Tuesday, December 10, 2013

भ्रष्टाचार का सोकावतो?



A perfection of means, and confusion of aims, seems to be our main problem.
.........Albert Einstein

 ‘साधनांची शुचिता आणि उद्दीष्टांविषयीचा गोंधळ, ही आपली मुख्य समस्या आहे’ असे आईन्सटाईन या थोर शास्त्रज्ञाने खुप पुर्वी म्हणून ठेवलेले आहे. तो विसाव्या शतकातला एक महान वैज्ञानिक मानला जातो. कारण ज्याने विज्ञानाचा वेध घेताना माणूसकी व भावभावनांचाही बारकाईने विचार केलेला होता. निव्वळ शास्त्रशुद्ध असून भागत नाही, तर ज्या समाजात आपण जगत व वावरत असतो, त्यालाही सोबत घेऊन जायचे विसरता कामा नये, याचे संपुर्ण भान असलेला वैज्ञानिक म्हणूनच त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरही त्याला मोठी मान्यता मिळालेली होती. आज देशात ज्या राजकीय आर्थिक व सामाजिक सांस्कृतिक विषयांचा तावातावाने उहापोह होत असतो; त्याचे परिणाम बघितलेम मग त्याच थोर माणसाचे उपरोक्त शब्द आठवतात. प्रामुख्याने राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुका संपल्यावर जे निकाल समोर आलेले आहेत, त्यातून त्रिशंकू विधानसभा निर्माण झालेली आहे. त्रिशंकू म्हणजे कुठल्याही एका पक्षाला बहूमत नसणे आणि काही पक्षांनी एकत्र येऊन बहूमताचे सरकार स्थापन करणेही अशक्य असावे; याला त्रिशंकू अवस्था असे म्हणतात. त्यात देशातील प्रमुख पक्ष असलेले कॉग्रेस व भाजपा परस्परांना पाठींबा देऊ शकत नाहीत. मात्र कॉग्रेसने दुसर्‍या क्रमांकाच्या ‘आप’ पक्षाला बिनशर्त पाठींबा देण्याचे मान्य केले आहे. पण आपण कुणाचा पाठींबा घेणार नाही की कोणाला पाठींबा देणार नाही, असा हटवादी पवित्रा ‘आप’चे नेते केजरीवाल यांनी घेतला आहे. त्याला साधनांची शुचिता म्हणतात. पण त्यांचे उद्दीष्ट साफ़ आहे काय?

   सरकार बनवणे म्हणजे एका बाजूला विधानसभेत विविध कायदे बनवणे आणि दुसरीकडे त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडणे. जेव्हा कॉग्रेस बिनशर्त पाठींबा देते आहे, तेव्हा अशा कुठल्याही कर्तव्यात अडथळा आणणार नाही, याची जाहिर कबुली देते आहे. मग कामापुरते बहूमत मिळणार असताना सरकार बनवण्यात पुढाकार घ्यायला केजरीवाल यांना कोणती अडचण आहे? आपलेच हुकूमी बहूमत त्यांना कशाला हवे आहे? ज्यांना कॉग्रेस आणि भाजपा यांच्या संसद सदस्यांनी संमत केलेला जनलोकपाल कायदा चालणार होता; त्यांना आता तोच कायदा करण्यासाठी दिल्लीच्या विधानसभेमध्ये त्याच पक्षांचा पाठींबा अस्पृष्य़ कशाला वाटतो आहे? त्यांचे उद्दीष्ट काय आहे? उत्तम सुसह्य भ्रष्टाचारमुक्त कारभार करणारे सरकार कसे असू शकते, त्याचा नमूना पेश करण्याची हीच उत्तम संधी नाही काय? त्यांना चांगले काम करायचे आहे आणि तेच केवळ चांगले काम करू शकतात, असा त्यांचा दावाही आहे. तर त्यासाठी कॉग्रेसचा पाठींबा घेऊन त्यांनी सरकार बनवावे. त्यात कॉग्रेसने अडथळे आणले तर राजीनामा देऊन खापर कॉग्रेसवर फ़ोडायचा अधिकार कोणी केजरीवाल यांच्याकडून हिरावून घेतलेला नाही. किंवा सरकार चालवताना पाठींबा देणार्‍यांनी काय पापकर्म केले, त्याचे पुरावेही देण्याची बोनस सोय त्यांना मिळू शकणार आहे. पण त्यासाठी उद्दीष्ट साफ़ स्वच्छ असायला हवे. आपल्याला काय साधायचे आहे, त्याबद्दल केजरीवाल व त्यांच्या पक्षातच गोंधळ आहे. किंवा त्यांचे खरे उद्दीष्ट त्यांनी पारदर्शकपणे लोकांसमोर मांडलेले नाही. त्यांनी आज निर्माण केलेला पेचप्रसंग ही दिल्लीच्या मतदारांची शुद्ध फ़सवणूक आहे, असेच म्हणावे लागेल. दिलेत तर बहूमत नाही, तर सत्ता नको असे त्यांनी आधीच सांगितले होते काय?

   ‘आप’ पक्षाने लोकांकडे नुसती मते मागितली होती आणि आपणच बहूमताने सरकार बनवणार, अशी हवा निर्माण केली होती. म्हणूनच नवा पक्ष असून ते इथपर्यंत मजल मारू शकले. आज बहूमत कमी पडते, तर दुसर्‍या कुणा पक्षाने त्यांना पाठींबा देऊ केला आहे. त्याही पक्षाला दिल्लीच्याच जनतेने मते दिलेली आहेत आणि जनभावना ओळखून तो पक्ष केजरीवाल यांना त्यांची आश्वासने पुर्ण करण्याची संधी देतो आहे. समजा उद्या कॉग्रेसने पाठींबा काढून घेतला, तरी फ़ेरनिवडणुका होणारच. पण हुतात्मा होऊन अधिक चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच भाजपाने सरकार बनवण्याचे नाकारलेले नाही. आपल्याकडे संख्याबळ नाही व कोणी ते पुर्ण करत नाही; म्हणून भाजपाने माघार घेतली आहे. कॉग्रेसच्या ऑफ़रमुळे ती सबब ‘आप’चे केजरीवाल यांना देता येणार नाही. कारण त्यांनी बहूमत मिळालेच तर सरकार बनवू नाही; तर फ़ेरनिवडणूकांची पाळी आणू असे कधी सांगितले नव्हते. पाठींबा घेणे वा देणे हे सौदेबाजीचे असते, तेव्हा त्याला नकार समजू शकतो. पण कॉग्रेसने कुठलीही सौद्याची भाषा केलेली नाही. मग केजरीवाल यांनी पलायन कशाला करावे? एक म्हणजे साधनांची शुचिता दाखवण्याच्या नादात त्यांना उद्दीष्टाचा विसर पडलेला असावा, किंवा ते आपल्याच भ्रमात वावरत असावेत. लोकांना आदर्श आवडतो. पण व्यवहारी जगात आदर्शावर जगता येत नसेल, तर लोकांना त्यापेक्षा भ्रष्ट वाटणारा सुसह्य उपयुक्त पर्याय स्विकारावा लागतो. भारतात कॉग्रेसने दिर्घकाळ सत्ता मिळवली व राबवली; कारण आदर्शवादामागे भरकटत गेलेल्यांच्या अव्यवहारी मुर्खांपेक्षा व्यवहारी भ्रष्टाचाराला कौल देणे लोकांना भाग पडले आहे. केजरीवाल दिल्लीकरांचा तसाच भ्रमनिरास करून पुन्हा सौदेबाज राजकारणाला शरण जाण्याची वेळ लोकांवर आणत आहेत.

No comments:

Post a Comment