Friday, September 6, 2013

उतावळेपणाचा दुष्परिणाम

 
 
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाला आता दोन आठवड्याचा कालावधी उलटू्न गेला आहे आणि पोलिसांना अजून तरी कुठलाही ठाम तपास लावता आलेला नाही. आता कुठे शंकास्पद दाखलेबाज गुन्हेगारांना ताब्यात घेऊन जो तपास सुरू झाला आहे, तो मात्र नक्कीच योग्य दिशेने घेऊन जाईल, अशी शक्यता अधिक आहे. कारण आता पोलिसांनी कुठल्याही गदारोळाकडे साफ़ दुर्लक्ष करून थेट गुहेगारी जगताकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यात मग शिर्डी येथून ताब्यात घेतलेला कोणी आसिफ़ असेल वा चन्या बेग असेल. हे जरी थेट मारेकरी म्हणून ताब्यात घेतलेले नसले, तरी ते अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यातले दाखलेबाज गुन्हेगार आहेत. त्यामुळेच त्या खुनात भले त्यांचा सहभाग नसला, तरी असा गुन्हा घडतो, तेव्हा गुन्हेगारी जगात त्याबद्दल उहापोह सुरू होत असतो. आपल्या भागात वा आपल्याप्रमाणे को्णी ‘गेम’ केला, त्याबाबतीत असे लोक अतिशय संवेदनाशील असतात. कोण मारला गेला, यापेक्षा त्यांना कुठे, कसा व कोणी मारला यात अधिक रस असतो. कारण आपल्या ‘कार्यक्षेत्राचे’ उल्लंघन झाले असेल, तर ही मंडळी कमालीची विचलीत होत असतात. दाभोळकरांच्या हत्याकांडातील सर्वात प्रमुख दुवा, ती सुपारीबाज हत्या असल्याचा होता. ज्याप्रकारे जागा, वेळ व हल्ल्याची पद्धत होती; ती सुपारीबाज खुन्याला शोभणारीच होती. त्यामुळे त्याच दिशेने पहिल्या दिवसापासून त्याचा तपास सुरू व्हायला हवा होता. पण थेट मुख्यमंत्र्यापासून तोंडाळ लोकांनी जी वाचाळता दाखवली; त्यामुळे पोलिसांना खर्‍या दिशेने तपास करणेच अशक्य होऊन बसले होते. दाभोळकरांविषयी आस्था दाखवणार्‍यांनी ज्या बाबतीत संशय व्यक्त करण्याचा सपाटा लावला, त्यामुळे तपासाची दिशा भरकटली होती.

   दाभोळकर यांच्या आंदोलन व चळवळीला ज्यांचा विरोध होता, त्यांच्याकडून बोलताना वा लिहिताना काही अवास्तव बोललेही गेले असेल. पण त्या शब्दांना तपासात किती किंमत द्यायची; हा मुद्दा महत्वाचा होता. हत्या व हल्ल्याचा प्रकार बघितला, तर लगेच हे सुपारी किलींग म्हणजे भाडोत्री खुन्यांकडून करून घेतलेले काम आहे, हे लक्षात येऊ शकत होते. त्यातली सफ़ाई व निसटण्याची चतुराई व्यावसायिक चतुराई दाखवत होती. त्यामुळेच खुनाचे सुत्रधार शोधण्यापेक्षा खरे हल्लेखोर ताब्यात घेणे वा त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. असे हल्लेखोर मिळाले, मग खर्‍या सुत्रधार वा सुपारी देणार्‍यापर्यंत जाऊन पोहोचणे अवघड रहात नाही. पण त्या हल्लेखोरांच्या मागावर जाण्याची सवड व मोकळीक गदारोळ करणार्‍यांनी पोलिसांना दिलीच नाही. सनातन वा हिंदुत्ववादी किंवा वारकरी संप्रदाय यांच्याविषयी पहिल्या दिवसापासून इतका गहजब करण्यात आला, की मोडस ऑपरेंडीनुसार हा सुपारी गुन्हा असल्याचेही स्पष्टपणे बोलून दाखवायची पोलिसांना हिंमत राहिली नाही. परिणामी असे मारेकरी, शार्पशुटर शोधण्यापेक्षा बोंबलणार्‍यांच्या समाधानासाठी सनातनच्या कोणा साधक व्यक्तीला पकडण्यासाठीच पोलिसांना आपली शक्ती पणाला लावणे भाग पडले. शेवटी गोव्यात कुणा साधकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हाच हा गहजब थांबला. अर्थात त्याचा तपासात काहीही उपयोग झाला नाही. त्याला गोव्यातून पुण्यात आणून पोलिसांनी जबानी घेऊन सोडून दिले. पण त्यामुळे सनातन विरोधी चाललेला गदारोळ थांबला आणि पोलिसांना खर्‍या गुन्ह्याच्या तपासाचा मार्ग खुला झाला. त्यांनी गुन्ह्याची पद्धती व घटनाक्रमाच्या आधारे गुन्हेगार जगताकडे डोळे वटारून योग्य शोध सुरू केला आहे.

   वाचाळ दाभोळकर समर्थकांनी गहजब केला नसता व पोलिसांना अकारण सनातनच्या दिशेने भरकटवले नसते; तर असे डझनभर सुपारीबाज पकडून त्यापैकी एकाकडून तरी दाभोळकरांचा गेम करणार्‍यापर्यंत नक्कीच मजल मारली असती. त्याला प्राधान्य अशासाठी आहे, की असे मारेकरी सामान्य बुद्धीचे असतात आणि विनाविलंब सुपारी देणार्‍यांची म्हणजे खर्‍या सुत्रधाराची नावे मिळू शकतात. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील मारेकरी सापडल्यावर पोलिसांना खासदार असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला नव्हता. पण तोच तपास आधीच पाटलांचे धागेदोरे शोधण्यात गुरफ़टला असता, तर खरे मारेकरी बेपत्ता व्हायला सवड मिळाली असती. आणि मग सहजासहजी पाटलांपर्यंत पोहोचता आलेच नसते. इथे नेमकी तीच चुक झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनीही पहिल्याच दिवशी कारस्थान असल्याची भाषा बोलून सुरुवात केली आणि आठवडाभर पोलिसांना मारेकर्‍याचा शोध घेण्य़ापेक्षा नुसत्याच संशय व्यक्त करणार्‍या शंकासुरांच्या समाधानाला प्राधान्य द्यावे लागले आहे. थोडक्यात दाभोळकरांविषयी आत्मियता दाखवताना ज्या लोकांनी सनातनविषयी आपला सुड उगवण्याचे उपदव्याप केले; त्यांनीच या तपासाची दिशा भरकटून टाकण्याचे मोठे पाप केले. त्यातून पोलिस तपासात जो व्यत्यय आणला आहे, त्याचा लाभ म्हणून हल्लेखोर व त्यांचे सुत्रधार असतील, त्यांना धागेदोरे लपवायला सवड मिळाली त्याचे काय? जेव्हा पोलिसतपास व आपुलकी यांच्यात गल्लत केली जाते; तेव्हा मग असाच कामाचा विचका होतो. महत्वाच्या वेळेचाही कालापव्यय होऊन जातो. थोडक्यात ज्यांनी आपल्या आपुलकीचे नको तिथे प्रदर्शन मांडण्याची हौस भागवून घेतली, ते उतावळेच या तपासकामातले खरे अडसर झाले म्हणावे लागते.

1 comment:

  1. खरे आहे ंऎ तुमच्या शी सहमत आहे .

    ReplyDelete