Monday, October 19, 2015

पुरोगामीत्वाने केली अति तिथे माती

लोकशाही इतकी तकलादू नसते!   (३)


बंगाल केरळात सत्ता व गुंडगिरीच्या बळावर विरोधकांना चेपून टाकणारे मार्क्सवादी लोकशाहीच्या गप्पा मारतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. मागल्या दोन दशकात नक्षलवादी हिंसाचाराने थैमान घातले आहे. दोन वर्षापुर्वी छत्तीसगड राज्यात कॉग्रेस नेत्यांच्या पथकावर नक्षलवाद्यांनी इतका भीषण हल्ला चढवला की त्यात अर्धा डझन नेते मारले गेले. तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा वाढली होती काय? सरसकट कत्तल वा हिंसाचाराचे थैअमान घालणार्‍या या वृत्तीमुळे देशातली लोकशाही धोक्यात आल्याचा गाजावाजा कोणी केल्याचे ऐकीवात नाही. पण त्यांच्याशी संबंधित वा सहकार्य करणार्‍यांवर खटले भरले, तर त्यांच्या बचावाला कोण धावून जात असतात? त्यात भरणा असलेले साहित्यिक लेखक लोकशाहीला प्रोत्साहन देतात काय? त्यांच्या निषेधाला किती साहित्यिक वा पुरस्कार विजेते पुढे आले आहेत? एकूणच सर्वत्र दुटप्पीपणा चाललेला दिसेल. आपण गाय मारली तरी लोकशाही आणि दुसर्‍याने वासराला नुसता चाबुक मारला तरी अमानुष हत्या म्हणून बोंबा ठोकणे, आता कंटाळवाणे झाले आहे. म्हणूनच लोकशाही, पुरोगामी, सेक्युलर असले शब्द आता अर्थशून्य होऊन गेले आहेत. त्यातून भंपक लोकांचे राजकीय हेतू साध्यही होत असतील. पण त्यासाठी दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी अशा निरपराधांचे जीव जातात, ही गंभीर बाब आहे. त्यातले गांभिर्यही सामान्य माणसाच्या लक्षात येईनासे होत चालले आहे. ती खरी चिंतेची बाब आहे. अशा हत्यांचे राजकीय भांडवल करणारे नाकर्ते असले, म्हणून त्या हत्यांचे समर्थन होऊ शकत नाही. कुणालाही कोणी हकनाक मारणे ही बाब भीषण आहे. त्याविषयी सामान्य जनता संवेदनशील असली पाहिजे आणि तीव्र प्रक्षोभ व्यक्त झाला पाहिजे. ती लोकशाहीच्या संवेदनशीलतेची खरी कसोटी आहे. पण दुर्दैवाने तसे घडलेले दिसत नाही. या तिन्ही हत्येनंतर जनमानसात हवा तितका प्रक्षोभ उमटला नाही. म्हणूनच चिंता करायची तर सामान्य जनतेत आलेल्या त्या बधीरपणाची चिंता आवश्यक आहे. लोक इतके बधीर व संवेदनाहीन कशाला होत चालले आहेत, त्याचे उत्तर शोधावे लागेल. त्याचे उत्तर प्रामाणिकपणे शोधले तर त्यावर उपायही सापडू शकेल.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला मग त्यातले नाविन्य संपते आणि नेहमीची गोष्ट म्हणून लोक त्याविषयी संवेदनाशून्य होऊन जातात. लांडगा आला रे आला असली गोष्ट होऊन जाते. तसे झाले मग खरेच लांडगा येतो, तेव्हा कितीही बोंबलून लोकांना खरे वाटत नाही. तशीच आजच्या समाजाची अवस्था झाली आहे. कुठल्याही बारीक गोष्टीचे इतके अवडंबर माजवले जाते, की खर्‍या गंभीर धोक्याचीही भिती वाटेनाशी होऊन जाते. दाभोळकर पानसरे यांच्या हत्येने लोकशाही धोक्यात आलेली नाही. पण अशा घटना लोकशाही समाजाला लज्जास्पद आहेत, ही बाब नक्कीच गंभीर असते. काळ सोकावतो म्हणतात तसा हा धोका असतो. अखलाख महंमदची हत्याही तशीच आहे. पण म्हणून तसेच वातावरण बिघडून गेले आहे असा निष्कर्ष काढून, बहुसंख्य हिंदू समाजाला जातीय दंगलखोर असल्यासारखे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे अधिक घातक आहे. विशेषत; एका याकुब वा अफ़जल गुरुसाठी संपुर्ण मुस्लिम समाजाला घातपाती ठरवू नका म्हणणारेच, दादरीच्या घटनेनंतर जमावाचा धर्म मुद्दाम सांगू लागतात, तेव्हा आगीत तेल ओतत असतात. तसे खरेच असते, तर पाकव्याप्त काश्म्रिरातील बहुसंख्य मुस्लिमांनी भारतात सहभागी होण्यासाठी लाठ्या कशाला खाल्ल्या असत्या? इथे भारतात मुस्लिम विरोधी इतके कडवे हिंसक वातावरण असेल, तर व्याप्त काश्मिरातील मुस्लिम भारतीय होण्याचा आग्रह कशाला धरतील? मग लक्षात येते, की दादरीची घटना अतिरंजित करून सांगितली जात आहे आणि त्यामुळे मुस्लिम विचलीत होत नसले, तरी बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या मनात मात्र जहर कालवले जात असते. अशी कृत्ये झुंडी करतात आणि झुंड तशी कशामुळे व केव्हा वागते, तेही समजून घेतले पाहिजे. त्याशिवाय नुसतेच लोकशाही वा पुरोगामीत्वाचे ढोल पिटून उपयोग नाही.

झुंडीच दंगली करतात आणि झुंडींना चिथावणी दिल्याने त्या हिंसक होतात, यात शंका नाही. पण सामान्य माणसाचे रुपांतर झुंडीत होण्याची एक प्रक्रिय़ा असते. कोणीही लोकांच्या जमावाला झुंड बनवून हिंसा करवून घेऊ शकत नाही. दुखावलेल्या वा तिटकारा त्वेषाने भारलेल्या लोकांचे एकत्र येणे त्यासाठी आवश्यक असते. तेच काम मागल्या दोन तीन दशकात पुरोगामी लोकांनी मोठ्या इमानेइतबारे पार पाडलेले आहे. सतत जिहादी हिंसाचार, लवजिहाद, घातपात वा बॉम्बस्फ़ोट अशा घटना मुस्लिम अतिरेक्यांकडून झालेल्या आहेत. त्यात बहुतांश हिंदूंचाच बळी पडला आहे. त्याला बौद्धिक युक्तीवादाने पाठीशी घालण्यातून हिंदू समाजाच्या मनात मुस्लिम समाजाविषयी एक रागाचे वा त्वेषाचे बीज पुरोगाम्यांनी पेरले आहे. तो राग व्यक्त करण्यालाही पाप ठरवण्याने त्याचे स्फ़ोटक भावनांमध्ये रुपांतर होत गेलेले आहे. मग जो कोणी अशा भावनांना चुचकारतो, त्याच्या फ़सव्या गोष्टीही त्या दुखावलेल्यांना पटत जातात. त्याचे रुपांतर मग हिंदूंचे संतप्त जमाव किंवा झुंड बनवण्यात होऊ शकते. अशा बाबतीत मग साक्षी महाराज वा कुणा साध्वीकडे चिथावणीखोर म्हणून बोट दाखवले जाते. पण त्यांना जो कच्चा माल म्हणून दुखावलेले हिंदू हवेत, त्यांची निर्मिती वा पुरवठा पुरोगाम्यांनी केलेला नाही काय? आता गुजरातमध्ये गरबा किंवा दांडियामध्ये मुस्लिम तरूणांना प्रवेश नाकारण्यावर टिका करण्यातून अशा हिंदूंना दुखावले जात असते. त्यातून मग चिथावणीला बळी पडणारा कच्चा माल निर्माण होत असतो. तेव्हा त्यातून लोकशाही धोक्यात येत असेल, तर तिला जबाबदार कोण आहे? अशा झुंडी निर्माण करणारे त्यातले खरे गुन्हेगार आहेत.

गंमत बघा, दोनतीन दशके मागे गेलो तर देशात सेक्युलर पुरोगामी हे शब्द फ़ारसे वापरात नव्हते आणि देशातील सर्व धर्माचे लोक अधिक सौहार्दाने व समंजसपणाने एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते. पण जसजसा देशातला पुरोगामी डंका अधिक वाजत गेला व सेक्युलर ढोल जोरात पिटले जाऊ लागले; तसतशी जातियवादाची किड वेगाने पसरत गेलेली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातल्या राजकारणात कॉग्रेसला हिंदूंचा पक्ष ठरवून जी टिका व्हायची, तेच आज भाजपाच्या बाबतीत होताना आपण बघत आहोत. त्या आरोपामुळे कॉग्रेस सेक्युलर व्हायची थांबली नाही. पण नंतरच्या काळात मात्र मुस्लिम गठ्ठा मतांसाठी कॉग्रेस हिंदू विरोधी पक्ष होत गेला. परिणामी मुस्लिमधार्जिणा नसलेला पक्ष लोक शोधत गेले आणि त्यातून भाजपाच्या हाती सत्ता येऊ शकली आहे. त्यातली लोकशाही समजून घेता आली नाही, तर पुरोगामी मुर्खपणा या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्यापर्यंत जाऊ शकेल. मागल्या बारा पंधरा वर्षातला पुरोगामी अतिरेक मोदींना सत्तेपर्यंत व बहुमतापर्यंत घेऊन गेला आहे. त्यातल्या चुका सुधारल्या गेल्या नाहीत, तर अधिकाधिक हिंदू लोकसंख्या धर्माच्या नव्हेतरी हिंदू राजकारणाच्या आहारी जाण्याला पर्याय उरणार नाही. ज्या घटना व हत्यांचे भांडवल करून लोकशाही धोक्यात आल्याचा गहजब चालला आहे, त्या घटना गंभीर असल्या तरी तेवढ्याने धोक्यात यायला लोकशाही तितकी तकलादू नसते. पण पुरोगाम्यांच्या अतिरेकाने इथले धार्मिक व जातिय सौहार्द नक्कीच धोक्यात आले आहे. नेपाळमध्ये मुस्लिमांनीही हिंदूराष्ट्र हवे अशी मागणी केली, कारण तिथले सेक्युलर राजकारण म्हणजे ख्रिश्चन धर्मांतराला मोकाट रान, असा मुस्लिमांचाच आक्षेप होता. इथे पुरोगामीत्वाचे दुष्परिणाम मुस्लिमांच्याच वाट्याला अधिक यायला लागले, मग तेही भारताला हिंदूराष्ट्र बनवण्याच्या मागे उभे रहाणे अशक्य नाही. मात्र त्याचे श्रेय कोणा हिंदूत्ववाद्याला घेता येणार नाही. इतका पुरोगामी मुर्खपणा बोकाळला आहे. लोकशाही इथे अबाधितच राहिल, यात शंका नाही! भारत सेक्युलर राष्ट्र राहिल किंवा नाही, हा खरा गंभीर सवाल आहे. (संपुर्ण)

5 comments:

  1. भाऊ तीनही लेख उत्तम. पुरोगामी वार्तांकन करणाऱ्यांना हे वास्तव दिसत नाही हे आश्चर्यजनक आहे.
    तसाच २००२ मध्ये गोधरा येथे निरपराध हिंदू पेटवून देण्यात काही कॉंग्रेस चे गुंड असल्याचे सांगितले जाते.
    तेव्हा अखलक आणि घटनांमागे केवळ मोदींना बदनाम करण्यासाठी कॉंग्रेस चे गुंड असू शकतील का?

    आणखीन एक हलकट पणा. एखाद्याच्या तोंडाला काळे जेव्हा कुणी फासतो तेव्हा शाई उडवली जाते. अर्थातच माणूस प्रतिकार करतो आणि शिंतोडे उडवलेले दिसतात. पण वानगीदाखल खालील फोटो पहा.

    https://www.google.co.in/search?q=sudhindra+kulkarni+face+blackened&rlz=1C1AVNE_enIN650IN650&espv=2&biw=1366&bih=667&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=0CAYQ_AUoAWoVChMI9tz-qt_QyAIVEESICh33Zwzp#imgrc=Gd3B-_eWCx0lrM%3A

    ह्यात अगदी मेक अप केल्यासम चेहरा काळा केला आहे. माझा मुद्दा असा कि देशातील पुरोगामित्व धोक्यात आल्याच कुभांड रचलं जातंय आणि त्यामागे तथाकथित पुरोगाम्यान्चाच हात असण्याची शक्यता जास्त!

    ReplyDelete
  2. पुरोगामी स्वत:च आपला गळा दाबुन रडं काढतायत. पुढेही तेच जीणं नशीबी आहे त्यांच्या!

    ReplyDelete
  3. फार उत्तम पद्धतिने सत्यपरिस्थितीचे विश्लेषण केलत आपण ।
    हिंदू दहशहतवादाचे खंडन करणारा एखादा लेख आपल्याकडून वाचायला आवडेल ।

    ReplyDelete