Tuesday, August 12, 2014

घरकी मुर्गी दाल बराबर?

"You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality."
- Ayn Rand

जगप्रसिद्ध चिंतक व लेखिका आयन रॅन्ड म्हणते ‘तुम्ही वास्तवाकडे पाठ फ़िरवू शकता, पण वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याच्या परिणामांपासून तुमची सुटका नसते.’
---------------------------------
अमूक<<<<
हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये फरक कोणते आहेत?
मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही.
म्हणून हा प्रश्न विचारतोय..
--------------------------------
हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांमधला फरक

हिंदू माणूस समाजवादी, मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी इत्यादी असू शकतो. म्हणजे धर्माने आणि परंपरेने हिंदू असूनही तो वेगळं राजकीय- सामाजिक वा निष्ठा वा कार्यक्रम वा विचारसरणी स्वीकारतो.

हिंदुत्ववाद्याला मात्र हे शक्य नाही.
रा.स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप थोडक्यात संघ परिवारातूनच हिंदुत्ववादी निवड करतो. त्याच्यापुढे दुसरा पर्यायच नसतो.
================================
तमूक<<<<
 मी हिंदुत्ववादी नसल्यामुळे हिंदू धर्माला माझा काहीएक उपयोग नसावा. एकंदरीतच मी कुठल्याही धर्माचा असतो तरी इतकाच यूसलेस आणि असाच अडाणी असलो असतो याबद्दल मला खात्री आहे.
-----------------------------------

(फ़ेसबुकवरल्या या दोन मित्रांच्या उपरोक्त विधानानंतर अशा विषयावर मनात आलेले विचार मांडणे अगत्याचे वाटले म्हणून हा उपचार. त्यांची नावे टाळली आहेत, कारण त्यातून व्यक्तीगत हेत्वारोप होतात आणि मुद्दा बाजूला पडतो.)

  बहुसंख्य हिंदू म्हणून जगणार्‍यांना वा हिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या व प्रामुख्याने अशा विषयात बोलणार्‍यांना आपण हिंदू असणे म्हणजे जगाच्या संदर्भात नेमके काय, आहे त्याचा पत्ता नसतो. त्याची ही अशी प्रचिती येत असते. हिंदू असण्याचा अभिमान असला, मग तुम्ही हिंदूत्ववादी होता, असाही एक समज आहे. पण असला समज बोलघेवडेपणाच्या पलिकडे जाणारा नसतो. कुठल्याही वाद वा अस्मितेची कसोटी तेव्हाच लागते, जेव्हा तिची सत्वपरिक्षा घेतली जात असते. या संदर्भात जे हिंदू आहेत पण हिंदूत्ववादी नाहीत म्हणजे काय, याची आपण तपासणी सुरू केल्यास नेमके काही हाती लागू शकते. उदाहरणार्थ उपरोक्त दोन मित्र वा अनेक तत्सम लोक संघप्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना असे मतप्रदर्शन करीत आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यांच्या म्हणण्याचा साधा अर्थ इतकाच, की हिंदू असलो तरी अभिमानाने त्याची जाहिरात करावी किंवा त्यासाठी तलवार उपसून लढायला बाहेर पडावे, अशी त्यांच्यात कुठलीही उर्मी नाही. सहाजिकच तशी उर्मी वा खुमखुमी असेल त्याला हिंदूत्ववादी म्हणता येईल, असाच त्यांच्या म्हणण्याचा गर्भितार्थ आहे. किंबहूना आपण हिंदूत्ववादी नसून नुसतेच हिंदू आहोत, म्हणुन धर्माचा पगडा आपल्यावर लादला जाऊ शकत नाही, असेही ठासून सांगण्याचे अगत्य त्यांच्यात आहे. परिणामी आपल्याला हिंदू म्हणा किंवा नाही म्हणालात, तरी फ़रक पडत नाही असेच त्यांना सुचवायचे आहे. त्यांनी बोलून दाखवले तितक्या उत्साहात अनेक हिंदू बोलूनही दाखवणार नाहीत. पण त्यांना जितक्या उत्साहात स्वेच्छेने असे घोषित करावेसे वाटले, तितक्या उत्साहाने किती बिगरहिंदू आपल्या धर्माविषयी आपण उदासिन आहोत, असे सांगायला अगत्याने पुढे येतील? सगळी समस्या तिथूनच सुरू होते.

याच विषयावर चर्चा वाहिन्यांवर सुरू होत्या, त्यामध्ये अमुक म्हणतो तसे अनेक उदारमतवादी हिंदू अगत्याने भागवत यांच्यावर आक्षेप घेत होते. पण सेक्युलर म्हणून त्यात सहभागी झालेला कोणीही बिगरहिंदू तितकी सैल भूमिका घेत नसतो. त्या प्रत्येकाला आपल्यावर हिंदू असा शिक्का मारण्याचा आलेला संताप लपत नव्हता. जितक्या अगत्याने त्यांना आपण हिंदू नाही हे सांगण्याचा उत्साह होता, तितका किती हिंदूंमध्ये हिंदू असण्याचा उत्साह आढळतो? अशा हिंदूंचा उपयोग तरी काय, असाही प्रश्न मग लक्षात घेण्यासारखा आहे. तमूक हा मित्र म्हणतो, ‘आपण हिंदू म्हणून निरूपयोगी आहोत.’ या मित्राचा दावा शंभर टक्के त्याच्या धर्मापुरता खरा व योग्यच आहे. पण त्याचे पुढले विधान मात्र संदिग्ध आहे. ‘एकंदरीतच मी कुठल्याही धर्माचा असतो, तरी इतकाच यूसलेस आणि असाच अडाणी असलो असतो.’ यात गफ़लत आहे. कारण तमूक अन्य कुठल्याही धर्मात जन्मलेला वा सध्या तरी सहभागी झालेला नाही. आणि असता तर त्याला असे खुलेपणाने बोलायची मुभा मिळाली असती काय? तसे असते तर बिचार्‍या तस्लिमा नसरीनला देशोधडीला लागायची वेळ आली असती काय? तिच्या मायदेशातच नव्हेतर आपल्या भारत नामे सेक्युलर देशातही तिला तशी मुभा आपण देऊ शकलेलो नाही. मुस्लिम असूनही इस्लाम झुगारण्याचे वा मुस्लिमत्व नाकारण्याचे धाडस तस्लिमाच्या जीवावर कशाला उठले आहे? आपण लंब्याचवड्या सेक्युलर गप्पा मारताना तस्लिमाने पत्करलेल्या धोक्याचा विचार तरी करतो काय? जे स्वातंत्र्य वा अधिकार अमूक वा तमूक हिंदू म्हणून उपभोगू शकतात, तेवढे तरी स्वातंत्र्य आपल्याच सेक्युलर देशात हमीद दलवाई वा तस्लिमाला मिळू शकले आहे काय? त्यांनाही तेच स्वातंत्र्य हिंदू असते, तर उपभोगता आले असते. त्यांना त्याची किंमत कळू शकली, ती आम्हाला हिंदू असून उमगलेली नाही. आणि असे उदारमतवादी असलेल्या हमीद वा तस्लिमा यांच्याबद्दलच म्हणता येत नाही, अगदी ज्यांच्यावर पुन्हा कट्टरता वा धर्मांधतेचा आरोप होतो, त्या शाही इमाम बुखारी यांच्याही बाबतीत तेच म्हणावेच लागते. हिंदू असण्याची महत्ता सेक्युलर मित्रांना उमजलेली नाही, कारण त्यांचे हिंदू असणे कसोटीला लागलेले नाही.

ज्यांची हिंदूत्ववादी म्हणून हेटाळणी वा उपहास करण्यात सेक्युलर मित्रांना धन्यता वाटते, ते बिगरहिंदूंच्या इतके कडवे धर्मवादी वा स्वाभिमानी असते, तर काय झाले असते? बुखारी त्याचे उत्तर देतात. ‘भारत हा देश इथल्या सेक्युलर पक्षांमुळे नव्हेतर बहुसंख्य हिंदूंमुळे सेक्युलर राहू शकला आहे.’ तसे नसते तर काय झाले असते, त्याचा अर्थ बुखारींना नेमका कळतो. म्हणूनच कडवे इस्लामी असून त्यांनी भारतीय हिंदूंचे कौतुक केले आहे. त्याचा अर्थ इतकाच, की हिंदू म्हणून जे कोणी असतात, ते आपल्या धर्माचे आग्रही नसतात, म्हणूनच इतर धर्मियांना आपापल्या धर्माने वा उपासना पद्धतीने जगण्याची सुट वा मुभा मिळू शकते. त्याचा अर्थ काय, त्याचा तपशील हवा असेल, तर इतिहासात जाण्याची गरज नाही. बांगलादेश, अफ़गाणिस्तान वा पाकिस्तानातून आजही जीव मुठीत धरून भारतात आश्रयाला येणार्‍या हिंदूंकडे आपल्याला बघता येईल. त्यांनाही तिथे आपापल्या मायभूमीत अमूक वा तमूक प्रमाणेच धर्माचे अवडंबर माजवायची हौस नाही वा त्यांनी हिंदूत्ववादाचा आग्रह धरलेला नाही. पण त्यांचे हिंदू असण्यापेक्षा मुस्लिम नसणे, त्यांच्या जीवावर उठलेले आहे. त्यांच्याकडेही पाठ फ़िरवू. त्याच्यापलिकडे इराक नावाच्या देशात सध्या जो धुमाकुळ माजलेला आहे, तिथल्या बिगर मुस्लिम वा शिया पंथीयांचे काय करायचे? त्यांच्यावर मृत्यूची छाया इतकी गडद कशाला झालेली आहे? त्यांचे कुठले धर्म वा उपासना पद्धती असतील किंवा नसतील, त्याच्याशी त्यांच्या जगण्याच्या ‘सवलती’चा संबंध जोडला गेलेला आहे ना? त्यांना आपली उपासना पद्धत आपल्या पुरती निवडण्याचा किंवा नावडण्याचा तरी अधिकार आहे काय? नसेल तर कशामुळे त्यांना इतका क्षुल्लक अधिकार नाकारला गेलेला आहे? इराकमध्ये तुमच्या आमच्यासारखे हिंदूच बहुसंख्य असते तर त्यांच्यावर अशी जीवघेणी वेळ आली असती काय? अमूक वा तमूक यांच्यासारखे हिंदू आहेत, तसेच जरी इराकमध्ये बहुसंख्येने असते, तर त्या याझदी वा शिया मुस्लिमांना सुखरूप जगता आले असते ना? मग त्यांच्यावरचे खरे संकट कोणते आहे? तर तिथे कोणीच हिंदू नाहीत वा भलेबुरे कुठलेच हिंदू बहुसंख्य नाहीत, हेच संकट नाही काय? शाही इमाम बुखारी तेच सांगतात. भारतात बहुसंख्य हिंदू आहेत, हीच अन्य धर्मियांसाठी सुरक्षेची हमी आहे. ती कुठल्या सेक्युलर राजकीय पक्षाने बहाल केलेली सुरक्षा नाही, तर बहुसंख्य हिंदू असणे, ही सेक्युलर जीवनाची असण्याची हमी असते.

यासाठी कोणी हिंदूत्ववादी होण्याची गरज नाही किंवा प्रत्येकाने स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याचीही गरज नाही. पण बहुसंख्य हिंदू असणे, हीच सेक्युलर रहाण्याची हमी असते. किंबहूना तीच हिंदू असण्यातली महत्ता असते. कारण हिंदू असण्याचे पहिले लक्षण तुम्ही दुसर्‍यावर आपले धर्मविचार लादण्याची शक्यता नगण्य होऊन जाते. उलट जिथे हिंदू बहुसंख्य उरत नाहीत, तिथे सेक्युलर समाज शिल्लक उरत नाही. तीच तर तुमच्या हिंदू असण्याची महत्ता आहे. तीच तर सेक्युलर युगाची मोठी उपयुक्तता आहे. ज्याच्याअभावी काश्मिरमधून हिंदू असलेल्यांना जीव मूठीत धरून पळ काढावा लागला आहे. अमूक वा तमूक हिंदू असून हिंदूत्ववादी नसल्याचे अभिमानाने सांगतात, ती हिंदू असण्यातली चैन आहे. तशी चैन तस्लिमाला तिच्या मायदेशात करता येत नाही किंवा हमीद दलवाईना आपल्या जन्मदेशात अनुभवता येत नाही. ज्या गोष्टी सोयी वा सुविधा सहजासहजी उपलब्ध होतात, त्याची किंमत कोणाला असते? म्हणतात ना घरकी मुर्गी दाल बराबर?

1 comment:

  1. भाऊ, आपण हिन्दू असेच मवाळ राहिलो तर जशजशी मुस्लिमांची संख्या वाढत जाईल तसतसे भारत इस्लामिक राष्ट्र म्हणून नावारुपाला येत जाईल. या निवडणुकित लोकांनी हा धोका ओळखुनच भाजपला त्यापेक्षा मोदींना निवडून दिले आहे असे वाटते. सध्या जे तथाकथित 'हिन्दू सेक्युलर' लोक आहेत त्यांना हे कसे कळत नाही. आपण म्हणता तसे खरेच हिन्दू एक नाहीत. खुप हिंदूंचा हिंदुत्वाला काहीही उपयोग नाही. मुस्लीम हिन्दू इतके सहिष्णु नाहित हे इतिहासाच्या पानापानावर लिहले आहे, परंतू त्यातून हिन्दू काहीही शिकले नाहीत असे वाटते. पृथ्वीराज चव्हाण यांनी युद्धात मोहम्मद घोरिला हरवुनही १४ वेळा माफ करुण सोडून दिले होते परंतू त्याच घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांना खुप अत्याचार करुण आत्महत्या करण्यास भाग पाडले.
    दोनएक वर्षांपूर्वी सुब्रमनियम स्वामी यांनी एक मटा किंवा लोकसत्तेत लेख लिहला होता. त्यांनी पुराव्यासहीत बऱ्याच देशांची उदाहराने देवून दाखवून दिले होते की जशीजशी मुस्लीमांची लोकसंख्या वाढत जाते तसतसे पायरीपायरीने त्या देशाचे इस्लामीकरण होत जाते.
    आतापर्यंत काँग्रेस आणि इतर पक्ष 'सेक्युलर' वागुनही भारत इस्लामी दहशतवाद्यांचे पाहिले लक्ष आहे. 'सेक्युलर' वागण्याचे हेच जर फळ मिळणार असेलतर भारताला हिन्दू राष्ट्र घोषीत केल्याने काय फरक पडणार आहे?

    ReplyDelete