Monday, November 25, 2013

न्यायाचे निकष कोणते?



   ‘टहलका’चे संस्थापक व संपादक तरूण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच संस्थेत काम करणार्‍या तरूण पत्रकार महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर उच्चभ्रू समाजातील अनेक मान्यवरांचे व प्रतिष्ठीतांचे मुखवटे फ़ाटत चालले आहेत. कुठल्याही संघटित गुन्हेगारीमध्ये परस्परांमध्ये एकमेकांचे गुन्हे लपवायचा एक अलिखित करार असतो. त्यामुळे वरकरणी एकमेकांची पापे चव्हाट्यावर आणायचा आव आणणारे अनेक उच्चभ्रू प्रतिष्ठीत; प्रत्यक्षात परस्परांना संभाळून घेत असतात. अगदी कुठल्याही गुन्हेगार टोळीत नेमकी हीच नितीमत्ता असते. जोपर्यंत छोटा राजन हा दाऊदच्या टोळीत कार्यरत होता तोपर्यंत त्याने कधीच दाऊदच्या पापाचा उच्चार केला नव्हता. पण दोघांमध्ये फ़ाटाफ़ूट झाल्यावर त्यांनी एकमेकांवर दोषारोप सुरू केलेले होते. टोळीतला एखादा गुन्हेगार माफ़ीचा साक्षीदार होऊन साक्ष देतो; तेव्हाच त्यांची लपलेली पापे चव्हाट्यावर येत असतात. छोटा राजन याने दाऊदची पापे सांगितली, म्हणून त्याच्या पापांना माफ़ी नसते. पण निदान त्यामुळे गुन्ह्याचे धागेदोरे तरी सापडायला मदत होते. उच्चभ्रूंची संघटित गुन्हेगारी नितीमत्ता त्यापेक्षा वेगळी नसते. ती पाळली जाते तोपर्यंत त्यांचे उजळमाथ्याने समाजात वावरायचे मुखवटे सुरक्षित असतात. काही वर्षापुर्वी त्याच नितीमत्तेला तडा गेला. दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात वावरत असलेल्या काहीजणांनी आपापल्या वैचारिक किंवा सैद्धांतिक भूमिकांच्या आहारी जाऊन इतरांचे मुखवटे फ़ाडण्याचा प्रयास सुरू केला. त्यातून तरूण तेजपाल नावाचा एक ‘महान पत्रकार’ उदयास आला. त्याने छुपा कॅमेरा वापरून अनेक प्रतिष्ठीतांची अब्रू चव्हाट्यावर आणायच्या कारवाया सुरू केल्या. त्याला अर्थातच अनेक बुद्धीमंतांनी सैद्धांतिक बांधिलकीमुळे पाठींबा व समर्थन दिले.

   जेव्हा एनडीए सरकार सत्तेवर होते, तेव्हा त्याला पराभूत करण्याची राजकीय इच्छाशक्ती व कुवत गमावून बसलेल्या सेक्युलर राजकारण्यांनी तरूण तेजपाल नावाच्या अट्टल गुन्हेगारी वृत्तीच्या भंपक पत्रकाराला हाताशी धरून त्याच्या ब्लॅकमेल करणार्‍या पत्रकारितेला प्रतिष्ठा बहाल केली. जे काम राजकीय कुवतीने साध्य होणार नव्हते, ते बदनामीतून साधण्याच्या सुपारीबाजीने तेजपाल पैसे मिळवू लागला व प्रतिष्ठीतही झाला. पण जितका तो अशा ‘प्रतिष्ठीतांच्या’ संगतीत वावरू लागला, तसतसा त्यालाही त्यांचेच छंद लागले. ‘टहलका’ नावाचा एक दरारा निर्माण झाला. कुणाचीही कुलंगडी काढायची आणि बदल्यात अशा प्रतिष्ठीतांना बदनामीचा धाक दाखवून पैसे उकळायच धंदा राजरोस सुरू झाला. मात्र त्याची वाच्यता अन्य कुठल्या माध्यमात होत नव्हती. कुणी त्याचे पुरावे आणून दिले तरी माध्यमातल्या ‘बुजूर्गांनी’ त्या पुराव्यांना भिक घातली नव्हती. त्यातूनच तेजपाल व टहलकाची दहशत वाढत गेली. मिळालेल्या ताकदीची मस्ती चढणे अपरिहार्यच असते. मग त्याचे चटके त्या नियतकालिकात काम करणार्‍या तरूणी व महिलांना बसू लागले. पण बाकीच्या प्रतिष्ठीतांच्या अब्रुचे धिंडवडे काढणार्‍याच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? ज्या महिलांनी हे चटके सोसले, त्यांनी ज्याच्याकडे तक्रार करायची, तीच अत्याचार करणार्‍याची भागीदार आणि इतरांना महिला अधिकाराची महत्ता सांगणारी असल्यावर न्याय मागायचा तरी कुणाकडे? अर्थात तेवढा तेजपाल एकटाच अन्याय अत्याचार करणारा म्हणायचे कारण नाही. त्याच्या या ‘मिळकती’मध्ये अनेक प्रतिष्ठीत भागिदार असणार, यातही शंका नको. म्हणूनच जेव्हा तेजपालचे हे गोवा प्रकरण न्याय मागायला टाहो फ़ोडत होते, तेव्हा बाकीची माध्यमे व पत्रकार अमित शहाच्या फ़ोन संभाषणावर गदारोळ माजवण्यात गर्क होती.

   खरोखरच या माध्यमांना त्या अनामिक गुजराती तरूणीच्या सुरक्षा वा स्वातंत्र्याची चाड होती, की तेजपाल प्रकरणाला वाचा फ़ुटण्याच्या भयाने सर्वच माध्यमे लोकांची दिशाभूल करण्यासाठी अमित शहाचे ‘साहेब’ प्रकरण गाजवत होते? पण केवळ सोशल मीडियाच्या कुजबुजीला जोर चढल्याने वाहिन्या व माध्यमांना तेजपाल प्रकरणात लक्ष घालावे लागले. अशाच एका कार्यक्रमात, चर्चेत सहभागी होताना ज्येष्ठ संपादक पत्रकार विनोद मेहता यांनी अधिकच भयंकर सत्य सांगून टाकलेले आहे. त्याचा पाठपुरावा कुणा पत्रकाराला किंवा महिला आयोगाला करावासा वाटू नये; याचे नवल वाटते. ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर बोलताता मेहता यांनी हाच प्रकार बहुतेक नावाजलेले संपादक, पत्रकार नवख्या विद्यार्थी पत्रकार मुलींशी नित्यनेमाने करीत असतात, असा दावा केला होता. आजच नव्हेतर गेल्या कित्येक वर्षात हेच चालू असुन त्यात बरबटलेले अनेकजण मान्यवर संपादक ज्येष्ठ पत्रकार झाले आहेत असे मेहता यांनी सांगितले. महिला आयोगाला अमित शहाच्या संभाषणाची फ़िकीर आहे. त्यात कुठलीही इजा झालेली नाही, त्या मुलीची चिंता आहे. पण मेहता यांनी उघडपणे सांगितलेल्या माध्यमातील मुखंडांनी शेकडो तरूण मुलींचे पत्रकार म्हणून केलेल्या लैंगिक शोषणाची दखलही घ्यावी असे का वाटू नये? टहलका प्रकरणातली पिडीत तरूणी आजही एकाकी लढते आहे. तिच्या मदतीला किती महिला अधिकार संस्था पुढे आल्या? येणार नाहीत, कारण यात गुंतलेली आरोपीची भागिदार शोमा चौधरी त्यांच्यापैकीच एक ‘प्रतिष्ठीत मान्यवर’ आहे. मेहता म्हणतात ते बहुतांश पत्रकार त्याच सेक्युलर टोळीतले आहेत. अमित शहा त्या टोळीतला नाही. हा सेक्युलर न्यायाच्या निकषातला फ़रक आहे.

No comments:

Post a Comment