Friday, January 9, 2015

वास्तवाच्या विस्तवाचा जीवघेणा खेळ



फ़्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सध्या चाललेल्या परिस्थितीची कारणे आजची नाहीत. या हिंसा व जिहादी घातपाताची पाळेमुळे अलिकडल्या इतिहासात शोधावी लागतील. शिवाय त्याला तिथले अमानुष मानवाधिकारी राजकारण व सेक्युलर पाखंडही तितकेच जबाबदार आहे. मागल्या अर्धशतकात युरोपियन महासंघ उदयास आल्यावर प्रत्येक युरोपियन सदस्य राष्ट्रावर विविधतेची जी सक्ती काही अतिशहाण्यांनी केली. त्यातून आजची भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. महायुद्ध संपल्यानंतर युरोपची नव्याने उभारणी झाली आणि त्यातून जी सुबत्ता आली, त्यात आजच्या परिस्थितीची पाळेमुळे रुजलेली आहेत. एका बाजूला सुबत्ता व स्वातंत्र्य याचा अतिरेक झाला आणि बारीकसारीक कामे करायला माणसे मिळेनाशी झाली. त्यात पुन्हा विवाहबाह्य संबंध व अविवाहित जीवनाची नवी शैली विकसित झाली. त्यात कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली. कारण उशीरापर्यंत महिला अविवाहित राहून जननक्षमता घटली. परिणामी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कष्ट उपसू शकणारी तरूण लोकसंख्या घटत गेली. त्या कामासाठी मग परदेशी नोकरदार आणायला प्राधान्य मिळाले. अधिक त्याच कालखंडात युरोपियन महासंघाच्या विविधतेच्या आग्रहामुळे मोठ्या प्रमाणात अरबी व आफ़्रिकन कष्टकर्‍यांना या देशांमध्ये शिरकाव करून घेता आला. सहाजिकच त्यात पुर्वाश्रमीच्या वसाहतीच्या देशातील नागरिकांचा भरणा होता. फ़्रान्सच्या वसाहती प्रामुख्याने उत्तर आफ़्रिकेतील मुस्लिम देशातल्या असल्याने, त्यांचाच भरणा तिथल्या स्थलांतरितांमध्ये दिसून येतो. अशाच नव्या नागरिकांची दुसरी पिढी आता जन्माने फ़्रेन्च आहे. पण धर्माने मुस्लिम आहे आणि त्यांच्यापासूनच मुळच्या फ़्रेन्च नागरिकांना जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आलेली आहे. पॅरिसमध्ये जो हल्ला झाला तो अशाच मुस्लिमांकडून.

अर्थात अशा वृत्तीला कोणी इतके डोईजड करून ठेवले, त्याचाही तपास आवश्यक ठरावा. आठनऊ वर्षापुर्वी पॅरिसच्या उपनगरात मोठ्या प्रमाणात दंगली जाळपोळ सुरू होती. जागोजागी डझनावारी मोटारी मध्यरात्री पेटवून दिल्या जात होत्या आणि तिथे आग विझवायला येणार्‍या अग्नीशमन दलाच्या जवानांवरही हल्ले व्हायचे. त्याच्या बातम्या आता कोणाच्या स्मरणात नसतील. पण इंटरनेटवर त्या उपलब्ध आहेत आणि मुद्दाम कोणीही त्या शोधून वाचू शकतो. त्यात तिथल्या सेक्युलर माध्यमांचे पाप आपल्या समोर येऊ शकते. दोन आठवडे पॅरिसच्या विविध उपनगरात हा हैदोस चालू होता. पण बातम्या देणार्‍या पत्रकारांनी एकदाही उघडपणे त्यामागे असे स्थलांतरीत मुस्लिम असल्याचा उच्चार केला नाही. त्याऐवजी उत्तर आफ़्रिकन स्थलांतरीत असे शब्द वापरले जात होते. म्हणजेच त्या दंगली व जाळपोळीमागे असलेली धार्मिक प्रेरणा झाकून-लपवून ठेवण्याची कसरत माध्यमांनी केली, हे नाकारता येत नाही. आपल्याकडल्या बातम्यांमध्ये जसा एका समाजाचा वा विशिष्ठ धर्मियांचा उल्लेख होतो, तशीच ही पळवाट होती. त्यातून बहुसंख्य फ़्रेन्च नागरिकांना सत्यापासून वंचित ठेवण्याचा सेक्युलर उद्योग झाला होता. पण ज्यांना त्या दंगल जाळपोळीचे चटके बसत होते, त्यांच्यापासून वास्तव लपलेले नव्हते. कारण याच जाळपोळीत कॅथलिक चर्चही जाळली गेली होती. म्हणजेच त्या जिहादी प्रवृत्तीला राजकीय नेत्यांप्रमाणेच पत्रकार व माध्यमेच पाठीशी घालत होती. त्याची संतप्त प्रतिक्रिया मग मतदानातून उमटली होती. अशा स्थलांतराच्या विरोधात सतत बोलणार्‍या सारकोझी यांना लोकांनी राष्ट्राध्यक्षपदी निवडून दिले होते. मात्र त्यामुळे जिहादी मानसिकता आटोक्यात आली नाही. आता पुन्हा तिनेच डोके वर काढले आहे. मुद्दा इतकाच, की आता सेक्युलर माध्यमांनीच जोपासलेला भस्मासूर त्यांच्यावर उलटला आहे.



अर्थात तिथले स्थलांतरीत मुस्लिमच धर्मांध आहेत असे मानायचे कारण नाही. ख्रिश्चन वा ज्युधर्मियही तितकेच कर्मठ आहेत. पण जितके मुस्लिम जिहादी आक्रमक हिंसक व बेछूट आहेत, तितके अन्यधर्मिय नाहीत. म्हणूनच धर्मांधतेविषयी भूमिका घेताना दगडापेक्षा वीट मऊ, असे तारतम्य राखणे अगत्याचे असते. त्याचे भान सुटले, की आपण कुणाला प्रोत्साहन देतो त्याची जाणिव संपुष्टात येते आणि अशी अवस्था होते. प्रत्येकवेळी ख्रिश्चन-ज्यू धर्मियांना बळ मिळू नये, म्हणून जिहादी हिंसेला पाठीशी घालण्यातून फ़्रान्समध्ये इस्लामिक अतिरेक वाढत गेला आणि मध्यंतरी त्यापैकी अनेकांनी इराक वा अफ़गाणिस्तानात स्वदेशी सैनिकांच्या विरोधात लढायला प्रयाण केले. त्यानंतर सेक्युलर शहाण्यांना जाग आली. पण आता खुप उशीर झालेला आहे. अलिकडेच ब्रिटीश सैनिकांच्या विरोधात ब्रिटीश मुस्लिम नागरिकच इराकमध्ये मुंडकी कापत असल्याचे चित्रण समोर आलेले आहे. फ़्रान्स त्याला अपवाद नाही. एकूणच युरोपमध्ये महासंघ झाल्यावर तिथे सेक्युलर वर्चस्व निर्माण झाले आणि महासंघाच्या संसदेने अनेक कायदे व धोरणे राष्ट्रीय संसदांवर लादून अशा रितीने मोठ्या प्रमाणात स्थलांतरीतांना युरोपिय देशात आणले. त्यातून अरब आणि अन्य मुस्लिम देशातील स्थलांतरीतांची संख्या युरोपिय देशात वाढली. यापैकी मुस्लिमांचा भरणा अधिक असुन जे्व्हा धार्मिक तेढ निर्माण होते, तेव्हा कुठल्याही देशातून आलेला मुस्लिम समधर्मिय म्हणून नव्या राष्ट्राच्या विरोधात एकवटतो. कुठल्याही जागतिक इस्लामिक आवाहनाला प्रतिसाद द्यायला संघटितपणे सामोरा येतो. अशी ही समस्या आहे. तिला नुसते धर्मांधांनी चिथावणी दिलेली समस्या म्हणून बघता येणार नाही. त्यामागच्या सेक्युलर थोतांडाचे पापही तपासले पाहिजे. कारण धर्मांध कारवायांना पाठीशी घालणार्‍या सेक्युलर दिवाळखोरीनेच ही समस्या जागतिक बनवली आहे.

त्यात पत्रकार माध्यमांचा वाटा छोटा नाही. उंदिर आणि वाघ घरात घुसले, तर कोणाशी आधी लढावे याचे तारतम्य असायला हवे. वाघाच्या कृत्याची उंदराच्या कृतीशी तुलना करण्याने अशा समस्या हाताबाहेर जात असतात. फ़्रान्स त्याचाच अधिक बळी आहे. २००५ मध्ये जाळपोळ करणार्‍यांची मानसिकता व ओळख लपवणार्‍या पत्रकार माध्यमांनी, कशाला खतपाणी घातले होते? त्या भीषण दंगलीमागे मुस्लिम असताना त्यांची ओळख उत्तर आफ़्रिकन अशी करण्यातून माध्यमांनी कोणाची दिशाभूल केली होती? आजही ताज्या चित्रफ़ितीमध्ये हल्लेखोर ‘अल्ला हो अकबर’ असे ओरडून सांगत असताना, माध्यमांची भूमिका काय होती? हे कोणी एकांडे माथेफ़िरू असतील व त्यांच्या मागे कुणी मोठी जिहादी शक्ती नसेल, असाच सूर होता ना? त्यापैकी एकजण यापुर्वी एका हल्ल्यात पकडला गेला होता. त्याच्यावर बारीक नजर ठेवली गेली असती, तर अशी वेळ आली असती का? पण तसे केल्यास मग मुस्लिमांना पक्षपाती वागणूक दिल्याचा आक्षेप घ्यायला जगभरची सेक्युलर माध्यमे आघाडीवर असतात. म्हणूनच कोण सुसह्य श्रध्दाळू आणि कोण जीवावर बेतणारा धर्मांध, याचा भेदभाव करणे आवश्यक आहे. त्याचे भान सुटले मग विस्तवाशी खेळ होतो. फ़्रेन्च माध्यमांनी व उपरोक्त साप्ताहिकाच्या संपादकांनी त्याचे भान राखले होते, असे कोणी म्हणू शकेल काय? ज्यांना वास्तवाचे भान उरत नाही ते विस्तवाशीच खेळतात. मग त्यात भाजणे होरपळणे अपरिहार्य असते. धर्माच्या श्रद्धेशी खेळताना अन्य धर्मिय आणि इस्लाम यांच्यातला मूलभूत फ़रक नाकारण्याची मोजावी लागलेली ही किंमत आहे. त्यातून धडा शिकला नाही, तर यापेक्षा मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यापासून कोणाचीच सुटका नसेल. मग ते सेक्युलर वा पत्रकार भारतीय असोत किंवा पाश्चात्य असोत. संकट काळागोरा वा आस्तिक-नास्तिक असा भेदभाव करीत नसते.

1 comment:

  1. जे्व्हा धार्मिक तेढ निर्माण होते, तेव्हा कुठल्याही देशातून आलेला मुस्लिम समधर्मिय म्हणून नव्या राष्ट्राच्या विरोधात एकवटतो. - याच अर्थाच विवेचन वीर सावरकरांनी केलेल आहे. भाऊ, त्यावर एकदा सविस्तर लिहाल का ?

    ReplyDelete