Sunday, February 8, 2015

‘मांझी’ जो नैया डुबोये उसे कौन बचाये?



दिल्लीत मतदान संपून आता लोक निकालाची प्रतिक्षा करता असताना, पलिकडे बिहारमध्ये नवाच राजकीय पेच उभा राहिला आहे. अर्थात त्यामुळे भाजपाच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फ़ुटत असल्या तर नवल नाही. पण दुसर्‍याच्या अपयशात आपला आनंद वा यश शोधणार्‍यांचे भवितव्य कसे अस्तंगत होत जाते, त्याचा नमूना म्हणुन सध्याच्या राजकीय घटनाक्रमाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरावे. एका बाजूला आपले यश पचवण्यात भाजपा अपयशी ठरल्याचे दिल्लीतील चाचण्या दाखवत आहेत, तर दुसरीकडे यशाचे अजिर्ण झालेल्या नितीशकुमारांची शोकांतिका बिहारमध्ये घडताना दिसत आहे. मग आपल्या दिल्लीतल्या तारांबळीच्या वेदना रडायच्या, की नितीशच्या तारांबळीचा आनंद साजरा करायचा; अशी भाजपाला दुविधा झालेली आहे. कारण मोदी द्वेषाच्या आहारी जाऊन ज्या तात्विक कसरती नितीशनी गेल्या दिडदोन वर्षात चालविल्या होत्या, त्यातच त्यांना आज गटांगळ्या खाव्या लागत आहेत. त्या प्रत्येक कसरतीमध्ये त्यांनी तात्कालीन विजय संपादन करून दाखवला होता. पण त्याचे दुरगामी दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागणार होते. तेच सतत समोर येत आहेत. त्यात लोकसभेच्या पराभवापासून लालूंना शरण जाण्यापर्यंतची नामुष्की समोर आहे. पण त्यातून भाजपा काय शिकला? बिहारमधली नितीशची चुक जशीच्या तशी महाराष्ट्रात भाजपाने गिरवली नव्हती काय? नितीशनी सोळा वर्षाच्या मैत्रीला, पंतप्रधान पदाच्या मोहात सापडून तिलांजली दिल्याचा आरोप जुन २०१३ मध्ये भाजपा करीत होता. मग महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापाठी भाजपाने पंचवीस वर्षे जुन्या मैत्रीची कितपत बूज राखली? ती मैत्री तोडताना कुठल्याही पक्षातले जिंकू शकणारे उमेदवार आयात करून १२२ आमदारांची बाजी मारताना जी झिंग चढली होती, तिनेच दिल्लीत आयात उमेदवार आणायची बुद्धी शिरजोर झाली.

जी भाषा महाराष्ट्रात मागल्या सप्टेंबर आक्टोबर महिन्यात चालली होती, तीच दिल्लीतही चालू होती. ‘इतके आमदार संपर्कात’ असे बोलण्यात मे महिन्यापासून जानेवारी उजाडेपर्यंतचे आठ महिने वाया गेले आणि प्रत्यक्ष निवडणूक आली, तेव्हा बहूमताची मजल मारण्याच्या गुणवत्तेचे उमेदवारही अन्य पक्षातून आणायची पाळी आली. अन्य पक्षातून ठराविक लोकांना पक्षात घेताना मुत्सद्दीपणा जरूर असतो. त्यात शत्रू पक्षाला खिळखिळा व दुबळा करण्याचा हेतू असला तर गोष्ट वेगळी. पण अन्य पक्षातून नेते आयात करून संघटनेला सूज येते, शक्ती वाढत नाही. आम आदमी पक्षाचे पुरेसे आमदार फ़ोडण्यात अपयशी झाल्यावर निवडणूकांना सामोरे जायची वेळ आली. त्यापेक्षा लोकसभेतील यशावर विसंबून तिथेही सप्टेंबर महिन्यात निवडणूका घेण्याची तयारी केली असती, तर आजच्या इतकी तारांबळ झाली नसती. आठ महिन्यात केंद्रातील सत्तेच्या मदतीने काही नजरेत भरणारे काम करून दाखवले, तरी केजरिवाल डोके वर काढू शकले नसते. पण आपली अब्रु वाचवण्यासाठी बिहारमध्ये आज नितीशकुमार ज्या चलाख्या व कसरती करीत आहेत, तसे खेळ मागल्या आठ महिन्यात भाजपाने दिल्लीत केले. तेच लोकसभेनंतर शिवसेनेला संपवण्याची संधी शोधण्यातून झाले होते. मित्रामंध्ये शत्रू शोधायची दुर्बुद्धी झालेल्यांना कोणी बाहेरच्या शत्रूने येऊन संपवावे लागत नाही. लोकसभेतील यशानंतर भाजपाच्या नेतृत्वाला तीच बाधा झाली. शत प्रतिशत भाजपाच्या घाईने या पक्षाला इतके पछाडले, की त्यांनी जुन्या शत्रूंचे निर्दालन आटोपण्यापुर्वीच मित्रांना शत्रूच्या गोटात लोटायची मोहिम हाती घेतली. थोडक्यात लोकसभेच्या आपल्या अपुर्व यशाला अपशकून करण्याची पावले भाजपा स्वत:च उचलत गेला. दिल्लीत दिसतो आहे तो त्याचाच परिणाम आहे. पराभूत आम आदमी पक्षाला त्यातून जिंकण्याची संधी भाजपाने निर्माण करून दिली.

बिहारमध्ये संयुक्त जनता दल या पक्षाला मोठा करण्यात भाजपाचा मोठा सहभाग होता. पण स्वत:चे बहूमत नसताना त्याच सहकार्‍याला लाथ मारण्यापर्यंत नितीशनी मजल मारली आणि स्वत:साठी संकटांची मालिका उभी केली. मग त्यांना लोकसभेत पराभवाचे तोंड बघावे लागल्यावर लालूंचे पाय धरावे लागले आणि मुख्यमंत्रीपदही सोडावे लागले. आज त्यांनी जो विश्वासातला सहकारी त्या पदावर नेमला होता, तोच वाकुल्या दाखवतो आहे आणि त्याला बाजूला करण्यासाठी नितीशना लालूंच्या मदतीने त्याचा बंदोबस्त करावा लागत आहे. लोकसभेनंतर जीतनराम मांझी यांना नितीशच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले होते. आज ते सोडायची वेळ आल्यावर त्याने सरळ नितीशनाच आव्हान दिले आहे. मुळात एनडीए सोडली नसती, तर मोदींना बिहारमध्ये इतक्या जागा मिळाल्या नसत्या आणि लोकसभेत निदान २०-२४ खासदार नितीशच्या हाती राहिले असते. मोदींना बहूमताचा पल्ला गाठण्यात दहा पंधरा खासदार कमीच पडले असते. म्हणजेच पर्यायाने एनडीएमध्ये नितीशचा वरचष्मा कायम राहिला असता. मुख्यमंत्रीपदही अबाधित राहिले असते. पण घाई व उद्दामपणाने त्यांचा राजकीय र्‍हास होत गेला वा त्यांनीच ओढवून आणला. राजकीय जीवनात उभे करायला हातभार लावणार्‍या मित्रालाच नितीशनी शत्रू केले आणि त्यांच्यावर जी दुर्दैवी पाळी आली. पाव शतकाची सेना-भाजपा मैत्री तोडून भाजपाने कोणता संदेश देशभर पाठवला होता? कुठल्याही पक्षातले जिंकू शकणारे उमेदवार आयात करून पक्षातील निष्ठावंताना कुठला संदेश दिला होता? निष्ठावान कार्यकर्ता कामाचा नाही. नेता कोणतीही निवडणूक जिंकून देतो, असा तो कॉग्रेसी वृत्तीचा संदेश होता. दिल्लीत त्याचीच किंमत आता मोजायची पाळी आलेली नाही काय? पण इथे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष श्री. दानवे ‘आमदार संपर्कात’ असल्याची भाषा बोलतच आहेत.

ही निती भाजपाची नव्हेतर नितीशची नितीमत्ता होती व आहे. त्यांनी बिहारमध्ये केलेला प्रयोग भाजपाने देशव्यापी करायचा चंग बांधला. परिणाम दिसायला नेहमीच वेळ लागतो. आपण कोणते आत्मघातकी पाऊल उचलले आहे, ते नितीशना १०१३ च्या जुनमध्ये उमगले नव्हते. मे २०१४ मध्ये त्यांना परिणाम भोगावे लागले आणि आता आठ महिने उलटून गेल्यावरही ते दुष्परिणाम संपण्याची चिन्हे नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात मैत्री तोडण्याच्या आत्मघातकी राजकारणाचे परिणाम दिल्लीत दिसू लागले आहेत. त्याला शिवसेना जबाबदार नसेल. पण युती तोडण्यातून गेलेला संदेश मात्र नक्कीच जबाबदार आहे. भाजपाला कोणी मित्र नकोत आणि प्रादेशिक अस्मितेला पायदळी तुडवणे हेच भाजपाचे राष्ट्रीय उद्दीष्ट आहे, असा तो संदेश होता. जेव्हा कॉग्रेसने अशी खेळी सुरू केली, तिथून त्याला प्रादेशिक अस्मितेच्या पक्षांचे आव्हान उभे रहात गेले. मोजक्या राज्यातले जनता दल वा भाजपा असे पक्ष सोडल्यास मागल्या दोनतीन दशकात कॉग्रेसशी झुंज दिली ती प्रादेशिक पक्षांनी. त्यांचीच स्थानिक मदत घेऊन भाजपाने कॉग्रेसला राष्ट्रीय आव्हान उभे केले. पण लोकसभेत कसेबसे बहूमत मिळताच भाजपाने विनाविलंब प्रादेशिक मित्रांचेच खच्चीकरण हाती घेतले. थोडक्यात कॉग्रेस पुरती नामोहरम होण्याआधीच आपल्या प्रादेशिक मित्रांना शत्रू गोटात ढकलण्याची मोहिम भाजपाने हाती घेतली. त्यासाठी स्वपक्षातल्या स्थानिक नेत्यांचीही मुस्कटदाबी केली. दिल्ली त्याचे मोठे उदाहरण आहे. किरण बेदींचे नेतृत्व लादताना दिल्लीच्या नेत्यांना विश्वासातही घेण्याची भाजपा श्रेष्ठींना गरज वाटली नाही. मग नितीश व भाजपात फ़रक कुठे राहिला? किशोरकुमारचे प्रसिद्ध गाणे आहे.

चिंगारी कोई भडके, तो सावन उसे बुझाये
सावन जो अगन लगाये, उसे कौन बुझाये?

मझधारमे नैय़ा डुबे, तो माझी पार लगाये
‘मांझी’ जो नैया डुबोये उसे कौन बचाये?

No comments:

Post a Comment