Saturday, May 16, 2015

पाकिस्तान खायी म्हणून त्यालाच खवखवे



पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव ऐजाज अहमद चौधरी यांनी बुधवारच्या कराचीतील हल्यासाठी भारताच्या ‘रॉ’ नामक हेरसंस्थेवर आरोप केला असेल, तर भारतासाठी तो सन्मानच मानायला हवा. याचा अर्थ त्या आरोपात तथ्य आहे असा अजिबात होत नाही. पण ह्याचा अर्थ इतकाच होतो, की पाकिस्तान आता भारताच्या हेरखात्याला घाबरू लागला आहे. तीन महिन्यापुर्वी भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुंबईतल्या एका समारंभात भाषण करताना एक गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. त्याचा अर्थच भारतीय माध्यमांना उलगडला नव्हता. त्याचा चौधरी यांच्या आरोपाशी संबंध जोडता येईल. कुठल्याही देशात जितके लष्कर व सुरक्षा दले महत्वाची असतात, तितकेच त्याचे हेरखातेही महत्वाचे असते. कारण दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि थेट पारंपारिक युद्ध टाळण्याच्या अटी प्रत्येक सदस्य राष्ट्राला घालण्यात आलेल्या आहेत. सहाजिकच थेट युद्ध शक्य नसल्याने एकमेकांना शह देण्याचे डावपेच प्रत्येक देश खेळत असतो. आपले शत्रू व मित्र यांच्या राजकारणावर लक्ष ठेवून त्यांच्या कारभारात अस्थीरता निर्माण करणे, ही नव्या युगाची रणनिती व युद्धनिती बनून गेलेली आहे. जोवर सोवियत युनियन व अमेरिका अशा दोन महाशक्ती होत्या, तोवर जग त्यांच्यातच विभागले गेलेले होते. अधिक त्यांच्यापासून फ़टकून रहाणार्‍या देशांचा तिसरा गट होता. त्याला अलिप्त राष्ट्रे असेही म्हटले जायचे. त्यातल्या अनेक देशांना हाताशी धरून महाशक्ती आपले छुपे युद्ध खेळत असत. त्याला शीतयुद्ध म्हटले जाई. सोवियत सत्ता अस्तंगत झाल्यावर शीतयुद्ध संपले. पण दरम्यान ज्या छुप्या युद्धाची प्रणाली विकसित झाली होती, तिला मग अन्य मार्गाने प्रोत्साहन मिळत गेले. हे युद्ध हेरखात्यामार्फ़त लढवले जात असते. पाकची आय एस आय वा भारताची ‘रॉ’ त्याचीच फ़ळे आहेत.

शीतयुद्ध संपल्यावर अमेरिकेने पोसलेल्या आय एस आयला वार्‍यावर सोडून दिले आणि मग पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी त्या हेरखात्याला परराष्ट्रनितीचा एक भाग म्हणून वापरले. त्याची ग्वाही पाकचे माजी अध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी दिलेली आहे. त्याखेरीज पाकचे अमेरिकेतील माजी राजदूत हक्कानी यांनीही तालिबान हे पाकने उभे केलेले भस्मासूर भारताविरोधी वापरण्यात चुक झाल्याचेही उघड बोलून दाखवले आहे. तेव्हा आज ऐजाज अहमद चौधरी कशाबद्दल बोलत आहेत, ते लक्षात येऊ शकेल. आजवर त्यांनी जे पाप केले, तेच भारत करतो आहे; असे त्यांना म्हणायचे आहे. कारण भारताला हैराण करण्यासाठी व भारतात राजकीय अस्थैर्य निर्माण करण्यासाठीच पाकने खलिस्तान, मुजाहिदीन, तोयबा वा तत्सम नावाने ज्या कारवाया केल्या, ते प्रत्यक्षात पाक हेरखात्याचेच उपदव्याप होते. त्यालाही अर्थात भारतीय हेरखातीही आपल्या परीने उत्तर देतच होती. पण काही राजकारण्यांनी त्यात व्यत्यय आणल्याने पाकिस्तानी वरचष्मा दिसत होता. मागली दोन दशके हे छुपे युद्ध चालूच होते. पण त्यात पाकिस्तानचे पारडे जड असल्याने भारतातून प्रत्येक घातपातानंतर आय एस आयचे नाव घेतले जायचे. हे आय एस आय म्हणजे काय आहे? ते पाकिस्तानचे हेरखातेच आहे. पण पाकिस्तानने सहसा भारताच्या हेरखात्याच्या विरोधात कधी बोंब ठोकल्याचे कानी येत नव्हते. कारण तेव्हा दिर्घकाळ इथे भारतात रक्तपात चालू होता आणि घातपाताशिवाय दिवस जात नव्हता. तुलनेने पाकिस्तानात शांतता नांदत होती. संसदेवरील हल्ल्यापासून मुंबईत सामुहिक कत्तल करण्यापर्यंत अशा छुप्या युद्धाची मजल गेली होती. त्या काळात कधी ‘रॉ’ बाबत आरोप पाकिस्तानने केला नव्हता. आज नेमकी उलटी परिस्थिती आलेली आहे. गेल्या वर्षभरात भारतात कितीसे घातपात व जिहादी हल्ले होऊ शकले आहेत?

याचा अर्थ इतकाच, की मोदी सरकार आल्यापासून किंवा भारतात सत्तांतर झाल्यापासून जिहादी हल्ल्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे आणि भारतीय बातम्यातून पाक हेरसंस्थेचे नाव जणू गायब झालेले आहे. उलट सीमेपलिकडे पकिस्तानात मात्र क्वचितच असा दिवस उजाडतो आहे, की घातपात रक्तपात झाल्याची बातमी प्रसिद्ध होत नाही. या रक्तपाताला रोखण्यात पाकिस्तानचे लष्कर, सरकार व पोलिस साफ़ अपेशी ठरत आहेत. म्हणून त्याचे खापर भारतीय हेरखात्यावर फ़ोडण्याचा कांगावा सुरू झाला आहे. ते स्वाभाविक आहे. खायी त्याला खवखवे म्हणतात, त्यातला हा प्रकार आहे. आजवर आपण जे केले, तेच आता भारताकडून होते, असे पाकिस्तानला वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून तशी वस्तुस्थिती असायचे काही कारण नाही. दाऊद वा अन्य भारतीय गुन्हेगार व टोळ्यांना वापरून, फ़ुस लावून पाकिस्तानने भारतात उच्छाद मांडला होता. त्यासाठी भरपूर पैसाही खर्च केला. पण त्यात जे मारेकरी वा मृत्यूचे फ़रिश्ते पाकिस्तानने निर्माण केलेत, ते सुपारीबाज खुनी आहेत. कुठल्याही धर्म वा सामाजिक धारणेशी त्यांना कर्तव्य नाही. जो पैसे मोजेल, त्याच्यासाठी हत्याकांड करणारे ते यमाचे दूत आहेत. त्यांना भारतानेच मोबदला दिला पाहिजे असे नाही. जो कोणी पैसे देईल त्याच्यासाठी ते पाकिस्तानातही सामुहिक हत्याकांड व हिंसा करू शकतात. मुद्दा इतकाच, की भारत सोडून पाकिस्तानचा कोण शत्रू आहे, की जो पाकमध्ये अस्थीरता निर्माण करायला मोठी रक्कम खर्चू शकतो? कालपरवाच कुवेत, दुबई व अबुधाबीच्या राज्यकर्त्यांनी पाकिस्तानला तशा धमक्या दिल्या होत्या. येमेन युद्धात पाकिस्तान सहकार्य देत नाही, म्हणून आखाती देशातीक्ल सुन्नी राज्यकर्त्यांनी ‘हा नकार पाकला महागात पडेल’ असे बजावले होते. हे देश सुन्नी असून येमेनचे युद्ध हे सुन्नी विरुद्ध शिया असे आहे. कराचीत मारले गेलेले बसप्रवासी शिया असावेत हा योगायोग आहे काय?

पश्चिमेची सीमा इराणला लागलेली असल्याने पाकिस्तानला त्याचे वैर नको आहे आणि येमेनची लढाई प्रत्यक्षात सुन्नी सौदी विरुद्ध शिया इराण यांच्यातलीच आहे. त्यात पाक सेना पाठवली नाही, म्हणून सौदीचे मित्र दुबई व कुवेत खवळलेले आहेत. त्यांच्यापाशी हल्लेखोरांना द्यायला भरपूर पैसा आहे. आजवर पाकची गरीबी कमी करायला त्यांनी अनुदान दिलेले होते. आता त्याच पाकला धडा शिकवण्यासाठी अतिरेक्यांना अस्थीरता माजवायला हेच देश भरपूर किंमत मोजू शकतात. भारतातल्या काफ़ीर नागरिकांना ठार मारायला प्रशिक्षित केलेल्या मारेकर्‍यांसाठी पाकिस्तानातील इस्मायली शियापंथीय सुद्धा काफ़िरच आहेत. मग आखातातील सुन्नी राज्यकर्त्यांसाठी पाक प्रशिक्षित सुन्नी मारेकरी पैसे मोजून पुढे आले, तरी ‘धर्मकार्य’च पार पाडले जाते ना? त्यात भारताच्या हेरखात्याने नाक खुपसण्याचे काय कारण आहे? पाकमध्ये राजकीय अस्थीरता भारताला नको आहे, कारण त्याचे चटके भारतालाही अप्रत्यक्षपणे भोगावे लागतात. म्हणूनच बचावात्मक प्रतिकारापेक्षा भारताला पाकच्या अंतर्गत भानगडीत पडायचे काही कारण नाही. पण आखाती सुन्नी राज्यकर्त्यांना पाक-इराण यांच्यात शिया-सुन्नी संघर्ष पेटवण्यासाठी अशा कारवाया राजकीय लाभाच्या नक्की आहेत. म्हणूनच पाकच्या राज्यकर्त्यांनी व हेरखात्याने डोळसपणे आपल्या चुकांचा अभ्यास करावा आणि कराचीसह अन्यत्र होणार्‍या घातपाताचे आकलन करावे. त्यात भारत वा भारतीय हेरांपेक्षा जुन्या मित्र व आजच्या शत्रूंचे हितसंबंध असल्याचे साफ़ दिसून येईल. उगाच भारतावर आरोप करण्यापेक्षा राजकीय धोरणापासून रणनिती व युद्धनितीचा नव्याने अभ्यास करावा. मग पायाशी काय जळते आहे त्याची अक्लल येईल. काश्मिरमधल्या उचापती सोडून कराचीपासून पेशावरपर्यंत विस्कटलेली घडी बसवण्यात लक्ष घालावे. भारतीय हेरखात्याला दोष देऊन त्याची ख्याती व दबदबा वाढेल, आणखी काहीही साध्य होणार नाही.

No comments:

Post a Comment