Wednesday, July 29, 2015

आजच्या जमान्यातले जयचंद आणि पृथ्वीराज



शेकडो वर्षापुर्वीची कहाणी आहे. कोणी याकुबची फ़ाशी रद्द करा म्हटल्यावर आज आपण खवळतोय. पण आपला इतिहासच तसा नाही काय? जयचंद राठोड आठवतो आपल्याला? त्याच्या डोक्यावर खापर फ़ोडून आपण मोकळे होतो ना? त्यानेच संयोगिताच्या स्वयंवरातून तिला पृथ्वीराज चौहानने पळवली, म्हणून इतिहास घडवला नव्हता काय? कितव्या शतकातली गोष्ट आहे? शतक आणि साल शोधण्याची गरज आहे काय? त्याने काय होणार? शतक अकरावे असो किंवा एकविसावे असो, त्यात जयचंद आणि पृथ्वीराज असतातच. भारतीय स्वभावाचा तो गुणदोष आहे. आपल्या वादात वितुष्टात शत्रूला साथ देवून भाईबंदांसह आपल्यावरच नामुष्की ओढवण्याचा वारसा शतकानु शतके चालत आलेला आहे ना आपल्याकडे? पण पृथ्वीराज शहाणा होत नाही की जयचंदला अक्कल येत नाही. बहिणीशी प्रेम करून तिला पळवून नेणार्‍या पृथ्वीराजला धडा शिकवण्यासाठी जयचंदाने महंमद घोरीला साथ दिली होती ना? सग्यासोयर्‍याचा घात केला होता ना? पण म्हणून पृथ्वीराज निरपराध होता असे म्हणता येते काय? कित्येकदा त्याने घोरीला युद्धात पराभूत केले. पण तो शरण आला आणि मोठ्या औदार्याने त्याला अभय देण्याचे पाप कोणाचे होते? साक्षात आपल्याच दगाबाज मृत्यूला जोपासण्याचे पाप पृथ्वीराजाने केले नव्हते काय? आज गुरदासपूरचा हल्ला असो किंवा दिल्लीत राष्ट्रपतींना याकुबची फ़ाशी रद्द करण्याचे सादर झालेले निवेदन असो, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना आपण अनुभवत नाही काय? जे याकुबच्या कृत्यामुळे हकनाक मारले गेले त्याविषयी काडीमात्र भावना ज्यांना नाहीत, असे लोक आपल्या देशातले प्रतिष्ठीत म्हणून उभे आहेत आणि याकुबसाठी गळा काढत आहेत. पण त्यापैकी एकानेही कधी मारल्या गेलेल्या निरपराध मुंबईकरांसाठी अश्रू ढाळला नव्हता. याकुबसाठी त्यांना इतकी सहानुभूती कशाला आहे?

उद्या संधी मिळाली तर हाच याकुब वा अन्य कुठलाही जिहादी असाच आणखी कित्येक निरपराधांचे जीव घ्यायला क्षणाचाही विलंब लावणार नाही. तेव्हाही खरेखोटे न तपासता याकुबने आपल्या भावाशी संगनमत करून घातपाताचे षडयंत्र रचले आणि अंमलात आणलेले होते. महंमद घोरी असो किंवा याकुबसारखा जिहादी असो, त्यांची मानसिकता तसूभर वेगळी नाही. प्रत्येक मुस्लिम तसा असतो असे नाही. याकुब वा अन्य कुठला मुस्लिम याच्यातला फ़रक आपल्याला करता येणार नसेल, तर मग इतिहासाची पुनरावृत्ती होतच रहाणार आहे. दंगलखोर आणि कारस्थानी मारेकरी यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. थंड डोक्याने जो हत्येची योजना आखतो आणि काळजीपुर्वक नियोजन करून अंमलात आणतो, तो जिहादी वा सैतान असतो. अकस्मात उदभवलेल्या परिस्थितीने जो हिंसेला प्रवृत्त होतो, त्याला दंगलखोर म्हणतात. त्याच्या हातून एका ठराविक परिस्थितीत हिंसा घडून गेलेली असते. पण दोन भिन्न गोष्टींची गल्लत करायची आणि मग सामान्य माणसांचा गोंधळ उडवुन द्यायचा हे एक घातक तंत्र झाले आहे. जेव्हा त्यात मुस्लिम जिहादी पकडले जातात, तेव्हा मग दहशतवादाला धर्म नसतो म्हणायचे आणि हिंदू दंगलखोर असला तरी त्यावर धर्माचे लेबल अगत्याने लावायचे, हा नेहमीचा खेळ झालेला आहे. यात फ़सवणुक कुठे आणि कशी आहे, तेही समजून घेणे भाग आहे. कारण आपल्या देशाला याकुब वा तत्सम घातपाती जिहादींपासून धोका नाही, इतका अशा दिशाभूल करणार्‍या बुद्धीवादी मान्यवरांपासून धोका आहे. कुंटणखान्यात येऊन फ़सलेल्या मुलीला मोल देवून जबरदस्ती करणारा गुन्हेगार नसतो, इतका तिला प्रेमात फ़सवून कुंटणखान्यात आणून विकणारा सैतान असतो. आज याकुब आपल्याला सैतान वाटतो आहे. पण सत्य विचित्र असते. त्या याकुबपेक्षा त्याला वाचवायला पुढे सरसावलेत, असे लोक अधिक भयंकर सैतान आहेत.

प्रेमात पडलेली मुलगी आपल्या सगेसोयर्‍यांना सोडून ज्या प्रियकराच्या सोबत पळून येते. तिने विश्वासाने त्याला साथ दिलेली असते. कुठल्याही संकटात तो आपल्याला वाचवणार व सोडवणार अशा विश्वासावर ती मुलगी उठून आलेली असते. त्यानेच तिला कुंटणखान्यात नेवून विकणे म्हणजे किती मोठा दगाफ़टका असतो? आपल्या समाजात आपण ज्यांच्याकडे मान्यवर प्रतिष्ठीत जाणते म्हणून बघत असतो, त्यांनी नेहमी कायद्याच्या राज्याची प्रवचने दिलेली आहेत. यातले बहुतेक लोक गुजरात दंगलीत दोषींना शिक्षा देण्यासाठी अहोरात्र रडतेले आहेत. जे आरोप सिद्ध झाले नाहीत वा त्याचे पुरावेही सापडत नाहीत, अशा बाबतीत मोदींना शिक्षा व्हावी म्हणून गळा काढणार्‍यांचा यात भरणा दिसेल. मग त्यांचे तेव्हाचे कायदाप्रेम खरे होते, की आज न्यायाला धुडकावण्याची भूमिका खरी आहे? न्याय व कायद्याची कदर असेल तर शिक्षा कोणालाही होवो, तिचे समर्थन व्हायला हवे. पण ही माणसे एका बाजूला शिक्षेचा पुराव्याशिवाय आग्रह धरतात आणि दुसरीकडे पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या गुन्ह्याच्या शिक्षेला अतिरेक ठरवू बघतात. इथेच त्यांच्यातला फ़सवा प्रियकर आपल्या लक्षात येऊ शकतो. दिशाभूल उमजू शकते. माथी भडकलेली असताना बेभान होऊन केलेली दंगल त्यांना चिंतेचा विषय वाटतो आणि योजनापुर्वक केलेल्या हत्या त्यांना दुर्लक्षणिय क्षमाशील चुक वाटते. असे लोक समाजाला गाफ़ीलपणे खाटकाच्या हाती सोपवत असतात. कुठल्याही फ़सव्या योजनेत लाखो रुपये गुंतवून अधिक लाभ मिळण्याचे आमिष दाखवणार्‍या लफ़ंग्या सेल्समनपेक्षा अशा निवेदनकारांची लायकी अधिक नाही. कारण हे लोक सहानुभूतीच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत आहेत आणि प्राणघातक संकट म्हणजे लोकशाही वा सुरक्षितता असल्याचा भास निर्माण करीत आहेत. त्यांना स्वत:च्याही भविष्याचे भान उरलेले नाही.

युझफ़ुल इडीयट असा एक इंग्रजी शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ असा, की असे मुर्ख शत्रूला उपयुक्त असतात आणि स्वत:साठी मुर्ख असतात. इराणमध्ये शहा विरोधात क्रांती झाली तिचे नेतृत्व तिथल्या कम्युनिस्टांकडे होते. पण सामान्य जनतेला सोबत ओढण्यासाठी त्यांनी परागंदा असलेला मुल्ला आयातुल्ला खोमेनी याचा चेहरा पुढे केला. जेव्हा इराण पेटला आणि शहाला पळून जावे लागले, तेव्हा सत्तासुत्रे खोमेनीच्या हाती आली. त्याने फ़्रांसहून मायदेशी परत आल्यावर सर्वप्रथम कम्युनिस्टांचे शिरकाण केले. थोडक्यात शहाच्या विरोधात इराणी कम्युनिस्टांनी आपल्याच जीवावर उठण्यार्‍याला बळ देण्याचा मुर्खपणा केला होता. इथेही आज याकुब वा जिहादीच्या समर्थनाला उभे राहणारे तथाकथित डावे उदारमतवादी वेगळे काय करीत आहेत? दुसरीकडे तशाच मतांच्या लाचारीने अनेक इतरही पक्ष भरकटले आहेत. अशा राजकीय पक्षांचे वर्तन जयचंद राठोडचा इतिहास नव्याने घडवत असतात. कॉग्रेसच्या साथीने देशात नाव कमावल्यानंतर ओवायसीने महाराष्ट्रात त्याच कॉग्रेसची कबर बांधायला हातभार लावला ना? आज ओवायसी कोणते डाव खेळतो आहे, त्याचे परिणाम दोनतीन वर्षांनी याकुबच्या समर्थक दिवट्यांना कळतील. सुदैवाने आज भारतात राजेशाही नाही आणि सामान्य जनताही पृथ्वीराजसारखी भोळीभाबडी नाही. तिनेच आधी इथल्या जयचंदांचा सुपडा साफ़ करून मागल्या लोकसभेत आपला कल स्पष्ट केला आहे. त्यातून इथले एकविसाव्या शतकातले जयचंद धडा शिकलेले नसतील तर घोरीकडून संपवले जाण्याआधी जनताच त्यांना निकालात काढील. भाजपा वा मोदी जर पृथ्वीराज व्हायची उदार स्वप्ने बघत असतील तर मतदार त्यांनाही पर्याय शोधल्याशिवाय रहाणार नाही. कारण नेता कितीही महत्वाचा असला तरी आधुनिक युगात जनताच इतिहास घडवत असते आणि बदलतही असते, हे आजच्या जयचंद व पृथ्वीराजांनी विसरू नये.

7 comments:

  1. भाऊ, अक्षर अन अक्षर पटणारे विवेचन!

    ReplyDelete
  2. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या दहशतवाद्याला देशद्रोहासाठी शिक्षा मिळाली आहे, त्याच्या बाजुने कोणि बोलत आहे. लोकशाहीच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखालील मूर्खपणा आहे हा. शिवाय यातून त्यांची देशावर किती निष्ठा आहे, हे तर उघडच आहे. जोपर्यंत व्यक्तिनिष्ठा संपून देशनिष्ठा सुरू होत नाही, तोपर्यंत असे जयचंद तयार होणार आणि घोरी या देशावर आक्रमण करणार. तेव्हा आपण फक्त प्रूथ्विराज ऐवजी शिवाजीराजे असू हीच अपेक्षा!

    ReplyDelete
  3. Please send a copy of this article to Mr Girish Kuber editor of Loksatta.Please ask his comments on the same.

    ReplyDelete