Thursday, November 14, 2013

भाडोत्री न्यायदाते?

   पुढल्या आठवड्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाला तीन महिने पुर्ण होत आहेत आणि अजून त्या प्रकरणाचा धागादोराही पुणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अशा स्थितीत पुण्याच्या शंकरशेट मार्गावर एका हॉटेलमध्ये, कुख्यात गुंडाची अधिक भयावह पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे. इतकी भीषण घटना घडलेली असूनही त्याबद्दल पोलिसांना कुठलाही दुवा मिळू शकलेला नाही. दाभोळकरांची हत्या भल्या सकाळी हमरस्त्यावर झाली होती तर कुणाल पोळ या गुंडाची हत्या मध्यरात्री एका हॉटेलमध्ये झाली आहे. पहिल्या प्रकरणात एकदोन मारेकर्‍यांनी पाठलाग करून गोळ्या झाडत पोबारा केलेला असू शकतो. पण त्यापेक्षाही दुसरा गुन्हा अधिक भयकारी आहे. कारण यायला बळी गुंड असून तो नुकताच तुरूंगातून बाहेर आलेला होता. शिवाय आपल्यावर असा प्राणघातक हल्ला होऊ शकतो, हे ठाऊक असल्याने तो अतिशय सावधही असणार. इतके असूनही तो त्या हॉटेलमध्ये अवेळी गेला असताना दहापंधरा हल्लेखोरांनी त्याच्या देहाची चाळण होऊन जाईल, इतका अफ़ाट गोळीबार केला आहे. म्हणजेच ही घटना काही मिनिटे सलग घडत असावी. थोडक्यात दाभोळकर हत्येइतके हे काम सोपे नाही. इतक्या हल्लेखोरांना नेमक्या जागी पोहोचणे बेछूट गोळीबार करून निसटणे, सोपे अजिबात नाही. तरीही त्यांनी आपले काम चोख बजावले आहे आणि सर्वच हल्लेखोर सहीसलामत निसटले आहेत. याचा अर्थ इतकाच, की पुण्याचा पोलिस बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. ताज्या हत्याकांडाने पुण्याच्या पोलिस यंत्रणेच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब केले, असेच म्हणता येईल. परिणामी दाभोळकर हत्येचे कोडे उलगडले जाईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

   अर्थात दाभोळकर यांच्या हत्याकांडाचे पडसाद उमटणे अपरिहार्य होते. कारण हा माणूस सभ्य अजातशत्रू असा कार्यकर्ता होता. उलट कुणाल पोळ हा समाजकंटक होता. म्हणूनच त्यावरून माध्यमात याप्रकरणी काहूर माजणे असंभव आहे. पण म्हणून त्या घटनेने निर्माण केलेली स्थिती बदलत नाही. हे हत्याकांड ही दाभोळकर हत्येची पुढली पायरी आहे, हे विसरून चालणार नाही. कुणाल पोळ याने निवडलेली जीवनशैली अशाच पद्धतीने शेवटाला पोहोचत असते. पण त्यातून समाजाच्या सुरक्षेला व कायदा व्यवस्थेला आव्हानही दिले जात असते. कुणी गुन्हा केला वा कायदा धाब्यावर बसवला; म्हणून त्याला दंडीत करण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. अगदी ज्याच्यावर अन्याय झाला, त्यालाही परस्पर गुहेगाराला शिक्षा करायची मुभा कायद्याच्या राज्यात नसते. तिथे पोलिसांनी व कायद्याने हस्तक्षेप करायचा असतो. इथे अर्थातच कुणालचे जे कोणी शत्रू आहेत किंवा त्याने दुखावलेले लोक आहेत, त्यांनी परस्परच त्यांच्या शत्रूची विल्हेवाट लावलेली आहे. त्यांचे आक्षेप खरे वा योग्यही असतील. पण म्हणून त्यांना कायदा हाती घेऊन न्यायनिवाडा करायचा अधिकार नाही. तशी मुभा दिली गेल्यास कोणीही कोणालाही शिक्षा देऊन तिची अंमलबजावणी करू लागेल आणि समाजात अराजकच माजल्यासारखे होईल. कुणालची हत्या म्हणूनच महत्वाची आहे. जेव्हा अशा हत्या किवा घटनांकडे दुर्लक्ष होते, तेव्हाच मारेकरी किवा खाजगी ‘न्यायदाते’ निर्माण होतात, ज्यांना आजकाल सुपारी हल्लेखोर मारेकरी म्हणून ओळखले जाते. त्यातूनच मग दाभोळकरांच्या हत्येसारख्या घटनांना मोकळीक मिळत असते. ज्याला कोणाला आपल्या शत्रूचा काटा काढायचा असतो, तो अशा ‘भाडोत्री‘ न्यायदात्यांकडे जाऊ लागतो.

   कुणालच्या हत्याकांडाची पार्श्वभूमी तपासणे म्हणूनच अगत्याचे आहे. बातमीनुसार तो अमुक एका हॉटेलमध्ये आलेला असल्याचे त्याच्या मारेकर्‍यांनी आधीच खात्रीपुर्वक तपासून व खातरजमा करून घेतलेले होते. कुणाल तिथे एकटा नव्हता, काही साथीदारांसह तिथे आलेला होता. म्हणजेच हत्याकांडाचे साक्षीदार असणार, उरणार याचीही हल्लेखोरांना खात्री होती. तरीही त्यांनी अशा हल्ल्याचा धोका पत्करलेला आहे. जितक्या गोळ्या झाडल्या गेल्याचे बातमीतून स्पष्ट होते, त्याकडे बघता जणू ते हॉटेल युद्धभूमीच झालेले होते. गोळ्यांचा अक्षरश: पाऊसच पाडला गेला आणि कुणाल मारला गेल्याची खात्री पटल्यावरच खुनी तिथून बाहेर पडले. याचा सरळ अर्थ इतकाच, की दहाबारा मिनीटे गोळीबार चालू होता, त्यात पोलिस वा कायद्याचा कुठलाही व्यत्यय येण्याची भिती त्या हल्लेखोरांना नव्हती. खेरीज तिथून निसटताना आपल्याला अडथळा येणार नाही, याचीही हमी त्यांना होती. दहापंधरा हल्लेखोर एकत्रित इतका भीषण हल्ला करायच्या जागी एकाच वेळी पोहोचू शकतात आणि सहजगत्या निसटूही शकतात, यातून पुण्याच्या सुरक्षा व कायदा व्यवस्थेची प्रकृती किती ढासळली आहे, त्याचीच साक्ष दिली जाते. ही सरकार व पोलिसांसाठी अत्यंत लांच्छनास्पद अशीच बाब आहे. कारण इथे सभ्यगृहस्थ दाभोळकर किंवा कुणाल गुंड यांचीच हत्या झालेली नाही, तर त्यातून पोलिस व कायद्याच्या राज्याला आपण जुमानत नाही, याचीच साक्ष त्या हल्लेखोरांनी दिलेली आहे. दाभोळकरांची हत्या पचवता आली, म्हणून आता इथपर्यंत गुन्हेगार मजल मारू शकले हे विसरता कामा नये. आता पुणे ही विद्यानगरी वा बुद्धीमंतांचे गाव राहिलेले नसून ते माफ़ियांचे सामाज्य झाले आहे, त्याचीच उदघोषणा यातून त्या मारेकर्‍यांनी केली आहे. कारण दाभोळकर हत्याकांड अनुत्तरीत असताना कुणालच्या हत्याकांडातून त्या हल्लेखोरांनी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेलाच जखमी व अपंग करून टाकले आहे.

No comments:

Post a Comment