Friday, December 27, 2013

आजचे कौरव पांडव



   गेल्या वर्षी याच काळात दिल्लीत बलात्काराच्या घटनेने लोकमत संतप्त झालेले होते. त्याच्या काही महिने आधी आसामची राजधानी गुवाहाटी येथे एका पबमधून बाहेर पडलेल्या तरूणीवर काही मुठभर गुंडांनी रस्त्यावरच केलेला हल्ला प्रकरण गाजले होते. म्हणजे हे गुंड तिचे वर्दळीच्या रस्त्यावर वस्त्रहरण करीत होते आणि त्याचे रितसर चित्रण करून वाहिनीवर दाखवले जात होते. त्याचा इतका गाजावाजा झाला, की राष्ट्रीय महिला आयोगाला त्यात दखल घ्यावी लागली होती. पुढे त्या प्रकरणी हस्तक्षेप करणार्‍या महिला आयोगाने गुवाहाटीला भेट देऊन त्या पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला. त्याच कथानकाचे एक उपकथानक आता आपण विसरून गेलेले आहोत. त्या प्रकरणात हस्तक्षेप करायला महिला आयोगाने पाठवलेल्या शिष्टमंडळाच्या एक सदस्याने पिडीत मुलीला पत्रकारांसमोर पेश केले आणि तिचे नावही जाहिर केले. त्यातून खुप खळबळ माजलेली होती. कारण सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार अशा पिडीतेची ओळख लपवण्याचे बंधन आहे. त्याचा भंग महिला आयोगाच्या पथकाकडून झाल्याने ती खळबळ माजली होती. मग त्या अतिउत्साही महिला आयोग सदस्याची हाकलपट्टी करण्यात आलेली होती. आज कुणाला त्या थोर लढवय्या महिलेचे नाव आठवते काय? दिड वर्षात आपण ती घटनाच विसरून गेलो असू; तर त्या महिलेचे नाव आठवणार तरी कसे? पण अकस्मात ती महिला समोर येऊन उभी ठाकली आणि जुन्या दिड वर्षापुर्वीच्या आठवणी चाळवल्या. आता ही आक्रमक झुंजार महिला ‘आप’ पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी ती कॉग्रेस पक्षावर दुगाण्या ‘झाडू’ लागली आहे. तिचे नाव आहे अलका लांबा.

   जेव्हा गुवाहाटीची घटना घडली, तेव्हा तिच्या अशा वागण्याने पक्षाचे थेट दुसर्‍या क्रमांकाचे नेते राहुल गांधी यांच्यावरच बालंट आलेले होते. कारण त्यांच्याच आग्रहाने व शिफ़ारशीने या महिलेची नेमणूक महिला आयोगावर झालेली होती. प्रसिद्धीसाठी हपापलेले जे काही लोक सार्वजनिक जीवनात वावरत असतात, त्यापैकी अलका लांबा ह्या एक होत. त्यामुळेच त्यांनी गुवाहाटीच्या त्या पिडीतेच्या अब्रुपेक्षा आपल्याला प्रसिद्धीच्या झोतात जाण्याची संधी साधताना त्या मुलीचे नाव चव्हाट्यावर आणण्याचा आगावूपणा केलेला होता. आता त्याच अलका लांबा यांनी ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांची भेट घेतली असून या नव्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजून त्यांचा समावेश त्या पक्षात झालेला नाही. पण अपेशी ठरणार्‍या कॉग्रेसमधून नेत्यांनी पळ काढण्याची सुरूवात होत असल्याचे ते लक्षण आहे. आपल्या पलायनासाठी लांबा यांनी दिलेले कारण मोठे मजेशीर आहे. कॉग्रेसमध्ये कित्येक महिने कार्यकर्त्याच्या मताची दखलही घेतली जात नाही आणि आम आदमी पक्षाचे सर्व निर्णय पारदर्शी व जनतेशीच संवाद साधून घेतले जातात, या फ़रकाने अलकाताईंचे मतपरिवर्तन झाले आहे. निकालानंतर ‘आप’ला कॉग्रेसने विधानसभेत समर्थन देण्याचा निर्णय शीला दिक्षीत यांनी परस्पर घेतला आणि त्यासाठी कार्यकर्तांचे मत विचारातही घेतले गेले नाही. मात्र जेव्हा केजरीवाल चौकशीची भाषा बोलू लागले, तेव्हा शीला दिक्षीतांना कार्यकर्त्यांची नाराजी आठवली. म्हणजे तुमच्या सोयीचे असेल, तेव्हा श्रेष्ठी निर्णय लादणार आणि पेचातून सुटायची गरज असली, मग खापर कार्यकर्त्यांच्या डोक्यावर फ़ोडणार. अशी कॉग्रेसची कार्यशैली असल्याची अलकाताईंची तक्रार आहे. पण ही कार्यशैली त्यांना पक्षाचा पराभव होईपर्यंत कधीच का कळली नव्हती?

   आपले उमेदवार ठरवण्यापासून ‘आप’ने सर्व व्यवहार खुले ठेवले होते आणि कॉग्रेसमध्ये हायकमांडची संस्कृती अलकाताईंच्या जन्मापुर्वीपासूनची आहे. त्यांच्यापेक्षा वयाने अधिक व पक्षात दिर्घकाळ काम केलेल्या अनेक महिला कार्यकर्त्या आहेत. पण अलकाताईंची आयोगावर थेट वर्णी पक्षश्रेष्ठी म्हणून राहुल गांधी यांनीच परस्पर लावली होती. त्यासाठी त्यांनी वा पक्षाने कुठल्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतलेले नव्हते. लहान वयात आपल्याला परस्पर इतकी मोठी नेमणूक कशी मिळाली, याचे रहस्य अलकाताईंना तेव्हा उलगडावेसे कशाला वाटले नव्हते? आणि आजसुद्धा त्यांनी ‘आप’चे वरीष्ठ नेते योगेंद्र यादव यांना जाऊन भेटायची गरज काय? ज्या पक्षाचे काम उत्तम वाटते, त्यात थेट सामान्य कार्यकर्ती म्हणून सहभागी व्हायला मोठ्या नेत्यांना भेटायची गरज नसते. आपल्या विभागात पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊनही सुरूवात करता येते. उपयुक्तता लक्षात घेऊन पक्ष तुम्हाला त्याची गरज म्हणून पुढे आणतच असतो. पण अलकाताईंना एक नेता म्हणूनच ‘आप’मध्ये दाखल व्हायचे आहे. आम आदमी म्हणून त्यांना पक्षांतर करायचे नाही. अशा व्यक्तीला ‘आप’मध्ये त्यांना हवा तसा प्रवेश, हा नवा पक्ष देणार असेल; तर त्याच्याकडे बघायचा ‘आम आदमी’चा दृष्टीकोनही बदलू लागणार यात शंका नाही. परंतु कॉग्रेससाठी व त्या पक्षाच्या श्रेष्ठींसाठी हा इशारा आहे. यश मिळत असते तोपर्यंतच असे पदाचा हव्यास धरणारे तुमच्यासोबत असतात व निष्ठेचे प्रदर्शन मांडतात. जेव्हा अपयशाचा काळ सुरू होतो, तेव्हा त्याच निष्ठावंतांइतके भयंकर दगाबाज कोणी नसतात. कारण अशा निष्ठावंतांच्या महायुद्धात व महाभारतात पांडव जिंकत नसतात, तर जिंकणारे पांडव आणि पराभूताला कौरव संबोधले जात असते.

No comments:

Post a Comment