Sunday, April 20, 2014

नेपोलियन म्हणालाच होता



कधीही एकाच शत्रूशी वारंवार लढू नये, अन्यथा त्यातून तुम्ही आपले लढाईचे सर्व डावपेच त्याला शिकवून टाकता. -नेपोलियन बोनापार्ट

  आजच्या पत्रकारितेत अभ्यासू व चिकित्सक अशा मोजक्या संपादकात कुमार केतकर यांचा समावेश होतो. विविध वाहिन्यांवर ते चर्चेत सहभागी होतात आणि नेमके मुद्देसूद बोलतात. मध्यंतरी मतचाचण्य़ांच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला होता. नरेंद्र मोदी यांनी खुप लौकर लोकसभा निवडणूक प्रचाराला आरंभ केला आणि सतत मोदीचा घोष झाल्याने आता त्याचा उफ़राटा परिणाम भाजपाला भोगावा लागतोय, असे मत केतकरांनी व्यक्त केले होते. साध्या मराठीत आपण अति तिथे माती असे म्हणतोच. त्यामुळे केतकरांचा हा मुद्दा पटण्य़ासारखाच आहे. पण केतकरांचा मुद्दा इथे योग्य असला, तरी संदर्भ चुकलेला आहे. कदाचित त्यांनी मुद्दामही चुकवलेला असू शकतो. त्यांचे कॉग्रेसप्रेम आणि भाजपाविरोध जगजाहिर आहे. त्यामुळेच जाणिवपुर्वक त्यांनी दिशाभूल करण्यासाठी असे मतप्रदर्शन केलेले असू शकते. अन्यथा त्यांच्यासारख्या पंडीताचा संदर्भ चुकणे खटकते. मुद्दा योग्य अशासाठी, की आज खरेच अतिरेकाचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. पण तो अतिरेक मोदींच्या नेतेपदाच्या प्रचाराचा नसून, गेल्या बारा वर्षात सेक्युलर गोटातून मोदींना लक्ष्य करण्याचा जो अतिरेक झाला; त्याचे दुष्परिणाम आता त्याच सेक्युलर राजकारणाला भोगावे लागत आहेत. गुजरात दंगलीचे निमीत्त करून सलग बारा वर्षे जो मोदी विरोधाचा व त्याच्या आडून हिंदूत्व विरोधाचा अतिरेक झाला; त्याचेच हे दुष्परिणाम आहेत. कारण त्यातून आपण बहूसंख्य हिंदू समाजाला दुखावत आहोत आणि त्यांच्या मनात मोदींविषयी सहानुभूती निर्माण करीत आहोत, याचे भान सेक्युलर राजकारणी वा बुद्धीमंतांनी राखले नाही. त्यात मोदींविषयी जनमानसात जी सहानुभूती वाढत गेली, त्यातूनच त्यांना आज राष्ट्रीय नेतेपदाची संधी मिळवून दिली आहे.

   बळी म्हणून मिळणारी सहानुभूती ही एक बाजू झाली. त्यामुळे कोणी इतका मोठा राष्ट्रीय लोकप्रिय नेता होऊ शकत नाही. तीन वर्षापुर्वी अरविंद केजरीवाल व अण्णा हजारे यांनी लोकपाल आंदोलन छेडून भ्रष्टाचार विरोधात लोकांची सहानुभूती मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला. पण आंदोलन संपताच व लोकपाल कायदा झाल्यावर अण्णांची महती घसरणीला लागली. तर दिल्ली काबीज करूनही सत्ता राबवण्यात अपेशी झाल्यामुळे केजरीवाल यांची लोकप्रियता लयास गेली आहे. मग मोदींविषयी सहानुभूती कशामुळे टिकून राहिली आहे? त्याचे उत्तर केतकर देत नाहीत. पण कित्येक शतकांपुर्वी जगातला ख्यातमान योद्धा नेपोलियन बोनापार्ट याने त्याचे उत्तर देऊन ठेवलेले आहे. तो म्हणतो, ‘कधीही एकाच शत्रूशी वारंवार लढू नये, अन्यथा त्यातून तुम्ही आपले लढाईचे सर्व डावपेच त्याला शिकवून टाकता.’ याचा अर्थ काय? तुम्ही सतत ज्याच्याशी डावपेच खेळत रहाता आणि त्यातून तो सहीसलामत बाहेर पडत आपला बचाव करू शकला; तर तुमच्याकडचे डावपेच संपून जातात. नवे काहीच शिल्लक उरत नाही आणि असा शत्रू आक्रमक झाला, तर त्याला रोखण्यासाठी तुमच्यापाशी कुठलाच उपाय शिल्लक नसतो. मोदींची कहाणी वेगळी नाही. राष्ट्रीय नेता म्हणून पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्याआधीच देशभरच्या माध्यमांनी, सेक्युलर विद्वानांनी व राजकारण्यांनी आपली सर्वच अस्त्रे त्यांच्या विरोधात वापरून संपवलेली होती. त्यामुळेच गेल्या वर्षभरात मोदी दिग्विजयासाठी गुजरात बाहेर पडल्यानंतर, त्यांना रोखण्यात कुठलाही विरोधक किंचीतही यशस्वी होऊ शकलेला नाही. कारण मोदींच्या रणनितीबद्दल त्यांचे विरोधक संपुर्ण अनभिज्ञ आहेत आणि मोदींना विरोधकांची प्रत्येक खेळी आधीच माहिती झालेली आहे. ती खेळण्यापुर्वीच मोदी विरोधकांवर मात करतात.

   राजीव गांधी पंतप्रधान असताना भारतीय फ़ौजेला तामिळी वाघांच्या बंदोबस्तासाठी श्रीलंकेला पाठवण्यात आलेले होते. पण हात हलवीत सेनेला माघारी फ़िरावे लागले. याचे कारण वाघांना घातपाती युद्धाचे प्रशिक्षणच मुळात भारतीय सेनेने दिलेले होते. आज पाकिस्तानात तालिबान धुमाकुळ घालत असतात. पण सगळी ताकद पणाला लावूनही पाक सेनेला त्यांचा अबंदोबस्त करणे साधलेले नाही. कारण त्या जिहादींना युद्धाचे प्रशिक्षण पाक सेनेनेच दिलेले आहे. नेपोलियन तेच म्हणतो. तुमचे सगळेच डावपेच शत्रूला माहिती असले, तर त्याला जिंकता येत नाही. ते त्याला माहिती होऊ नयेत, म्हणून एकाच शत्रूशी वारंवार लढाई करत राहू नये. गेल्या बारा वर्षात म्हणजे २००२ पासून २०१४ पर्यंत सेक्युलर म्हणवून घेणार्‍यांनी मोदींच्या बाबतीत काय केले? मोदींवर दंगलीचा, मुस्लिमांना मारल्याचा, पक्षपाताचा, धर्मांधतेचा, हिंदूत्वाचा, अरेरावी व हुकूमशाहीने सत्ता राबवल्याचा आरोप सेक्युलर विरोधकांनी केला नाही; असा एक दिवस गेला काय? या सातत्याने झालेल्या आरोप व बदनामी अपप्रचारातून आपली सुटका कशी करून घ्यावी व प्रतिहल्ला कसा करावा; याचे जणू प्रशिक्षणच मागल्या बारा वर्षात विरोधकांनी मोदींना दिलेले नाही काय? पंतप्रधान पदाचा उमेदवार होईपर्यंत जे आरोप झाले, त्यापेक्षा एक तरी नवा आरोप वा आक्षेप मोदींवर मागल्या आठ महिन्यात झाला आहे काय? उलट आपल्या प्रचाराच्या मोहिमेत मोदी जो प्रतिहल्ला करीत आहेत, मुद्दे समोर आणत आहेत; त्यांनी विरोधकांची भंबेरी उडवत आहेत. हल्ला झाल्यानंतर विरोधकांना आपल्या बचावासाठी धावपळ करावी लागते आहे. मोदींवर प्रतिहल्ला करणेही साधलेले नाही. केतकर म्हणतात, तसा बारा वर्षाचा अतिरेक मोदी विरोधकांना नडलेला आहे. आणि नेपोलियन म्हणतो, तसा विरोधकांनीच मोदींना हल्ल्याचे प्रशिक्षण देऊन आपल्याच विरोधात उभे केलेले आहे.

No comments:

Post a Comment