Tuesday, January 21, 2014

‘रोज काही तुफ़ानी करूया’


   दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल धरणे धरून बसल्याच्या बातम्या सर्वच वाहिन्या दाखवत आहेत आणि त्या पक्षाच्या मंत्र्यांनी केलेले पराक्रम सुद्धा सर्वच माध्यमातून दाखवले जात होते. पण दिल्लीतल्या आम आदमीचे दुखणे मात्र कुठलीच वाहिनी दाखवत नव्हती. जणू नवे सरकार सत्तेवर आल्यापासून दिल्लीकर कमालीचे सुखावलेत आणि त्यांच्या जगण्याची स्थिती आलबेल झाल्याचेच आपल्याला दाखवले जात होते. पण म्हणून ती वस्तुस्थिती नव्हती आणि नाही. शुक्रवारी केजरीवाल यांच्या धरण्यामुळे दिल्लीकरांचे हाल कसे होत आहेत, त्यावर एकदोन वाहिन्यांनी बातम्या दिल्या आणि वृत्तपत्रांनी नागरिकांच्या तक्रारी छापल्या म्हटल्यावर केजरीवाल यांचे पित्त खवळले. त्यांनी थेट पत्रकार माध्यमांवर कॉग्रेस भाजपाचे दलाल असल्याचा आरोप करून टाकला. त्यामुळे मागल्या दिड महिन्यापासून ‘आप’च्या आरत्या ओवाळणार्‍या माध्यमाला थोडीशी जाग आलेली आहे. सहाजिकच मग आजवर लपवलेल्या बातम्या व घटनांना प्रसिद्धी मिळू लागली आहे. त्यातली पहिली व महत्वाची बातमी आहे, ती दिल्लीतल्या ‘आम आदमी’ मतदार शिक्षकांची. हे हंगामी शिक्षक दिल्ली सरकारच्या सेवेतले असून त्यांनी नोकरी कायम होण्यासाठी केजरीवाल यांना मुख्यमंत्री केले होते, मते दिली होती. पण याच पक्षाची सत्ता येऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही आपल्या नोकर्‍या कायम करण्याविषयी केजरीवाल काहीच हालचाल करीत नाहीत, असे दिसल्यावर ‘आम आदमी’चा पहिला घटक रस्त्यावर आलेला आहे. त्यांनी गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली सचिवालयासमोर धरणे धरले आहे. पण आठ दिवस उलटून गेले तरी केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षाचा कोणी नेता त्या ‘आम आदमी’ मतदाराकडे फ़िरकलेला नाही, की कुठल्या वाहिनीने बातमी दाखवली नाही.

   कारण जी आश्वासने दिली व लोकांची मते घेतली, ती आश्वासने पुर्ण करणे शक्य नसल्याने केजरीवाल मुळचा जाहिरनामा गुंडाळून भलत्याच विषयाकडे लोकांचे लक्ष वेधण्याचे नाटक करू लागले आहेत. शिवाय खरे प्रश्न व समस्या बाजूला टाकून भलतेच विषय दिल्लीकरांची खरी समस्या असल्याची दिशाभूल करू लागले आहेत. जनलोकपाल विधेयक. वीजेचे दर अर्ध्यावर आणणे किंवा प्रत्येक कुटुंबाला सातशे लिटर पाणी पुरवठा करण्याला त्यांनी बाजूला टाकून दिले आहे. तितकेच नाही. दिल्ली सरकारच्या सेवेत असलेल्या साडेतीन लाख हंगामी कर्मचार्‍यांना कायम करण्याचा विषय आता वार्‍यावर सोडून देत पोलिसांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री असताना रस्त्यावर आंदोलनात उतरून आणि त्यातून लो्कांसह माध्यमांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्य़ाचा आटापिटा चालविला आहे. पण त्याचवेळी आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांनी चार महिन्यात दिल्लीत काय केले, त्याचा हिशोबही विचारला जाऊ नये, यासाठी हा आटापिटा आहे. त्यासाठी त्यांनी आपले सरकार पाडले जावे, यासाठी कसोशीचे प्रयास चालविले आहेत. त्यासाठी एका बाजूला पाठींबा देणार्‍या कॉग्रेसला आपला पाठींबा काढून घेण्य़ाशाठी सतत अपमानित करणे व शिवीगाळ करणे चालू आहे. नाहीच तर कॉग्रेसच्या केंद्र सरकारने आप सरकार बरखास्त करावे, असाही डावपेच खेळला जात आहे. दिल्लीत मुख्यमंत्री व मंत्रीच कायदा मोडत असतील, तर घटनात्मक जबाबदारी म्हणून ते सरकार बरखास्त करण्याची तरतुद आहे. ती सक्ती या आंदोलनातून केली जात आहे. जेणेकरून केजरीवाल यांना लोकसभेपुर्वी हुतात्मा व्हायचे आहे. मग त्याच बळावर देशात मतांचा जोगवा मागायची त्यांची रणनिती आहे.

   मंगळवारी सकाळपासूनच तमाम वाहिन्या केजरीवाल यांच्या खोटेपणाचे दाखले व पुरावे दाखवू लागल्या होत्या. एका बाजूला आपण धरण्यावर बसलो तिथे चहापाणी, नास्ताही आणू दिला नाही, पोलिसांनी आपली कोंडी चालविली आहे, असे केजरीवाल पत्रकारांना सांगत होते. आणि त्याचवेळी तिथेच बसून तत्पुर्वी केजरीवाल पत्नीनेच घरातून आणलेला नास्ता कसे करीत होते, त्याचे चित्रण दाखवले गेले. त्याखेरीज सरकारने तिथून जवळच पालिकेतर्फ़े पिण्याच्या पाण्य़ाचा टॅन्कर आणून उभा केल्याचे दिसत होते आणि केजरीवाल मात्र निदर्शकांना प्यायचे पाणीही आणू दिले नाही अशा थापा मारत होते. थोडक्यात आता केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या पापांचे व थापांचे आणखी उदात्तीकरण करण्याचा माध्यमांनाही कंटाळा आलेला आहे. मात्र दिड महिना खोटे कौतुक ऐकायची सवय लागलेल्या केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांना आता माध्यमे सत्य दाखवू लागल्यावर संताप अनावर झाला आहे. त्यामुळेच आजवर लपवलेले सत्य वाहिन्या प्रक्षेपित करू लागताच, केजरीवाल माध्यमांना भाजपा कॉग्रेसचे दलाल ठरवण्यापर्यंत घसरले. खरे तर मोजक्याच वाहिन्या व पत्रकारांनी लोकांसमोर सत्य आणायची हिंमत यापुर्वी केलेली आहे. एका बातमीनुसार ‘आप’च्या मुख्यालयाच्या इमारतीत एका रहिवाश्याने यांच्या अखंड गोंगाट करणार्‍या स्पिकरचा त्रास होत असल्याची तक्रार केली, तर आसपासच्या रहिवाश्यांनी आपल्या बहूबेटींची छेड काढली जाते, असे सांगितले. मंगळवारी धरण्याच्या गर्दीत एबीपी न्युजच्या महिला पत्रकाराची छेड आप कार्यकर्त्यांनी काढल्याचा जाब पत्रकारांच्या घोळक्यानेच संजय सिंग यांना विचारला. हे सत्य आता हळुहळु उजेडात येऊ लागले आहे. त्यामुळेच आपली साधूसंत व हुतात्मा ही प्रतिमा जपण्यासाठी केजरीवाल त्यांचे सरकार पाडले जाण्यासाठी कमालीचे उतावळे झालेत. त्या कुठल्या जाहिरातीतले तरूण उड्या मारतात आणि म्हणतात ना? ‘आज काही तुफ़ानी करूया’ त्याच चालीवर केजरीवाल यांचे ‘रोज काही तुफ़ानी करूया’ नाटक रंगलेले आहे.

5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. अजून २ --३ महिने चालेल नौटंकी

    ReplyDelete
  3. इथे फेसबुक वर शेअर करायचा ऑप्शन का नाहीये ?????

    ReplyDelete
  4. Bhau tuphani karnyachya nada madhe te mul vishaya pasun bhatkat challe ahet evhana gele ahe as mhantal tari chalel. kejriwal yanya kay sadhya karyache ahe he deo ch jano pan aam admichya nava khali swatchi poli bhajun ghenacha erada distoy .

    ReplyDelete