Monday, October 31, 2016

बघा जमलं तर!

तीन मित्रांच्या एकाच दिवशी (रविवारी) एकाच घटनेविषयी प्रतिक्रीया फ़ेसबुकवर वाचल्या आणि आईनस्टाईन आठवला.
तो काय म्हणतोय ते आधी समजून घ्या. मग पुढल्या तीन प्रतिक्रीया वाचा, समजून घ्या, जमलं तर!

 "Any intelligent fool can make things bigger, more complex, and more violent. It takes a touch of genius -- and a lot of courage -- to move in the opposite direction."  - Albert Einstein

=============================

 Sarang Darshane
29 October at 20:25 ·
बऱ्याच वर्षांपूर्वी वसंतराव पळशीकर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेत प्रथम भेटले. तेथे परिसंवाद होता. जेवणाच्या सुटीत मी धीर करून विचारले, ‘वाईतल्या शिबिरांना मी आलो तर चालेल का?’
वाईत, प्राज्ञपाठशाळामंडळात होणाऱ्या शिबिरांची तेव्हा फार छान बैठक बसली होती. वाड्यात राहायचे. एका विषयावर तीन तीन दिवस चर्चा आणि मधल्या वेळांमध्ये मस्त गप्पा.. कितीतरी प्रकारच्या, क्षेत्रातल्या आणि वयोगटातील सुजनांशी... ते मुक्त विद्यापीठच होते. वसंतरावांनी माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाले, ‘या.. पण गंभीरपणे घ्यावे लागेल ते. तीन दिवस उपस्थित राहून सहभागी व्हाल ना. आता पुढचे शिबिर डिसेंबरात आहे.. या तुम्ही..
त्यांनी म्हटले तर समज दिली पण तशी ती आवश्यकही असणार. पण तशी समज देतानाही आवाजात गोडवा आणि आर्जवच होते. कठोरपणा काहीच नव्हता..
मी खूपच खूष झालो. तेथे रेगेसर असणार होते. वसंतराव तर संयोजक. मी पहिल्या शिबिराला गेलो, तेव्हा तर देवदत्त दाभोलकरही सहभागी झाले होते. वसंतराव साऱ्या चर्चेचे संयोजन इतके नेटके, नीटस आणि सर्वांना सांभाळून घेत करत. त्यांच्यातले कार्यकर्तेपण त्यांच्यातल्या विचारवंताची नेमकी काळजी घेत असे. त्यामुळे, सर्व शिबिरार्थींना समान वागणूक. बोलण्याची संधी. शंका विचारण्याची मुभा आणि सर्वांचे सर्व बोलणे कमालीच्या गांभीर्याने घेत त्यातून चर्चा पुढे नेण्याची हातोटी...
दरएक शिबिरामागे माझे वसंतरावांवरचे प्रेम वाढत गेले. आधीचा मनातला संकोचही गेला. एका शिबिराच्या वेळी माझी तब्येत काही ठीक नव्हती. मला वाटते, मी काहीच बोललो नाही. तरी, समारोपात माझ्याकडे पाहात वसंतराव म्हणाले, ‘आपण सगळे सहभागी झालो. काहीजण नसतील बोलले. पण त्यांनी इथले सगळे ऐकले आणि टिपले तर आहेच...’ एखाद्याला समजावून घेण्याची केवढी ही परिपक्व भावना होती!
या वाईच्या शिबिरांमध्ये माझ्यासारख्या अल्पमतीलाही खूप काही शिकायला मिळाले, ते वसंतरावांमुळे. नवभारत तर मी वाचत असेच. त्यांची संपादकीये मला आवडत. मनातल्या मनात काही मतभेदही होत. माझ्या आजोबांचे शिक्षण झालेले असल्याने आणि त्यांच्याकडून खूप आठवणी ऐकल्या असल्याने माझे प्राज्ञपाठशाळामंडळाशी आधीच घट्ट नाते जुळले होते. मग तेथे राहून काही काही नवे शिकणे, फार भारी वाटायचे. श्रेष्ठांच्या गप्पा ऐकणे भाग्याचे वाटे.
वसंतराव कोणत्याही विषयावर बोलताना पार मुळापर्यंत जात. एकेक धागा काढून मोकळा करीत. शांतपणे दोनचारसहा बाजू समजावून देत. अनाग्रही पण ठाम मांडणी करत. कोणत्याही विचाराचा परामर्श त्यांना वर्ज्य नसे. एखादा शिबिरार्थी समजा लाईटली काहीतरी बोलत असेल, तरी वसंतराव मात्र गांभीर्य सोडत नसत. ते इतक्या प्रामाणिक निष्ठेने उत्तर देत की, त्यानेही मनातल्या मनात लाजून जावे.
आज सकाळपासून मी वसंतरावांचे जाणे मनात झाकून ठेवले होते.
आता मात्र कमालीची व्याकूळता आली आहे..

=================================

Sunil Tambe
Yesterday at 01:25 ·
Vasant palshikar passed away.
What Ashish Nandy is saying today or in 21st century, Vasant Palshikar had written this sometime in second half of 20th century.
Unfortunately, Palshikar wrote this in Marathi and no Marathi journalist or editor could understood Palshikar's basic premise.
It's indeed sad.
However, we are fortunate that Kishor Bedkihal had edited three collections of Vasant Palshikar's writing while Sameer Shipurkar digitized most of the writings of Vasant Palshikar.

=================================

Hari Narke
Yesterday at 10:43 ·
मोठा विचारवंत!

काही लोक अतिशय भाग्यवंत असतात. बेताचा वकुब असूनही भक्तांच्या आरत्यांच्या जोरावर त्यांचे ढोल वाजत असतात. ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. विचारवंत वगैरे म्हणून ख्यातनामही होतात.
काही मोजके लोक मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून व्रतस्थपणे ज्ञानार्जन/ज्ञाननिर्मिती करीत असतात. त्यांच्यामुळेच समाज श्रीमंत होतो. त्याची उंची वाढते.

भालचंद्र नेमाडे आणि रावसाहेब कसबे यांच्यामधून गेले काही महिने विस्तवही जात नाही. परंतु त्यांचे किमान एका विषयावर एकमत आहे. ते दोघेही दिवंगत वसंत पळशीकरांना थोर विचारवंत मानतात. या दोघांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव असल्याने मी पळशीकरांना मानायचो. मानतो.

खाजगी भेटीत पळशीकरांशी गप्पा मारताना त्यांचा अवाका आणि व्यासंग सदैव जाणवायचा. ते तसे ऋजु आणि सुहृद होते. वैचारिक पुस्तकांचा त्यांनी सहवास केलेला होता. त्यांचे वक्तृत्व मात्र अगदीच वाईट होते.

सातारच्या किशोर बेडकीहाळ यांच्या डा. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात पळशीकर असणारच हा जणू घटनात्मक नियम होता.

अकादमीने समकालीन मराठी साहित्यातले दणकट लेखक रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर एक विशेष चर्चासत्र घेतले होते. सालाबादप्रमाणे पळशीकरच उद्घाटक होते.

पठारे यांना पळशीकर कोणता "ताम्रपट" बहाल करतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते. ते बोलायला उठले आणि त्यांनी पहिलेच वाक्य उच्चारले, " मी पठारेंचे एकही पुस्तक वाचलेले नाही." आणि तरिही ते पुढे सुमारे तासभर बोलले. हे धाडस केवळ थोरच! हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. पठारे माझे अतिशय आवडते लेखक असल्याने मला फारच जोराचा धक्का बसला. त्यामुळे पळशीकर माझ्या मनातून उतरले. पठारेंसारख्या श्रेष्ठ लेखकाबाबतच त्यांचे असे होते असे नाही.
त्यांचे ललित साहित्याचे एकुण वाचन अजिबातच नसावे किंवा अगदीच वरवरचे असावे असे त्यांच्याशी गप्पा मारताना कायम जाणवत असे. मात्र तरिही त्यांची याबाबतची ठाम मते होती आणि त्यांच्या कंपूला ती सरसकट अनुकरणीय किंबहुना वंदनीय वाटत असत.

स्वा. सावरकर यांच्या नावावर पळशीकरांनी कितीतरी काल्पनिक अवतरणे तयार करून सावरकरांना कसे झोडपून काढले होते यावर शेषराव मोरे यांनी सोदाहरण प्रकाशझोत टाकलेला होता. त्याचा प्रतिवाद पळशीकरांनी कधी केल्याचे किमान मला तरी ज्ञात नाही.

ज्याअर्थी पुरोगामी विचारवंत म्हणून पळशीकरांचा फार मोठा दबदबा आणि दरारा होता त्याअर्थी ते मोठे असणारच! मात्र माझ्या मर्यादित कुवतीमुळे मला त्यांचा हा मोठेपणा नीट कळला नसावा.

पळशीकरांना विनम्र आदरांजली.

1 comment: