Thursday, November 7, 2013

गरजते वो बरसते नही



  गेल्या दोन वर्षात इंटरनेट नावाच्या तंत्रज्ञानाने जगाला अनेक धक्के दिलेले आहेत. भारतामध्ये अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद, त्याचाच पुरावा होता. पण इजिप्त किंवा पाश्चात्य देशात जशी त्यातून राजकीय उलथापालथ घडून आली; तितकी अजून भारतीय इंटरनेटची मजल गेलेली नाही. म्हणूनच केवळ माध्यमे वा सोशल मीडियाचा वापर करून क्रांती घडवू बघणार्‍या लोकांचा भ्रमनिरास होऊ लागलेला आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि अण्णा हजारे यांच्या छायेतून प्रकाशात आलेले नवे राजकारणी अरविंद केजरीवाल, त्यापैकीच एक आहेत. अण्णांच्या लोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी फ़ेसबुक व मोबाईल माध्यमातून लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला होता. मग त्याचे प्रतिबिंब माध्यमातून पडत असले, म्हणून खरेच प्रत्यक्ष समाजजीवनावर त्यांच्या आंदोलनाचा किती प्रभाव पडू शकला होता? जोपर्यंत ही मंडळी आंदोलनात होती तोपर्यंत मिळणारा प्रतिसाद त्यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याचा पवित्रा घेतल्यावर ओसरत गेला. किंबहूना दिल्लीनंतर त्यांनी मुंबईत आरंभलेल्या उपोषण आंदोलनाचा पुरता बोजवारा उडाला होता. तेव्हा कांगावा करीत केजरीवाल यांनी सरकारने लोकांची कोंडी केल्याचा आरोप केला होता. पण अखेरीस दोनच दिवसात अण्णांसह केजरिवाल यांना मुंबईतील गाशा गुंडाळावा लागला होता. मग त्यांच्यापासून अण्णा सावध झाले. तेव्हा केजरीवाल यांनी आपले व्यक्तीगत महात्म्य वाढवायला सुरूवात केली आणि अनेकजण त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा ओळखून त्यांच्यापासून दुरावत गेले. मग आंदोलनाची कास सोडून केजरीवाल यांनी आरोपबाजीची नवी लढाई सुरू केली. सतत प्रसिद्धीत रहाण्याने सत्तेपर्यंत जाण्याचे त्यांचे डाव पुरते फ़सले आहेत.

   राजकारण म्हणजे घाण, उकिरडा, भ्रष्टाचाराचे आगर असली भाषा वापरणार्‍या केजरीवाल यांनी मग राजकारणाचा कचरा उपसण्याचा पवित्रा घेऊन नागरिकांना उजवा म्हणजे स्वच्छ राजकारणाचा पर्याय देण्याचा पवित्रा घेतला. आम आदमी पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. त्यात आधीपासूनच त्यांच्या सोबत असलेले जुन्या संघटनेचे कार्यकर्ते सहकारी सहभागी झाले. तर किरण बेदी यांच्यासारख्यांनी त्यापासून फ़ारकत घेतली. पण लोकपाल म्हणून प्रसिद्धी संपादन केलेला चेहरा घेऊन आपण निदान दिल्लीत आपले राजकीय बस्तान बसवू शकतो; अशा आशेवर केजरीवाल धडपडत राहिले. अण्णांप्रमाणे पांढरी टोपी डोक्यावर चढवून त्यावर त्यांच्या पाठीराख्यांनी मग अण्णांच्या आंदोलनाच्या वारशाचे भांडवल करण्याचा सपाटा लावला. पण साठ वर्षे मुरलेल्या भारतीय मतदाराला भुरळ घालण्यात असली नाटके उपयोगी पडेनाशी झाल्याची त्यांना आता जाणीव झालेली असावी. नुसते इंटरनेट किवा माध्यमातून झळकल्याने आपल्या झोळीत मते पडायची खात्री वाटेनाशी झाल्यावर अस्सल राजकीय मुरब्बी नेत्याला शोभेल अशा चाकोरीतून केजरीवाल वाटचाल करू लागले. त्यांनी इतर पक्षांप्रमाणे विविध जातीधर्माच्या आधारावर मतांची भिक मागण्याचा मार्ग चोखाळला आहे. मुस्लिम मतांचा गठ्ठा नावाचा एक भ्रम बहुतेकांना सतावत असतो, त्यातच गुरफ़टलेल्या केजरीवाल यांनी मग अन्य कुठल्या नेत्याप्रमाणेच मुस्लिम मौलवीसमोर माथा टेकण्याचा पर्याय निवडला. निव्वळ भ्रष्टाचार विरोधाच्या घोषणा निरूपयोगी वाटल्याने त्यांनी चक्क जिहादी मुस्लिमांचेही पाय धरायचा पवित्रा घेतलेला आहे. मात्र हा मामला चव्हाट्यावर येणार नाही याची पुरेपुर काळजी त्यांनी घेतली होती. पण पाप चव्हाट्यावर आलेच.

   नुसत्या धर्माच्या नावाने मतांचा गठ्ठा मिळवायला केजरिवाल मौलवीकडे गेले नाहीत, तर दंगल व हत्येला चिथावणी देणार्‍या जिहादी मौलवीकडे मतांची भिक मागायला हा क्रांतीकारक जाऊन पोहोचला. तस्लिमा नसरीन या बांगलादेशी बंडखोर लेखिकेला धर्मद्रोहासाठी ठार मारण्याला जाहीर बक्षीस लावणार्‍या बरेलीच्या मौलाना तकीर रझा खान यांचा अशीर्वाद घ्यायला केजरीवाल गेल्याचे उघड झाले. कारण बरेलीच्या दर्ग्यात ते गेलेले होते. पण त्याची फ़ारशी कोणी दखल घेतली नव्हती. मात्र त्यावर तस्लिमाचे भाष्य प्रसिद्ध झाल्यावर केजरीवाल यांची बोलती बंद झाली. लोकांनी जाहिर कार्यक्रमातच त्यांना याबद्दल जाब विचारायला सुरुवात केली आणि पक्षाच्या म्होरक्यापासून पार्टीतले तमाम ‘आम आदमी’ दोनतीन दिवस माध्यमाच्या कॅमेरापासून गायब झाले होते. बिळात दडी मारून बसले होते. इतरांच्या लहानसहान चुका शोधून जाब विचारण्याचेच राजकीय कर्तृत्व आजवर गाजवलेले हे लढवय्ये; आपल्यावर आरोप होताच तीन दिवस तोंड लपवून बेपत्ता झाले होते. आमंत्रित करूनही कुठल्या वाहिनी वा कॅमेरासमोर आले नाहीत. पारदर्शक कारभार व राजकारणाचे हवाले देत स्थापन झालेल्या या पक्षाला पहिल्या निवडणूकीत व पहिल्या आरोपातच तोंड लपवायची पाळी आली असेल; तर भविष्यात त्याच्याकडून कसली अपेक्षा करता येईल? पारदर्शक म्हणजे यांचेच नंगेपण जगाला दिसायची वेळ आल्यावर कसे व्हायचे? गरजेते वो बरसते नही म्हणतात, त्याचीच प्रचिती त्यांच्या टोळीला झाल्यावर राजकारण म्हणजे नुसते आरोपांनी खेळले जात नाही, तर सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यातून विस्तारते; याचा अनुभव केजरीवाल यांना येऊ शकेल. तोपर्यंत नुसतेच फ़ुगे उडवायला त्यांना कोणी रोखू शकत नाही.

No comments:

Post a Comment