Saturday, November 24, 2012

भगत सिंग आपल्यातलाच एक होता



आपल्या समाजात इतका भक्कम पाया प्रस्थापित करणार्‍या तालिबान व अन्य अतिरेकी संघटनांशी दोन हात कसे करायचे, यावर आपल्या देशात (पकिस्तानात) खुपच चर्चा व विचार चालू आहे. अर्थात ते योग्य व समर्थनियच आहे. तालिबानांनी आणलेली दहशत आणि माजवलेला थरार यांनी आपला देश कदाचीत कायमचा बदलून गेला आहे, प्रामुख्याने फ़ाटा प्रदेशातील लोकांचे जीवन तर ओळखण्यापलिकडे बदलले आहे. कधी संधी मिळालीच तर तिथले लोक सत्य बोलण्याची हिंमत करतात व सांगतात, कित्येक वर्षे त्यांना अविश्वसनीय इतक्या क्रौर्याचा अनुभव घ्यावा लागला आहे. त्यातून सुटका व्हावी अशी त्यांनी मागणी राहिली आहे, पण कोणी त्यांच्याकडे लक्षच दिलेले नाही.

खरे सांगायचे तर आपल्याला असलेले धोके व दहशत तालिबानांच्या पलिकडचे आहेत. आणि ही बाब अशी आहे, की आपल्याला त्याकडेच अधिक लक्ष देण्याची करज आहे. लोकांच्या मनाचा कब्जा ज्या अतिरेकाने घेतला आहे तो कदाचित खुद्द दहशतवाद्यांपेक्षा अधिक भयंकर धोका आहे. आणि अशी मानसिकता सर्वत्र आढळून येते आहे. चारही प्रांतांच्या मोठ्या महानगरात, आणि छोट्या शहरात व गावागावात ते जाणवते. प्लेगच्या साथीप्रमाणे तो धोका सर्वत्र वेगाने पसरतो आहे.

ती समस्या नुकतीच लाहोरमधल्या शदमान फ़वारा चौकाच्या नामांतर वादातून पुन्हा समोर आली आहे. मार्क्सवादी बुद्धीमंत, क्रांतीकारक व अत्यंत धाडसी स्वातंत्र्यवीर शहिद भगतसिंग यांचे नाव त्या चौकाला देण्यातून हा वाद उफ़ाळून आलेला आहे. तो शहिद कोण? ज्याला ब्रिटीश सत्तेच्या काळात १९३१ साली याच शदमान चौकात वयाच्या तेविसाव्या वर्षी फ़ाशी दिलेली होती.

याच वर्षीच्या १४ नोव्हेंबर रोजी दिलकश लाहोर समितीने भगत सिंगाच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा बहूमान करण्यासाठी या शदमान चौकाला त्याचे नाव देऊन नामांतराला मान्यता दिली होती. या समितीमध्ये प्रशासक, लेखक, आर्किटेक्ट, कलावंतांचा समावेश आहे. लाहोर या ऐतिहासिक महानगराचे सुशोभीकरण व तिथे रस्त्यांसह जागांचे नामांतर करण्यासाठी या समितीची नेमणूक झाली आहे.

ही मान्यता मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी लाहोर हायकोर्टाचे न्यायाधीश नासिर सईद शेख यांनी स्थानिक जिल्हा व शहर प्रशासनाला अशा नामांतराचा आदेश जारी करण्यापासून परावॄत्त करणारा आदेश लागू केला. एका अर्जाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी प्रशासनाकडे काही उत्तरे मागितली आहेत. तहरिके हुरमत ए रसूल संघटनेचे सदस्य व शदमान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, झहिद बट यांच्या अर्जावर हा आदेश देण्यात आला आहे. चौधरी रहमत अली यांनीच पाकिस्तान हे नाव देशाला दिलेले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्या चौकाला त्यांचे नाव देण्याचा प्रशासनाचा मनोदय होता. पण शहिद भगतसिंग फ़ाऊंडेशन व काही तथाकथित मानवाधिकार संघटनांच्या पुढाकाराने प्रशासनावर दबाव आणण्यात आला, म्हणूनच हे नाव बदलण्याचा निर्णय झाला, असे बट यांच्या अर्जात म्हटले आहे. भारताचे हित बघणारा गट यामागे असल्याचा हवाला देतांनाच अर्जामध्ये पवित्र कुराण व सुन्नहचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. पण याच समितीने आधीच रहमत अली यांचे नाव लाहोरमधील एका भुयारी मार्गाला देण्याची शिफ़ारस केलेली आहे.

लाहोरमध्ये भडक ओबडधोबड व गलिच्छ वा वाटावा असाच हा चौक आहे, इतक्या विचित्र पद्धतीने त्याच्या आसपासच्या इमारती व रस्ते रंगलेले आहेत. त्यामुळेच भगतसिंग सारख्या क्रांतीवीराच्या स्मारकासाठी हा विद्रूप चौक हे दुर्दैवच म्हणायला हवे. संपुर्ण उपखंडाच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा झालेल्या या माणसाच्या स्मारकासाठी यापेक्षा अधिक चांगली जागाच हवी. पण वस्तुस्थिती अशी, की त्याच चौकात ब्रिटीशांनी ८० वर्षापुर्वी त्या क्रांतीवीराला फ़ासावर चढवले होते. आणि म्हणूनच तो चौक हीच त्याच्या स्मारकासाठी ऐतिहसिक हक्काची जागा आहे, असा दावा लाहोरच्या नागरिकांचा एक गट गेली अनेक वर्षे करतो आहे. आपण त्या स्वातंत्र्यवीराचे खुप जुने देणे लागतो असे त्या गटाचे म्हणणे आहे. कारण आपला देश (पाकिस्तान) त्याच स्वातंत्र्यलढ्यातून उदयास आला, ज्यात लक्षावधी मुस्लिम, हिंदू, शिखांनी सारखाच भाग घेतला होता.

काही दशकांपासून आपल्या देशाच्या इतिहासाचे इतक्या बेशरमपणे विकृतीकरण करण्यात आले आहे, की फ़ारच थोड्या लोकांना आज वास्तव माहित असेल. १९४७ सालापुर्वी लाहोर शहर व जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक बिगर मुस्लिम म्हणजे प्रामुख्याने हिंदू व शिख वास्तव्य करीत होते. (पाकिस्तानी) पंजाबच्या अन्य जिल्ह्यातही जवळपास तसेच लोकसंख्येचे प्रमाण होते. जोवर सीमेच्या दोन्ही बाजूंना धार्मिक अत्याचार सुरू झाले नव्हते; तोवर ही परिस्थिती होती. ज्या फ़ाळणीमुळे मानवी इतिहासात सर्वात मोठे लोकसंख्येचे स्थलांतर झाले, ज्यामुळे मानवी हत्याकांड व आंधळ्या द्वेषाचा जन्म झाला, त्यापुर्वीची ही गोष्ट आहे.

भगत सिंगाच्या बाबतीत भारतीय गटबाजीचा विषय निघता कामा नये. भगत सिंगाचा जन्म तेव्हाच्या लायलपूर व आजच्या फ़ैसलाबाद जिल्ह्यातील झारनवाला गावात झाला. त्याचे शिक्षण लाहोरमध्ये झाले व त्याने पंजाबच्या अनेक जिल्ह्यात दौरे करून तरुणांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायची प्रेरणा दिली होती. समाजवादाने भारावलेल्या भगतसिंगाने देशाच्या अनेक शहरात जाऊन तरूणांना आपल्या अल्पायुष्यात प्रेरित केले होते. वस्तुस्थिती अशी आहे, की या (पाकिस्तानी) पंजाबच्या सुपुत्राची भारताने चांगली आठवण ठेवली आहे. त्याच्यावर चित्रपट, नाटके निघाली, पुस्तके छापली गेली, ही आपल्यासाठी लज्जास्पद बाब आहे. त्यामुळेच भगतसिंगाच्या स्मारकासाठी कोणी खास प्रयत्न वा लॉबींग करण्याची गरज नव्हती. त्याच्या कर्तृत्वानेच त्याला महान बनवले आहे. पण शोकांतिका अशी आहे, की पाकिस्तानच्या शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमातून आम्हीच त्याला पुसून टाकले आहे. जाणिवपुर्वक त्याला विस्मरणाच्या गर्तेत ढकलून दिले आहे.

म्हणूनच आपल्याला ज्याप्रमाणे दहशतवादाशी लढायची गरज आहे; तसेच आपल्याला अज्ञान व धर्मांधतेशी लढावे लागणार आहे. कारण त्यामुळे जो द्वेष व भ्रम निर्माण केला जातो, त्यातूनच अतिरेक व माथेफ़िरूपणा जन्माला येत असतो. शिक्षण क्षेत्रात याची सुरूवात खुपच पुर्वी झाली होती. पण जनरल झिया उल हक यांच्या लष्करी क्रांतीनंतर तिला अधिक वेग आला. आज आपल्याला ती प्रक्रिया उलट्या दिशेने माघारी फ़िरवण्याची गरज आहे. पण त्यासाठी योग्य निर्णय घेतले जात नाहीत. शालेय पाठ्यपुस्तकात अजून तोच चुकीचा विकृत पाढा वाचला जात आहे. वास्तवा पलिकडचे ठरलेले नायक व हिरो मुलांसमोर मांडले जात आहेत. आपला देश यापासून वाचवायचा असेल तर ताबडतोबीने दुरुस्त्या करण्याची गरज आहे. एका महान देशभक्त क्रांतीवीर व्यक्तीच्या नामकरणा सारख्या साध्या विषयात विरोध करून वाद निर्माण करण्याची जी मुभा मिळत आहे, त्यातून आपण कोणत्या धोक्याच्या सावटखाली जगत आहोत त्याची साक्ष मिळते. आणि अशी अनेक उदाहरणे आहेत.

लोकांची मानसिकता बदलणे अत्यंत गुंतागुंतीचे अवघड काम असते. अगदी बंदूकधारी दहशतवाद्यांच्या मागे जाण्यापेक्षाही लोकांची मनोवृत्ती बदलणे अवघड काम आहे. ह्या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नयेत. कारण त्या दोन्हीचा उपाय वेगवेगळ्या मार्गाने होऊ शकत नाही. त्याकडे आपण एकच मोठी समस्या म्हणून बघावे लागेल. दहशतवादाने आपल्या आयुष्यात केवळ हिंसाच आणलेली नाही, तर त्याने आपल्या मेंदूची फ़ेररचनाही केली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या मेंदूने आपल्याला अशा विचारांमध्ये गुंतवले आहे, की भूतकाळतून बाहेर पडण्यापासून ते विचार आपल्याला परावृत्त व भयभीत करतात.

अशा विचारातून एक संदेश सर्वत्र पोहोचवला जात असतो, जो मलाला युसूफ़जाईच्या विरोधात बदनामीच्या मोहिमा चालवतो. मलाला ऐवजी डॉ. अफ़िया सिद्दिकीच्या नावाने दिवस साजरा करायचा प्रचार होतो. तोच विचार तुम्हाला सतत भारताकडे शत्रू म्हणून बघायला प्रवृत्त करत असतो आणि दुसरीकडे पाकिस्तानातले अल्पसंख्यांक व महिलांच्या सशक्तीकरणाकडे डोळेझाक करायला भाग पाडत असतो. कुठल्यातरी मार्गाने हे चित्र बदलले पाहिजे, ज्यामुळे लोक आपल्या भूतकाळाविषयी सत्य जाणतील, शिकतील आणि त्यायोगे आपल्याला वर्तमान काळात काय करणे अगत्याचे आहे, याचा (पाकिस्तान्यांना) त्यांना बोध होऊ शकेल

कोमिला हयात ( लेखिका पाकिस्तानातील एक ज्येष्ठ पत्रकार व एका प्रनुख दैनिकाच्या माजी संपादिका आहेत. त्या ‘द न्यूज’ दैनिकात व अन्यत्र नेहमी वैचारिक लिखाण करीत असतात. हे त्यांच्या मूळ लेखाचे स्वैर रुपांतर आहे. शक्य असेल त्यांनी मूल इंग्रजी लेख मुद्दाम वाचावा.)
=====================.
http://www.thenews.com.pk/Todays-News-9-144392-Bhagat-Singh-was-one-of-us

4 comments:

  1. Very nice to read such a person ' komilla hayat ' very much appreciated.

    ReplyDelete
  2. अतिशय परखड लेख

    ReplyDelete
  3. शेवटी सत्य उघडकीला आले.हिंदुस्तानच्या द्वेषावरच ज्यांची निर्मिती झाली आहे भगतसिंगासारख्याची महती कशी कळणार ?

    ReplyDelete