Tuesday, December 24, 2013

‘आप’त्ती व्यवस्थापन


   भाजपा किंवा कॉग्रेसला आपण राजकारण शिकवीत आहोत, अशी शेखी आम आदमी पक्षाचे नवे प्रेषित अरविंद केजरीवाल नित्यनेमाने मिरवीत असतात. पण वास्तवात त्यांनीच जुन्या पक्षांकडून बनेलगिरी कशी आत्मसात केली, ते आता समोर येऊ लागले आहे. प्रथमच देशात एक इमानदार पक्ष राजकारणात आलेला आहे आणि तो अत्यंत पारदर्शक कारभार करतो, असा त्यांच्यासह त्यांच्या तमाम पाठीराख्यांचा दावा असतो. त्यांच्या या पारदर्शक इमानदारीचा पुरावा कुठला असतो? तर आम्ही अन्य पक्षांप्रमाणे बंद खोलीत बसून भिंतीआडचे राजकारण करीत नाही, असाही सज्जड पुरावा नित्यनेमाने दिला जात असतो. पण जेव्हा केव्हा त्यांची ही पारदर्शकता तपासण्याची कसोटीची वेळ येते; तेव्हा ह्या इमानदार पक्षाचा प्रत्येक नेता व कार्यकर्ता गडद पडद्याआड आपले तोंड लपवित असतो, असाच गेल्या वर्षभ्रराचा अनुभव आहे. कॉग्रेसच्या पाठींब्याने अल्पमत सरकार बनवण्यासाठी आपण कुठली सौदेबाजी केलेली नाही, हे भासवण्यासाठी आठवडाभर त्यांनी दिल्लीच्या गल्लीबोळात सभा घेतल्या, लोकांचे संदेश मागवून मते घेतली. परंतु जेव्हा त्यांना राज्यपालांनी मंत्रीमंडळ बनवण्याचे आमंत्रण दिले; तेव्हा मात्र हे आम आदमीतले निवडक ‘खास आदमी’ बंद खोलीत भिंतीआड जाऊन बसले. तिथे त्यांनी लोकांच्या नजरेआड खिचडी शिजवायला सुरूवात केली आणि त्याचा दरवळ भिंतीच्या फ़टीतून बाहेर पसरला. ज्या सहा नवोदित आमदारांना नव्या मंत्रीमंडळात सहभागी करून घेण्य़ाचा निर्णय झाला व त्यांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली; तेव्हा तुलनेने ज्येष्ठ असलेले आमदार विनोदकुमार बिन्नी संतप्त होऊन बैठकीतून उठून निघून गेले. त्यांचा आवेश बघितल्यावरच खिचडी नासल्याचा बाहेर प्रतिक्षा करणार्‍या पत्रकारांना अंदाज आला. त्यांनी विनाविलंब बिन्नी व विविध नेत्यांना गाठण्याचा प्रयास केला, तेव्हा खरी पारदर्शकता समोर आली.

   मंगळवारी संध्याकाळी आवेशात बिन्नी बैठकीतून निघून गेले, तेव्हाच बाहेर पडलेले दुसरे नेते योगेंद्र यादव यांना पत्रकारांनी घेरले. तर त्यांनी सफ़ाई देण्यापेक्षा पक्षाचे प्रवक्ते शिसोदिया बोलतील, असे सांगून काढता पाय घेतला. मग शिसोदिया पत्रकारांना नव्या मंत्र्यांची यादी देण्यासाठी सामोरे आले. त्यांनी सराईत राजकारण्याला लाजवील इतक्या बनेलपणाने बिन्नी नाराज असल्याचे आपल्याला ठाऊकच नाही; असा कांगावा केला. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर मग मध्यरात्री बिन्नी यांची समजूत घालायला त्यांच्या घरी ‘आप’चे नेते कशाला धावले होते? तब्बल सहासात तास बिन्नी नाराज असल्याच्या आणि दुसर्‍या दिवशी ‘मोठा’ खुलासा करणार असल्याच्या बातम्या सर्वच वाहिन्यांवर झळकत होत्या. पण केजरीवाल वा त्यांच्या कुणाही सहकार्‍याला त्याचा थांगपत्ता नव्हता. किंवा ‘आप’ल्या पक्षाची पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी पत्रकारांसमोर येऊन खुलासा करण्याची कोणाला गरजही वाटली नाही. जुन्या तमाम ‘बेईमान’ राजकीय पक्षाच्या नेत्याप्रमाणेच ‘आप’चे इमानदार नेते भिंतीआड दडी मारून बसले होते आणि बिन्नी यांची समजुत काढण्यात गर्क होते. खुद्द बिन्नी यांनी आपला मोबाईल फ़ोन बंद करून टाकला होता. म्हणजेच काय चालले आहे, त्याविषयी पत्रकार किंवा ‘आम आदमी’ मिळून तयार होणार्‍या आम जनतेला जागरूक करायची नेत्यांना गरज वाटलेली नाही. दुसरीकडे त्याच पक्षाचे तोंडपाटिलकी करणारे कविनेते कुमार विश्वास यांनी मंत्रीपदाचे वाटप हा मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांचा राखीव अधिकार असल्याचेही सांगून टाकले. हा राखीव अधिकार अन्य पक्षांच्या नेत्यांनी वापरला; मग त्यांची पक्षश्रेष्ठी अशी हेटाळणी ‘आप’वाले करणार. यालाच इमानदारी म्हणतात काय?

   बुधवारची सकाळ उजाडण्यापर्यंत वातावरण निवळले होते. आदल्या संध्याकाळी केजरीवाल यांच्या घरातल्या बैठकीतून हातपाय आपटत बाहेर पडलेले बिन्नी यांचे एका रात्रीत मतपरिवर्तन झालेले होते. आपल्याला सत्तेचा हव्यास नाही आणि पक्ष सोपवेल ती कामगिरी पार पाडू; अशी भाषा तेही बोलू लागले होते. अशीच भाषा विजय गोयल यांनी हर्षवर्धन यांची भाजपाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर केलेली नव्हती काय? कालपरवाच मंत्रीपद सक्तीने सोडावे लागल्यावर जयंती नटराजन यांनी पक्षात संघटनात्मक जबाबदारी घेण्याची केलेली भाषा, बिन्नी यांच्यापेक्षा वेगळी आहे काय? जयंतीच्या राजिनाम्याविषयी कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांचे मौन आणि बिन्नीच्या निघून जाण्यानंतर ‘आप’च्या नेत्यांनी तोंड लपवण्याची केलेली कसरत; कितीशी वेगळी होती? दोन्हीकडे तोच प्रकार आहे. फ़क्त तसे ‘आप’वाला वागला तर त्याला ‘शर्मा’ म्हणायचे आणि अन्य पक्षातला असेल तर त्याला बेशर्मा म्हणायचे असते. त्याच वर्तनाला ‘आप’सातले म्हणून इमानदार ठरवायचे आणि अन्य पक्षातले असेल तर बेइमानदार म्हणायचे असते. पक्ष आणि निवडू्न आलेले आमदार नवे असले, तरी कित्येक वर्षे राजकारणात मुरलेल्या राजकारण्यांपेक्षा आम आदमी पक्षाचे नेते व आमदार अधिक ‘मुरब्बी’ आहेत, हे कोणालाही मानावेच लागेल. अन्य जुन्या भ्रष्ट पक्षात मंत्रीमडळ बनले किंवा सत्ता हाती घेतल्यानंतर हाणामार्‍या व नाराजी समोर येते, बंड होते. इथे अधिक इमानदार पार्टीत औटघटकेच्या सत्तेची नुसती झलक दिसली आहे, तर हाणमार्‍या व मानभावीपणाचे नाटक रंगले आहे. यालाच तर खरे मुरब्बी राजकारण म्हणतात. पक्षातल्या बंडाला शह देण्यासाठी सोनियाजी वा अन्य नेत्यांनी आजवर कितीदा राजिनाम्याचे नाटक रंगवलेले आहे ना? ‘आप’त्ती व्यवस्थापन तरी कुठे भिन्न आहे?

1 comment:

  1. आंधळ्यासारखे या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करू नका,उत्तर द्या 1) Why BABU BOKARIA (your minister who was sentenced for three years in jail for looting mines in coal scam) continues in your ministry? BABU BOKARIA as Water Resources Minister, was convicted and sentenced to three years of imprisonment by a Porbandar court in illegal mining case. Babu Bokhiria is the fourth minister of the Narendra Modi government to be facing serious charges while in office, joining the league of Fisheries Minister Purshottam Solanki, former minister of state for home Amit Shah and former women and child welfare minister Maya Kodnani. 2) Rs 400 crore scam over fishing contracts issued by the fisheries department headed by minister PURSHOTTAM SOLANKI. Gujarat HIGH COURT upholded order to prosecute BJP minister Purshottam Solanki. 3) Maya Kodnani was convicted for her role in the Naroda Patia massacre and sentenced to 28 years of imprisonment.

    ReplyDelete