Saturday, March 24, 2012

इतक्या वर्षानंतर का?


  येत्या ३१ ऑक्टोबरला त्या घटनेला २८ वर्षे पुर्ण होतील. ज्या दिवशी इंदिरा गांधींना त्याच्याच अंगरक्षकांनी जवळून गोळ्या घालून ठार मारले, त्या घटनेला. तेव्हा मी त्यावर एक लेख लिहिला होता. त्यात किशोरकुमारच्या ’चिंगारी कोई भडके’ या गाण्याचा उल्लेख केला होता. ते काव्य लिहिणार्‍या आनंद बक्षींचे कौतुकसुद्धा केले होते. मात्र तरी मला त्या क्षणी मरणार्‍या इंदिराजींच्या मनात, त्या अंतिम क्षणी काय भावना असतील त्याचा कधीच थांग लागला नव्हता. ज्यांनी जीव वाचवायचा, त्यांनीच जीव घेतला तर काय वाटत असेल? विश्वासघात, दगाबाजी असे शब्द खुप तोकडे असतात.

   तेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ठाण मांडले होते. त्यांना बाहेर काढायच्या सर्व योजना अपयशी ठरल्यावर, इंदिराजींनी तिथे सैन्य पाठवायचा धाडसी निर्णय घेतला होता आणि अंमलात आणला होता. त्यानंतार शिखांच्या भावना भडकल्या होत्या. त्याचा फ़ायदा उठवण्यासाठी खलिस्तानवादी अतिरेक्यांनी इंदिराजींना ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या. त्यामुळे मग पंतप्रधान असलेल्या इंदिराजींच्या भोवतीची सुरक्षा वाढवण्य़ात आली होती. शिवाय धोका नको म्हणून त्यातले शिख पोलिस व जवान काढून घेण्यात आले होते. पण इंदिराजींनी त्याला साफ़ नकार दिला. विशेषत: त्यांच्या सुरक्षेत दिर्घकाळ असलेल्या बियांतसिंग नावाच्या अधिकार्‍याला त्यांनी हट्ट करून परत तैनात करायला भाग पाडले होते. शेवटी त्यानेच घातलेल्या गोळ्यांनी त्यांची इहलोकीची यात्रा संपली.

   जेव्हा तो त्यांना गोळ्या घालत होता तेव्हा व त्या लागल्यावर, काही क्षण तरी त्या जिवंत नक्कीच असतील. त्यांना काय वाटले असेल? ज्याला आपण इतक्या विश्वासाने आपल्या सुरक्षेत पुन्हा आणले तो? यु टू ब्रूटस? हे शब्द आपण अनेकदा वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. इंदिराजींनी सुद्धा ऐकलेले असतील. पण त्यांना ते प्रत्यक्ष अनुभवावे लागले. शेवटचे काही क्षण का असेनात, पण त्यांना ते शब्द नक्की आठवले असणार. बियांतसिंग? ज्याने आधीच्या दहा वर्षात त्यांचे संरक्षण करण्यात धन्यता मानली, कर्तव्य मानले, ज्याला सुरक्षेतून बाजूला केल्यावर विश्वास दाखवून त्यांनी परत आणले, त्यानेच बेसावध गाठून त्यांचा जीव घ्यावा? ती शेवटच्या क्षणाची वेदना त्या जीवघेण्या गोळीपेक्षा भयंकर असेल ना? कदाचीत ती जिव्हारी लागलेली गोळी त्यांना अधिक प्रेमळ वाटली असेल. कारण तिनेच ती मनाची असह्य वेदना संपवली असेल. अशा जगात जगण्यापेक्षा त्यातून सुटका इंदिराजींना अधिक सुरक्षित वाटली असेल. विश्वासघाताने गोळी घालणार्‍या बियांतपेक्षा ती जीवघेणी गोळी जास्त विश्वासू वाटली असेल त्यांना. कारण तिने देहाच्या वेदनांपेक्षा भयावह अशा मानसिक यातनांमधून त्यांना मोक्ष दिला होता.

   खरेच देहाच्या वेदना, यातना खुप सौम्य असतात. त्यापेक्षा मनाला, काळजाला भेदणार्‍या; जखमी जायबंदी करणार्‍या वेदना भयंकर असह्य असतात. त्यापेक्षा मरण मोठे सुखद असू शकेल. त्या यातना सोसत जगणे मरण्यापेक्षा घाणेरडे मरण असते. झाडलेल्या गोळीपेक्षा ती झाडणारा जिव्हारी जखम करून गेला होता. तेव्हा मला ते कळले नव्हते. कित्येक वर्षे कळले नाही. इतक्या वर्षांनी ती वेदना मला आजच का कळावी? कोण जाणे? पण आज मी इंदिराजींच्या त्या दु:खाने मनसोक्त रडलो. त्या वेदनेसाठी रडलो. कधी कुणासाठी रडलो नसेन, इतका रडलो आज. नियतीच्या मनात काय असेल? हीच माझ्या माणुस असण्याची खुण असेल काय? की मला माणुस असण्याचा साक्षात्कार घडवण्यासाठी आताच त्या वेदनेचा अर्थ समजला असेल?

1 comment:

  1. भाऊ दुख आवर , होत अस कधी कधी , आता सुव्र्न्मान्दीर कारवाईत सामील असलेल्या अधिकार्यावर लंडन मध्ये हल्ला झाला त्याचा विचार करा हि विनंती कारण तुमच्यासारख्यांचे वाचून आमच्यासारखे आपली मते बनवत असतात

    ReplyDelete