Wednesday, November 20, 2013

मळलेली कलंकित झाडू



  शहाजोगपणा किंवा मानभावीपणा म्हणजे काय ते बघायचे असेल, तर आपण अरविंद केजरिवाल यांचा चेहरा बघावा; असे म्हणायची पाळी या माणसाने राजकारणात प्रवेश केल्यापासून आणली आहे. आधी त्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा पवित्रा घेऊन सरकारी नोकरी सो्डत समाजसेवेचे व्रत घेतले होते. मग त्यातूनच विविध जनहिताची कामे करताना त्यांच्याभोवती जो तरूणांचा गोतावळा तयार झाला,; त्यातून त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा निर्माण झाल्या असाव्यात. त्यातही काही गैर नाही. कुणी समाजसेवेतून राजकारणात येणे अजिबात चुकीचे नाही. पण ज्याने राजकारणाची दलदल साफ़ करण्याचे संकल्प सोडून राजकारणाचा तंबू थाटला; त्याने आपल्यावर कुठल्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी. राजकारणात शिरल्यापासून केजरिवाल यांनी आपल्या स्वच्छ चारित्र्याचा कुठलाही दाखला देण्यापेक्षा इतरांवर चिखलफ़ेक करण्यालाच स्वत:च्या चारित्र्याचा दाखला असल्याचा आभास निर्माण केला होता. तसे पाहिल्यास राजकारणात त्यांनी येण्यापुर्वीच त्यांच्यावर अनेकांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप ठेवलेले होते. पण प्रत्येकवेळी अण्णा हजारे यांच्या पदराआड लपून केजरीवाल यांनी आपला चेहरा झाकला होता. मात्र ताज्या घडामोडीत खुद्द अण्णांनीच त्यांच्याविषयी शंका व संशय व्यक्त केल्याने केजरीवाल यांचा मुखवटा पुरता फ़ाटला आहे. आपल्या नावावर आणि आंदोलन काळात प्रचंड रक्कम जमा झाली; त्याचे काय झाले, अशी शंका आता खुद्द अण्णांनीच पत्र पाठवून विचारली आहे. त्याचे उत्तर अण्णांना थेट पाठवले तरी चालले असते. पण पक्षकार्य वा समाजकार्य म्हणजे पत्रकार परिषद घेऊन बोभाटा करणे; हीच समजूत असलेल्या केजरिवाल यांनी सर्वाच घोटाळा करून टाकला.

   अण्णांच्या पत्राची जाहिर वाच्यता केजरिवाल यांनीच पत्रकार परिषदेत केली. तिथे कोणा भाजपा कार्यकर्त्याने त्यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचा प्रयास केला आणि तेच निमित्त धरून केजरिवाल यांनी भाजपा व कॉग्रेसचे धाबे दणाणल्याने आपल्यावर आरोप होत आल्याचा कांगावा करून टाकला. पण अण्णांच्या शंकाचे निरसन मात्र त्यांना करता आलेले नाही. इतरांवर केजरिवाल यांनी आरोप केल्यावर त्याची चौकशी होण्यापुर्वीच ते गुन्हेगार असल्याची घोषणा करून टाकणारा हाच माणूस; आता आपल्यावरच्या आरोपाची चौकशी व्हावी म्हणतो आहे. यापुर्वी त्यांच्याच पक्षाचे मुंबईतील नेते मयंक गांधी व अंजली दमाणिया यांच्यावर आरोप झाल्यावर केजरिवाल यांनी चौकशी करण्याचे सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले? प्रशांत भूषण यांच्यावरही असेच जमीन बळकावचे आरोप होते, त्याचे पुढे काय झाले? या आरोपातून आपले सहकारी मुक्त झाल्याचे वा निर्दोष सुटल्याचा कुठला पुरावा अजून तरी केजरिवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केल्याचे, ऐकण्यात नाही. मग आता अण्णांनी त्यांच्याकडे खाजगीत पत्राद्वारे खुलासा मागितलेला असताना जाहिर खुलासा कशाला द्यायचा? हा अत्यंत धुर्त माणूस तिथेच फ़सला. कारण अण्णांना खाजगी पत्र पाठवण्याला ज्यांनी फ़ुस दिलेली होती, त्यांनी हा सापळा लावला असावा. कारण उत्साहाच्या भरात केजरिवाल खुलासा करणार याची त्यांना खात्री असावी. तो खुलासा होताच अण्णांही भीडेस्तव केजरिवालच्या विरुद्ध बोलणार नाहीत, हे गृहित असावे. पण अशी दोन्हीकडून आळीमिळी गुपचिळी झाल्यावर अण्णांशी वर्षभरापुर्वी झालेल्या खाजगी भेटीत कोणीतरी अण्णांचे केजरिवाल विषयी असलेले मत समोर आणले. चोरून केलेल्या त्या चित्रणाने केजरिवाल यांचा मुखवटा फ़ाटून गेला.

   आपल्या विरुद्ध हे कारस्थान असल्याचा केजरिवाल यांचा आरोप खोटा अजिबात नाही. आजवर त्यांनी अनेकांचे मुखवटे फ़ाडले आणि त्यासाठी कारस्थानी रितीनेच आरोप केले व लोकांना गोत्यात आणलेले आहे. नेमक्या त्याच पद्धतीने कोणीतरी त्यांना आज गोत्यात आणले आहे. आधी खुलासा द्यायला भाग पाडून नंतर तो खुलासा किती बनवेगिरी आहे; तिचा पुरावा अण्णांच्या जुन्या चित्रणातून समोर आणलेला आहे. हे चित्रण जुने असून आताच निवडणूकीच्या तोंडावर समोर आणणारे कारस्थानी आहेत, हा केजरिवाल यांचा आरोप म्हणूनच खरा आहे. पण म्हणून ते चित्रण खोटे पडत नाही. त्यात अण्णांनी व्यक्त केलेले मत आणि विचारलेल्या शंकांचा खुलासा केजरिवाल यांच्यापाशी नाही. अण्णांनी केजरिवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी विविध आंदोलने व कार्यक्रमातून निधी गोळा करण्याचा इद्योग केला व त्याचा अपहार केल्याची शंका व्यक्त केलेली आहे. गैरप्रकार घडल्याचे व घडत असल्याचाही संशय व्यक्त केला आहे. त्याच कागदोपत्री इन्कार केजरिवाल का करू शकलेले नाहीत? वाड्रा, गडकरी वा अन्य राजकारण्यांची कागदपत्रे मांडून खुलासा मागणार्‍या केजरिवालांकडे आता कागदोपत्री खुलासा देण्याइतके ‘पारदर्शक’ पुरावे का नाहीत? इतरांनी तपास करण्याची गरजच काय? आपल्यापाशी असलेली कागदपत्रे किंवा बॅन्केची खातेपुस्तिका. वर्गणी देणगीची पावतीपुस्तके थोबाडावर मारून केजरिवाल आरोपकर्त्यांचे तोंड बंद करू शकतात ना? पण त्यासाठी मानभावीपणा पुरेसा नाही. अण्णांच्या पत्राचे राजकीय भांडवल करायला गेलेल्या केजरिवाल यांच्या पावित्र्याचे सोंग उघडे पडले आहे. राजकारणात झाडू निशाणी घेऊन आलेल्या केजरिवाल यांनी घाण साफ़ करताना आपणही त्याच घाणीने माखलो असल्याची साक्ष दिली म्हणायची.

No comments:

Post a Comment