Wednesday, October 15, 2014

भाजपाला बहूमत मिळेलही, पण........



गेले काही दिवस मी जे काही संदर्भ देऊन महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीविषयी विवेचन करतो आहे, ती अनेक मोदीभक्त किंवा भाजपा समर्थकांना आवडलेली नाही. त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण त्यासाठी त्यांनी माझ्या पत्रकारी प्रामाणिकपणावर शंका उपस्थित करण्याने मन विषण्ण झाले. गेल्या दोन अडीच वर्षात नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वाटचालीबद्दल लिहीताना त्यांचे मी समर्थन करतोय; अशी अनेक मित्रांची व वाचकांची तक्रार होती. काहींनी तर मला भाजपावाला किंवा मोदीभक्त संबोधण्यापर्यंत मजल मारली होती. तेव्हाही तशाच मानसिक यातना झाल्या होत्या. पण तेव्हा किंवा आज माझी भूमिका किंचीतही बदललेली नाही. तेव्हा मी मोदी समर्थक नव्हतो, तर मोदींना, किंवा भाजपासह हिंदूत्ववाद्यांना केवळ सेक्युलर भूमिकेच्या आहारी जाऊन कोंडीत पकडण्याच्या चलाखीच्या मी विरुद्ध होतो. मोदी विरोधातल्या खोट्या प्रचाराचा विरोधक होतो. मी काही लिहीले म्हणुन मोदी जिंकणार नव्हते, किंवा जिंकलेही नाहीत. आपल्या लिहीण्या बोलण्याने कोणाचे पारडे जड वा हलके होऊ शकते; असे मानणार्‍या पत्रकारांपैकी मी अजिबात नाही. पण वेळोवेळी वाचकांना आठवत नसलेला तपशील व दाखले देऊन, विचारांना प्रवृत्त करणे, ही पत्रकाराची जबाबदारी असते. याच भावनेतून मोदी वा भाजपाच्या झाकल्या जाणार्‍या बाजूंना उजाळा देण्याचे कर्तव्य मी पार पाडत होतो. आज त्याची गरज उरलेली नाही. उलट तोच भाजपा किंवा मोदी भरकटत चालले असतील, तर त्याविषयी लोकांना विचार करायला भाग पाडणे, मला पत्रकार म्हणून माझे कर्तव्य वाटते.

त्यामुळेच राज्यात विधानसभा निवडणूकीत ज्या घडामोडी चालू आहेत, त्याविषयी मला परखड मतप्रदर्शन आवश्यक वाटले. त्यामुळे शिवसेनेला लाभ होईल किंवा भाजपाचा तोटा होईल; असे मला अजिबात वाटत नाही. ज्यांना कोणाला तसे वाटत असेल, त्यांनी अशा भ्रमातून बाहेर पडावे. पण ज्याप्रकारच्या प्रतिक्रिया मोदीभक्त किंवा भाजपा समर्थकांकडून इथे वाचायला मिळाल्या, त्यावरून एक नक्की म्हणू शकेन, की भाजपाही आता कॉग्रेसच्या वळणाने जाऊ लागली आहे. त्यामुळे त्या पक्षाचे भविष्य वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण कॉग्रेसला इतके भरकटायला निदान शंभर वर्षे जावी लागली. त्याच्या वाटेने साडेतीन दशकांपुर्वी जनता पक्षीय गेले आणि इतिहासाने कॉग्रेसला नवी संजीवनी दिली. त्यातून धडा शिकून १९८० सालात बाजूला झालेल्या भाजपाने १९८९ नंतर नव्याने उभारी घेतली होती आणि नेमक्या याच मार्गाने झटपट यशस्वी होण्याच्या घाईगर्दीत भाजपाने आपला आत्मा गमावला. त्याला दहा वर्षे वनवासात जावे लागले होते. त्या केविलवाण्या इतिहासाचा चेहरा म्हणून आपण आज अगतिक लालकृष्ण अडवाणींकडे बघू शकतो. सत्तालंपटतेच्या त्याच गाळातून मोदी या पक्षाला बाहेर काढतील, अशा अपेक्षा त्यांच्या वाटचालीतून निर्माण झाल्या होत्या. पण त्या आता मावळू लागल्या आहेत. अर्थात आज यशाची झिंग चढलेल्या भाजपावाल्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना ते सहजासहजी पटणार नाही. १९९८ सालात तरी कुठे पटले होते? त्याचे दुष्परिणाम दिसायला २००४ साल उजाडावे लागले होते. म्हणून आज अशा लोकांची मनस्थिती मी चांगली समजू शकतो. कारण अशी मानसिकता १९७७, १९८९ वा १९९९ या सालात खुप जवळून बघितली व अभ्यासली आहे. ज्यांना सदिच्छा कळत नाहीत, त्यांना समजावता येत नाही. केजरीवाल यांना तरी कुठे वास्तवाकडे बघायची शुद्ध होती? त्यांच्या समर्थकांची हीच अवस्था वर्षभरापुर्वी होती ना? यशाची नशाच इतकी धुंद करणारी असते, की डोळ्यासमोरचे दिसत नाही. कानात बोंबा ठोकल्या तरी ऐकू येत नाही. अर्थात त्यामुळे परिणाम बदलत नाहीत.

त्यामुळेच आता एक नम्र विनंती आहे, ज्यांना आवडत नसेल, किंवा त्यांच्या आनंदात विरजण पडत असेल, त्यांनी माझे लिखाण वाचू नये. त्याकडे विरोधक वा मुर्ख म्हणून पाठ फ़िरवावी. मला त्याचे दु:ख नाही. कारण मी कधीच पक्षपात करीत नाही. माझी मते निरपेक्षपणे मी मांडत आलो आहे आणि ती आवडावीत असा माझा कधीच आग्रह राहिलेला नाही. किंबहूना मागल्या दोन वर्षात इथे सोशल मीडियात ज्यांनी माझ्यावर मोदीभक्त असा आरोप केलेला होता, त्यांना दिलेला शब्द पाळायची वेळ जवळ आली म्हणता येईल. नरेंद्र मोदींनी लोकसभा जिंकण्यापुर्वी अशा तक्रारदारांना मी स्वच्छ शब्दात सांगितले होते, की मोदींना सत्ता मिळाली, मग अनेक विरोधक पत्रकार संपादक त्यांच्या आरत्या ओवाळायला लागतील. तेव्हा भाजपा व मोदींच्या चुका दाखवणार्‍यांची त्रूटी भासणार आहे. मग पुन्हा ती आघाडी भाऊ तोरसेकरलाच लढवावी लागणार आहे. तशी वेळ इतक्या लौकर येईल, अशी मात्र अपेक्षा नव्हती. पण असो, नियतीच्या मनात तसे असेल, तर आपल्या हाती कुठला पर्याय उरतो? कोणाला तरी ती जबाबदारी उचलावीच लागत असते. भाजपा ‘नावाच्या’ पक्षाला उद्या राज्यात बहूमत व सत्ता मिळाली, तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण त्याचे दु:ख नसले तरी, त्याचा मला आनंद मात्र अजिबात होणार नाही. कारण त्यात भाजपाचे नाव शिल्लक असले तरी त्याचा विचार क्षीण झालेला आहे. ज्या हेतूने गेल्या दहा वर्षामध्ये ढासळणार्‍या पक्षाला सावरण्यासाठी अनेक निष्ठावान कार्यकर्ते अखंड राबले, त्याचा मागमूस आताच्या भाजपामध्ये उरला आहे, असे मला वाटत नाही. जणू राष्ट्रवादी व भाजपा यांच्या विलीनीकरणातून उदयास आलेला नवा पक्ष, यावेळची विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्याची तुलना १९७८ सालाच्या जनता पक्षाशी करता येईल. मग त्याचे भवितव्य त्या लयास गेलेल्या जनता पक्षापेक्षा वेगळे असेल काय? आणि तसे ते लयास जाताना सावधानतेचा इशारा देण्याला कोणी शत्रू म्हणत असेल, तर खुशाल म्हणो. मला त्याचे दु:ख नाही. तेव्हाही असेच धोक्याचे इशारे देण्यात माझ्यासारखे अनेकजण ‘जनता’प्रेमींना शत्रूच वाटले होते. १९९५ सालात युतीची सत्ता आल्यावर तिच्या चुका दाखवणार्‍यात मी आघाडीवरच होतो. पण त्यावेळी तरी कुणा युती समर्थकाला माझे इशारे आवडले होते? यशाची झिंगच और असते. ती कुणालाही शेख चिल्ली बनवायला वेळ लावत नाही. मग सत्तेपर्यंत एकहाती पोहोचण्याची नशा किती प्रभावी असेल? अर्थात नशेत कोणीही असला, म्हणुन त्याच्या आत्मघाताकडे पाठ फ़िरवण्याला प्रामाणिकपणा म्हणता येत नाही. म्हणुनच तेव्हा १९९५ सालात युतीला सत्ता मिळण्यासाठी प्रयत्नशील असूनही, सत्ता मिळाल्यावर युतीच्या चुका दाखवण्याने मला अनेक राजकीय मित्रांचा रोष पत्करावा लागला होता.

पण आज जग कितीसे बदलले आहे? नुसत्या सत्तेच्या वासाने इतकी झिंग चढली आहे, की सदिच्छा कळेनाश्या झाल्या आहेत. सत्ता मिळाल्यानंतर किती भरकटणे होईल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी. पण तो मुद्दा नाही. ज्याप्रकारे युती मोडली व सत्तेची समिकरणे भाजपा नेत्यांनी जुळवली आहेत, ती कदाचित यशस्वी ठरतील. पण ती टिकावू असतील काय? कितीकाळ ती सत्ता टिकेल? त्यातून खरेच महाराष्ट्राला घोटाळेमुक्त वा भ्रष्टाचारमुक्त करता येईल काय? की महाराष्ट्रातील भाजपाचे राजकारण कर्नाटकच्या वाटेने जाईल? तसे जाऊन पक्षाची भरभराट होते, असे म्हणायचे आहे काय? कर्नाटकात स्वबळावर सत्ता मिळवण्याचे गणित झटपट साध्य झाले. पण पाच वर्षात कुठल्या अवस्थेला भाजपा जाऊन पोहोचला? त्यापेक्षा महाराष्ट्रात योजलेले समिकरण भिन्न आहे काय? तिथे तरी सत्तेत भागिदार झालेल्या देवेगौडांच्या त्या मित्र पक्षाने दगा दिलेला होता आणि नंतर सत्ता मिळवण्यासाठी रेडडी बंधूंना पक्षात आणून स्वबळावर सत्ता मिळवली गेली. आज राष्ट्रवादीतून घाऊक प्रमाणात भरती केलेल्या आयात मालाची ‘गुणवत्ता’ रेड्डी बंधूंपेक्षा शुद्ध स्वरूपाची आहे काय? नसेल तर परिणाम तरी कितीसे वेगळे असू शकतात? ज्यांना त्याचे कौतुक करायचे असेल, त्यांनी जरूर करावे. माझ्या दृष्टीने ती लबाडी असते आणि तिच्या यशातच विनाशाची बीजे पेरलेली असतात. मी त्यासाठी टाळ्या पिटू शकत नाही. नाईलाज आहे मित्रांनो. मला केजरीवालच्या यशाची कमान चढतानाही त्याच्या कोसळण्याचे भविष्य बघून दया आलेली होती. मग आजच्या अपेक्षित भाजपा यशाचे कौतुक कसे करू? म्हणून काही दिवस सातत्याने इतिहास सांगितला. पुढल्या काही दिवसात, महिन्यात वा वर्षात त्याची प्रचिती येईलच. कारण दिर्घकाळ संघर्ष करून पक्ष उभा करणार्‍या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांचा हा विजय असणार नाही. तो निव्वळ हातचलाखीने साधलेला डाव असेल. म्हणूनच प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पराभव असेल. त्यातून आयातीत उपर्‍यांना व मुठभरांना सत्तेची उब मिळेल. पण ज्यांनी कसली अपेक्षा न बाळगता या पक्षाच्या उभारणीसाठी कष्ट उपसले आहेत, त्यांच्याशी झालेली ती प्रतारणा असेल. त्यांचे नैराश्य व वैफ़ल्य कार्यकर्त्यांच्या आणखी एका पिढीला बरबाद करून टाकील. भाजपाचीच राष्ट्रवादी व कॉग्रेस झालेली बघण्यातले दु:ख अतुलनीय असेल. म्हणून म्हणतो, ज्यांना त्यातच आनंदी व्हायचे असेल, त्यांनी काहीकाळ माझ्या लेख व ब्लॉगकडे पाठ फ़िरवावी. आपापले आनंदोत्सव साजरे करावेत. त्यांना शुभेच्छा.

9 comments:

  1. Namaskar Bhau,aajcha lekh ha khoop jasta santulit waatala,tasech me mazya mitrana nehmich utkrushtha patrakaritesathi tumcha blog wachayla sangat aalo aahe,tevha likhan asech chalu thevave he vinanti.

    ReplyDelete
  2. पत्रकारितेचा अभ्यासक म्हणून मी अनेक वर्षापासून भाऊ आपले विश्लेषण वाचतो आहे. यात मला कधीही आपण एकांगी लिहीता असे मला वाटले नाही. तुम्ही कोणाचे भक्त आहात हा समज साफ चुकीचा आहे. जे आहे ते लिहीणे ही भाऊची खासीयत आजतायागत कायम आहे. एक वाचक म्हणून आपले सडेतोड लिखान मला आवडते. वास्तव दाखविल्यानंतर ते सर्वांनाच रूचेल अथवा पचेल असे नाही. जे आहे ते आज ना उद्या स्विकारावे लागणार आहे. भाजपाला मिळणारे यश हे काही काळापुरती सूज असण्याची शक्यता आहे. या यशाने भुरळून जाऊन हे भाजपाई मस्तवाल होणार असतील तर यांची जागा यांना दाखविण्याचे काम करावे लागणारच आहे. हे काम तुम्ही आम्ही एक मतदार म्हणून करू शकतो.
    यातही आज मला एक विषय सातत्याने सतावतो तो हा की प्रादेशिक पक्षांचे राजकारण या निमित्ताने का संपवले जात आहे. या संपण्याच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीत राष्ट्रवादी सारखा पक्ष पुन्हा कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याची काही शक्यता आहे का ? या बाबत एखादे विश्लेषण आले तर आणखी बरे होईल.

    ReplyDelete
  3. 'तेव्हा भाजपा व मोदींच्या चुका दाखवणार्‍यांची त्रूटी भासणार आहे. मग पुन्हा ती आघाडी भाऊ तोरसेकरलाच लढवावी लागणार आहे. तशी वेळ इतक्या लौकर येईल, अशी मात्र अपेक्षा नव्हती.'
    भाऊ, is the Best!

    ReplyDelete
  4. Bjp is aparty with strong cadre base.hence I think that the risks of getting power with thehelp of imported candidates might be a calculated one.moreover,it seems that modiji must have certain hidden agenda to overcome the risks mentioned by you.let us see.

    ReplyDelete
  5. Bhau, you keep writing. People want a Masiha to fulfil their dreams. And in process they overlook many facts. This is a beginning of facism. The time will tell the importance of your articles. Thanks.

    ReplyDelete
  6. Bhau ajoba pan tumhala nhi vatat ka rajkaran change zalay?? Itihasat je zalay tyachi punaravruti hoilch he gruhit dharna kitpat yogya ahe???

    ReplyDelete
  7. Khupach chan..Yash pachvane Apyash pachvnya peksha khup avghad asate hech khar...

    ReplyDelete
  8. Tumache sarve lekh atishar yogya ahet ani wastusthitila dharun ahet.

    ReplyDelete