Saturday, May 17, 2014

एकविसाव्या शतकातला एकलव्य



महाभारत या महाकाव्यामध्ये एकलव्याची गोष्ट आहे. तो खालच्या जातीचा असल्याने द्रोणाचार्य हा गुरू त्याला काहीही शिकवायला तयार नसतो. बाकी कुरू वंशातल्या राजपुत्रांना द्रोणाचार्यांची शिकवणी चालू असते. त्याचे अवलोकन करून एकलव्य मन लावून स्वत:च शिकत असतो. नुसत्या अवलोकनातून तो अव्वल धनुर्धर होतो. इतका अव्वल, की त्याच्यापुढे द्रोणाचार्यांनी सर्व कौशल्य पणाला लावून तयार केलेला आपला पट्टशिष्य अर्जून सुद्धा फ़िका पडतो. मग आपल्या शिष्यालाच सर्वोत्तम धनुर्धर ठरवण्यासाठी दोणाचार्य एक लबाडी करतात. ज्याला कधी एक धडा शिकवला नाही, त्या एकलव्याला भावनात्मक गोत्यात टाकून त्याच्याकडे गुरूदक्षीणा मागतात. कारण एकलव्य मनोभावे त्यांना गुरू मानत असतो. बिचारा एकलव्य त्यालाही तयार होतो. तेव्हा गुरू त्याच्याकडे उजव्या हाताच्या अंगठ्याची मागणी करतात. तो अंगठाच गेला तर पुन्हा एकलव्य कधीही धनुष्यबाण चा्लवू शकणार नसतो. पण बिचारा एकलव्य ती दक्षीणाही देतो आणि कायमचा निकामी होऊन जातो. शेकडो वर्षे कित्येक पिढ्यांनी ऐकलेली ही कथा आहे. प्रत्येकाला एकलव्याची दया येते. पण आपण आसपासचे एकलव्य बघू तरी शकतो काय? आज तशाच एकविसाव्या शतकातील एकलव्व्याने तमाम भारतीय राजकीय द्रोणाचार्यांना आपल्या धनुर्विद्येने थक्क करून सोडले आहे आणि ते सगळेच त्याच्याकडे गुरूदक्षिणा मागत आहेत. पण हा पुराणातला एकलव्य नाही. तो आधुनिक युगातला आहे, म्हणून तो अंगठा देण्याऐवजी या भोंदू द्रोणाचार्यांना ‘अंगठा दाखवतो’ आहे.

   गेल्या दहा बारा वर्षात भारतातल्या तमाम राजकीय जाणकार, अभ्यासक, विश्लेषक व नेत्या-पंडीतांनी गुजरातचा मुख्यमंत्री असलेल्या या नरेंद्र मोदी नामक एकलव्याला टोचून टोचून संपवायचा व नामोहरम करायचा प्रयत्न केला. त्याला शह देण्यासाठी नवनवे शिष्यगण पुढे केले. पण त्या सर्वांवर मात करून आपणच उत्तम धनुर्धर असल्याचे, म्हणजे पराक्रमी शूरवीर असल्याने गेल्या सहाआठ महिन्यात मोदींनी सिद्ध केले. त्या सर्व काळामध्ये याच द्रोणाचार्यांनी त्याच मोदींनी असे वागावे, तसे करावे, हेच बोलावे किंवा तेच बोलू नये अशा शेकडो मागण्या करून झाल्या. पण मोदींनी त्याकडे साफ़ दुर्लक्ष करून आपली धोडदौड सुरूच ठेवली. ज्यांनी कुठलीही मदत वा सहाय्य न करता संपवण्याचे उद्योग केले; त्यांना मोदींकडून कुठली अपेक्षा बाळगायचा अधिकार तरी उरतो काय? मग मागल्या सहा महिन्यात पंतप्रधान होण्यासाठी मोदींनी काय काय करावे, असे सांगायचा कोणाला अधिकार होता काय? मग तशा मागण्या करणे म्हणजे एकलव्याकडे अंगठा मागण्यासारखीच चाल नव्हती काय? कदाचित त्या पुराणकालीन एकलव्याची फ़सवणूक झाली, त्याची या एकविसाव्या शतकातील एकलव्याने परतफ़ेड केली म्हणायची. कारण या आधुनिक द्रोणाचार्यांच्या कुठल्याही भावनात्मक वा राजकीय पेचात फ़सायचे नाकारून त्यांना या एकलव्याने अंगठा दाखवला म्हणायचा. हे सगळे राजकारण कसे घडत उलगडत गेले?

कॉग्रेसचे अभ्यासू नेते व ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरील पहिलेच मोठे राजकीय आव्हान आहे; असे का म्हटले त्याचा कुणा राजकीय अभ्यासकाने गंभीरपणे विचारच केला नाही. रमेश असे गंमतीने म्हणाले नाहीत. कारण त्यांना मोदी नावाचे आव्हान नेमके कळलेले आहे आणि त्यांना राजकीय इतिहासही चांगला ज्ञात आहे. आजवर अनेकदा कॉग्रेस पक्षाला विविध राज्यात व केंद्रातही सत्ता गमवावी लागली आहे. पण तरीही पुन्हा त्या धक्क्यातून सावरून कॉग्रेस उभी राहिली आहे, सत्तेवर आलेली आहे. पण दुसरीकडे अनेक राज्ये अशी आहेत, की तिथे एकदा पराभव झाल्यावर कॉग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन कधी होऊ शकलेले नाही. १९६७ च्या पराभवानंतर कॉग्रेस पुन्हा कधीच तामिळनाडूत सत्तेवर येऊ शकली नाही. आता तर स्वबळावर तिथल्या निवडणूकाही तो पक्ष लढवू शकत नाही. १९७७ नंतर बंगालमधून कॉग्रेस पक्ष असाच कायमचा परागंदा होऊन गेला. डाव्या आघाडीने तिथे पक्का जम बसवल्यावर ममतांनी कॉग्रेस बाहेर पडून नवा प्रादेशिक पक्ष काढूनच डाव्यांना पाणी पाजले. पण कॉग्रेस संपली. १९९० नंतर उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यातून कॉग्रेस कायमची उखडली गेली. तेच गुजरातमध्ये १९९५ नंतर झाले आहे. पण तसे कधी देशाच्या राजकारणात म्हणजेच संसदीय राजकारणात होऊ शकले नाही. आज स्वबळावर नाहीतरी मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन कॉग्रेसने पुन्हा सत्ता मिळवली आहे. १९७७, १९८९, १९९६, १९९८ व १९९९ असे पराभव पचवूनही कॉग्रेस पुन्हा संजीवनी मिळवून दिल्लीची सत्ता काबीज करू शकली आहे. जे उपरोक्त काही राज्यात झाले तसे दिल्लीच्या संसदीय राजकारणात पाच पराभवानंतरही का होऊ शकले नाही? त्याचे उत्तर त्या त्या राज्यातील बदलातून सापडू शकते. ज्या राज्यात कॉग्रेस कायमची उखडली गेली, तिथे कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या समर्थ नेत्याने व एकपक्षिय सत्तेनेच कॉग्रेसला पर्याय दिलेला आहे. जिथे आघाडीचे पर्याय उभे राहिले, तिथे कॉग्रेसला पुन्हा पुन्हा जीवदान मिळत राहिले आहे. मुलायम, मायावती, लालू, नितीशकुमार, डावी आघाडी, वा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी, छत्तीसगडमध्ये रमण सिंग वा मध्यप्रदेशात शिवराज सिंग चौहान अशा खमक्या नेत्यांपाशी एकपक्षिय बहूमत आल्यावर असे बस्तान बसवले, की कॉग्रेसचे पुनरूज्जीवन करणेच अशक्य होऊन गेले. पण तसा पर्याय कधी दिल्लीच्या राजकारणात उभा राहिला नाही, की उभा ठाकला नाही. खंबीरपणे देशभरच्या जनमानसावर प्रभाव पाडू शकेल, असा नेताच बिगर कॉग्रेस पक्षांना कधी समोर आणता आलेला नव्हता. मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग. व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी यांनी कमीअधिक मुदतीची सरकारे स्थापन केली व चालवली सुद्धा. पण त्यांच्या पाठीशी कधी एकदिलाने चालणारा पक्ष नव्हता किंवा त्यांची पक्षावर व जनमानसावर हुकूमत प्रस्थापित झाली नव्हती. तसे देशव्यापी प्रभाव पाडू शकणारे नेतृत्वच बिगर कॉग्रेस पक्षांना उभे करता आलेले नव्हते. नेमकी उलटी स्थिती कॉग्रेस पक्षाची होती. नेहरू गांधी खानदानाच्या आज्ञेत वागायचे व जगायचे, असे व्रत घेतलेली कॉग्रेस सोनिया राहुल यांच्याही इशार्‍यावर नाचू शकते, हेच कॉग्रेसचे खरे बळ आहे. नेमके तेच मुलायम, मायावती, लालू, नितीश, मोदी वा जयललिता वा करूणानिधी व नवीन नटनाईक यांच्याही पक्षात राज्यपातळीवर होतांना दिसेल. तेच मोदींच्या निमित्ताने भाजपमध्ये आता राष्ट्रीय पातळीवर होऊ घातले आहे. त्या अर्थाने कॉग्रेस समोर खरे आव्हान प्रथमच उभे ठाकले आहे, असेच जयराम रमेश यांना म्हणायचे होते,

1 comment:

  1. भाऊ नरेन्द्र मोदिंचे हे आव्हाण परतवने कॉंग्रेसला खुप अवघड जाणार आहे.

    ReplyDelete