Thursday, April 24, 2014

सोनिया अमेठीत का आल्या?

  दिल्लीची विधानसभा निवडणूक संपली आणि तिथे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने लक्षणिय यश मिळवल्यावर त्याची खुप कारणमिमांसा झालेली होती. त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघर फ़िरून जो लोकसंपर्क साधला; त्यातून इतके मोठे यश त्या पक्षाला पहिल्याच प्रयत्नात मिळाल्याचे गोडवे गायले गेले. पण गंमत अशी, की पुढल्या दोनतीन महिन्यात सर्वांनाच त्याचा विसर पडला. त्या पक्षाच्या यशाचे कौतुक करणार्‍या राहुल गांधी यांनीही या नव्या पक्षाकडून शिकावे लागेल; अशी भाषा केली होती. ते किती शिकले, हा संशोधनाचा विषय आहे. पण ज्यांनी तो प्रयोग दिल्लीत यशस्वीरित्या राबवला, ते खुद्द केजरीवालही त्याला विसरून गेले आहेत. त्याऐवजी त्यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरताना आपला पक्ष टिव्हीच्या प्रचारातून यश मिळवू शकेल, अशी समजूत करून घेतलेली आहे. त्यामुळेच पुढल्या काळात केजरीवाल वा त्यांच्या सहकार्‍यांनी सतत टिव्हीवर दिसण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यानंतर भाजपाने लोकसभा निवडणूकीची रणनिती जाहिर केली, तिलाही आम आदमी पक्षाची नक्कल म्हणून हेटाळणी झाली होती. ती रणनिती होती दहा कोटी घरे वा कुटुंबात थेट संपर्क साधण्याची. त्याची मिमांसा करून किंवा त्यामागचा हेतू समजून घेण्याचे कष्ट कोणी घेतले नाहीत. भाजपाची लोकसभा मोहिम म्हणजे मोदींच्या भव्यदिव्य सभा, असाच अर्थ लावला गेला. म्हणूनच सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होऊ शकते काय; असले खोचक प्रश्न विचारले गेले. पण घरोघर पोहोचण्याच्या रणनितीकडे साफ़ दुर्लक्ष करण्यात आले. आताही तिचेच दृष्य परिणाम दिसत असताना कोणाला त्याचा शोध घ्यावा, असेही वाटू नये ही नवलाची बाब आहे. पण ज्यांना राजकारणाची हवा कळते, त्यांना त्याचा शोध घ्यावाच लागतो. तो पत्रकारांना लागला नाही, पण रायबरेली व अमेठीत प्रचाराला पोहोचलेल्या प्रियंका गांधी यांना लागला.

   दहा वर्षापुर्वी प्रथमच राहुल गांधी यांनी अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांच्यासमवेत अर्ज दाखल करायलाही सोनियाजी फ़िरकल्या नव्हत्या. प्रियंका व रॉबर्ट वाड्रा मात्र राहुल सोबत होते. याहीवेळी तेच दोघे तिथे आलेले होते. पण प्रथमच परवा सोनिया गांधींनी अकस्मात अमेठीला जाऊन ‘आपण राहुल हा पुत्र अमेठीला दिला आहे’ अशी भाषा वापरली. तिसर्‍यांदा राहुल तिथली निवडणूक लढवत आहेत आणि प्रथमच त्यांची आई अमेठीला पोहोचली. खरे तर २००४ सालात पुत्रासाठी सोनियांनी हा मतदारसंघ सोडला होता. पण त्याविषयी इतकी खात्री होती, की आपण आपला पुत्रच इथे आणलाय; असेही सांगायला तिथे जायची सोनियांना गरज वाटलेली नव्हती. मग यावेळी तसे का वाटावे? आपला पुत्र त्यांनी दहा वर्षापुर्वीच अमेठीला दिलेला असताना, आज तसे वाक्य कशाला बोलावे? तिथून आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी आव्हान दिले, म्हणून सोनिया विचलीत झाल्या आहेत, की भाजपाच्या लोकप्रिय अभिनेत्री स्मृती इराणी तिथे उमेदवारी करत असल्याने चिंता वाटते आहे? बालेकिल्ल्यात राहुलना कसली भिती आहे? कुठल्याही पक्षाच्या उमेद्ववाराने असे आव्हान उभे केले म्हणता येणार नाही. कारण तसे आव्हान नाहीच. पण आव्हान संपुर्ण उत्तरप्रदेशात आहे आणि त्याच मोदीलाटेचा परिणाम अमेठी-रायबरेलीत होण्याची चिंता त्यामागे आहे. आणि ही मोदीलाट एका व्यक्तीमुळे आलेली नाही. अशीच लाट दिल्लीत उठली आणि त्यात शीला दिक्षीत या मुख्यमंत्री वाहून गेल्या होत्या. ती लाट केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाची नव्हती. तर त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी घरोघर फ़िरून ‘आप’चा जो झंजावात निर्माण केला; त्यात मुख्यमंत्र्याला वाहून जावे लागले होते. त्या घरोघर फ़िरणार्‍या व गाजावाजा नसलेल्या प्रचारकांकडून लाट निर्माण होत असते. आणि असेच प्रचारक प्रियंकांच्या नजरेत भरल्यावर त्यांनी सोनियांना तात्काळ अमेठीत जनतेला आवाहन करायला बोलावून घेतले.

   कुठल्या वाहिनीवर अशी बातमी वा गवगवा झालेला नाही. अधूनमधून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व कुमार विश्वास यांची कॉग्रेसजनांशी झालेली झटापट वाहिन्यांवर दिसते. पण कॅमेरापासून दूर रहाणारे व गटागटाने गावागावात व घराघरात जाऊन सामान्य जनतेशी संपर्क साधणारे रा. स्व. संघाचे कार्यकर्ते; हे यावेळी उत्तरप्रदेशातील सर्वात मोठे आव्हान म्हणून उभे राहिलेले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांकडून प्रियंकाना त्याचा सुगावा लागला. काही गावातून फ़िरताना त्यांना असे दहाबारा कार्यकर्त्यांचे गट त्यांच्या नजरेत भरले. हा घोळका कुठल्या घोषणा देत नाही, की झेंडे फ़डकावित नेत्यांच्या सोबत फ़िरत नाही. परंतु घराघरात जाऊन मतदाराशी बोलतो, त्याला आपली बाजू समजावतो. हेच वाराणशीमध्ये चालू आहे. तिथे ७० हजार गुजराती स्थायिक झालेले आहेत. त्यांचे स्थानिक विणकरांशी व्यावहारिक संबंध आहेत. हे लोक मुस्लिम विणकरांना मोदीमहात्म्य समजावत फ़िरतात. त्यांच्या बायका म्हणजे वाराणशीतल्या गुजराती गृहिणी लौकर घरकाम उरकून घोळक्याने घरोघर मोदींचा प्रचार करीत फ़िरतात. सुरतच्या साडी व्यवसायाला मोदींनी कसे वरदान दिल्याच्या गोष्टी कथन करतात. असा डोळ्यात वा कॅमेरात न भरणारा प्रचार, लाटेचे रूप धारण करत चालला आहे. अशाच प्रचाराने दिल्लीत कॉग्रेसला दगा दिला होता आणि त्याचे अनुकरण मागल्या दोन महिन्यापासून भाजपाचा प्रभाव असलेल्या साडेतिनशेहून अधिक लोकसभा मतदारसंघात करण्यात आले. त्याचाच परिणाम आता दिसू लागल्यावर त्याला मोदीलाट असे नाव दिले जाते आहे. पण त्यामागची खरी मिमांसा होऊ शकलेली नाही. जे राजकीय अभ्यासकांना उमगलेले नाही किंवा पत्रकारांना बघता आलेले नाही; ते प्रियंकाला उमगावे आणि त्यांनी आईला अमेठीत यायला भाग पाडावे, यातच त्यांनी राजकीय जाण लक्षात येऊ शकते. दहा कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याच्या रणनितीचा तो परिणाम आहे. मिशन २७२चे तेच खरे रहस्य आहे.

No comments:

Post a Comment