Friday, January 10, 2014

खास आदमींची झुंबड

    एकूणच सध्या देशात मोठी क्रांती येऊ घातली आहे. वास्तवात कुठल्याही देशात क्रांती अन्य भागातून व प्रदेशातून सुरू होते आणि क्रमाक्रमाने मजल दरमजल करीत ती राजधानीत जाऊन पोहोचत असते असा इतिहास आहे. पण इथे राजधानीत क्रांती होऊन तिचा फ़ैलाव अन्य भागात होताना दिसतो आहे. जेव्हा एखाद्या समाजात वा देशात लोक इतिहासच घडवायला निघालेले असतात, तेव्हा त्यांनी आरंभलेल्या कार्यासाठी इतिहासातले दाखले शोधण्यात अर्थ नसावा. मग ‘आप’ण सध्या आपल्या देशात होऊ घातलेल्या क्रांतीचे मोजमाप कसे करायचे? त्याची लक्षणे तरी कशी तपासून बघायची? की निव्वळ बातम्या येतात आणि माध्यमातून क्रांती येत असल्याचे हवाले दिले जात आहेत; म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा? सध्या तरी सामान्य माणसापुढे म्हणजे देशातल्या आम आदमी समोर त्यापेक्षा वेगळा काही पर्याय दिसत नाही. तेव्हा क्रांती येतेय तर आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असलेले बरे. ज्यांना ती क्रांती येताना दिसत नसेल, ते अर्थातच खोटारडे वा बेईमान असणार आहेत. तेव्हा ज्यांना या क्रांतीच्या कालखंडात खोटे पडायचे नसेल, त्यांनी निमूटपणे क्रांतीच्या कमानी उभारण्याचे काम हाती घेतलेले बरे. क्रांती जेव्हा केव्हा यायची असेल तेव्हा येईलच. आणि नाही आली म्हणून कुठे बिघडले? पुढली क्रांती येणारच आहे. त्यासाठी रंगीत तालीम समजून आपापले समाधान करून घ्यावे. सध्या निदान जाणत्या वा मान्यवर खास लोकांमध्ये ‘आम आदमी’ व्हायची झुंबड उडालेली आहे. त्यात या क्रांतीची मशाल सर्वात आधी खांद्यावर घेणारे अण्णा हजारे मात्र मागे पडले आहेत. की त्यांनाही येणारी क्रांती मान्य नाही? कारण ही मशाल त्यांनी दोन अडीच वर्षापुर्वी पेटवली होती, तेव्हा त्यांची मनपुर्वक टवाळी करण्यात धन्यता मानणार्‍यांची अशीच झुंबड उडालेली होती.

   तेव्हा अण्णांचे आंदोलन म्हणजे फ़ॅसिझम असल्याचे मानणारे व त्यातल्या खाचाखोचा दाखवून ती क्रांती कशी फ़सणार याचीच मिमांसा करणारे, आज त्याच क्रांतीच्या स्वागतासाठी पायघड्या पसरताना दिसत आहेत. कोणी तेव्हा अण्णांच्या आंदोलनाला रामलिलेसारखी अण्णालिला म्हणून संबोधले होते; तर कोणी त्याला आधुनिक टिव्हीच्या जमान्यातला रियालिटी शो म्हणून त्याची अवहेलना केलेली होती. त्यापैकीच अनेकजण आता आपला मिमांसा व विश्लेषकाचा उद्योग सोडून क्रांतीचा झेंडा खांद्यावर घेताना दिसू लागले आहेत. त्यांची ही झुंबड बघितली तर अण्णांनाही आज शंका येईल, की आपणच जनलोकपाल कायद्यासाठी उपोषण केले होते, की यापैकी कोणाच्या उपोषणाची आपण वाहिनीवरून टवाळी करीत बाईट देत होतो? त्या कालखंडात अण्णांच्या आंदोलनाने देशाचे कसे नुकसान होते, असे अगत्याने सांगणारे अण्णांची विश्वासार्हता कशी घसरत चालली होती, त्यावर उहापोह करीत होते. रामलिला मैदानावरील उपोषणाची सांगता झाल्यावर केजरीवाल व अन्य काही सहकार्‍यांनी विविध राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणूकीत कॉग्रेसला धडा शिकवण्यासाठी विरोधात मतदान करण्यासाठी प्रचार केला होता. त्यामुळे कितीजण विचलीत झालेले होते? कोणकोण विचलीत झालेले होते? त्यात आपल्याच महाराष्ट्रातील लढवय्या समाजसेविका मेधाताई पाटकरांचाही समावेश होता, हे आज कोणाला आठवते काय? त्याच कारणास्तव मेधाताईनी आंदोलनाचे राजकारण होऊ लागले म्हणून लोकपाल आंदोलनातून फ़ारकत घेतली होती. आता केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारल्यावर त्याच मेधाताई सुद्धा ‘आप’लेपणाने त्याच क्रांतीचा झेंडा खांद्यावर घ्यायला पुढे सरसावत असल्याची बातमी आहे.

   सत्ता माणसाला किती बदलते आणि किती लोकांचे ब्रह्मचर्य विचलीत करते; त्याचा खेळ आपण सध्या बघत आहोत. ‘राजकीय हस्तक्षेपासाठी आम आदमी पक्षाने चांगली भूमी तयार केली आहे’ असा मेधाताईंचा दावा आहे. सवाल इतकाच. की ती भूमी केजरीवाल अण्णांच्या लोकपाल आंदोलनापासूनच तयार करीत होते, त्यासाठीच त्यांनी पोटनिवडणूकीत हस्तक्षेप करण्यापर्यंत मजल मारली होती. मग तेव्हा त्यांना बळ देण्यापेक्षा त्याच्या विरोधात मेधाताईंनी पवित्रा कशाला घेतला होता? त्यांनी नाराजी व्यक्त करून त्यातून अंग कशाला काढून घेतले होते? समजा केजरीवाल यांचा राजकीय डाव दिल्लीत पुरता फ़सला असता, तर उध्वस्त झालेल्या भूमीविषयी मेधाताई वा अन्य खास आदमी काय बोलले असते? अर्थात सध्या उडालेल्या झुंबडीमध्ये मेधाताई एकट्याच नाहीत. अनेक पराभूत मान्यवर त्यात आधीपासूनच सरसावलेले आहेत. केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश करायचा व लोकांकडे मते मागायला जायचा पवित्रा घेतला, तेव्हा दिड वर्षापुर्वी यापैकी कोणाला त्यांच्या आंदोलन वा पक्षाचे आकर्षण कशाला वाटलेले नव्हते? तेव्हा त्यापैकी कोणाला झंजावात होऊ घातलेल्या या क्रांतीचा सुगावा कशाला लागला नव्हता? दिल्लीत इतक्या जागा मिळण्यापर्यंत आणि आपापल्या अगतिकतेसाठी दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी केजरीवालना मुख्यमंत्रीपदी बसवण्यापर्यंत; यातल्या खास आदमींना क्रांतीची झुळूकही कशाला ओळखता आलेली नव्हती? १९७७ सालात आणिबाणी विरोधात जनता लाट उसळून आल्यावर संसदेत आणिबाणीचा प्रस्ताव मांडणार्‍या जगनीवनराम, हेमवतीनंदन बहूगुणांनाही असेच काहीसे साक्षात्कार झालेले आठवतात. मग आज उडालेली झुंबड तोच जुना इतिहास नव्याने लिहीणार आहे, की घडवणार आहे असा प्रश्न पडतो.

No comments:

Post a Comment