Thursday, October 15, 2015

हिडीस, किळसवाणे, पाताळयंत्री

"You can fool all the people some of the time, and some of the people all the time, but you cannot fool all the people all the time." -Abraham Lincoln



सुप्रिम कोर्टाने कालपरवा संजीव भट्ट नामक माजी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याची एक याचिका फ़ेटाळून लावली. त्यात नुसती त्याची मागणीच नाकारलेली नाही, तर ह्या माणसाने कायदा, न्याय व कोर्टाचीही दिशाभूल करण्याचा किती हिडीस खेळ केला, त्याचीही लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अर्थात त्यात एकटा संजीव भट्ट उघडा पडलेला नाही, तर मागल्या चौदा वर्षात मोदी द्वेषाने भारावलेले जे पाताळयंत्री पुरोगामी कारस्थान या देशात मोठ्या उजळमाथ्याने राबवले गेले, त्याचाच या एका निकालातून देशातल्या सर्वोच्च न्यायपीठाने पर्दाफ़ाश करून टाकला आहे. पण कोडग्या लोकांना लाज नसते, म्हणून की काय हे लोक आता संजीव भट्टला सोडून अखलाक महंमद नावाच्या नव्या शिकारीवर तुटून पडले आहेत. दादरीच्या घटनेसाठी पंतप्रधान मोदींना गुन्हेगार ठरवण्यामागची पुरोगामी चाल समजून घ्यायची असेल तर संजीव भट्ट प्रकरणी सुप्रिम कोर्टाने दिलेला निवाडा काळजीपुर्वक अभ्यासावा लागेल. त्यातून पुरोगामी वा प्रतिष्ठीत मुखवट्याच्या आड किती हिंस्र चेहरे दडलेले आहेत, त्याची आपोआप साक्ष मिळून जाईल. जे घडलेच नाही त्याचा आभास उभा करायचा आणि त्यासाठी एखाद्याला फ़ासावर द्यायचे, इतक्या सराईत गुन्हेगाराचे रुप आता पुरोगाम्यांनी धारण केल्याचा तो सज्जड पुरावा आहे.

गुजरात दंगल मोदींनी घडवून आणली व ती रोखू नये असा पोलिसांना आदेश देवून मुस्लिमांची कत्तल घडवून आणली; इथून त्या मोहिमेची सुॠवात झाली होती. त्याच मुळ अफ़वेचा जनक होता संजीव भट्ट! तो गुजरात पोलिसातला वरीष्ठ सनदी अधिकारी होता आणि त्यानेच गुजरात दंगल मोदींमुळे होऊ शकली, अशी आवई उठवली होती. त्यावर विसंबून मग देशभरचे तमाम पुरोगामी मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत सुटले होते. ज्याचा कुठला पुरावा नव्हता की कोणीस आक्षीदार नव्हता. पण मग तसा साक्षीदार पुढे आणला गेला. त्याचे नाव संजीव भट्ट! गोध्रा येथे जळितकांड झाल्यावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरातच वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. तिथे त्यांनी ‘दोन दिवस लोकांना आपला रोष प्रकट करण्याची मोकळिक द्या, कुठली कारवाई नको’ असे आदेश दिले होते, अशी ग्वाही भट्टने आपल्या साक्षीत दिलेली होती. आपण त्या बैठकीला हजर होतो असा भट्टचा दावा होता. गुजरात दंगलीची चौकशी चालू असतानाच एहसान जाफ़री यांच्या पत्नीने सुप्रिम कोर्टात दाद मागितली व त्यातून नेमल्या गेलेल्या विशेष तपास पथकाने कसून शोध घेतला. त्यात संजीव भट्ट याचा दावा खोटा पडला. तो अशा कुठल्याही बैठकीला हजर नव्हता. पण आपण हजर असल्याचे दाखवण्यासाठी त्याने आपल्या ड्रायव्हरला खोटे प्रतिज्ञापत्र सादर करायला भाग पाडले. ड्रायव्हरने आपल्याला मुख्यमंत्री निवासस्थानी नेले, असा भट्टचा दावा पुराव्यानिशी खोटा पडला. कारण तीस्ताच्या प्रयत्नांनी नेमलेल्या खास पथकानेच तेव्हा ड्रायव्हर अहमदाबादेत नव्हता आणि म्हणूनच भट्टला त्याने मोदींच्या घरी नेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सिद्ध केले. तेवढाच खोटेपणा झालेला नाही. तिथे तात्कालीन गृहमंत्री हिरेन पंड्या असल्याचाही भट्टचा खोटेपणा उघडा पडला. कारण पंड्या तिथे नव्हते आणि नेमक्या त्याचवेळी भट्ट पंड्याशी मोबाईलवर वेगवेगळ्या भागातून बोलल्याचे पुरावे हाती आले. यातून भट्ट खोटारडेपणा करीत गेला आणि त्यासाठी खोटेनाटे पुरावे निर्माण करत गेल्याचे कोर्टाने आपल्या निकालात नमूद केले आहे.

विषय तिथेच संपत नाही. जेव्हा हा खोटेपणा उघडा पडला, तेव्हा भट्ट विरोधात दोन गुन्हे नोंदले गेले आणि त्याचा तपास गुजरातमध्ये होऊ नये, म्हणून त्याने सुप्रिम कोर्टाकडे धाव घेतली. त्याचीच ही याचिका होती. पण त्यात तोच एकटा खोटा व लफ़ंगा ठरलेला नाही. त्याने कॉग्रेस, नर्मदा बचाव आंदोलन व इतरांच्या मदतीने थेट सुप्रिम कोर्टावरही प्रभाव पाडायचा कसा प्रयत्न केला, त्याचे धिंडवडे निकालात काढलेले आहेत. म्हणजेच नर्मदा बचाव असो किंवा कॉग्रेस असो, त्यांच्या खोटारडेपणाची लक्तरे या निकालपत्राने काढलेली आहेत. जनहिताचे मुखवटे लावून मिरवणार्‍यांच्या अब्रुचे धिंडवडे यात आहेत. खेरीज मोदी विरोधातील राजकारणात माध्यमे पत्रकारांचा कसा योजनाबद्ध वापर करण्यात आला, त्याचेही तपशील कोर्टाने यात मांडले आहेत. त्यासाठी भट्ट याने विविध लोकांना लिहीलेल्या इमेल्स वा साधलेले संपर्क यांचा तपशीलवार गोषवारा यातून समोर आला आहे. गुजरात दंगलीचे खापर मोदींच्या माथी फ़ोडून त्यांना राजकीय जीवनातून उठवण्याचे किती हिडीस कारस्थान पुरोगामीत्व मिरवणार्‍यांनी यशस्वीरित्या मागल्या चौदा वर्षात राबवले होते, त्याचा हा गोषवारा आहे. त्यातून एक गोष्ट सामान्य माणसासाठी स्पष्ट झाली, की माध्यमातील कोणी पुरोगामी वा सेक्युलर असेल, त्याच्या कुठल्याही शब्दावर यापुढे विश्वास ठेवण्याचे कारण नाही. किंबहूना माध्यमात पुरोगामी, सेक्युलर वा नामवंत म्हणुन कोणाला पेश करण्यात आले, तर बिनदिक्कत त्याला भामटा समजायला हरकत नाही. सुप्रिम कोर्टाने ज्या प्रकारचे ताशेरे मारले आहेत, त्याकडे बघता नर्मदा बचाव किंवा माध्यमे यांना जगासमोर येण्याची शरम वाटली पाहिजे. ज्यांनी कोणी गुजरात दंगलीचे खापर मोदींच्या माथी मारण्याचा उद्योग कळत नकळत केला, त्यांचे या निकालाने पुर्ण वस्त्रहरण केले आहे. मग अशा कोणावर यापुढे कसला विश्वास ठेवायचा?

आज त्यातलेच बहुतांश लोक पुरस्कार परत देत आहेत आणि दादरीच्या घटनेसाठी मोदींना आरोपी ठरवू बघत आहेत. असे लोक जेव्हा मोदींवर आरोप करतात, तेव्हा आपोआप मोदी निर्दोष असल्याची खात्री बाळगायला हरकत नाही. याचे कारण त्यांची प्रत्येक साक्ष, त्यांचे प्रत्येक आरोप देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने खोटे पाडले आहेत. किंबहूना यातला कोणीही विश्वासार्ह साक्षिदार नाही, याचीच ग्वाही संजीव भट्ट प्रकरणातल्या निकालपत्राने दिली म्हटल्यास वावगे ठरू नये. दादरी प्रकरणाचे सोडून द्या! त्यासाठी कोणीही पुरस्कार परत करण्याची गरज नाही. पण मागल्या चौदा वर्षात आपण जो खोटारडेपणा केला किंवा त्यात उजळमाथ्याने सहभागी झालो, याची त्यापैकी कोणाला शरम असेल, तर त्याचे प्रायश्चीत्त म्हणून त्यांनी जाहिरपणे माफ़ी मागण्याचे तरी सौजन्य दाखवायला हवे. नर्मदा बचावचा कोर्टाच्या निकालात उल्लेख आला आहे, तो कौतुकास्पद नसून शंकास्पद आहे. त्याचा खेद मेधा पाटकरांना किंवा त्यांच्या भक्तांना आहे काय? ज्यांना समाजात नामवंत वा प्रतिष्ठीत म्हणुन पेश केले जात, ते किती हिडीस व हिणकस वृत्तीची माणसे आहेत, त्याची प्रचिती हे निकालपत्र देते. दिल्लीतल्या माध्यमे, पत्रकार व स्वयंसेवी संस्थाही कोर्ट व न्यायाच्या प्रक्रियेत दिशाभूल करण्यासाठी इतक्या संगनमताने सहभागी होत असतील, तर दाऊद, राजन वा गवळी यांच्यावरही विश्वास ठेवायला हरकत नाही. पण अशा माध्यमांनी मान्यवर म्हणुन पेश केलेल्या कोणावरही काडीचा विश्वास यापुढे जनता ठेवणार नाही. अर्थात दिड वर्षापुर्वी मतदानातून जनतेने त्याची साक्ष दिलेलीच होती. आता देशाच्या सुप्रिम कोर्टानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पण म्हणतात ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, काल़चे बोलणे आज नाही! त्याच कोडग्यांचे नवे नाटक सुरू झाले आहे. या देशात किती भामटे आजवर पुरस्कृत होते, तेच या नव्या नाटकातून सिद्ध होईल.

कालपरवा सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याची घटना घडलीच, पण जर ही भामटेगिरी वेळीच थांबली नाही, तर सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि अशा प्रतिष्ठींतांना रस्त्यावर मिळेल तिथे लोक काळे फ़ासायला कमी करणार नाहीत. कारण तोतयेगिरीने पुरोगामीत्वाला ग्रासले असून त्याच्याच कारणाने पुरोगामीत्व ही शिवी होत चालली आहे. डॉ. सदानंद मोरे त्यापासून कशामुळे अलिप्त झाले, त्याचे कारण आपण मंबाजीच्या गोतावळ्यात फ़सल्याचे त्यांच्याही लक्षात येत चालले असावे. म्हणूनच त्यांनी पुरस्कृतांच्या रांगेत उभे राहून पुरस्कार परत करण्यास नकार दिलेला असावा. सर्व क्षेत्रातले संजीव भट्ट उघडे पडायचे दिवस आलेत म्हणायचे.

24 comments:

  1. भाऊ...अत्यंत परखड भांडाफोड केलीय...अभिनंदन.

    ReplyDelete
  2. रोखठोक विश्लेषण केलात पण ते जनसामान्यांपर्यंत पोचायलाच हवे .

    ReplyDelete
  3. भाऊ खुपच सुंदर लेख तुमच्या विचारा प्रमाणे सर्व स्तरातील संजिव भट उघडे पडायला पाहिजेत त्यातच देशाचे भवितव्य दडलेले आहे

    ReplyDelete
  4. डॉ. सदानंद मोरे म्हणतात की मला पुरस्कार या सरकारने दिला नाही , मग मी तो का परत करावा. कमाल या लोकांची . १०-२० वर्षा पूर्वी ज्याना पुरस्कार दिले ते सुधा परत करता आहेत , नेमाडे आजुन चुप कैसे माहित नाही .

    ReplyDelete
  5. Gujrat madhe kahi zala tar modi zavabdar.. Mag UP madhe dadri kandala akhilesh yadav la ka javabdar dharat nahi..yatunach duheri bhumika lakshat yete

    ReplyDelete
  6. नेहेमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण --- अभिनंदन .

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्ही निर्भिडपणे आणि रामशास्त्री बाण्याने लिहितां. मान गये भाऊ आपको, और आपके लिखनेके अंदाजको.
    पब्लिक है, सब जानती है! ....
    लेकिन आपजैसा बिनाडर बजानेवालाभी चाहिये होता है.
    ज़ियो भाऊ!!!

    ReplyDelete
  8. ह्यात मोदींनी हुरळुन जायची काही गरज नाही. त्यांचा 'अडवाणी' होतोय की काय ही भीती वाटते.

    ReplyDelete
  9. अप्रतिम!

    ReplyDelete
  10. कोंबड झाकले म्हणून सुर्य उगवायचा राहत नाही

    ReplyDelete
  11. भाऊ जबरदस्त। आमच्या सारख्या अनेक देशप्रेमी मनांना या लिखाणा ने वाचा फोडली।

    ReplyDelete
  12. भाऊ, नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख. तुमचं कौतुक आणि अभिनंदन करावे तितके थोडकेच आहे.

    खंत एकाच गोष्टीची वाटते, तुमचे विचार काही लाख मराठी लोकांपर्यंत पोहचतात पण बरखा दत्त आणी राजदीप सरदेसाई आणी हजारो इतर त्यांचे विष कोट्यावधी लोकांमध्ये पसरवतात आणी दुर्दैव्याने त्यांना आवर घालणार कोणीच नाही. कदाचित आपल्य्रा भारतालाच हा शाप असेल कि वर्षानुवर्षे नेहरू-गांधी familyची गुलामगिरी सहन करायची आणि सावरकर व बोस सारख्यांना देशद्रोही ठरवायचं. इतकच नाही तर याकूब मेमन सारख्यांना National Hero बनवायचं.

    ReplyDelete
  13. Modi far kashtatun war alet, te ase huralun janar nahit. Saglyana purun uratil.....

    ReplyDelete
  14. धन्यवाद भाऊ,
    सडेतोड आणि माहितीपुर्ण
    पण द्वेषाचा गाॅगल लावल्याने हा लेख पुरोगाम्याना दिसणार नाही

    ReplyDelete
  15. भाऊ,
    सदानंद मोरे ह्यांनी आजपर्यंत कधी निर्भीड भूमिका घेतलेली आहे ? नेहमी काठावर बसलेले असतात आणि स्वतःचे हितसंबंध लक्षात घेवून त्याप्रमाणं मतप्रदर्शन करतात. हा बौद्धिक आप्रमानिकापणा नव्हे काय ? उदा : जेव्हा सर्व वारकरी अनंत यादवांवर तुटून पडले होते तेव्हा वाराकार्यांच्याही काही चुकांबद्दल ह्यांना विचारला तर हे कधीही स्पष्टपणे बोललेला आठवत नाही ! तीच गोष्ट पुरोगामी दहशतवादाबद्दल ! आमच्या नजरेत तरी मोरे सर हे स्वतःची प्रतिमा आणि हितसंबंध जपून मगच सोयीप्रमाणे बोलणारे विद्वान आहेत, नाही का?

    ReplyDelete
  16. Aprateem Vishleshan and Stya paristithiche yatharth varnan.

    ReplyDelete
  17. ekoonach kunavarhee vishwas uralelaa nahee...kaheehi mhana donhee baajoo kharya tarihee kilasvanyaach aahet...karan dveshamoolak vicharach donhi bajoone pasaravale jaat aahet hech khare aahe...

    ReplyDelete
  18. आता काळं फासण्याचे दिवस गेले आता लोक बेदम चोपच देतील.👌

    ReplyDelete
  19. खूपच छान लेख आहे ,मुळात हे लेख वाचायचे म्हणूनच आपले फेसबुक पेज लाइक केले कारण अगोदर पुण्यनगरीत आलेले लेख दररोज वाचायला मिळायचे , पण तिथे लिहिणे सोडून दिल्यापासून खूप दिवस काही वाचायला मिळाले नाही ब्लॉग च्या निमित्ताने परत एकदा हि संधी उपलब्ध झाली.आजचे पुरोगामी हे ढोंगी पुरोगामी आहेत दिवसा प्राणिहत्यावर बोलतील व रात्री मात्र त्यावरच ताव मारतील,

    ReplyDelete
  20. कानके निच्चे बजाई गुरुजी!!

    ReplyDelete
  21. हा लेख सत्य बाहेर जनते पयँत पोहवणारा आहे,संजु भट हा ऐक मोहरा आहे कटकारस्थान करणारे पण ऊघडे झालेत सत्य परेशान है पराजित नही,

    ReplyDelete