Tuesday, June 30, 2015

‘कविते’चा आशय समजून घेणार कोण?



सामान्य माणसाची स्मरणशक्ती दुबळी असते असे म्हटले जाते. पण काही बोलके लोक स्वत:ला बुद्धीमान व तल्लख समजत असतात. मात्र व्यवहारात तसे आढळत नाही. जितकी सामान्य माणसाची बुद्धी दुबळी, तितकीच सोयीनुसार शहाण्यांची स्मरणशक्तीही दुबळीच असते. तसे नसते तर कविता कृष्णन या पुरोगामी महिला नेत्याने ट्वीट केल्यानंतर तिच्यावर मोदीभक्त तुटून पडले नसते आणि त्यांनी अतिशय गंभीरपणे या ‘कविते’च्या कथनाचा आशय काय, तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. या महिलेने मुलीसह फ़ोटो काढून पाठवा अशा आवाहनामुळे मोदी स्त्रीलंपट असल्याचे काही सुचवण्याचा प्रयत्न केल्याने अनेकजण विचलीत झाले. मोदींचे चहाते चिडले तर समजू शकते. पण त्याच वेळी पुरोगामी गोटातून कोणी या ‘कविते’च्या समर्थनार्थ पुढे कसा सरसावला नाही, याचेही नवल वाटले. कारण इतिहास बघितला तर कविता कृष्णन यांनी त्यांचे मांडलेले मनोगत गैरलागू ठरवता येत नाही. ज्या पुरोगामीत्वाचा वारसा त्यांनी वा आजकालच्या पुरोगाम्यांनी चालविला आहे, त्यात ‘कविते’चा आशय नेमका आहे? त्यातला वा त्यामागचा संदर्भ लक्षात घ्यायला हवा. माणसे कधीही आपले मत अनुभवातून बनवत असतात आणि जितका अनुभव दांडगा, तितके त्याबाबतचे मत ठाम होत जाते. कविता कृष्णन यांचे विधान म्हणूनच त्यांच्या अनुभवातून तपासून बघायला हवे. त्यांचे तथाकथित पुरोगामीत्वही त्याच जुन्या संदर्भाने तपासले, तर मोदीभक्तांचा राग शांत होऊ शकेल. पुरोगामीही अतिशय हिरीरीने कृष्णन यांच्या समर्थनाला पुढे येऊ शकतील. आजकाल आपल्या देशात गुन्हेगारी, पापकृत्य वा सदाचार, पुण्य यांची विभागणी तशी झालेली आहे. तुम्ही प्रतिगामी म्हणून ओळखले जात असाल, तर तुमचे पुण्य़कर्म आपोआप पापकर्म होऊन जाते. त्याच्या उलट तुम्ही पुरोगामी असाल तर तेच कृत्य पुण्यकर्मही ठरू शकते.

दिडदोन वर्षापुर्वीची एक गाजलेली ब्रेकिंग न्युज आता कोणाला आठवतही नाही. अर्थात तीच तर आपल्या विस्मरणशक्तीची मोठी किमया आहे. दीडदोन महिन्यापुर्वीचे छगन भुजबळांचे पुण्यकर्म कोणाला आज आठवत नसेल, तर दीडदोन वर्ष जुन्या ब्रेकिंग न्युज कशाला स्मरणात जागा अडवून बसतील? तर हे प्रकरण तरूण तेजपाल नावाच्या पुरोगाम्याचे होते. ‘टहलका’ नावाचे साप्ताहिक इंग्रजी व हिंदीतून चालवणार्‍या तेजपालचा दिल्लीत मोठा दबदबा होता. मागल्या दहाबारा वर्षात त्याने आपल्या साप्ताहिकातून जनजागृती किती केली वा प्रबोधन किती केले, त्याचा होशोब कोणी विचारला नाही. त्याचवेळी नुसत्या एका साप्ताहिकातून अब्जावधी रुपयांची उलाढाल हा इसम कशी करू शकतो, असाही प्रश्न युपीए सरकारच्या कारकिर्दीत कोणाला पडला नाही. गोव्यातल्या पंचतारांकित हॉटेलात जगभरच्या नावाजलेल्या व्यक्तींना बोलावून विविध सेमिनार भरवून जागतिक उत्थानाच्या चर्चा घडवून आणणार्‍या तेजपाल, याला दिल्लीतले मोठमोठे लोक कोट्यवधी रुपयांच्या देणग्या द्यायचे आणि त्याच्या समारंभांना अगत्याने हजर रहायचे. गुजरात दंगलीचे खरे आरोपी शोधून त्यांचे छुप्या कॅमेराने चित्रण ध्वनिमुद्रण इंटरनेटवर टाकण्यातून तेजपाल मोठा झाला. भाजपाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना रंगेहाथ लाच घेताना कॅमेरात बंदिस्त केल्याने ‘टहलका’सह तेजपाल रातोरात नावारूपाला आला. असा तेजपाल दिल्लीत मग पुरोगामी गोटातला मोठा हिरो झालेला होता. त्याच्या शब्दावर लाखो नव्हेतर करोडो रुपये ओतणारे रांगा लावून उभे असायचे. त्याने अनेक कंपन्या सुरू केल्या आणि त्यात भांडवल गुंतवायला लोकांची रांग लागलेली असायची. तोच तेजपाल! गोव्यातल्या बलात्काराच्या आरोपाने किती गाजत होता? दिवसभर वाहिन्यांवर तोच दिसत होता आणि त्याच्याच नावाचा बोलबाला होता ना?



आपण विसरूनच गेलो ना त्याला? आज तो काय करतो, त्याच्यावरच्या आरोप व खटल्याचे पुढे काय झाले? काही स्मरते आपल्याला? कोरी पाटी आहे ना? तेजपाल नावाच्या थोर पुरोगाम्याला आपण साफ़ विसरून गेलोय. आपणच कशाला तमाम वाहिन्या व त्यांचे संपादकही संपुर्ण विसरून गेलेत तेजपालला. अगदी तेव्हा नरडीच्या शिरा ताणून तेजपाल याला बेड्या ठोकण्य़ासाठी आकाशपाताळ एक करणारा ‘टाईम्स नाऊ’चा अर्णब गोस्वामी सुद्धा तेजपाल साफ़ विसरून गेलाय. इतके प्रवचन झाले मग तेजपाल आणि कविता कृष्णन याच्या विधानाचा संबंध काय, असा प्रश्न वाचकाच्या मनात आलेला असेलच ना? तर तो थेट पुरोगामीत्व आणि दुसर्‍यांच्या मुलीवर ‘डोळा’ ठेवण्याशी आहे. कविता कृष्णन यांनी मोदींवर कुठला आरोप केला आहे? मोदींना मुलींचे फ़ोटो पाठवू नका. त्यांची दुसर्‍यांच्या मुलीवर वाईट नजर असते. कविता कृष्णन पुरोगामी महिला संघटनेच्या म्होरक्या आहेत आणि त्यांना भाजपा वा अन्य संघाच्या नेत्यांचा कुठलाही अनुभव नाही. मग त्यांनी असे विधान कशाच्या आधारे केले? तेच तपासून बघण्यासाठी इथे तेजपालची साक्ष काढली आहे. कारण जेव्हा तेजपालवर आरोप झाले आणि अटके़ची शक्यता निर्माण झाली, तेव्हा त्याने आपला बचाव काय मांडला होता? भूमीगत होऊन आपली अटक टाळण्यासाठी तेजपालने जाहिर विधान करताना काय म्हटले होते? गोव्यात भाजपाचे सरकार आहे आणि आपण पुरोगामी वा सेक्युलर असल्यानेच आपल्याला गोवले जाते आहे. त्याचा साधा अर्थ असा, की पुरोगामी असल्यावर बलात्कार करण्याची मोकळीक असते किंवा तेच पुण्यकर्म असते. असेच तेजपालला सुचवायचे असणार ना? त्यासाठी कुणा पुरोगामी संस्था नेत्याने तेजपालचा कधीच निषेध केला नाही. म्हणजेच पुरोगामीत्व बलात्काराची विशेष सवलत देते, असाच तथाकथित पुरोगाम्यांचा ठाम विश्वास असेल ना?

पण इथे आणखी पुढला मामला आहे. तेजपाल एका बाजूला झालेल्या घटनेचा इन्कार करीत नव्हता आणि दुसरीकडे आपल्या पुरोगामीत्वाचा हवाला देऊन आपल्यवर केवळ पुरोगामी असल्यानेच आळ आणला जातोय, असाही त्याचा दावा होता. मुद्दा इतकाच, की असा आरोप त्याच्यावर कोणी केलेला होता? कोणी अशी तक्रार केली होती? ज्या मुलीने असा आरोप केला होता आणि दाद मागितली होती, ती तेजपालच्या जुन्या सहकारी पत्रकाराचीच तरूण कन्या होती. पित्याचा मित्र म्हणून आणि आपल्याच कन्येची मैत्रिण म्हणून तेजपालने या मुलीला ‘टहलका’मध्ये पत्रकाराची नोकरी दिलेली होती. म्हणजे कन्येची मैत्रिण वा मित्राची कन्या यांचा ‘पुरोगामी वापर’ कसा करावा, याचे काही पुरोगामी शास्त्र असावे. अन्यथा तेजपालने असा बचाव कशाला मांडला असता? त्याचीच ज्येष्ठ सहकारी शोमा चौधरीही पुरोगामी म्हणून तत्पुर्वी सतत मोदी विरोधात वाहिन्यांवर झळकत असे. तिनेही अशा प्रसंगी पिडीत मुलीपेक्षा तेजपालचीच बाजू हिरीरीने मांडलेली होती. कितीसे पुरोगामी त्यावेळी तेजपालच्या या प्रकरणाचा संतप्त होऊन निषेध करायला बाहेर आलेले होते? बाकीच्या गोष्टी सोडून द्या. पुरोगामी म्हणूनच आपल्याला गोत्यात टाकले जात आहे, असा दावा तरूण तेजपालने केल्यावर तोच पुरोगामीत्वावरचा कलंक आहे, असे सांगायची इच्छा कुणा पुरोगाम्याला झालेली नव्हती. हा संदर्भ जोडला तर कविता कृष्णन यांचे अनुभवाचे बोल कुठून आलेले असतील, ते लक्षात येऊ शकते. म्हणून म्हटले आपण ‘कविता’च्या शब्दात फ़सण्यापेक्षा त्यातला आशय समजून घेतला पाहिजे. ही अनुभवातून आलेली वेदना वा प्रक्षोभ असण्याची शक्यता नसेल, असा दावा कोणी करू शकेल काय? पण करणार काय? आजकाल सगळ्यांचीच स्मरणशक्ती दुबळी झालेली आहे. कुणालाच काही आठवत नाही, की शोधावेसेही वाटत नाही.

3 comments:

  1. http://indianexpress.com/article/blogs/selfiewithdaughter-trolling-on-social-media-women-dare-not-cross-the-line/
    pl see the link above,pl blog on this

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    या कृष्णन बाईंनी यासंदर्भात इशारतजहाचं नाव घेतलं नाही. ही पुरोगाम्यांची प्रगती म्हणावी की अधोगती? ;-)

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. आजकाल पैशाने असली प्रकरणे दाबली जातात. त्यात तेजपाल हा मिडिया वालाच. सगळे मिडियावाल्यांची तोंड पैसा फेकून बंद केली असतील. परंतु न्यायव्यवस्था सुद्धा इतकी फालतू होईल असे वाटत नव्हते.

    ReplyDelete