Sunday, May 11, 2014

नरेंद्र मोदींची रणनिती

   जेव्हापासून नरेंद्र मोदी यांना भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले, तेव्हापासून त्या पक्षाला एकच प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. मित्र पक्ष सोबत यायला तयार नाहीत, होते तेही निघून गेले आणि तुम्ही लोकसभेतील बहूमताचा पल्ला कसा गाठणार? पहिली बाब अशी, की कुठलाही सेनापती युद्धापुर्वी व युद्ध संपेपर्यंत आपली रणनिती, युद्धनिती कधीच जाहिर करीत नाही. कारण तेच त्याचे सर्वात भेदक हत्यार असते. त्याची रणनिती कळली, तर शत्रूचे काम सोपे होऊन जात असते. म्हणूनच दोघांच्या पलिकडे तिसर्‍याला एखादी गोष्ट कळली, तर ती गोपनीय उरत नाही, असे चाणक्य म्हणतो. असे असेल तर भाजपातले नेतेच काय, सोबतच्या गोतावळ्याला तरी मोदी आपली रणनिती संपुर्णपणे उघड करून सांगतील काय? आणि जो तपशील सर्वच सहकार्‍यांसमोरही उघड करता येत नाही, तोच जाहिरपणे पत्रकारांना सागता येईल काय? सबब अशी बाब विचारायची नसते; तर घटनाक्रम व कृतीतून उलगडायचा प्रयत्न करायचा असतो. त्यात अनेक संकेत दडलेले असतात. मोदींच्या गेल्या दोन वर्षातल्या अनेक हालचाली, कृती व वक्तव्यातून त्यांची रणनिती पुरेशी स्पष्ट झालेली आहे. सातत्याने गुजरात दंगलीचे कारण देऊन आपल्यावर एकतर्फ़ी टिका व्हावी; असे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. दुसरीकडे शक्य झाले, तेव्हा त्यांनी सतत राहुल, सोनिया व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर कडवी टिका केलेली आहे. जितके भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांना संसदेत बसून करता आले नाही, तितके कॉग्रेस व युपीएचे नुकसान मोदींनी आपल्या भाषणे व वक्तव्यातून केलेले होते. पण त्यातून त्यांना काय साधायचे होते? तर त्यांना पंतप्रधान पदाचा हव्यास जडलेला आहे त्यासाठीच मोदींना घाई झालेली आहे, असेही म्हटले गेले. पण त्यांचे लक्ष्य केवळ पंतप्रधानपद होते काय?

   कॉग्रेसला लोक वैतागलेले असले तरी त्यांना पर्याय दुबळा पांगळा नको होता. म्हणूनच सत्तेच्या मागे धावत सुटलेल्या भाजपाला मागल्या निवडणूककीत सपाटून मार खावा लागला. लोकांना कॉग्रेसची जागा घेऊ शकणारा पक्ष हवा होता, पण सत्तालोलूप दुसरी कॉग्रेस नको होती. भाजपाने १९९६पासून २००४ पर्यंत आपल्या हव्यासाची साक्ष दिल्यानेच अधिकचा मतदार त्यांच्याकडे यायचे थांबले होते. त्याच लोकांना आपल्याकडे ओढायचे लक्ष्य घेऊन मोदी राष्ट्रीय राजकारणात उडी घ्यायला सिद्ध झाले होते. पण त्यासाठी देशव्यापी खंबीर नेतृत्व आणि देशव्यापी पक्ष संघटना अगत्याची होती. मोदींचा तोच रोख होता. त्यासाठी त्यांनी दुबळे सरकार व भ्रष्टाचार ही दोन लक्ष्ये निश्चित केली होती. त्यापैकी एका आघाडीवर अण्णा हजारे व केजरीवाल यांनी त्यांचे काम परस्पर पार पाडले. तर सरकारच्या नकर्तेपणाला नामोहरम करायचे काम आपल्या गुजरात कारभारातून मोदींनी पार पाडले. असले दोन खुले अजेंडे मोदींनी समोर ठेवले होते. अन्य दोन अजेंडे गोपनीय होते, ज्याची वाच्यता त्यांनी कधीच केली नाही. त्यातला एक मुस्लिम व्होटबॅन्क व सेक्युलर थोतांडाला शह देण्याचा. त्यासाठी या दोन्ही गोष्टींना कंटाळलेल्या लोकांना आपली खंबीर प्रतिमा दाखवायचा यशस्वी प्रयोग मोदींनी पार पाडला. गुजरात दंगलीचा मुद्दा घेऊन त्यांच्याकडे जितका माफ़ीचा आग्रह धरला, तितका तो ठामपणे फ़ेटाळून लावत मोदींनी आपल्या खंबीर प्रतिमेला उजळून घेतले. त्याचे दोन फ़ायदे होते. एकीकडे त्यातून हिंदूत्वाचा खंदा समर्थक व मुस्लिम लांगूलचालनाच्या राजकारणाने व्यथीत असलेला वर्ग त्यांच्याकडे निश्चितपणे वळत गेला. या निमित्ताने होणार्‍या टिकेचा लाभ मोदींनी कसा उठवला? जितकी ही दंगलीची टिका कडवट होत गेली, तितकी दुसरीकडे मोदींसाठी हिंदू व्होटबॅन्क उभी रहात गेली. ज्याची कोणी कधी अपेक्षाही केलेली नव्हती. त्यातून मोदींनी काय साधले?

   ह्या हिंदू व्होटबॅन्केचा काय उपयोग होता? कितीही प्रयत्न केले तरी सगळा हिंदू एकगठ्ठा मतदान करणार नाही, याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. पण ७५ टक्क्याहून अधिक हिंदू लोकसंख्येतला पंधरासोळा टक्के हिंदू जरी मोदींच्या मागे गठ्ठा म्हणून ठामपणे उभा राहिला, तरी तो मुस्लिम व्होटबॅन्क मानल्या जाणार्‍यांना तुल्यबळ होतो. म्हणजेच मुस्लिम मतांची जी धार्मिक संख्या म्हणून मातब्बरी सांगितली जाते, तिचे सामर्थ्य तेवढ्या हिंदू मतांनी निकामी होऊन जाते. मग धर्माची महत्ता ज्यांना वाटत नाही, त्या उरलेल्यांना विकास व चांगला कारभार सांगून जवळ घेतले, तर त्या बळावर मोठा विजय मिळवणे शक्य होते. मुस्लिमांचे कितीही लांगुलचलन करून कॉग्रेसला हिंदूही मते देतात, कारण त्यांना धर्माचे कौतुक नसून कारभाराची हमी आवश्यक वाटते. अशा लोकांना चांगल्या कारभाराविषयी खात्री द्यायची काळजी मोदींनी घेतली. उरलेल्या हिंदू कडव्यांना गुजरातच्या दंगलीची माफ़ी न मागितल्याने जवळ राखणे सहजशक्य होते. कारण विरोधक दंगलीचा व संघाचा बागुलबुवा करून मोदींना हिंदूत्ववादी ठरवण्याचे काम बिनबोभाट पार पाडणारच होते. म्हणजेच माफ़ीचा कितीही आग्रह होऊनही त्याविषयीचे मोदींचे मौन, हा हिंदूत्वाच्या रणनितीचा अघोषित भाग होता. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले असे प्रचाराच्या अखेरीस नक्की म्हणता येईल. त्यात मतमोजणीनंतर मोदी यशस्वी झाले, तर त्याचे देशभरच्या राजकारणावर दिर्घकालीन परिणाम होऊ शकणार आहेत. पहिला परिणाम म्हणजे मुस्लिम लांगुलचालन म्हणजे सेक्युलॅरिझम; हा विषय इतिहासजमा होईल. दुसरी गोष्ट मतांचे लाचार सगळेच पक्ष सेक्युलर पाखंड सोडून हिंदू व्होटबॅन्केच्या मागे धावत सुटतील. तसे झाल्यास ‘सबका साथ, सबका विकास’ असे सतत बोलणारा नेता म्हणून मोदी हाच मुस्लिमांसाठी एकमेव ‘सेक्युलर’ नेता शिल्लक राहिल. सतत तीन महिने मोदी कॉग्रेसमुक्त भारत अशी भाषा बोलत आहेत, त्याचा वास्तविक अर्थ पाखंडी सेक्युलॅरिझममुक्त भारत असा आहे. ती रणनिती कितपत यशस्वी झाली, त्याचे उत्तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळालेले असेल.

3 comments:

  1. उत्कृष्ट . आज देश मोदींच्या झंझावातामुळे ढवळून निघाला आहे पण त्यामागची कारण काँग्रेसला कळू शकलेली नाहीत आणि इथेच त्यांची फसगत झालेली आहे. बाकी SP ; BSP ; RJD ; JDU आणि Trunmul यांचा विरोध हा व्यक्तिविरोध आहे त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही .

    ReplyDelete
  2. Secular shabdachi paribhasha badalnyache kam Modini kele hi khup mothi goshti njali karan aata congresch lokana dharmandha aahe ase lokana Modincha rananiti mule vatu lagale aahe.

    ReplyDelete
  3. आजच्या कॉंग्रेस (तसेच इतर सर्वच पुरोगामी पक्ष ) कडे बघितले कि या लेखाची भविष्यवाणी खरी ठरलेली आहे याची प्रचीती येते.

    ReplyDelete