Monday, May 30, 2016

कॉग्रेसमधले फ़िदायिन

दोन वर्षे उलटून गेली तरी कॉग्रेसला आपण कोणत्या कारणाने सत्ता गमावली आणि लोकांनी आपल्याला कशाला झिडकारले, त्याचा बोध होऊ शकलेला नाही. पराभवाची चव चाखल्यावर कोणीही आपले कुठे चुकले, त्याचे आत्मपरिक्षण करत असतो. जुन्या चुका होऊ नयेत याची काळजी घेत असतो. पण कॉग्रेसची समस्या अशी आहे, की त्याचे नेतृत्त्व चुकत नाही, अशी पक्षाची समजूत आहे आणि म्हणूनच चुका दुरूस्त करण्याचा विषयच उदभवत नाही. सहाजिकच निवडणूकात दारूण पराभव ज्यामुळे झाला, त्याची सातत्याने पुनरावृत्ती होत असते. तसे नसते तर ताज्या पराभवातून ही मंडळी काही शिकली असती. आसाम व केरळात सत्ता गमावण्याने आज कॉग्रेस कर्नाटकापुरती शिल्लक उरली आहे. तर आणखी घसरगुंडी व्हायला नको असाच विचार व्हायला हवा आणि मते पक्षापासून दुरावली असतील, तर ती परत यायला हवीत. ती यायची तर जनमानसात आपल्या पक्षाविषयी सदिच्छा असायला हव्यात आणि सदिच्छा म्हणजे बातम्या किंवा प्रसिद्धी नसते. मते किंवा लोकमत म्हणजे लोकांच्या सदिच्छा असतात. जितकी सदिच्छा असलेली माणसे तुमच्या पाठीशी अधिक, तितकी तुमची मते वाढत असतात. म्हणून तर सार्वजनिक जीवनात लोकप्रिय किंवा उजळ प्रतिमा असलेल्या लोकांना गोळा करावे लागत असते. मोठ्या लोकसंख्येपुढे ज्यांची प्रतिमा लोकप्रिय असते, अशांना सोबत घेऊन जावे लागते. सचिन तेंडूलकर किंवा अमिताभ बच्चन ही अशी हाताच्या बोटावर मोजता येणारी व्यक्तीमत्वे असतात, ज्यांच्या मागे लोकांच्या सदिच्छा असतात. त्यांच्याबद्दल लोकात आत्मियता असते. खेळाडू कलावंत यांना म्हणूनच जवळ ठेवायचे असते. कॉग्रेसला त्याचेही भान उरलेले नाही. अन्यथा त्यांनी आज अकारण अमिताभ बच्चन यांच्या विरोधात तोफ़ा कशाला डागल्या असत्या?
मोदी सरकारची दोन वर्षे पुर्ण होत असताना एक मोठा समारंभ दिल्लीत योजलेला आहे. त्यात अनेक नामवंत कलावंत सहभागी होत आहेत. अमिताभ बच्चन अशाच एका कार्यक्रमाचे संयोजन करणार आहेत. ‘बेटी बचाव’ ही मोदी सरकारची खास मोहिम असून ,त्यात अमिताभनी पुढाकार घेतला आहे. तर त्यांच्या विरोधात कॉग्रेसने आग ओकण्याचे काय कारण होते? कॉग्रेसचे मागल्या पंधरा वर्षापासूनच मोदी हे लक्ष्य आहे. त्याबद्दल कोणाची तक्रार नाही. त्याचा भले उपयोग झाला नाही. पण मोदी राजकीय नेता आहेत आणि त्यांच्या विरोधातली मोहिम चालू शकते. पण अमिताभ बच्चन कोणी राजकीय नेता नाही, की प्रतिस्पर्धी नाही. मनोरंजनाच्या क्षेत्रात असूनही अमिताभ यांनी कधी उथळपणे उद्धटपणे आपल्याला पेश केलेले नाही. त्यामुळेच शतकातला महानायक अशी त्यांची ओळख झालेली आहे. परदेशातही त्याला मोठी लोकप्रियता लाभलेली आहे. अशा कलावंतावर कोट्यवधी लोक प्रेम करीत असतात. त्याच्यावर आरोप वा चिखलफ़ेक करताना अतिशय जपून पावले टाकणे गरजेचे आहे. कारण चहात्यांना त्यात गैर वाटले, तर असा मतदार आपल्या पक्षापासून दुरावत असतो. मोदींवर गुजरात दंगलीवरून काहुर माजलेले असताना अमिताभने त्या राज्याच्या पर्यटन प्रचाराला मदत केली होती. तेव्हा अनेकांच्या भुवया अशाच उंचावल्या होत्या. गुजरात भारताचा एक घटक असून तिथल्या पर्यटनाला हातभार लावण्याने मोदींचे राजकारण मान्य केले असा अर्थ होत नाही. तरीही मोदींच्या मदतीला गेल्याचा आक्षेप कॉग्रेसप्रेमींनी घेतला होता. मजेशीर गोष्ट अशी, की तेव्हा अमिताभ गुन्हेगार नव्हता, तर मोदी गुन्हेगार असून त्यांच्या मदतीला जाणे हा गुन्हा होता. आज कॉग्रेसजनांचे मत काय आहे? आज त्यांना मोदी गुन्हेगार वाटत नसून अमिताभ गुन्हेगार असल्याने मोदी सरकारने त्याची मदत घेणे गैर ठरवले जात आहे.
पनामा पेपर्स म्हणून जो गौप्यस्फ़ोट मध्यंतरी करण्यात आला, त्यात परदेशी पैसे लपवून ठेवणार्‍या यादीत अमिताभचा उल्लेख आला होता. त्याची कुठलीही खातरजमा होऊ शकलेली नाही. मात्र कायद्यानुसार त्याची छाननी भारत सरकारही करत आहे. तर तेवढ्यासाठी अमिताभला गुन्हेगार मानून सरकारी कार्यक्रमापासून दूर ठेवायचा सल्ला कॉग्रेसने दिला आहे. मुद्दा इतकाच, की मोदी सरकारने अमिताभपासून अलिप्त रहावे, असे म्हणणार्‍यांना मोदी सरकार पवित्र कधीपासून वाटू लागले? नरेंद्र मोदींना ‘मौतका सौदागर’ अशी उपाधी देणार्‍या सोनियांना आज मोदी चात्रित्र्यसंपन्न वाटतात काय? असतील तर त्यांनी तसे आधी जाहिर करावे आणि मगच अमिताभच्या सहभागावर आक्षेप घ्यावेत. पण असे काहीही होण्याची शक्यता नाही. राजीव गांधी याचे निकटवर्ति मित्र असलेल्या अमिताभवर सोनियांचा दिर्घकाळ राग आहे आणि आपला द्वेष त्यांना राजकारणातही लपवता येत नाही. म्हणूनच आता अमिताभवर पक्षातर्फ़े तोफ़ा डागण्यात आल्या आहेत. त्याचा अर्थातच काहीही उपयोग नाही. कारण सोनियांपेक्षा अमिताभची लोकप्रियता अधिक आहे आणि त्याच्या चारित्र्याविषयी लोकांचे मतही खुप चांगले आहे. निदान सोनिया वा कॉग्रेसकडून आपल्या चारित्र्याचे प्रमाणपत्र घेण्याची नामुष्की अजून तरी अमिताभवर आलेली नाही. पण अशा कृतीतून कॉग्रेस मात्र आपले अधिक नुकसान करून घेत आहे. अमिताभने तर कॉग्रेसच्या असल्या उथळपणाला प्रतिसादही दिलेला नाही. पण चित्रसृष्टी मात्र कॉग्रेसवर कमालीची नाराज झालेली आहे. खरे तर मागल्या आठवड्यात ॠषिकपूर या अभिनेत्याने थेट नेहरू-गांधी खानदानावरच टिकेची झोड उठवली होती. जागोजागी गांधी खानदानाच्या नावाने स्मारके उभी करण्यावर त्याने स्पष्टोक्ती केली होती. या स्थितीत आणखी आगावूपणा कॉग्रेसला परवडणारा नाही.
ॠषीकपुरच्या हल्ल्यानंतर काहूर माजले आणि एका कॉग्रेसी नेत्याने सोलापूरात शौचालयाला ॠषिकपूरचे नाव देण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे बातम्या रंगवल्या जातील. पण अशा कलावंतांना मानणारा वर्ग तुमच्यापासून दुरावत असतो. याच कलावंताना राजकीय पक्ष आपापल्या कार्यक्रमात अगत्याने आणतात, कंपन्या जाहिराती करायला वापरतात. कारण त्यांच्या मागे असलेल्या सदिच्छांचा लाभ आपल्या पदरात पडावा अशी अपेक्षा असते. दक्षिणेत तर अभिनेते कलावंत राजकीय प्रभाव निर्माण करून राहिले आहेत. त्यांना शरण जाणार्‍या कॉग्रेसला, हिंदी भाषिक अमिताभची शक्ती कळत नाही काय? कळते जरूर, पण सोनियांच्या द्वेषमूलक हुकूमतीला कोण आक्षेप घेणार? लालूंसारख्या कोर्टात दोषी ठरलेल्या नेत्यासोबत व्यासपीठ सजवणार्‍या सोनियांना अमिताभवर नुसते आरोप असल्याचे इतके वावडे कशाला हवे? इटाली येथील कोर्टात सोनियांच्या नावाचा उल्लेख भ्रष्टाचारात आलेला आहे. मग विरोधी पक्षाच्या एक प्रमुख नेत्या म्हणून मोदी सरकारने त्यांनाही कार्यक्रकापासून दूर ठेवावे काय? अमिताभच्या सहभागाला आक्षेप घेताना कॉग्रेसच्या नेत्या प्रवक्त्याने आपल्या नेत्यांची चरित्र्ये तपासून बघितली असती तरी खुप झाले असते. पण नुसताच बोलघेवडेपणा कॉग्रेसचा गुणधर्म झालेला असेल, तर यापेक्षा काहीही वेगळे शक्य नाही. अस्ताला चाललेल्या कॉग्रेसी राजकारणाला थोपवण्यापेक्षा, त्याच्या विनाशाला गती देण्याची घाई प्रत्येक कॉग्रेसजनाला झालेली असेल, तर अमिताभ तरी काय करणार? त्याने काही बोलण्याचीही गरज नाही. त्याचा चहाता व त्याला मानणारा वर्ग यातून कॉग्रेसला झिडकारणार, हे वेगळे सांगायला नको. सदिच्छा ज्यांना उमजत नाहीत, त्यांना सार्वजनिक जीवनात फ़ार काळ टिकून रहाता येत नाही. अमिताभवर कॉग्रेसने केलेला हल्ला म्हणूनच आत्मघातकी प्रकार आहे. कॉग्रेस दिवसेदिवस फ़िदायिन म्हणजे आत्मघातकी प्रवृत्तीकडे झुकत चालल्याचा तो सज्जड पुरावा आहे.

2 comments:

  1. भाऊराव,

    आसाम काँग्रेसचे नेते हिमंत विश्वशर्मा यांची कथा आपण ऐकली असेलंच. संघटनेचे प्रश्न मांडण्यासाठी हिमंत यांनी राहुल गांधींची भेट मागितली. कशीबशी मिळाली. वार्तालाप करत असतांना त्यांनी एकेक प्रश्न चर्चेस घेतला. तेव्हा राहुल गांधींचे लक्षच नव्हते. ते आपल्या कुत्र्यास बिस्किटे चारण्यात दंग होते. पुढे तो कुत्रा चक्क टेबलावर चढला आणि हिमंत यांच्या पुढ्यातल्या बशीतली बिस्किटे खाऊ लागला. (संदर्भ : http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/tambada/congress-lost-assam-assembly-election-rahul-gandhi/ )

    यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. ती म्हणजे राहुल गांधी स्वत: काँग्रेसचा प्रचंड द्वेष करतात. म्हणूनच इतक्या हिरीरीने तिला रसातळास नेत आहेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. बरोबर भाऊ उत्तम लेख

    ReplyDelete