Monday, October 31, 2016

सण, उत्सव, सोहळे




हिच्या चेहर्‍यावर दिसते, ती असते दिवाळी

(फ़ोटो सौजन्य, प्रशांत अरणके)

पृथ्वीतलावर माणूस हाच एक सजीव असा आहे, जो निसर्गालाही आपले नियम लावायला सज्ज असतो. म्हणूनच माणूस निसर्गाचे नियम शोधून त्याला आव्हानही देण्य़ाच्या सतत प्रयत्नात असतो. बाकीच्या सजीवांप्रमाणे मानवाने आपले निसर्गदत्त कर्तव्य मानले नाही. त्याने आपल्या अटीवर जगण्याची कायम धावपळ केलेली आहे. त्यातूनच मग माणसाच्या नव्या गरजा निर्माण झाल्या आणि त्याला सतत कामात गुंतून पडावे लागले. अशा कामातून थोडी विश्रांती मिळवण्यासाठी मग माणसाला सण उत्सव सोहळे अशा गोष्टी विरंगुळ्यासाठी शोधाव्या लागल्या. दिवाळी किंवा अन्य उत्सव त्यातूनच आलेले आहेत. शेकडो वर्षाच्या परंपरा लाभलेल्या अशा उत्सवांच्या दंतकथा तयार झाल्या. पण त्यातला एकमेव मूळ हेतू विरंगुळा असाच असतो. प्रत्येक माणूस आपापल्या कुवतीनुसार व शक्तीनुसार हे सोहळे साजरे करतो. कितीही अडचणीत वा कामात गुंतलेला माणूसही अशा सोहळ्यांपासून दूर राहू शकत नाही. यातली गंमत अशी असते, की दिवस आधीपासून ठरलेला असतो आणि तो अधिकाधिक आनंदी बनवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयास करीत असतो. आनंद ही अशी गोष्ट असते, की माणसाला एकट्याने तिची चव चाखता येत नाही. त्यातली मजाच निघून जाते. म्हणून मग अनेकांनी एकत्र येऊन आनंद वाटून घेण्याकडे कल असतो. दिवाळी असाच एक सण आहे. तो दिवस उजाडतो आणि आपण तो दिवस आनंदी रहाण्याचा प्रयास करतो. जवळच्या लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. खरे सांगायचे तर आनंदी होण्यापेक्षाही काहीकाळ नेहमीच्या विवंचना व व्यग्रतेतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा तो प्रयास असतो. त्यामुळेच सगळा आटापिटा नेहमीच्या अनुभवापासून पळण्याचा असतो. रोजचे जगणे आणि सणासुदीचे जगणे यात जास्तीत जास्त फ़रक पाडण्याला सण म्हणतात.

फ़राळ, फ़टाके, नवी वस्त्रेप्रावरणे ह्या गोष्टी तशा दुय्यम असतात. त्यापेक्षा त्यांचा उपभोग घेणारा महत्वाचा असतो. म्हणूनच मग असे प्रसंग स्मरणिय व्हावेत, अशीही धडपड होत असते. दिवाळीसाठी चार पैसे बाजूला करून चांगली खरेदी होत असते. दिर्घकाळ वापरल्या जाणार्‍या वस्तू वा सुविधांवर याचवेळी पैसा उडवला जातो. सहाजिकच तशी लालूच तुम्हाला दाखवून बाजार सजत असतो. या दिवाळीला काय वेगळे कराल? ते तुम्हाला सुचवून आपापला माल लोकांच्या गळी मारणारे बाजार त्यामुळेच उभे राहिले. खरे तर अशा वस्तु वा माल ही तुमची गरज नसतेही. पण ती वस्तु वा सुविधा म्हणजेच तुमचा आनंद; असा गदारोळ केला जातो आणि नकळत सामान्य माणूसही त्यात आनंद शोधू लागतो. त्यातून एक मोठी बाजारपेठ तयार होत असते. मात्र अशा गडबडीत आपण आपला व्यक्तीगत आनंद कुठे हरवून बसलो, त्याचेही अनेकांना स्मरण उरत नाही. यंदाच्या दिवाळीत अमूक खरेदी करायची वा असा खर्च करायचा, हे स्वप्न बघण्यात जी मजा असते. ती अशा बाजारपेठेत हरवून जाते. खरेदी वा कुठल्याही गोष्टीविषयी असलेले आकर्षण, ती आपलीशी करण्यात दडलेले असते. जोपर्यंत ते आपल्या हाती वा आवाक्यात आलेले नसते, तोपर्यंतच त्या गोष्टीची महत्ता असते. आपल्या कल्पनेत तिचा उपयोग वा मालकीविषयीची जे चित्र रंगलेले असते, ते साध्य झाल्यावर त्यातली मजा कुठल्या कुठे लुप्त होऊन जाते. अनेक वर्षे कोणी नवे घर घेण्याचे वा आपल्या मालकीची गाडी घेण्याचे स्वप्न रंगवत असतो. पण जेव्हा हे पुर्ण होते, तिथे तेच स्वप्न संपलेले असते. सहाजिकच ते मिळवण्याविषयीचे आकर्षण संपते आणि त्यातला आनंद अल्पावधीच गायब होऊन जातो. मग ती वस्तु त्या मुहूर्त वा दिवाळीची भेट होऊन जाते. तिच्याकडे बघायचे आणि त्या सणाच्या स्मृतींमध्ये रमायचे, इतकेच त्याचे महत्व उरते.

आनंद ही बाब व्यक्तीगत आणि सामुहिक असते. पण ती कुठल्या वस्तु वा सुविधेमध्ये नसते. तर परस्परांना आनंदी बघण्यात असते. एखादी सुग्रण भरपूर मेहनत घेऊन चांगले पदार्थ बनवते आणि जेव्हा त्याची चव चाखणारा समाधानाचा ढेकर देतो, त्यातला तिचा आनंद अवर्णनीय असतो. एका क्षणात आपले कष्ट विसरून तीच गृहीणी त्यातले कौशल्य कथन करण्यात रमून जाते. इतरांच्या समाधानात मिळणारा तो आनंद कुठल्या बाजारात वा दुकानात विकत मिळू शकत नाही. इतके कष्ट उपसूनही त्या गृहीणीला थकवा येत नाही. त्याला सण म्हणतात. रोजच्या कमातून वेळ काढून फ़राळाचे चार पदार्थ बनवणार्‍या त्या थकलेल्या गृहीणीच्या चेहर्‍यावरचे समाधान हा सण असतो. त्याच्या जागी कुठल्या महागड्या दुकानातून आणलेले खाद्यपदार्थ वा मिठाईचे खोके आनंद देऊ शकत नाहीत. त्याची किंमत पैशात असते. आनंदाचे तसे मूल्यमापन होऊ शकत नाही. आजकाल शेकड्यांनी भेटवस्तु, मूल्यवान वस्तु खरेदी करून दिवाळी निमीत्त वाटल्या जातात. त्या देण्याघेण्यातले समाधान कितपत खरे असते? एकाला आपल्या औदार्याचे समाधान मिळते, तर दुसर्‍याला फ़ुकटात काही पदरात पडल्याचा आनंद मिळत असेल. पण त्या दोघांना एकाच पद्धतीचा आनंद मिळतो असे नाही. जो आनंद देण्याबरोबर घेण्यातही दडलेला असतो, त्याला सणासुदी म्हणतात. दुर्दैवाने आजकाल लोकांना त्याचा पुरता विसर पडला आहे. म्हणूनच दिवाळी वा अन्य कुठलाही सण-उत्सव बाजारी होऊन गेला आहे. त्यात आपल्याला आनंदाचे क्षण शोधायचीही सवड उरलेली नाही. आपल्यासाठी ते काम बाजारातील हुशार व्यापारी करीत असतात आणि आपण त्यांच्याकडून आनंद खरेदी केल्याच्या भ्रमात खुश असतो. मात्र कशासाठी व कुठला आनंद प्राप्त झाला, त्याचा खुलासाही आपण करू शकणार नाही, अशी केविलवाणी स्थिती झाली आहे.

त्यापेक्षा अतिशय गरीब वा सामान्य घरातली दिवाळी अधिक आनंदमय असते. ज्यांचा संसारच पाठीवर असतो, अशा भटक्या कुटुंबांची दिवाळी किंवा अन्य सण अधिक सुखद असतात. त्यांना घरच नसते तर त्याची सजावट करण्याचा प्रश्नच येत नाही. सुगंधी उटणे वा मोती साबणाने अंधोळी करण्यासाठी पाण्याचा नळ हजर नसतो. अशीही हजारो कुटुंबे दिवाळी साजरी करताना बघयला मिळतात. कधी तिथे थोडे डोकावून बघावे. त्यांच्या ताटात गोडधोड पदार्थ नसतील वा अंगावर नवनवे सुंदर कपडे नसतील. पण आज दिवाळी आहे, इतकाच त्यांचा आनंद असतो. जुनेच धुवून स्वच्छ केलेले कपडे परिधान केलेल्या अशा लोकांच्या मुखड्यावरचा आनंद खरी दिवाळी दाखवतो. कारण हाताशी वा खिशात काहीही नसताना अशी माणसे आनंदी रहाण्याचा प्रयास करतात. तेव्हा ते रोजची दुखणी वा वेदना यातना विसरून तो दिवस जगू बघत असतात. त्याला खरा विरंगुळा म्हणतात. अपेक्षाभंग, त्रुटी, अपुरेपणा वा विवंचना यापासून काही काळाची मुक्तता म्हणजे नवी उर्जा जमवणे असते. आनंद हा नव्या उर्जेचा जनक असतो. त्यासाठीच उत्सवाचे निमीत्त असते. त्यातून नव्या समस्या प्रसंगांना सामोरे जाण्याची आकांक्षा जागवली जावी, इतकीच अपेक्षा असते. रोजच्या जीवनात लागलेली धाप कमी होऊन ताजेपणाने जगण्य़ाला सामोरे जाण्यासाठी जमवलेली पुंजी म्हणजे आनंद असतो. दिवाळीसारखा उत्सव नवी उर्जा जमवण्यासाठी असतो. समस्या, अडचणी वा विवंचना प्रत्येकाच्या वेगळ्या असतील, तर प्रत्येकाचा विरंगुळाही वेगळाच असणार ना? त्याचे सवंगडी व सहकारी सुद्धा वेगवेगळे असणार आणि त्यांच्या एकत्रित आनंदाचे समिकरणही वेगळेच असणार. ते तयार मालाच्या बाजारात मिळत नाही. ते आपण, आपले व आपल्याच सग्यासोबत्यांच्या सहमतीने तयार करू शकतो. आपल्या घरातला मनातला अंधार बाजारातले दिवे संपवू शकत नाहीत.

बघा जमलं तर!

तीन मित्रांच्या एकाच दिवशी (रविवारी) एकाच घटनेविषयी प्रतिक्रीया फ़ेसबुकवर वाचल्या आणि आईनस्टाईन आठवला.
तो काय म्हणतोय ते आधी समजून घ्या. मग पुढल्या तीन प्रतिक्रीया वाचा, समजून घ्या, जमलं तर!

 "Any intelligent fool can make things bigger, more complex, and more violent. It takes a touch of genius -- and a lot of courage -- to move in the opposite direction."  - Albert Einstein

=============================

 Sarang Darshane
29 October at 20:25 ·
बऱ्याच वर्षांपूर्वी वसंतराव पळशीकर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेत प्रथम भेटले. तेथे परिसंवाद होता. जेवणाच्या सुटीत मी धीर करून विचारले, ‘वाईतल्या शिबिरांना मी आलो तर चालेल का?’
वाईत, प्राज्ञपाठशाळामंडळात होणाऱ्या शिबिरांची तेव्हा फार छान बैठक बसली होती. वाड्यात राहायचे. एका विषयावर तीन तीन दिवस चर्चा आणि मधल्या वेळांमध्ये मस्त गप्पा.. कितीतरी प्रकारच्या, क्षेत्रातल्या आणि वयोगटातील सुजनांशी... ते मुक्त विद्यापीठच होते. वसंतरावांनी माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाले, ‘या.. पण गंभीरपणे घ्यावे लागेल ते. तीन दिवस उपस्थित राहून सहभागी व्हाल ना. आता पुढचे शिबिर डिसेंबरात आहे.. या तुम्ही..
त्यांनी म्हटले तर समज दिली पण तशी ती आवश्यकही असणार. पण तशी समज देतानाही आवाजात गोडवा आणि आर्जवच होते. कठोरपणा काहीच नव्हता..
मी खूपच खूष झालो. तेथे रेगेसर असणार होते. वसंतराव तर संयोजक. मी पहिल्या शिबिराला गेलो, तेव्हा तर देवदत्त दाभोलकरही सहभागी झाले होते. वसंतराव साऱ्या चर्चेचे संयोजन इतके नेटके, नीटस आणि सर्वांना सांभाळून घेत करत. त्यांच्यातले कार्यकर्तेपण त्यांच्यातल्या विचारवंताची नेमकी काळजी घेत असे. त्यामुळे, सर्व शिबिरार्थींना समान वागणूक. बोलण्याची संधी. शंका विचारण्याची मुभा आणि सर्वांचे सर्व बोलणे कमालीच्या गांभीर्याने घेत त्यातून चर्चा पुढे नेण्याची हातोटी...
दरएक शिबिरामागे माझे वसंतरावांवरचे प्रेम वाढत गेले. आधीचा मनातला संकोचही गेला. एका शिबिराच्या वेळी माझी तब्येत काही ठीक नव्हती. मला वाटते, मी काहीच बोललो नाही. तरी, समारोपात माझ्याकडे पाहात वसंतराव म्हणाले, ‘आपण सगळे सहभागी झालो. काहीजण नसतील बोलले. पण त्यांनी इथले सगळे ऐकले आणि टिपले तर आहेच...’ एखाद्याला समजावून घेण्याची केवढी ही परिपक्व भावना होती!
या वाईच्या शिबिरांमध्ये माझ्यासारख्या अल्पमतीलाही खूप काही शिकायला मिळाले, ते वसंतरावांमुळे. नवभारत तर मी वाचत असेच. त्यांची संपादकीये मला आवडत. मनातल्या मनात काही मतभेदही होत. माझ्या आजोबांचे शिक्षण झालेले असल्याने आणि त्यांच्याकडून खूप आठवणी ऐकल्या असल्याने माझे प्राज्ञपाठशाळामंडळाशी आधीच घट्ट नाते जुळले होते. मग तेथे राहून काही काही नवे शिकणे, फार भारी वाटायचे. श्रेष्ठांच्या गप्पा ऐकणे भाग्याचे वाटे.
वसंतराव कोणत्याही विषयावर बोलताना पार मुळापर्यंत जात. एकेक धागा काढून मोकळा करीत. शांतपणे दोनचारसहा बाजू समजावून देत. अनाग्रही पण ठाम मांडणी करत. कोणत्याही विचाराचा परामर्श त्यांना वर्ज्य नसे. एखादा शिबिरार्थी समजा लाईटली काहीतरी बोलत असेल, तरी वसंतराव मात्र गांभीर्य सोडत नसत. ते इतक्या प्रामाणिक निष्ठेने उत्तर देत की, त्यानेही मनातल्या मनात लाजून जावे.
आज सकाळपासून मी वसंतरावांचे जाणे मनात झाकून ठेवले होते.
आता मात्र कमालीची व्याकूळता आली आहे..

=================================

Sunil Tambe
Yesterday at 01:25 ·
Vasant palshikar passed away.
What Ashish Nandy is saying today or in 21st century, Vasant Palshikar had written this sometime in second half of 20th century.
Unfortunately, Palshikar wrote this in Marathi and no Marathi journalist or editor could understood Palshikar's basic premise.
It's indeed sad.
However, we are fortunate that Kishor Bedkihal had edited three collections of Vasant Palshikar's writing while Sameer Shipurkar digitized most of the writings of Vasant Palshikar.

=================================

Hari Narke
Yesterday at 10:43 ·
मोठा विचारवंत!

काही लोक अतिशय भाग्यवंत असतात. बेताचा वकुब असूनही भक्तांच्या आरत्यांच्या जोरावर त्यांचे ढोल वाजत असतात. ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. विचारवंत वगैरे म्हणून ख्यातनामही होतात.
काही मोजके लोक मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून व्रतस्थपणे ज्ञानार्जन/ज्ञाननिर्मिती करीत असतात. त्यांच्यामुळेच समाज श्रीमंत होतो. त्याची उंची वाढते.

भालचंद्र नेमाडे आणि रावसाहेब कसबे यांच्यामधून गेले काही महिने विस्तवही जात नाही. परंतु त्यांचे किमान एका विषयावर एकमत आहे. ते दोघेही दिवंगत वसंत पळशीकरांना थोर विचारवंत मानतात. या दोघांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव असल्याने मी पळशीकरांना मानायचो. मानतो.

खाजगी भेटीत पळशीकरांशी गप्पा मारताना त्यांचा अवाका आणि व्यासंग सदैव जाणवायचा. ते तसे ऋजु आणि सुहृद होते. वैचारिक पुस्तकांचा त्यांनी सहवास केलेला होता. त्यांचे वक्तृत्व मात्र अगदीच वाईट होते.

सातारच्या किशोर बेडकीहाळ यांच्या डा. बाबासाहेब आंबेडकर अकादमीच्या प्रत्येक कार्यक्रमात पळशीकर असणारच हा जणू घटनात्मक नियम होता.

अकादमीने समकालीन मराठी साहित्यातले दणकट लेखक रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर एक विशेष चर्चासत्र घेतले होते. सालाबादप्रमाणे पळशीकरच उद्घाटक होते.

पठारे यांना पळशीकर कोणता "ताम्रपट" बहाल करतात याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते. ते बोलायला उठले आणि त्यांनी पहिलेच वाक्य उच्चारले, " मी पठारेंचे एकही पुस्तक वाचलेले नाही." आणि तरिही ते पुढे सुमारे तासभर बोलले. हे धाडस केवळ थोरच! हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. पठारे माझे अतिशय आवडते लेखक असल्याने मला फारच जोराचा धक्का बसला. त्यामुळे पळशीकर माझ्या मनातून उतरले. पठारेंसारख्या श्रेष्ठ लेखकाबाबतच त्यांचे असे होते असे नाही.
त्यांचे ललित साहित्याचे एकुण वाचन अजिबातच नसावे किंवा अगदीच वरवरचे असावे असे त्यांच्याशी गप्पा मारताना कायम जाणवत असे. मात्र तरिही त्यांची याबाबतची ठाम मते होती आणि त्यांच्या कंपूला ती सरसकट अनुकरणीय किंबहुना वंदनीय वाटत असत.

स्वा. सावरकर यांच्या नावावर पळशीकरांनी कितीतरी काल्पनिक अवतरणे तयार करून सावरकरांना कसे झोडपून काढले होते यावर शेषराव मोरे यांनी सोदाहरण प्रकाशझोत टाकलेला होता. त्याचा प्रतिवाद पळशीकरांनी कधी केल्याचे किमान मला तरी ज्ञात नाही.

ज्याअर्थी पुरोगामी विचारवंत म्हणून पळशीकरांचा फार मोठा दबदबा आणि दरारा होता त्याअर्थी ते मोठे असणारच! मात्र माझ्या मर्यादित कुवतीमुळे मला त्यांचा हा मोठेपणा नीट कळला नसावा.

पळशीकरांना विनम्र आदरांजली.

मुस्लिमांसमोरचा यक्षप्रश्न

muslims in UP के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशात सध्या जे समाजवादी वादळ घोंगावते आहे, त्याने सर्वात मोठा गोंधळ मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचा कोणीही विचार करताना दिसत नाही. समाजवादी पक्ष दुभंगणार काय आणि तसे झाले तर कोणाचा लाभ होईल, इतक्याच पातळीवर उहापोह चालू आहे. पण विविध समाजघटकांची विभागणी कशी होऊ शकते त्याचा विचार करण्याची तसदी कोणी घेतलेली नाही. मुस्लिम समाज नेहमी चतुराईने मतदान करत आला आणि त्यामुळेच त्याने एका पक्षाला संजिवनी दिली तर दुसर्‍या पक्षाला धाराशायी करून दाखवलेले आहे. म्हणूनच गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी मुस्लिम मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारल्याचे चित्रण सतत दाखवून, मोदींना घाबरवण्याचा खेळ अनेक पुरोगाम्यांनी व माध्यमांनी केलेला होता. पण मोदी त्या निवडणूकीत अभ्यास करूनच उतरले होते आणि त्यामध्ये मुस्लिम मतांच्या धुर्तपणाचाही बारकाईने विचार झालेला होता. किंबहूना त्यामुळेच मुस्लिम मतांचा प्रभाव त्या मतदानात अजिबात पडू शकला नाही. मात्र त्याचा कोणी गंभीरपणे अभ्यासही केलेला नाही. उत्तरप्रदेशात ८० पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्याची चर्चा खुप झाली. पण ८० पैकी एकही जागी कुठल्याही पक्षाचा एकही मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकला नाही. याचा विचार करण्याची बुद्धी कुणाही पुरोगामी विश्लेषकाला झाली नाही. उत्तरप्रदेशच्या लोकसभा मतदानात २० टक्केहून अधिक असलेल्या मुस्लिम मतदाराला मोदींनी कसे निष्प्रभ करून टाकले; त्याचा अभ्यासही ज्यांना करावासा वाटला नाही, तेच तथाकथित जाणकार मुस्लिम मतांशिवाय सत्ता मिळू शकत नाही, असेही दावे तेव्हा करत होते. पण मोदींना सत्ता मिळाली, बहुमत मिळाले आणि मुस्लिम मतांची महत्ता त्याच मतदानातून संपून गेली. आताही लौकरच होणार्‍या विधानसभा मतदानात मुस्लिमांचे स्थान काय, हा विषय कोणालाही सुचलेला नाही.

गेल्या म्हणजे २०१२ च्या वा त्याच्याही आधीच्या विधानसभा मतदानात उत्तरप्रदेशच्या मुस्लिमांची भूमिका निर्णायक होती. २००७ सालात मुस्लिम मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पक्षाकडे झुकला आणि त्यात ब्राह्मणांच्या थोड्या मतांची भर पडताच. मायावती स्वबळावर बहुमताचा पल्ला गाठून सत्तेपर्यंत जाऊन पोहोचल्या. मात्र तोच मुस्लिम पाच वर्षांनी मुलायमकडे मोठ्या प्रमाणात झुकला आणि सत्तेचे पारडे फ़िरले होते. याला मुस्लिम मतदाराचा धुर्तपणा म्हणता येईल. त्या धुर्तपणाचा थोडा तपशील समजून घेण्यासारखा आहे. जिथे जो पक्ष शिरजोर आहे आणि भाजपाला पाडू शकेल असा उमेदवार समोर आहे, तिथे मुस्लिम मतदाराने शक्ती वापरली. मग भाजपाला झोपवणे शक्य झाले. त्यामुळे २०१२ साली उत्तरप्रदेश विधानसभेत अपुर्व संख्येने मुस्लिम आमदार निवडून आले. ४०३ पैकी ६८ आमदार मुस्लिम होते. याचा अर्थ असा, की विधानसभेतील १७ टक्के आमदार मुस्लिम होते. इतकी मुस्लिम आमदारांची संख्या त्या विधानसभेत कधीच नव्हती. जिथे मुस्लिम दाटवस्ती आहे, तिथेच मुस्लिम आमदार निवडून येत. पण डावपेचात्मक मतदानामुळे सर्व पक्षाचे मिळून ६८ मुस्लिम आमदार होऊ शकले. त्याचा सामान्य बिगरमुस्लिम मतदारालाही धक्का बसला होता. भाजपाने अडीच वर्षांनी आलेल्या लोकसभा मतदानात त्याच भावनेला खतपाणी घातल्याने लोकसभेत चमत्कार घडला आणि उत्तरप्रदेशातून एकही मुस्लिम खासदार लोकसभेपर्यंत मजल मारू शकला नाही. तेव्हा त्याच मुस्लिम मतदाराला किती वैषम्य वाटले असेल? विधानसभेत त्याची भरपाई करण्याचा विचारही नक्की झालेला असेल. त्यामुळे मुलायमच्या पक्षाकडे अशा मुस्लिमांचा ओढा असेल, तर नवल नव्हते. कारण मुलायमचा समाजवादी हा आजकालचा भारतातील एकमेव मुस्लिम पक्ष उरला आहे. पण त्याच्यातच फ़ाटाफ़ुट सुरू झाली आहे.

समाजवादी पक्षातली फ़ाटाफ़ुट हा म्हणूनच केवळ त्या पक्षातल्या विविध नेत्यांचा वा अन्य मागास समाजघटकांचा विषय नाही. तो सर्वात मुस्लिमांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. पण सध्या जी चर्चा व उहापोह चालू आहे, त्यात कोणाचेही लक्ष मुस्लिम मतदाराच्या भावनांकडे अजिबात गेलेले नाही. आक्रमकपणे मुस्लिमांचे समर्थन करणारा अशी समाजवादी पक्षाची ओळख आहे. त्यातच दोन गट पडले आणि मतांची विभागणी होत असेल, तर अशा डावपेचात्मक मतदान करणार्‍या मुस्लिम लोकांनी कोणाला झुकते माप द्यायचे? एका पक्षाची निवड हा मुस्लिमांचा डावपेच नसतो. तर भाजपला पाडू शकेल असा कुठल्याही पुरोगामी सेक्युलर पक्षाचा उमेदवार, असाच मुस्लिम मतांचा कल असतो. तो मुलायमकडे असावा की बंड पुकारून उभा असलेल्या अखिलेशकडे असावा? त्यांना झुगारून मायावतींना कौल द्यावा, की कॉग्रेसकडे पुन्हा आशेने बघावे? आज उत्तरप्रदेशच्या मुस्लिम मतदारासमोर हा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. कारण तशाही मायावती मुलायमपेक्षा आघाडीवर असल्याचा निष्कर्ष ताज्या मतचाचणीतून पुढे आला आहे. पण भाजपाही पहिल्या क्रमांकावर दिसतो आहे. मुलायम तिसर्‍या क्रमांकावर आधीच फ़ेकला गेलेला आहे. तसे झाले तर मुलायमच्या घराणेशाहीला कंटाळलेला मोठा मागाससमाज भाजपाकडे झुकण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मुस्लिम मतदाराला कुठेही झुकते माप देऊन लाभ होण्याची शक्यता उरणार नाही. मुलायमच्या समाजवादी पक्षात घोंगावणारे फ़ाटाफ़ुटीचे वादळ, म्हणूनच त्या राज्यातील मुस्लिम मतदारांसाठी कयामत घेऊन अवतरले आहे. कॉग्रेस तर नामशेष झाली आहे आणि मुलायमच्या पक्षाला दुभंग भेडसावतो आहे. अशावेळी आज विधानसभेत आहेत, तितके तरी मुस्लिम प्रतिनिधीत्व शिल्लक उरणार काय, हा म्हणूनच मुस्लिमांसाठी गंभीर विषय झाला आहे.

मुद्दा नुसता भाजपाला पराभूत करण्याचा नाही, तर मुस्लिमांचे विधानसभेतील प्रतिनिधीत्व टिकवण्याचाही आहे. आधीच लोकसभेत उत्तरप्रदेशी मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व शून्यावर आलेले आहे. भाजपात मुस्लिमांचीच संख्या कमी असल्याने, तिथे मुस्लिमांना उमेदवारीच कमी मिळणार. त्यामुळे त्यातून किती मुस्लिम आमदार निवडून येऊ शकतील, त्याची काही हमी नाही. जिथे मुस्लिम दाटवस्ती आहे, तिथेच भाजपा मुस्लिम उमेदवार उभे करील. मुस्लिम दाटवस्ती नसूनही मुस्लिमांना उमेदवारी देणारे पक्ष मायावती मुलायमचे आहेत. त्यापैकी एक दिवाळखोरीत चालला आहे तर दुसरा बसपा किती मुस्लिमांना उमेदवारी देतील, याची हमी नाही. तिकिटे मिळालेल्या सर्वांना निवडून येणेही शक्य नाही. आजवर तीन प्रमुख पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवार्‍या मिळत होत्या आणि त्यांना डावपेचात्मक मतदान करून अधिक प्रतिनिधीत्व मुस्लिमांना मिळवता येत होते. पण आता समाजवादी फ़ाटाफ़ुटीमुळे उमेदवार विजयी होऊ शकतील असा मायावतींचा बसपा, हा एकमेव पक्षच शिल्लक उरला आहे. पण त्यातून मोठ्या संख्येने मुस्लिम आमदार विधानसभेत पोहोचण्याची शक्यता नाही. त्याकरिता मुस्लिमांना प्रतिनिधीत्वासाठी विजयी होऊ शकणार्‍या पक्षाकडे म्हणजेच भाजपाकडे धाव घ्यावी लागणार आहे. दाटवस्ती असलेल्या मुस्लिम मतदारसंघात कुठल्याही पक्षाचा मुस्लिम निवडून येऊ शकेल. पण निम्मेहून कमी मुस्लिम मतदार असलेल्या जागी भाजपाचा बिगर मुस्लिमही सहज निवडून येईल. मग ती हक्काची जागाही मुस्लिमांनी गमावण्याचा धोका आहे. थोडक्यात आजवरचा डावपेचात्मक मतदानाचा पर्याय मुस्लिमांपाशी उरलेला नाही. त्यांना भाजपाच्या मुख्यप्रवाही राजकारणात यावे लागेल आणि तिथे धार्मिक अट्टाहास चालवून घेतला जाण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणूनच समाजवादी पक्षातल्या फ़ाटाफ़ुटीचा हा एक विधायक परिणाम राजकारणाला नवी दिशा देऊ शकेल.


Saturday, October 29, 2016

सुरक्षेच्या कडेलोटावर

blasts RDX के लिए चित्र परिणाम

सगळीकडे भारत पाक सीमेवरील गोळीबार हिंसेच्या बातम्या येत असताना पालघर जवळील एका खेड्यात मिळालेला १५ किलो आरडीएसचा छुपा साठा, ही मोठी गंभीर बातमी आहे. कारण हा साठा तिथे कधी आला व कसा लपवला गेला, त्याचा थांगपथा पोलिसांना लागला नव्हता. अन्य कुठल्या गुन्ह्यातील आरोपींची चौकशी चालू असताना त्याची खबर लागली आणि तपास केला असता ओसाड जागी खड्डे खोदून लपवलेला हा साठा हाती लागला आहे. याचा एक अर्थ असा, की त्या गुन्हेगारांनी पोलिसांना अन्य चौकशीच माहिती दिली म्हणून हे प्रकरण उघडकीस आले. अन्यथा तो साठा तिथे तसाच पडून राहिला असता आणि सवडीने कधीतरी वापरला गेला असता. असे आणखी किती साठे लपवलेले असू शकतील आणि आपल्याला त्याची कल्पना नसेल, ही बाब अंगावर शहारे आणणारी आहे. पालघर जवळच्या ओसाड जागी हा साठा पोहोचला कसा, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांच्या खबर्‍यांचे जाळे तल्लख असते तर हे काम सोपे झाले नसते. पण ते होऊ शकले, म्हणजेच पोलिस यंत्रणा अपेक्षेइतक्या जागरूक राहिलेल्या नाहीत. किंवा त्यांना टेहळणी करून गुन्हे हाणून पाडण्याचे मुख्य काम करायला सवड मिळत नसावी. पोलिसांच्या अशा ढिसाळपणाचा लाभ गुन्हेगार नेहमीच उठवत असतात आणि दहशतवाद हा तर अतिशय चतुराईने होणारा संघटित गुन्हा असतो. यासाठी सरकारवर ठपका ठेवणे ही आता फ़ॅशन झाली आहे. पण सामान्य जनता वा जागरुक नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे किंवा नाही, याचाही विचार व्हायला हवा. कारण पोलिस प्रत्येक ठिकाणी पहारे देत उभे राहू शकत नाहीत. सामान्य माणसाने जागरुक रहायचे ठरवले, तर पोलिस यंत्रणा समाजाला अधिक उपयुक्त रितीने वापरता येऊ शकते. पण आजकाल तसे होत नाही. कारण एकूण समाजच निष्काळजी झालेला आहे.

ज्या परिसरात हे आरडीएक्स लपवलेले होते, तो ओसाड असला तरी त्या परिसरात अनेक बेकायदा गोदामे उभारलेली आहेत. म्हणजेच तिथे वाहनांची येजा चालू असते. त्यापैकी कोणालाही याप्रकारच्या हालचाली दिसल्याच नसतील, असे ठामपणे म्हणता येणार नाही. काही हालचाली शंकास्पद असतात आणि काही लोकांचे वागणे संशयास्पद असते. त्याविषयी सामान्य माणूस थोडा चिकित्सक झाला, तरी सुरक्षा अधिक चोख राखली जाऊ शकते. जिथे ही स्फ़ोटके मिळाली, तिथे अनेक जागी खड्डे मारून ती गाडून ठेवलेली होती. हे खड्डे मारण्याचे काम सहजासहजी वा झटपट उरकणारे नाही. त्यासाठी अंगमेहनत आवश्यक असते. म्हणजेच तिथे अशी स्फ़ोटके आणुन लपवण्याच्या पुर्वीच असे खड्डे मारून घेतलेले असणे शक्य आहे. ओसाड जागी असे काम कोणी करीत असेल, तर शंकास्पद नक्कीच असते. पालघर मुंबईच्या नजिकचा भाग असल्याने इथे जमिनीच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. सहाजिकच इथे कुठल्याही जमिनीच्या तुकड्यावर कोणी काही करीत असेल, तर नजरेत भरणारी बाब आहे. मग असे खड्डे मारण्याचे काम लपून कसे राहिले? पोलिसांच्या खबर्‍यांचे नेटवर्क सज्ज असेल, तर अशा बातम्या लपून रहात नाहीत. आणखी एक गोष्ट अशी की पैशासाठी वाटेल ते करणारा एक वर्ग, वाढत्या शहरांच्या भणंग वस्त्यांमधून निर्माण झाला आहे. झटपट मोठी कमाई करण्यासाठी अशी हजारो माणसे कुठल्याही मोठ्या शहरात रांग लावून उभी असतात. त्यांचा अशा बाबतीत सहज वापर करता येतो. त्यांना कोण कशासाठी पैसे देतो, याच्याही कर्तव्य नसते, की त्याच्या परिणामांशी घेणेदेणे नसते. त्याचाच फ़ायदा देशाचे शत्रू उठवू शकत असतात. शहरातील चमचमत्या झगमगणार्‍या दुनियेने लोकांना अशी भुरळ घातली आहे, की पैसा जादूची कांडी बनला आहे. त्याचा हा परिणाम आहे.

यापुर्वी मुंबईत दोनदा मोठ्या बॉम्बस्फ़ोट मालिका झालेल्या आहेत. कसाब टोळीने येऊन शेकड्यांनी नागरिकांना किडामुंगीप्रमाणे ठार मारले आहे. त्यानंतर तरी मुंबई वा तत्सम शहरातील लोकांनी जागरुकता दाखवण्याची गरज आहे. ही जागरुकता फ़क्त गुन्हेगारी व दहशतवादाच्या पुरती असायचे कारण नाही. अशा महानगरातील तुटपूंज्या सुविधा व यंत्रणांचा वापर पुरेपुर करता यावा, याचीही काळजी तिथेच पोटपाणी शोधाणार्‍यांनी घ्यायला हवी. दिडकोटी लोकसंख्येच्या घरात गेलेले मुंबई शहर किंवा दोन सव्वा दोन कोटी लोकसंख्या झालेला मुंबईचा परिसर; आता कडेलोटावर उभा आहे. तो एक सुप्त ज्वालामुखीच आहे. त्याचा भडका कधी उडेल त्याची कोणी हमी देऊ शकत नाही. म्हणूनच मुंबईकर म्हणवणार्‍या प्रत्येकाने हे शहर सुरक्षित होण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याप्रमाणे वागण्याची जगण्याची गरज आहे. त्यात मग तिथल्या सुविधा व यंत्रणांचा किंचीतही गैरवापर होऊ नये, ही जबाबदारी सर्वात मोठी आहे. त्यात मोर्चे निदर्शने वा अन्य कुठल्या गर्दीचा विषय आला; मग पोलिसांना बाकी सर्व गोष्टी सोडून अधिक लक्ष घालावे लागते. जेव्हा आपल्या नेहमीच्या कामातून पोलिस अशा अन्य कामात गुंतून पडतात, तेव्हाच गुन्हेगारांना व समाजकंटकांना आपले हातपाय हलवण्याचे मोकाट रान मिळत असते. त्यांना रोखणारा वा जाब विचारणाराच जागेवर नसला, मग अंमलीपदार्थ काय किंवा स्फ़ोटकांचा साठा काय, कुठूनही कुठेही हलवणे लपवणे सोपे होऊन जाते. जेव्हा अशा घातक पदार्थाचा प्रयोग होतो, तेव्हा तोच नागरिक भयभीत होऊन जातो आणि सुरक्षेसाठी त्याच पोलिस यंत्रणेकडून अपेक्षा बाळगू लागतो. पण पोलिसांना अन्य कामात गुंतवले नाही, तर ही मुलभूत कामे त्यांच्याकडून अधिक चोखपणे पार पाडली जातील व सामान्य नागरी जीवन अधिक सुरक्षित होऊ शकेल ना?

अन्य कुठल्या गुन्ह्यात हाती लागलेल्या गुन्हेगारांकडून माहिती वा खबर मिळाल्यावर पोलिस नेमक्या जागी पोहोचले. तरीही वरकरणी स्फ़ोटके मिळू शकलेली नव्हती. खास प्रशिक्षण दिलेल्या पोलिसी श्वान पथकाने हुंगून त्याचा वास काढला आणि मगच खड्डे उकरल्यावर या स्फ़ोटकांचा साठा हाती लागलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा साठा अशा ओसाड जागी लपवून ठेवला असेल आणि तिथे पहाराही देण्याची संबंधितांना गरज वाटलेली नसेल, तर असे किती साठे कुठे कुठे असतील, याची कल्पनाच भयावह आहे. आज देशात वातावरण तापलेले असताना पाकिस्तानचे हस्तक वा जिहादी मानसिकतेने बिघडलेल्या लोकांची संख्या कमी नाही. त्यांना अशाच घातक वस्तुंचा पुरवठा पाकिस्तान करू शकला, तर सीमेवरचे सैनिक देशाचे संरक्षण कसे करू शकणार? देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी नागरी सरकारप्रमाणेच सामान्य नागरिकांची असते. त्यात पुढाकार पोलिस यंत्रणेचाच असला पाहिजे. पण ती यंत्रणा जागरुक नागरिक अधिक प्रभावीपणे वापरू शकतो, हे विसरता कामा नये. दुर्दैवाने आपण तितके जागरुक नागरिक होऊ शकलेलो नाही. म्हणूनच धरणी, निदर्शने वा मेळावे आणि समारंभात पोलिसांना गुंतवून ठेवण्याचे पाप आपणच करत असतो. अधिक आसपास काय घडते याविषयी गाफ़ील रहाण्याला आपण मूलभूत हक्क समजतो. त्यातूनच आपण अतिरेक्यांना प्रोत्साहन देत असतो, याची जाणिव जर निर्माण झाली, तर आपल्याला अशा धोक्यातून वाट काढता येईल. अन्यथा थकलेले व कामाच्या बोजाखाली वाकलेले पोलिस, आपली सुरक्षा करू शकणार नाहीत. थोडे जवळपास व परिसरात काय घडते आहे, त्याचे भान ठेवून आपण नागरी कर्तव्य पार पाडण्यात पुढे येण्याची गरज आहे. पोलिसांवरचा भार कमी होईल, इतका संयम राखायला शिकलो पाहिजे. अन्यथा इतके आरडीएक्स अवघ्या महानगराला उध्वस्त करायला पुरेसे आहे.

हा खेळ सावल्यांचा

espionage के लिए चित्र परिणाम

काही दिवसांपुर्वी भारतातील पाक वकिलातीमध्ये काम करत असलेल्या एक अधिकार्‍याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तेव्हा पहिले स्मरण झाले ते माजी पाक अध्यक्ष लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ यांचे! वाजपेयींच्या कारकिर्दीत त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ़ यांना पदच्युत करून पाकिस्तानची सत्ता हाती घेतली होती. तिथे लष्करी राजवट लावली होती. मग आग्रा येथील शिखर परिषदेसाठी मुशर्रफ़ आले असताना, इंग्रजीतला उथळ पत्रकार राजदीप सरदेसाई याने त्यांची खास मुलाखत घेतली होती. त्यात हेरगिरीचा विषय आला होता. एका राष्ट्राध्यक्षाला विचारू नये असा वरकरणी आक्रमक वाटणारा प्रश्न राजदीपने विचारला होता. तर त्याला गप्प करताना मुशर्रफ़ यांनी त्याचे अज्ञान उघडे पाडले होते. राजदीपने पाक हेरखाते आयएसआयचा विषय काढला. तर मुशर्रफ़ म्हणाले, अशा विषयात बोलायचे नसते. भारतातल्या दूतावासामध्ये पाक अधिकारी जे काम करतात, तेच जगातल्या कुठल्याही देशातील दुतावासामध्ये भारतीय अधिकारीही करीत असतात. त्यामुळे याबद्दल जाहिरपणे बोलण्यात अर्थ नसतो. परक्या देशात दुतावास फ़क्त मैत्रीसाठी नसतो, तर तिथे आपल्या देशाचे हितसंबंध जपण्याच्या कारवाया करण्यासाठीच असे दुतावास स्थापलेले असतात. तिथे बहुतांश गुप्तचरांचाच वावर असतो. दिडदोन कोटी लोकसंख्येच्या अफ़गाणिस्तानात भारताला सात आठ वकिलाती कशाला हव्यात? तिथे असे कोणते राजनैतिक काम भारतीय अधिकारी करीत असतात? तर तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय हेरांचा वावर आहे आणि ते पाकविरोधी कारवायाच करीत असतात. असेच मुशर्रफ़ यांना म्हणायचे होते. ही बाब लक्षात घेतली तर नवीदिल्लीतील दूतावासामध्ये पाक हेर काय करीत होता, असा प्रश्न आपल्याला पडणार नाही. भारतविरोधी कारवाया हेच त्याचे काम असते आणि त्यासाठी भारतातले फ़ितूर गोळा करणे, ह्यासाठीच तो धडपडत असणार ना?

अर्थात यासाठीच मग भारतीय हेरखात्यालाही जागरुक रहावे लागत असते. इथे अनेक देशांचे मुत्सद्दी काम करत असतात. त्यांना राजनैतिक सवलत मिळालेली असते. इथले कायदे त्यांना खटल्यात ओढू शकत नाहीत. म्हणूनच त्याचा आडोसा घेऊन अशी मंडळी त्यांच्या देशाला लाभदायक ठरू शकतील वा त्यांच्या मित्रदेशाला फ़ायद्याचे ठरतील; अशा कारवाया करण्यात मग्न असतात. महमुद अख्तर नावाचा जो हेर दिल्लीत पकडला गेला, तो हेच काम करत असणार, यात शंकाच नाही. किंबहूना त्यासाठीच तर त्याची नेमणूक झालेली होती. त्याच्यावर भारतीय हेरांची पाळत नसेल, असे अजिबात नाही. पण तो अलिकडेच भारतात आला होता आणि जे उद्योग करीत होता, त्याच्याही आधीपासून असे हेरगिरीचे जाळे पाकने विणलेले असणार. म्हणून तर भारतात येऊन तीन वर्षे झाली, इतक्यात अख्तरने आधारकार्डही मिळवले होते. त्याचा अर्थ त्याच्या हाताशी हस्तकांचे पक्के जाळे उपलब्ध होते. त्याच्या भारतात येण्याआधीपासून ते सज्ज असावे. पण त्याला जाळ्यात ओढण्यासाठी व त्याच्या भोवतीचे फ़ितूर पकडण्यासाठी अख्तरला आत्मविश्वासाने काही उचापती करू देण्याची गरज असते. जितका त्याचा आत्मविश्वास अधिक, तितका तो बेधडक उचापती करणे शक्य होते. परिणामी त्याच्याभोवती असलेल्या अधिकाधिक हस्तकांचे चेहरे समोर येणे शक्य होते. अशा एका मोक्याच्या व्यक्तीच्या भोवती अनेक साखळयांमध्ये फ़ितूर हस्तक काम करीत असतात. त्यांचे जाळे उलगडून झाल्यावरच धरपकड होत असते. दिड वर्षे अख्तर उचापती करीत होता, याचा अर्थ त्याच्यावर तितका काळ पाळत ठेवलेली होती. पुरेशी माहिती हाती आल्यावरच त्याला उचलण्यात आलेले असणार. हे काम अर्थातच पोलिसांचे नाही तर भारतीय गुप्तचर खात्याचे आहे. त्यांनी सर्व सज्जता केली आणि पोलिसांना शिकार जाळ्यात ओढून दिलेली आहे.

यातला मोक्याचा माणूस महमुद अख्तर होता आणि तोच पकडला गेला आहे. पण त्यातली गंमत समजून घेतली पहिजे. दिल्लीच्या एका उद्यानात अन्य दोघांशी याची भेट ठरली होती आणि तिथेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने आपली ओळख भारतीय नावाने व ओळखपत्राने करून दिलेली होती. म्हणजे अख्तर किती गाफ़ील होता, ते समजू शकते. आपल्याला पाकचा हेर म्हणून हटकण्यात आले, अशी त्याच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. तसे असते तर त्याने तात्काळ राजनैतिक सवलतीचा आधार घेऊन पोलिसांना गप्प केले असते. पण सापळ्यात अडकलोय याचाही थांगपत्ता नसलेला अख्तर चौकशीत उघडा पडला आणि आता कुठलाही अन्य मार्ग नसल्याचे लक्षात आल्यावर, त्याने आपली खरी ओळख पोलिसांना सांगितली. त्याला अटक करणे शक्य नव्हते. म्हणूनच त्याची तडकाफ़डकी भारतातून हाकालपट्टी करण्याचा आदेश जारी झाला. पण ताब्यात घेतला जाताना अख्तर किती गाफ़ील होता, त्याचा अंदाज येतो. याचा अर्थ असा, की दिर्घकाळ त्याच्यावर पाळत ठेवून त्याचे धागेदोरे व सगेसोयरे हुडकून काढलेले आहेत, त्याचाही त्याला पत्ता नव्हता. आपण पुरते फ़सल्याची कल्पना आल्यावर त्याने पळवाट शोधली. पण तशी पळवाट त्याच्या टोळीतील अन्य भारतीय हस्तकांना उपलब्ध नाही अख्तरला इथे अडकवून ठेवण्यात काही हशील नाही. त्यापेक्षा जाणिवपुर्वक वा अजाणतेपणी त्याचे हस्तक झालेले मात्र फ़सले आहेत. त्यांच्याकडून किती खोलवर हे जाळे विणलेले आहेत, त्याचा तपशील उपलब्ध होणार आहे. त्यात कोण कोण उजळमाथ्याने समाजात वावरणारे लोक आहेत आणि देशाशी दगाफ़टका करणारे आहेत; त्याचीही माहिती भारतीय यंत्रणांच्या हाती लागणार आहे. किंबहूना यापैकी अनेकांच्या कुंडल्या एव्हाना तपासयंत्रणांना मिळालेल्याही असतील.

हेरगिरीचे जाळे खुप खोलवर विणलेले असते. वरकरणी हिमनगाचे टोक दिसत असते. त्यातल्या खालच्या स्तरावर किंवा नकळत शत्रू देशासाठी काम करणार्‍यांना काय करतोय याचाही पत्ता नसतो. अनेकदा असे लोक तत्वासाठी, विचारसरणीसाठी काही करत असतात. अशा खुळ्यांना आपल्या जाळ्यात ओढून देशाशी गद्दारी करायला वापरण्याचाच खेळ गुप्तहेर करीत असतात. आज भारत-पाक संबंध बिघडले असतानाही पाकमैत्री वा कलेच्या स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकणार्‍या अनेकांना अशाच जाळ्यात ओढलेले असू शकते. त्यांना अशा कामात ओढणारे किंवा प्रोत्साहन देणारे खरे शत्रूचे हस्तक असतात. त्यांना संघटित व सुसुत्रपणे कामाला लावण्याचे कर्तव्य अख्तरसारखा कोणी पार पाडत असतो. पाकला जी माहिती हवी किंवा भारताच्या दुबळ्या बाजू कळायला हव्यात, त्यात मदत करू शकणार्‍यांची यादी तयार करणे वा त्यांना आपल्या घोळक्यात ओढणे; अशी कामे अख्तरचे हस्तक परस्पर करीत असतात. अशापैकी अनेकांचे धागेदोरे एव्हाना तपास यंत्रणांना मिळालेले असू शकतात. तितकी पुरेशी माहिती मिळत नाही, तोवर अख्तरला गाफ़ील ठेवून मोकाट फ़िरायला दिले जात असते. ज्याअर्थी अख्तरला ताब्यात घेऊन पाकला पाठवून देण्याचा आदेश जारी झालेला आहे, त्याअर्थी त्याच्या भोवतीच्या अनेकांच्या कुंडल्या आधीच तपास यंत्रणांनी तयार ठेवलेल्या आहेत. त्यांच्या कारवायांवर आता बारकाईने नजर ठेवलेली असेल. योग्य वेळ येईल, तेव्हा त्यापैकी एकेकाचा गाशा गुंडाळला जाईल. कदाचित त्यापैकी अनेकांची परस्पर विल्हेवाटही लावली जाईल. कारण गुप्तचरांच्या कामाचा गाजावाजा होत नाही, की त्याविषयीची माहिती पत्रकार परिषद घेऊन सादर केली जात नाही. तो सगळा सावल्यांचा खेळ असतो. सावल्या दिसतात. पण कशाची सावली आहे, त्याचा थांगपत्ता सामान्य माणसाला लागू शकत नाही.

सावताची गुरू‘कृपा’



प्रामाणिकपणे सांगायचे तर दिवाळी उरकूनच मी घरी मुंबईत दिवाळीसाठी येऊन पोहोचलो. कारण आजकाल माझ्यासाठी पुण्यात जाणे हीच दिवाळी होऊन बसली आहे. पुण्यात बरेच मित्र सवंगडी तयार झालेत आणि त्यातले काही फ़ेसबुकातून येऊन भिडलेले. त्यातला गुरू सावंत एक! योगायोगाने पक्का मालवणी आणि त्यातही पुन्हा ‘सावंतवाडीचो’! मग काय दोनतीनदा भेटीगाठी झाल्या आणि आपोआप गाडी मासेमच्छीकडे वळली. मालवणी माणसाची नाती माश्याच्या काट्याइतकी बोचरी आणि त्याच्या चवी इतकीच लज्जतदार असतात. ही नाती जपण्या जोपासण्यासाठी तशीच गृहिणी घरात असावी लागते. गुरू तसा नशिबवान! त्याच्या घरात साक्षात सुग्रणींचा वास आहे. (इथे वास याचा अर्थ वस्ती असा घ्यावा. नाहीतरी आम्ही मालवणी लोक माश्याचा वास अधिक प्रिय असलेले लोक!) योगायोग असा की ओळखी नंतर काही काळातच गुरूला आपल्या गृहिणीच्या कुशलतेचा व्यापारी साक्षत्कार झाला आणि त्याने तिच्या पाकशास्त्राचा उपयोग करण्याचे मनावर घेतले. त्यातून पुण्यात एक चविष्ट मालवणी मासे मिळण्याची सोय झाली. त्याच्या या प्रयोगाचा पहिला साक्षीदार मीच होतो. त्याने हा उद्योग आरंभला आणि मलाही त्याबद्दल विचारले होते. प्रतिसाद त्याला मिळालेलाच होता. पण मी पुण्यात पोहोचलो आणि पहिल्याच संध्याकाळी गुरू मासळीचे जेवण घेऊन हजर झाला. सुरमई, बांगडा वगैरे गोष्टी नेहमीच्याच होत्या. पण त्यातला तिरफ़ळाचा स्वाद कुठल्या कुठे घेऊन गेला. तेव्हापासून माझ्या पुण्यात जाण्याची दिवाळी होऊन गेली. कारण एक तर बाहेर कुठून तरी खायचे म्हणजे वैताग. अशा विपरीत स्थितीत अस्सल मालवणी चवीचे माशाचे पदार्थ मिळाल्यावर दिवाळी नाही तर काय म्हणायचे? दिवाळी म्हणजे आनंदाचा सोहळा! तो यापेक्षा वेगळा कसा असेल?

गुरूची गृहिणी म्हणजे स्मिताच्या भरवशावर गुरूने हा उद्योग करायचे ठरवले आणि आरंभही केला. पण तिच्या हातचे पदार्थ चाखल्यावर मला एकदम अर्धशतक मागे गेल्यासारखे वाटले. बालपणी आई, मावश्या किंवा आजीच्या हातचे पदार्थ खाल्ले, तेव्हा बाजारात तयार मसाले मिळत नव्हते आणि आजच्यासारखे चमचमित पदार्थ ही तेव्हाची पद्धत नव्हती. सकस आणि पौष्टीक जेवण, हा मागच्या पिढीचा दंडक होता. त्यामुळे तेव्हाच्या खाल्लेल्या माशांची चव बदलली नसली, तरी मसाले आणि बनवण्याच्या पद्धतीमुळे अनेक माश्यांची चव बदलून गेली आहे. तारलीला सुटणारे तेल आणि खेकड्याच्या डेंग्यातली पोकळी भरून राहिलेला सुक्या खोबर्‍याचा रस; यांची अजब रसायने आज दुरापास्त झाली आहेत. शहरातल्या कुठल्या घरातही आज ती चव मिळेनाशी झाली आहे. अगदीच तळ कोकणातल्या कुठल्या आडगावात गेल्यास तशी ओरिजीनल चव चाखायला मिळते. तव्यावर भाजलेल्या ओल्या खोबर्‍यासह तांबड्या मिरचीचे केलेले वाटण, आता दुर्मिळ झाले आहे. त्या चवी फ़क्त आठवायच्या अशा निराश मानसिकतेने अस्वस्थ असलेल्या मला, अकस्मात गुरूच्या या उद्योगाने नवी संजिवनी दिली. पहिल्यांदा हौसेने गुरू हे पदार्थ घेऊन आला तेव्हाच मी त्याला वडीलकीचा सल्ला दिल्यासारखे धंदा कसा चाललाय म्हणून विचारले. तोही खुश दिसत होता. पण काही लोकांना चव आवडली नसल्याचे त्यानेच सांगितले. तेव्हा गुरूला एकच वॉर्निंग दिली. ज्यांना तुझ्या माश्यांची चव आवडणार नाही, त्यांच्याकडे पाठ फ़िरव. पण गृहलक्ष्मीच्या हातची चव बदलायची नाही. कारण ही अस्सल मालवणी कोकणी चव आहे. ज्यांना ती कळणार नसेल, त्यांची गिर्‍हायकी विसरून जा. वेळ लागेल, पण ज्यांना खरे मालवणी मासे खायचे आहेत, त्यांच्यासाठी ह्यात तसूभर बदल होऊन चालणार नाही.


                                                 (खुबे म्हणजे मोठ्या तिसर्‍या)

त्यानंतर मागल्या ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे. सातार्‍याहून पुण्याला येणार होतो आणि तेव्हाही मला मासे खाऊ घालण्याची गुरूला घाई झालेली होती. म्हणजे झाले असे, की त्याने एकेदिवशी फ़ेसबुकवर खुब्यांचे सुके केल्याचा फ़ोटो त्याने टाकला होता. सवयीनुसार मी त्याला तिथेच फ़ेसबुकवर शिव्या घातल्या. ‘साले खातात आणि इतरांच्या तोंडाला पाणी आणून सतावतात’. गुरूच्या मनात तो अपराधगंड राहिला आणि मी पुण्यात कधी येतोय म्हणून सारखे विचारत राहिला. त्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचतोय म्हटल्यावर गड्याने खुबे, तारल्या, खेकडे, सुरमई असा जामानिमाच सज्ज करून आणला. दोन दिवस माझी दिवाळी झाली. अर्थात फ़्रीजच्या कृपेने! त्या रात्री माझ्या ओसाड घरात गुरू आणि मी एकत्र जेवलो. मग तो निसटला आणि रात्री उशिरा मी पुन्हा मांदेलीचे कालवण आणि भात खाल्ला. अपरात्र झाली होती. पण तेव्हाच गुरूला फ़ोन करायचा मोह आवरत नव्हता तरीही थांबलो आणि सकाळी उठल्या उठल्या फ़ोन लावला. म्हटले फ़ोन बायकोकडे दे. तिला म्हटले मांदेलीच्या कालवणात काय घातले होते? बिचारी गडबडली. सर्व सांगत होती, पण मुख्य गोष्ट तिलाही सुचत नव्हती. त्या कालवणात घातलेले हळदीचे हिरवे पान कालवणाची चव पुरती बदलून टाकणारे होते. त्याबद्दल विचारले तर स्मिता (गुरूची पत्नी) आणखीनच गोंधळली. तिला विचारले पुण्यातल्या चाळीत हळदीचे पान कुठून आणलेस? तिने उत्तर दिले दारातच कुंडीत हळद लावलीय. कुठल्याही पॉश हॉटेलात गेलात तरी हा स्वाद आणि हीच चव मिळणार नाही. माश्याच्या कालवणातले हळदीचे हिरवे पान त्याचा स्वाद, मसाल्याच्याही थोबाडात मारणारा असतो. यावेळी अडिच महिन्यांनी पुण्यात पोहोचलो आणि गुरू अन्य दोन मित्रांसह जेवणाचा बेत करूनच आलेला. माझ्यासाठी खास सुक्या मासळीचा बेत होता.

सुक्या बांगड्याची आमटी अधिक सुक्या सुंगटाची मसालेदार भाजी! हा गुरूचा नवा बेत आहे. ‘गरीबकी थाली’ म्हणून त्याला त्याचे मार्केटींग करायचे आहे. त्याची पत्नी स्मिता व धाकटी वहिनी अजिता, ह्या दोघी सुग्रणी आहेत. ज्यांनी अस्सल मालवणी घरातले मासे खाल्लेत किंवा जे कोणी अशा चवींना दिर्घकाळ वंचित राहिलेत, त्यांनाच माझी दिवाळी म्हणजे काय झाले; त्याचा अंदाज येऊ शकतो. प्रत्येक माशाची चव वेगळी असते आणि त्यातले मसालेही जातीपातीनुसार बदलतात. त्यात पुन्हा प्रत्येक घरातील सुग्रणीची छाप त्या चवीवर पडतेच. स्मिता आणि अजिता या दोन मुलींनी माझ्यासारख्या सत्तरीतल्या म्हातार्‍याला पन्नास वर्षे मागे नेऊन सोडले. या दोघीहीही खुप म्हातार्‍या होईपर्यंत त्यांना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशा अस्सल मालवणी चवीचे परंपारीक मासे निदान दोनतीन पिढ्यांना खायला मिळोत अशी या दिवाळीची तमाम मासेखाऊंना शुभेच्छा! ज्यांनी कुठल्या तरी बाजारू हॉटेलात आचारी वा शेफ़च्या हातचे मासे मालवणी म्हणून खाल्ले असतील, त्यांना या दोन मुलींच्या हाताची चव कधीच कळणार नाही. पण ज्यांना खरोखरीचे मालवणी मासे व त्यातली विविधता चाखायची आहे, त्यांच्यासाठी गुरू‘कृपा’ साध्य करून घ्यावी. गृहिणीची खासियत तिच्या पाकशास्त्रात असते आणि सुदैवी मुलीच हाताची चव घेऊन जन्माला येतात. अजिता व स्मिता या मुलींना ते वरदान लाभले आहे. ही खरीतर देवाने गुरू सावंतावर केलेली कृपा आहे. त्याचा कृपाप्रसाद माझ्याही वाट्याला फ़ेसबुकमुळे आला. गुरूशी संपर्क साधून कोणालाही ह्या आनंदाची चव चाखता येईल. कारण त्याचे कुठे हॉटेल नाही, की भटारखाना नाही. खरेच घरगुती जेवण. या दोन मुलींना एकच सांगेन, उद्या व्यवसायात कितीही मोठे व्हा, किंवा हॉटेल काढा. पण त्यात तुमच्या हाताचा स्पर्श असल्याशिवाय माश्याला चव येत नाही, हे विसरू नका पोरींनो!

गुरू सावंत  (७०२८० ७८४३३ - ८००७७ ७८४३३)

Friday, October 28, 2016

आघाडी युतीला अर्थ नाही

uddhav devendra pawar के लिए चित्र परिणाम

लौकरच १९२ नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूका व्हायच्या आहेत. त्या संस्था खुप छोट्या आहेत. काही निवडक मोठ्या नगरपालिका सोडल्या, तर बहुतांश नगरपालिका गाववजा संस्था आहेत. त्यामुळे तिथे सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या शाखा वा संघटना असतील असे मानायचे कारण नाही. दहाबारा हजारापासून लाखभर मतदार असलेल्या या संस्थांमध्ये होणार्‍या निवडणूकात, पक्षाची निशाणी घेऊन क्वचितच लढती होत असतात. नवखा पक्ष त़सा प्रयोग करतो. पण कॉग्रेसने तिथल्या स्थानिक नेतृत्वावर अशा लढती आजवर सोडून दिलेल्या होत्या. कारण अशा विरळ वा छोट्या संस्थामध्ये वावरणारे दोनतीन गट हे स्थानिक नेतृत्वातल्या हेवेदावे वा भांडणाचे आखाडे असतात. त्यामुळे त्या दोनतीन नेत्यांना आपल्याच पंखाखाली ठेवण्याचे राजकारण आजवर झालेले आहे. म्हणूनच नेहमी अशा निवडणुका एकाच पक्षाचे नेते विविध पॅनेल बनवून लढताना दिसले आहेत. त्यात मग नव्याने उभे रहाणारे शिवसेना वा भाजपा, अशा पक्षांनी आपला झेंडा किंवा पक्ष म्हणून लढती दिल्या असतील. पण बिनपक्षाच्या पॅनेलमध्ये बहुतांश कॉग्रेसच असायची. पुढे राष्ट्रवादी असा एक गट कॉग्रेस सोडून बाहेर पडला आणि राज्यव्यापी पक्ष म्हणून काम करू लागला. तेव्हा ह्या पॅनेल पद्धतीला थोडा पायबंद घातला गेला. कारण अशा मोठ्या वस्तीच्या गावातील नेत्यांना वा त्यांच्या स्थानिक विरोधकाला पर्यायी पक्ष मिळाला होता. एकाने कॉग्रेसमध्ये आपले बस्तान बसवले, की त्याला शह देण्यासाठी दुसर्‍याने राष्ट्रवादी गाठायची; असाच पायंडा पडून गेला. पुढल्या काळात अशा स्वयंभू नेते व कार्यकर्त्यांसाठी शिवसेना किंवा भाजपा हे आणखी पर्याय उपलब्ध झाले. अशा स्थितीत या निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यात राज्यव्यापी किती पक्ष आपला झेंडा घेऊन लढतील, ते बघण्यासारखे असेल.

या निवडणूकांमध्ये आघाडी वा युती असावी-नसावी यावर अजून तरी चर्चा सुरू झालेली नाही. कारण सोपे आहे. पहिली गोष्ट म्हणजे नगराध्यक्षाची निवडणूक थेट व्हायची आहे. याचा अर्थ त्या गावात किंवा छोटेखानी शहरात खरी कोणाची हुकूमत आहे, ते सिद्ध करणारी ही निवडणूक असेल. सदस्यांनी नगराध्यक्ष निवडण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे आपला वरचष्मा ज्याला सिद्ध करायचा आहे, अशा बलदंड नेत्यांना आज कुणा पक्षाने उमेदवारी दिली, तर गोष्ट वेगळी. अन्यथा त्याला आता अशा कुठल्या पक्षाची मेहरबानी मिळवण्याची गरज उरलेली नाही. तो खरेच प्रभावशाली असेल व ते नगर त्याचा बालेकिल्ला असेल, तर थेट मतदानातूनच ती बाब सिद्ध होणार आहे. शिवाय ती निवड नुसती नगराध्यक्ष पदाची असणार नाही. पुढील विधानसभेसाठी आमदारकीवर दावे करायची ही पुर्वपरिक्षा मानायला हरकत नाही. कारण यातल्या बहुतांश नगरपालिका या तालुक्याची मुख्यालये असतात. तिथे ज्याचा वरचष्मा, त्याला पुढल्या आमदारकीत संधी अधिक असते. मग ज्या पक्षाला असा हुकमी उमेदवार पाहिजे, त्यांची यशस्वी नगराध्यक्षाकडे रीघ लागू शकते. म्हणूनच पक्षांच्या आघाड्या होण्यात अडचणी येणार आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यापेक्षा आपले वर्चस्व थेट सिद्ध करायचे आणि नंतर पक्षांना आपल्या दाराशी आणायचे; असे राजकारण स्थानिक पातळीवर शिरजोर असणारा नेता खेळणार आहे. तो डाव खेळायचा तर पक्षाला नगराध्यक्षपद मिळण्याचा विषय उरत नाही. व्यक्तीला ते पद मिळण्याला महत्व आलेले आहे. म्हणूनच नगरसेवक म्हणून पक्षाची उमेदवारी मिळवायचे प्रयत्न होतील किंवा अशा उमेदवारांनाही स्थानिक प्रबळ नेता आपल्याच पंखाखाली राखण्याचा प्रयास करील. असेच राजकारण व्हायचे असेल, तर विविध पक्षांच्या आघाड्या किंवा युती व्हायला संधीच कुठे शिल्लक उरते?

जेव्हा अशा निवडणुका होतात, तेव्हा त्याचे निकाल लागल्यावर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, त्याचे चित्र धूसर असते. कारण बहुतांश पक्षाचे कार्यकर्ते तिथे पॅनेल करून लढती देत असतात. मग निकाल लागून चित्र साफ़ झाले तर अशा निवडून आलेल्यांना आपापल्या पक्षात ओढण्याची स्पर्धा सुरू होते. कारण गावागावात असे नगरसेवक वा लोकप्रतिनिधी आमदारकी वा खासदारकीच्या लढाईतले बिनीचे शिलेदार असतात. त्यांना हाताशी धरून कायदेमंडळाच्या खर्‍या लढाईत उतरता येत असते. ही बाब लक्षात घेतली, तर येत्या महिन्यात होऊ घातलेल्या १९२ नगरपालिकांच्या निवडणूकात सेना-भाजपा किंवा दोन्ही कॉग्रेसमध्ये कुठलाही समझोता होण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. गावोगावी मागल्या दोन वर्षात झळकलेले फ़्लेक्स वा विविध फ़लक लक्षात घेतले, तर आळी बोळातले नवे राजकीय नेतृत्व किती आधीपासून तयारीला लागलेले होते, हे लक्षात येऊ शकते. आता त्यांच्या वा अन्य कुठल्या पक्षाने उमेदवारी नाकारली, म्हणून असे गल्लीतले स्थानिक नेते माघार घेतील काय? त्यापेक्षा पक्षांतर करून दुसरा झेंडा खांद्यावर घेतला जाईल वा अपक्ष म्हणून झुंज दिली जाईल. जिथे अशी गुंतवणूक केलेल्या इच्छुकाला खर्च केलेल्या पैशाची चिंता असेल, तो पक्षाच्या आघाड्या वा युत्यांना कितपत दाद देईल? अर्थात जिथे पक्षाचाच दांडगा नेता स्थानिक नेतॄत्व करीत असेल, तिथे पक्षांचा झेंडा व चिन्ह घेऊन लढती होतील. पण म्हणूनच अन्य कुठल्या पक्षासोबत तडजोडी जागावाटप होण्याची शक्यता बिलकुल नाही. हे राज्यातील विविध पक्ष नेतृत्वालाही पक्के ठाऊक आहे. म्हणूनच त्यापैकी कुठल्याही प्रमुख पक्षाने नगरपालिकांसाठी युती आघाडीची भाषाही केलेली नाही. उमेदवारीची तिकीटे देण्यापेक्षा निवडून आलेल्याना आपल्या पक्षात ओढण्याला महत्व असणार आहे.

म्हणून मग कोण किती उमेदवार उभा करतो, त्याची चर्चा होणार नाही. जागावाटपाचा विषय निघणार नाही. अगदी निकाल लागले तरी कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या; त्याचाही उहापोह दिर्घकाळ होणार नाही. प्रचार व निकालाचा धुरळा बसला, मगच कोणत्या पक्षाला किती पालिकांमध्ये सत्ता मिळाली, त्याचा तपशील समोर येऊ लागेल. त्यातले बहुतांश पक्षाच्या चिन्हावरही लढलेले नसतील आणि अनेकजण पॅनेल करून जिंकलेले असतील. पण त्यांची गणना अमूक तमूक पक्षाचा म्हणूनच होणार आहे. युती आघाड्या नंतर सत्तेच्या जागा वाटून घेण्यासाठी होऊ शकतील. कारण नगराध्यक्ष थेट निवडून येणार असला, तरी विविध समित्या वा सत्तापदे मात्र नंतरच वाटून घ्यायची आहेत. यातल्या अनेक नगरपालिकेतील एकूण मतदान मुंबईच्या एका नगरसेवकाच्या वॉर्डातील मतांइतकेही किरकोळ असणार आहे. त्यामुळेच त्यात पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावण्यात काही अर्थ नसतो. पण नंतर जिल्हा व तालुक्याच्या राजकारणातली सत्ता समिकरणे मात्र अशाच लोकांना हाताशी धरून मांडावी लागत असतात. म्हणूनच राज्यव्यापी पक्षांना वा त्या त्या जिल्ह्यातील प्रभावी राजकीय पक्षाला, अशा निवडणूकांवर बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यातून आपल्या हाती काय लागू शकेल, त्याची चाचपणी करावी लागत असते. राज्याच्या राजकारणाचा व सत्ताकारणाचा पाया इथूनच घातला जात असतो. क्रिकेटच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याची महत्वाकांक्षा असलेले खेळाडू जसे शालेय वा इतर सामान्य स्पर्धात आपले कौशल्य पणाला लावतात; तसे नव्या व स्थानिक नेत्यांना आपल्याकडे मोठ्या नेत्यांचे लक्ष वेधले जाण्यासाठी या लढतीमध्ये सर्वशक्तीनिशी उतरावेच लागत असते. म्हणून तर ह्या लढती नगण्य असल्या तरी त्यातून राज्याच्या भावी नेत्यांचे काही चेहरे समोर येणार आहेत. त्यात युती आघाडी हा विषय दुय्यम आहे.

(२७/१०/२०१६)

शिकारी खुद यहॉ, शिकार हो गया

anurag kashyap ADHM के लिए चित्र परिणाम

सहानुभूती हे सर्वात प्रभावी हत्यार असते. सहसा भोंदू माणसे त्याचा हत्याराप्रमाणे वापर करीत असतात. आपण अहिंसक आहोत किंवा आपण संयमी आहोत असे नाटक रंगवणारे लोक मोठ्या चतुराईने आपल्या भोवती सहानुभूतीचे कवच उभे करतात. मग सहजगत्या त्याचाच हत्याराप्रमाणे वापर करू लागतात. याचे ताजे उदाहरण म्हणून आपण पाकप्रेमी कलाकारांकडे बघू शकतो. आधी त्यांनी कलेला सीमा नसल्याचे दावे करून भारतीय जनभावनेला पायदळी तुडवण्याचा खेळ केला. जेव्हा प्रक्षुब्ध प्रतिक्रीया उमटू लागली, तेव्हा कलाकार हे सर्वात सॉफ़्ट टार्गेट म्हणजे सोपी शिकार असल्याचे नवे नाटक सुरू केले. आम्ही दुबळे आहोत म्हणून आम्हालाच लक्ष्य केले जाते, असा त्याचा अर्थ होतो. पण खरेच हे लोक इतके दुबळे किंवा सोपी शिकार असतात काय? ज्यांना सहजगत्या देशाचा गृहमंत्री तात्काळ भेट देतो आणि त्यांच्या समस्येत राज्याचा मुख्यमंत्री विनाविलंब हस्तक्षेप करायला सवड काढतो, त्यांना दुबळे म्हणायचे? मग समर्थ कोण आहेत, या देशात? सामान्य माणसे ज्यांचा देशाभिमान जाज्वल्य असतो, त्यांना सबळ वा मस्तवाल म्हणायचे काय? शब्दांचा कसा गोलमाल चालतो बघा. सामान्य माणसाच्या जीवनाला सतावत असलेली कुठलीही भीषण समस्या सोडवायला देशाचा गृहमंत्री वा मुख्यमंत्री इतक्या तत्परतेने पुढे येणार नाही. पण कलाकारांच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद मिळतो, कारण तेच खरे सबळ दांडगे आहेत. त्यांची शिकार सोपी नाही तर सर्वात अवघड गोष्ट आहे. सामान्य माणसाची शिकार सर्वात सोपी असते. सामान्य माणूसच कशाला, या देशात सर्वात सोपी शिकार वा दुबळे लक्ष्य राजकारणी असतात. जितका मोठ्या पदावरचा राजकारणी, तितकी सोपी शिकार ही आजही वस्तुस्थिती आहे आणि त्यातले मस्तवाल शिकारी, हे़च तथाकथित कलाक्षेत्रातले म्होरके असतात.

आठदहा दिवसांपुर्वी अनुराग कश्यप नावाच्या निर्माता दिग्दर्शकाने काय मुक्ताफ़ळे उधळली होती? पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली म्हणून करण जोहर दोषी असेल, तर लाहोरला गेल्याबद्दल मोदींनी अजून माफ़ी मागितली आहे काय? चित्रपट कलाकारांना लक्ष्य केले जाते, कारण आम्ही सर्वात दुबळी शिकार आहोत, असेच कश्यप म्हणाला होता ना? ह्या माणसाने कुठलेही कारण नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दोषारोप केले, तेव्हा मोदी नावाचा पंतप्रधान दांडगा असतो काय? असता, तर अशा कोणा ऐर्‍यागैर्‍याला सहजगत्या पंतप्रधानावर शिंतोडे उडवता आले असते काय? कश्यपच कशाला? दोन महिन्यापुर्वी कॉमेडी नाईट्सवाला कपिल शर्मा याने महापालिका अधिकार्‍यावर राग काढताना, थेट पंतप्रधानांना धारेवर धरले होते. कुठे आहेत अच्छ दिन? आम्हाला तर महापालिकेला लाच द्यावी लागते, असे बोल कुणाचे होते? मोदी वा देशाचा पंतप्रधान महापालिकेचा कारभार हाकतो काय? पुढे प्रकरण चिघळले तर कपिल शर्मानेच बेकायदा बांधकाम करून पर्यावरणाचेही नुकसान केले असल्याचे उघडकीस आले. पण आरंभी कोणी सहजगत्या पंतप्रधानांवर ताशेरे झाडले होते? कोणीही कुठलेही निमीत्त शोधतो आणि पंतप्रधानांवर शरसंधान करतो. दिल्ली नजिकच्या दादरी या उत्तरप्रदेशच्या गावात अखलाख महंमद नावाच्या व्यक्तीची जमावाने हत्या केली. कोणावर दोषारोप सुरू झाले होते? उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आहे. तरी थेट नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात असहिष्णुता बोकाळली असल्याचा आरडाओरडा कोणी सुरू केला होता? ह्याच तथाकथित कलाकारांनी ना? कुठलाही पुरावा किंवा साक्ष काढल्याशिवाय देशाच्या पंतप्रधानाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे दुबळे असतात? आणि अशा कांगावखोरांच्या आरोपाचे फ़टके बिनतक्रार सहन करणारा मात्र दांडगा असतो, अशी एक नवी भाषा देशात सध्या वापरात आलेली आहे.

नरेंद्र मोदीच कशाला? कुठलाही राजकारणी नेता वा पक्ष घ्या. त्याच्यावर कोणीही उठून कसलेली बेताल आरोप करीत असतो. राहुल गांधी, राज ठाकरे, अमित शहा, शिवराजसिंग चौहान, सोनिया गांधी असे कोणीही घ्या. त्यांच्यावर सनसनाटी आरोप सातत्याने होत असतात. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. त्यातही संघावर किंवा कुणा हिंदूत्ववादी संघटनेवर बिनपुराव्याचे आरोप करताना कोण पुढे होते? यापैकीच अनेकांनी असहिष्णुता आल्याचा आरोप करीत नाटक रंगवलेले नव्हते काय? नेहरू विद्यापीठात पोलिसी कारवाई झाल्यावर पहिले लक्ष्य कोण झाले होते? राजकारणी होते आणि त्यातले शरसंधान करणारे शिकारी कोण होते? तथाकथित कलाकारच होते ना? आज करण जोहर सोबत नाचणारे महेश भट वा तत्सम लोक गुजरात दंगलीपासून कोणाची सोपी शिकार करत होते? ह्याला कांगावा म्हणतात. कारण हेच शिकारी आहेत आणि सतत दुबळ्या लोकांना शोधून त्यांची मिळेल तिथे शिकार करत असतात. त्यातले सर्वात दुबळे लक्ष्य राजकीय नेते आणि पक्ष झालेले आहेत. कोणीही उठावे आणि नेत्यांची राजकारण्यांची शिकार करावी; अशी आजची स्थिती आहे. उरीच्या हल्ल्यानंतर राज ठाकरे किंवा मनसे यांनी पाकिस्तानी कलाकारांना निघून जाण्याचा इशारा दिला, तर त्यांच्यावर गुंडागर्दीचा आरोप करणारे शिकार असतात की शिकारी असतात? मनसेने चारदोन दगड फ़ेकले तर गुंडागर्दी असते आणि नेहरू विद्यापीठात धिंगाणा चालतो, त्याला काय म्हणतात? ते अविष्कार स्वातंत्र्य असते. देशाचे तुकडे करण्याची भाषा स्वातंत्र्याचा अविष्कार असतो आणि देशप्रेमापोटी शत्रूदेशाच्या नागरिकांना इशारा दिला, मग गुंडागर्दी होते. मनसेची असते ती हुल्लडबाजी आणि डाव्यांच्या पोरांनी हुल्लडबाजी केली तर ती निदर्शने असतात. कोण शिकार आणि कोण शिकारी आहे?

नेहरू विद्यापीठात कुलगुरूला कित्येक तास कोंडून ठेवणारे विद्यार्थी व त्यांची संघटना क्रांतिकारक असते आणि तसेच काही राज ठाकरेंच्या मनसेने केल्यास त्यावर पोलिसांचे दंडूके चालवायची मागणी होणार. पण तेच पोलिस मग कुलगुरूला सोडवायला नेहरू विद्यापीठाच्या आवारात कशाला शिरत नाहीत? तिथे तमाम दुबळ्यांची वस्ती आहे. चुकून पोलिसांनी कायदा वापरला, तर कुणा दुबळ्याची शिकार होऊन जाईल ना? याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. एकूणच बुद्धीवाद वा कलाकारी म्हणजे एक भोंदूगिरी होऊन बसली आहे. सलमानखान याच्यावर गाडी बेफ़ाम चालवून माणसे मारल्याचा आरोप झाला, तेव्हा किती हरिचे लाल कलाकार त्याच्याविरुद्ध सत्य बोलायला उभे राहिले होते? त्याने कुणा फ़ुटपाथवासीचा बळी घेतला, तो दांडगा कोणी शिकारी होता आणि सलमान दुबळी शिकार होता काय? हे शब्द बोलणार्‍या शहाण्यांनी कधी अशा बळी पडलेल्या वा कुत्र्याच्या मौतीने मेलेल्यांच्या वेदनांचा विचार तरी केला आहे काय? तेव्हा हे तमाम कलाप्रेमी सृजनशील लोक मुग गिळुन गप्प बसणार आणि पाकिस्तानी कलाकारांचा विषय आल्यावर यांना कंठ फ़ुटत असतो. सलमानच्या गाडीखाली चिरडून मेले त्यांच्यासाठी देशाच्या गृहमंत्र्याने वा कुणा मुख्यमंत्र्याने तात्काळ हस्तक्षेप केला होता काय? कसा करणार? आपण सामान्य माणसे दुबळी शिकार असतो आणि सामान्य माणसाला व त्याच्या भावनांना पायदळी तुडवण्याचा अधिकार कलाकार शिकार्‍यांना असतो. त्या अधिकारात कोणी बाधा आणली मग हे क्रुर शिकारी टाहो फ़ोडतात. त्यांची कोणी शिकार करतो आहे. ते दुबळे आहेत आणि म्हणून त्यांची शिकार होतेय. काय जमाना आला आहे ना? कुठल्याशा चित्रपत गीताचे बोल आठवतात, ‘शिकारी खुद यहॉ शिकार हो गया!’

(२७/१०/२०१६)

अखिलेश आणि जयललिता


akhilesh jayalalitha के लिए चित्र परिणाम
उत्तरप्रदेशात जुंपलेली पितपुत्रांची लढाई अनेक राजकीय अभ्यासकांना बुचकळ्यात टाकणारी ठरत चालली आहे. कारण आजवर मुख्यमंत्रीपदी बसलेल्या अखिलेश यादवला सर्वांनी पित्याच्या गडद छायेतला मुलगा म्हणूनच बघितलेले आहे. पण जी संधी मिळाली, त्यात टक्केटोणपे खात आणि शिकत त्याने केलेली वाटचाल कोणाला बघावीशी वाटलेली नाही. म्हणून तो पित्याच्याच पुण्याईवर जगणारा वारस, अशी त्याची अभ्यासकांसाठी प्रतिमा राहिलेली आहे. पण वास्तवात त्याने सत्तेवर आल्यापासून लाथाबुक्के खात अनुभवाची शिदोरी गोळा करत, राजकारणात स्वतंत्रपणे आपला जम बसवला आहे. हे जसे अभ्यासकांच्या नजरेत आलेले नाही, तसेच यादव कुटुंबियांच्याही नजरेत आलेले नाही. काही वर्षापुर्वी एका नव्या सनदी (दुर्गालक्ष्मी) अधिकारी महिलेच्या निलंबनापासून अखिलेशच्या वेगळेपणाची प्रचिती येऊ लागली होती. त्याने सत्ता हाती घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून गुंडगिरी व माफ़ियागिरीचे अनेक आरोप समाजवादी पक्षावर होत राहिले आणि त्याला सरकार संभाळता येत नाही, अशीच समजून होत गेली. त्यात पुन्हा आझमखान, शिवपाल यादव आणि पिता अशा तीन ज्येष्ठांच्या छायेत सत्तेचा अनुभव घेणार्‍या अखिलेशची ‘अर्धा मुख्यमंत्री’ अशीच टिंगल होत राहिली. गमतीने साडेतीन मुख्यमंत्री उत्तरप्रदेशात सत्तेवर असल्याचे म्हटले जात होते. त्यातला अर्धा अशी अखिलेशची संभावना होत राहिली. पण त्याच काळात त्याने नव्या पिढीच्या कार्यकर्ते व दुय्यम नेत्यांना आपल्या पंखाखाली आणत, आपला वेगळा गट व समर्थक पक्षात उभे करण्याला प्राधान्य दिले होते. आज पित्याला आव्हान देणारा अखिलेश असा सज्ज झालेला आहे. जे घडताना कोणी बघू शकलेला नाही. पण त्याच्यातली धमक व इर्षा जयललितांच्या पुर्वकाळाशी जुळणारी आहे. नेमक्या अशाच स्थितीतून तीन दशकांपुर्वी जयललितांना जावे लागले होते.

द्रमुकमध्ये दोन तुकडे पडले, तेव्हा प्रसिद्ध तामिळी अभिनेता एम. जी. रामचंद्रन यांनी वेगळी चुल मांडून अण्णा द्रमुक पक्ष स्थापन केला होता. मुलायम जनता दलाला सोडून स्वबळावर समाजवादी पक्ष काढून उभे राहिले; तसेच तेव्हा तामिळनाडून घडले होते. त्यात यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांनी आरंभी कॉग्रेसची मदत घेतली, तर मुलायमनी कांशीरामची मदत घेतली. पण नंतर विभक्त होऊनही सपा-बसपा हेच प्रतिस्पर्धी होऊन बसले. अण्णा द्रमुक सत्तेत आल्यावर रामचंद्रन यांच्याभोवती द्रमुकचे जाणते गोळा झाले, तरी त्यांनी त्यापैकी कोणाला आपला वारस नेमले नव्हते. चित्रपटातली आपली लाडकी नायिका जयललिता ह्यांना वारस म्हणून वाजतगाजत पक्षात आणले आणि त्यांनाच वारस केले होते. पण रामचंद्रन आजारी पडले आणि त्यांच्या भोवताली असलेल्या जुन्याजाणत्या दरबारी लोकांनी जयललियाना खड्यासारखे दूर केले. रुग्णशय्येवर पडलेल्या नेत्याची पत्नी जानकी अम्मा, यांना हाताशी धरून पक्षाचा व सत्तेचा कब्जा दरबारी लोकांनी घेतला. जयललिता पुर्णपणे एकाकी पडल्या. काही तरूण व दुय्यम नेत्यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळे अण्णा द्रमुकमध्ये फ़ुट पडली आणि पुढल्या विधानसभेत दोन्ही गटांचा दारूण पराभव झाला. जानकी अम्मा त्यानंतर विस्मृतीत गेल्या आणि कंबर कसून राजकारणी लढाईत उतरलेल्या जयललिता टिकून राहिल्या. त्यांनीच द्रमुकशी खरा लढा दिला. रामचंद्रन यांच्या अंत्ययात्रेत त्यांना हाकलून लावण्यात आले होते आणि विधानसभेत जयललितांना द्रमुकने कपडे फ़ाटेस्तवर विटंबना केली. तेव्हा मुख्यमंत्री होऊनच विधानसभेत परतु, असा इशारा देऊन जयललिता बाहेर पडल्या. पाच वर्षात त्यांनी आपला निर्धार पुर्ण केला होता. प्रतिकुल परिस्थितीत स्वयंभू माणसे टिकून रहातात आणि आश्रयाने जगाणारे वाहून जातात, हेच त्यातून सिद्ध झाले. अखिलेश काय वेगळे करतो आहे?

जयललितांनी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा मिळवण्यासाठी झुंज दिली. अखिलेश पित्याच्या हयातीतच मुलायमच्या आश्रितांना आव्हान द्यायला उभा ठाकला आहे. पिताही आश्रितांच्या बाजूने उभा राहिला असल्याने, ही लढाई पितापुत्र अशी दिसते आहे. पण प्रत्यक्षात ही लढाई मुलायमचा राजकीय वारसा आश्रितांकडे की कर्तबगार मुलाकडे, अशी होऊ घातली आहे. त्यात खंबीरपणे कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची जिद्द अखिलेशने दाखवली आहे. जी त्याच्या विरोधातल्या शिवपालपाशी नाही, की खुद्द मुलायममध्येही आज दिसलेली नाही. आपल्या निर्णयांना पुत्रच झुगारत असताना तडकाफ़डकी मुलायमनी त्याला सत्तेतून हाकलण्याची हिंमत अजून तरी दाखवलेली नाही. पण अखिलेशने मात्र आपल्या अधिकाराचा वापर करून शिवपाल-मुलायमच्या गोटातील अनेकांना दणका दिलेला आहे. सत्तेच्या जुगारात मोठी बाजी लावणार्‍याला यश मिळत असते. तर बाजी लावायलाच बिचकणार्‍यांना जिंकता येत नसते. तेव्हा जानकी अम्मा वा दरबारी नेत्यांना शरण जाण्यापेक्षा त्यांना शिंगावर घेण्याचे धाडस जयललितांनी दाखवले. आज उत्तरप्रदेशात अखिलेश यादव तेच धडे गिरवतो आहे. आपली कुवत व शक्ती जितकी असेल, तितका त्याचा पुरेपुर वापर करण्याचे धाडस त्याने दाखवले आहे. पण शिवपाल आदी मंडळी मात्र मुलायमच्या धोतराआड लपून कारवाया करीत आहेत. मुख्यमंत्री पदावरून अखिलेशला धडाक्यात खाली ओढण्याची हिंमत त्यांना झालेली नाही. पण त्याने मात्र यांच्या चार म्होरक्यांना सत्तेतून हाकलून लावण्याचे पाऊल विनाविलंब उचलले आहे. उद्या त्याच्या हाती सत्ता नसेल, पण भविष्यात टिकणारा तो बाजीगर असल्याची खुणगाठ प्रत्येकाने आतापासून बांधायला हरकत नाही. त्याचे विरोधक आजच्या सत्तेत गुंतून पडले आहेत आणि अखिलेश भविष्याच्या समिकरणाची मांडणी करतो आहे.

तामिळनाडूची सत्ता गेली आणि जानकी अम्माच्या पदराआड लपलेल्या दरबार्‍यांची हैसियत संपली. पण सत्तेसाठी शरणागत झाली नाही, ती जयललिता राजकारणात टिकून राहिली होती. कारण तिच्यापाशी धाडस होते आणि कर्तबगारी होती. मार्च महिन्यात होऊ घातलेल्या निवडणूकीत समाजवादी पक्षाची सत्ता संपुष्टात येईल. तेव्हा शिवपाल वा अन्य आश्रितांची स्थिती दयनीय असेल. तर मुलायमही धावपळ करण्याच्या वयापलिकडे गेलेले आहेत. अशावेळी त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाण्याची कुवत असलेला कोणीही आश्रितांमध्ये नाही. ती हिंमत व इच्छाशक्ती अखिलेशपाशी आहे. त्यामुळे पित्याच्या हयातीमध्ये या आश्रितांची नांगी ठेचुन त्यांना आपल्या पायाशी आणण्याचा डाव त्याने आरंभला आहे. २०१९ ची लोकसभा किंवा २०२३ ची विधानसभा लढताना, अखिलेशच्या बाजूने त्याचे वय असेल. उलट मुलायम वा शिवपाल वगैरे उताराला लागलेले असतील. त्यांच्यामध्ये झुंजण्याची शक्तीही शिल्लक राहिलेली नसेल. त्या लढाईत ही लोढणी आपल्या गळ्यात नसावीत. पण पित्याचा वारसा व पुण्याईचे एकाधिकारी व्हावे, असे हिशोब मांडूनच अखिलेश आखाड्यात उतरला आहे. त्यात आश्रितांना खच्ची केले आणि तरूण पिढीला आपल्याच सोबत ठेवले; तर पित्यालाही उतारवयात पुत्राचाच आसरा घ्यावा लागणार, अशी अखिलेशला पुर्ण खात्री आहे. तेव्हा दिवाळखोर कॉग्रेस वा दुबळ्या अजितसिंग इत्यादींच्या कुबड्या भाजपा व मायावतींशी लढताना मदतीला येतील, असाही अखिलेशचा होरा आहे. तामिळनाडूतल्या जयललितांचा १९९० सालचा कित्ता, हा मुलायमपुत्र नव्याने गिरवतो आहे. त्याला पंख फ़ुटले असून पिता, चुलते किंवा राजकीय अभ्यासक मात्र, अजून त्याला घरट्यातले पिल्लू समजून स्वत:चीच फ़सगत करून घेत आहेत. चार वर्षातल्या राजकारणातून हा मुलगा खुप काही शिकला व तावून सुलाखून निघाला आहे.

(२६/१०/२०१६)

लंबी रेस का घोडा

akhilesh cartoon के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशात सत्ताधारी पक्षामध्ये माजलेली बेबंदशाही अपरिहार्य होती. तिची सुरूवातच त्या पक्षाच्या साडेचार वर्षापुर्वीच्या यशात सामावलेली होती. तेव्हा मायावती सत्तेत होत्या आणि त्यांच्या एकखांबी तंबूचा कंटाळा आलेल्या मतदाराने जवळचा पर्याय म्हणून समाजवादी पक्षाला बहूमत बहाल केलेले होते. तेव्हा त्याला प्रचंड विजय मानून अनेकांनी मुलायम व त्यांचे सुपुत्र अखिलेश यांची पाठ थोपटली होती. पण जिंकलेल्या हरलेल्या जागांपेक्षा मिळालेल्या मतांकडे कोणी ढुंकून बघितले नाही. जी स्थिती मुलायम मायावती यांच्या पक्षाची होती, तीच तिसर्‍या चौथ्या क्रमांकावर फ़ेकल्या गेलेल्या भाजपा व कॉग्रेस पक्षाची होती. तशीच काहीशी सैरभैर मानसिकता विश्लेषण करणार्‍या उथळ पत्रकारांची होती. चौरंगी लढाईत जागा कमीअधिक होत असल्या, तरी कुठलाही पक्ष निर्णायक रितीने पराभूत झालेला नसतो, की संपलेला नसतो. त्याची प्रचिती अडीच वर्षांनी लोकसभा मतदानात आलेली होती. विधानसभेत २० टक्केपेक्षा कमी मते मिळवणार्‍या भाजपाला मोदींसारखा नेता मिळाला आणि त्यांची मते दुप्पट होऊन त्यांनी ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. म्हणून अन्य दोन प्रमुख असे पक्ष संपलेले नव्हते. मुलायमना ५ जागा मिळाल्या होत्या आणि मायावती एकही जागा जिंकू शकलेल्या नव्हत्या. पण त्या दोघांनी मिळवलेली मते लक्षणिय होती. हे मतांच्या टक्केवारीचे गणित समजून घेतले, तरच मतदानाच्या निकालांचे खरे वास्तविक विश्लेषण करता येत असते. मुलायम तिथेच चुकले आणि त्यांनी साडेचार वर्षापुर्वी आपल्या लाडक्या पुत्राच्या हाती सत्तासुत्रे सोपवून राजकारणाचा विचका केलाच. पण कुटुंबातल्या बेबनावालाही खतपाणी घातले. त्या कौटुंबिक बेबंदशाहीचीच किंमत आज त्यांना राजकारणा़त चुकवावी लागते आहे. गेल्या दोन दशकात उभ्या केलेल्या पक्षाच्या चिंधड्या उघड्या डोळ्यांनी बघण्य़ाचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आलेले आहे.

दोन भावांतील वितुष्ट पराकोटीला गेले आहे आणि दोन बायकांच्या सापत्नभावाने समाजवादी पक्षाला ग्रासलेले आहे. ज्या विचारधारेच्या आधाराने मुलायम मोठे झाले, त्याच लोहियावादाचे प्रणेते डॉ. राममनोहर लोहियांनी ‘भाईभतीजावाद’ असा शब्द राजकारणात प्रचलित केला होता. तेव्हा प्रबळ असलेल्या कॉग्रेसी राजकारणात घराणेशाही बोकाळू लागली होती. तिची हेटाळणी करण्यासाठीच लोहियांनी हा शब्द वापरात आणला होता. आज त्यांच्याच प्रतिमेला पुष्पहार घालून समारंभ सुरू करणार्‍या प्रत्येक पक्षाला, आज नेमक्या त्याच भाईभतीजावादाने पोखरून काढले आहे. मुलायमनंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून दबा धरून बसलेल्या शिवपाल यादवना त्यात वंचित ठेवण्यासाठी तिसरा भाऊ रामगोपाल यादवने, पुतण्याला पुढे करून सख्ख्या भावाचा पतंग कापला होता. तेव्हा मुलायमनी त्याला साथ दिली होती. आज तोच पुत्र शिरजोर होऊन चुलत्याला हाताशी धरून मुलायमना जुमानत नाही. आज मुलायमनी आपले वजन शिवपालच्या पारड्यात टाकले असताना डोईजड झालेला पुत्र अखिलेश पक्षाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला सिद्ध झाला आहे. त्याचा अर्थही मुलायमना लावता आलेला नाही. गोष्ट सरळ आहे. लौकरच विधानसभा निवडणूका होत आहेत आणि त्यात आपल्यालाच मुख्यंमंत्री करण्याची हमी नसेल, तर अखिलेश पक्षाचे तारू बुडाले तरी बेहत्तर अशा हट्टाला पेटलेला आहे. आपल्याकडे सत्ता नसेल तर पक्षाकडे सत्ता असून काय लाभ; अशी त्याची मानसिकता आहेच. पण पक्षाची सत्ता आपल्या हितशत्रूंकडे गेली, तर अधिकच त्रास दिला जाईल. त्यापेक्षा सरळ शत्रुकडे सत्ता गेली तरी उत्तम, असे अखिलेशचे गणित आहे. तो कोणालाही दाद देण्याच्या मनस्थितीत नसेल, तर त्याला विश्वासात घेण्याला पर्याय नव्हता. पित्यालाही यापेक्षा वेगळे काही शक्य नव्हते. पण मुलायम अजून हे ओळखू शकले नाहीत, तिथे गडबड झाली.

गेला महिनाभर पक्षांतर्गत ह्या लाथाळ्या चालू आहेत आणि मुलायमचा शब्द अखेरचा, असे सांगत प्रत्येकजण मुलायमच्या प्रत्येक निर्णयाला पायदळी तुडवत मनमानी करतो आहे. आधी अखिलेशनी शिवपालची महत्वाची खाती काढून घेतली, तर त्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचा पवित्रा मुलायमनी घेतला. पण दोघांना अखेरीस माघार घेऊन तडजोड करावी लागली. त्यातूनच पित्याने धडा घेतला असता, तर आजची कडेलोटाची स्थिती आलीच नसती. पोराला पंख फ़ुटले आहेत आणि त्याला आता पित्याच्या पंखाखाली रहाण्याची गरज उरलेली नसल्याचे तोच कृतीतून दाखवून देतो आहे. उलट जे मुलायमना घोड्यावर बसवून आपले डाव खेळत आहेत, त्यांच्यात स्वबळावर आपले हेतू साध्य करण्याचीही कुवत नाही. म्हणूनच मुलायमनी आपली प्रतिष्ठा व शक्ती अखिलेश विरोधकांच्या डावपेचात पणाला लावण्याचे काही कारण नव्हते. हे महिनाभर आधी स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुलायमनी शिवपाल आदी लोकांना वेसण घातली असती, तर अखिलेशला कडेलोटावर उभे करण्याचा प्रसंग आला नसता, की त्याने पक्षाला कडेलोटावर आणुन ठेवण्याची पाळी आली नसती. जेव्हा अशी स्थिती येते, तेव्हा तिचे लाभ उठवायला पक्षाबाहेरची राजकीय गिधाडे आभाळात घिरट्या घालत असतात. आताही तेच झाले आहे. अखिलेश आपल्याला समाजवादी पक्षाचा मुडदा पाडून देणार, अशा समजूतीने अनेक मुलायमशत्रू सज्ज आहेत आणि मुलायमपुत्रच त्यांना मेजवानी देण्यास सज्ज झाला आहे. कुठूनही आता पित्याशी वैर आलेच आहे, तर हरण्यासारखे अखिलेशपाशी काहीही रहिलेले नाही. मग त्याने घाबरावे कुणाला व कशाला? म्हणतात ना, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही? अखिलेशची मानसिकता नेमकी तशीच आहे. पित्याकडून अधिक काही मिळण्यासारखे राहिलेले नाही आणि पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हेही नाहीत. मग त्याने मान खाली घालून अपमान कशाला गिळावा?

लढून पदरात पडलेला पराभवही सन्माननीय मानला जातो. उलट शरणागती पत्करून मिळवलेले राज्यही लज्जस्पद समजले जाते. प्राथमिक मतचाचणीत समाजवादी पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला असताना, त्या पक्षात माजलेली बेबंदशाही आत्मविनाशाकडे घेऊन जाणारी आहे. त्यात आपण स्वाभिमानाने लढलो, असे चित्र अखिलेश निर्माण करू शकला, तरी राजकारणात त्याची प्रभावी व्यक्ती म्हणून प्रतिमा उभी राहू शकते. आज त्याच मार्गाने हा मुलगा निघालेला आहे. त्याला समाजवादी पक्षात असलेल्या तरूणवर्गाचा पाठींबा मिळालेला आहे. तर जुन्या पिढीतल्या कालबाह्य नेत्यांच्या बळावर मुलायमना पक्षावर निर्विवाद हुकूमत राखणे अशक्य झाले आहे. मुलायमना एक बाजू निवडणे भाग आहे आणि त्यांनी कालबाह्य सहकार्‍यांच्या व भावाच्या नादी लागून चुकीची निवड केली आहे. आगामी राजकारणात त्यांचा वारसा वयाने पुढे गेलेले बंधू चालवू शकणार नाहीत. अखिलेशच्या स्वयंभू होण्यातून मुलायमचीच पताका पुढे फ़डकणार आहे. जे धाडस पित्याच्या संमतीशिवाय अखिलेशने करून दाखवले, त्याचे कौतुक मुलायम करू शकले असते. आज त्यांच्या पाठीशी जमा झालेला गोतावळा दिर्घकाळ विरोधात वा अन्य पक्षात जाऊन माघारी आलेला आहे. त्यापैकी कोणी स्वबळावर काहीही चमक दाखवू शकलेला नाही. उलट अखिलेश पुर्णपणे स्वयंभू नसेल, पण प्रतिकुल काळामध्ये पक्षाला उभारी देण्यापासून साडेचार वर्षे सत्तेची धुरा संभाळून दाखवू शकलेला तरूण नेता आहे. मुलायमनी त्यालाच अंगावर घेऊन मोठी चुक केली आहे. नजिकच्या लढाईत अखिलेश यश वा सत्ता मिळवू शकणारही नाही. पण उतरप्रदेशच्या समाजवादी राजकारणातला तो लंबी रेसका घोडा नक्कीच आहे. त्यात हताश कॉग्रेसी, नव्या पिढीतले समाजवादी व मुलायमचे अन्य राज्यातले जुने सहकारी; यांच्या मदतीने अखिलेश नवा ‘मुलायम’ साकार करू शकेल, असे नक्कीच म्हणता येईल.

(२४/१०/२०१६)

कोट्यवधीच्या मल्टीप्लेक्स रहस्य

ADHM के लिए चित्र परिणाम

अलिकडे सर्वच हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या आधी बहुतेक वाहिन्यांवर त्यातील कलाकारांच्या गप्पाटप्पा दाखवल्या जात असतात. मग असे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दोन दिवस उलटण्यापुर्वीच त्यांनी किती कोटींचा धंदा केला, त्याचे मोठमोठे डोळे दिपवणारे आकडे वाहिन्यांच्या बातम्यातून झळकवले जात असतात. दोनतीनशे कोटी रुपयांचा गल्ला गोळा करणार्‍या या चित्रपटांचे कौतुक फ़ार झाले आहे. अमिर खान, शहारुख खान किंवा सलमान खान अशा मोजक्याच अभिनेत्यांचे चित्रपट कोट्यवधीचा धंदा करतात. पण तितक्याच गतीने पडद्यावर झळकणार्‍या अक्षयकुमार वा अजय देवगण किंवा बाकी कुणा अभिनेत्यांचे चित्रपट तसे तीनचारशे कोटी रुपयांचा धंदा करताना आपल्याला ऐकायला मिळत नाही. हे काय रहस्य आहे? अशी काय मोठी किमया ठरलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या चित्रपटात वा कथानकात असते, की त्यांनी कोट्यवधीचा गल्ला जमवावा. इतरांना तशी लॉटरी कधीच लागू नये? कुछ तो गोलमाल है! हे रहस्य चित्रपट प्रेक्षकांच्या गर्दीचे आहे, की अन्य काही जादू त्यात दडलेली आहे? आताही करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या निमीत्ताने ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मोठ्या पटगृहंनी नकार दिला, तेव्हा जोहर वा त्याची गॅंग गडबडलेली नव्हती. पण जेव्हा मनसेने त्याच्या चित्रपटाच्या मल्टीप्लेक्स पटगृहातल्या प्रदर्शनात गडबड करण्याचा इशारा दिला, तेव्हा ही मंडळी धाडकन कोसळली आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मागितले आणि दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे सांगतील, त्या अटीवर तडजोड केलेली आहे. तितकी शरणागती त्यांनी मोठा थिएटरमध्ये प्रदर्शनात प्रतिबंध आल्यावर पत्करलेली नव्हती. मग हे मल्टीप्लेक्स काय रहस्य आहे?

मल्टीप्लेक्स पटगृहात प्रचंड महागडी तिकीटे असतात. सामान्य पटगृहातील तिकीटाच्या अनेकपटीने महाग तिकीटे मल्टिप्लेक्समध्ये असतात. अशा मल्टीप्लेक्स पटगृहात दोन वर्षापुर्वी मराठी चित्रपट लावण्याची सक्ती सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी केली. तेव्हा मोठा कल्लोळ माजला होता. दिवसातला एकही खेळ मराठी चित्रपटाला देण्यास नाकारणार्‍या याच मल्टीप्लेक्स थिएटरात पाच-पाच खेळ अशा खर्चिक चित्रपटाचे होत असतात. तेही हाऊसफ़ुल्ल असतात. आठवड्याभरातच तिथे कोट्यवधीचा गल्ला हे चित्रपट जमा करतात असा दावा आहे. खरोखरच इतक्या महागड्या मल्टीप्लेक्समध्ये लोक इतकी गर्दी करून सलमान वा शाहरुखचे चित्रपट बघायला जातात काय? खरोखरच तिथे या चित्रपटांवर दौलतजादा करायला पैसेवाल्यांची अशी झुंबड उडत असते काय? सातत्याने तिथे हाऊसफ़ुल्ल गर्दी असते काय? कारण अनेकदा असे चित्रपट सामान्य पटगृहात गर्दी खेचत नसतात आणि त्याच चित्रपटांनी मल्टीप्लेक्समध्ये करोडो रुपये जमा केल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. ही तफ़ावत आहे की काही गल्लत आहे? कारण चित्रपट बघायला जाणारा प्रेक्षक रोखीत पैसे मोजत असतो आणि तो पैसे मोजणारा कोण, त्याची नोंद कुठेच होत नसते. त्यामुळे थिएटर मोकळे आणि बाहेर हाऊसफ़ुल्लचा फ़लक लावून, काळा पैसा पांढरा करण्याची काही चलाखी इथे होत असावी काय? कुछ तो गोलमाल है भाई! हे तथाकथित ठराविक निर्माते व त्यांचे अभिनेते मल्टीप्लेक्सच्या प्रदर्शनाविषयी हळवे कशाला असतात? हे म्हणूनच शोधण्याची गरज आहे. कारण करण जोहर मनसेच्या मल्टीप्लेक्सच्या धमकीनंतर वठणीवर आलेला आहे. तावडे यांच्याही मराठी चित्रपट दाखवण्याच्या सक्तीवर मल्टीप्लेक्सच नाराज होते. हा काही तरी वेगळा मामला आहे. त्याचा छडा कोणीतरी लावला पाहिजे.

मल्टीप्लेक्स हा अतिश्रीमंतांसाठीचा मामला मानला जातो. तिथे खर्चिक तिकीटे असतात आणि तिथेच भरपूर गल्ला गोळा होतो, असेही भासवले जाते. खरोखर तिथे इतकी कमाई होते, की सर्व निव्वळ देखावा आहे? कारण जे चित्रपट असा गल्ला गोळा करतात, त्यात अशी कुठलीही खास कथा नसते, की काही खास कलात्मकता नसते. मग हा कुठला प्रेक्षक आहे, जो इतक्या मोठ्या संख्येने महागडी तिकीटे घेऊन यांचा गल्ला भरायला झुंबड करतो? रोजच्या रोज तिथे हाऊसफ़ुल्लचे फ़लक लागतात, ते खेळ प्रत्यक्षात किती गर्दीत होत असतात, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. कारण दिवसेदिवस या ठराविक लोकांचे चित्रपट जो गल्ला गोळा करत आहेत, ते आकडे शंकास्पद बनत चालले आहेत. काही मार्गाने रोखीतला पैसा पांढरा करून घेण्याची खेळी यातून चालते काय? त्यासाठी चित्रपटांचे माध्यम वापरले जाते काय? मग त्यातले पैसेच असे निर्माते अन्य मार्गाने आपल्या बोलवित्या धन्याचे आदेश मानून पाकिस्तानी कलाकारांना पुरवण्याचा उद्योग करतात काय? काही प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. अनेक वर्षापासून हिंदी चित्रपटातील दाऊदचे साम्राज्य लपून राहिलेले नाही. मध्यंतरी त्याचा खुप गवगवा झाला होता. अलिकडे त्याबद्दल फ़ारसे बोलले जात नाही. पण बॉलिवुड अणि माफ़ियांचे संबंध नवे नाहीत. त्यांनी काळ्यापैशाचा सफ़ेद पैसा बनवण्यासाठी हा नवा हायवे उभा केलेला नसेल ना? अन्यथा ठराविक अभिनेत्यांचेच चित्रपट कोट्यावधीचा गल्ला गोळा करण्यामागे कुठले तर्कशास्त्र सापडत नाही. सध्याच्या स्थितीत करण जोहरच्या चित्रपटाचे सामान्य पटगृहातील प्रदर्शन रोखले गेल्यावरची अलिप्तता आणि मल्टीप्लेक्सच्या इशार्‍यानंतरची धावपळ; चकीत करून सोडणारी आहे. म्हणूनच सरकारने तपासयंत्रणा कामाला लावू्न, मल्टीप्लेक्समध्ये गोळा होणार्‍या कोट्यवधी रुपयांचे रहस्य उलगडण्याची गरज आहे.

कुठला वर्ग अशा चित्रपटांसाठी गर्दी करतो? खरोखरच अशी गर्दी होते काय? त्यात आगावू तिकीटविक्री किती होते? प्रत्येक खेळाला किती लोक उपस्थित असतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याने काही थक्क करून सोडणार्‍या गोष्टी उजेडात येऊ शकतील. पाक कलाकारांचे समर्थक आणि मल्टीप्लेक्स यांच्यात काही विशेष नातेगोते आहेत काय? कारण दाऊद पाकिस्तानात दडी मारून बसला आहे आणि त्याचा जुनाच संबंध बॉलिवुडशी आहे. आता त्याने पाकिस्तानी कलाकारांना त्यातूनच भारताच्या माथी मारण्याचा काही खेळ चालविला आहे काय? अशाही प्रश्नांची उत्तरे त्यातून हाती लागू शकतील. मल्टीप्लेक्स मोठ्या शहरात, महानगरातच आहेत. बाकी पटगृहे देशभर पसरलेली आहेत, लहान शहरांमध्ये आहेत. अशा पटगृहात सिनेमा प्रदर्शित होत नसल्याची चिंता करण जोहरच्य्या गॅंगला नव्हती. यामागे मल्टिप्लेक्स हे रहस्य आहे. त्यामुळे जोहरचा चित्रपट प्रदर्शित होण्यापेक्षा अशा रहस्याचा भेद होण्याला जास्त महत्व आहे. सैराट चित्रपटानेही शंभर कोटीचा गल्ला जमवला म्हणतात. मग हेच मल्टीप्लेक्स मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी उदासिन कशाला होते? सामान्य पटगृहातून जमा होणारा गल्ला व मल्टीप्लेक्समध्ये या कोट्याधीश चित्रपटांचा जमा होणारा गल्ला; यांचे प्रमाणही शंकास्पद असू शकेल. ती शंका खरी असेल, तर हे कलाकार वा त्यांची कलाकृती, सांस्कृतिक असण्यापेक्षा संस्कृतीच्या मुखाट्यातली गुन्हेगारी असू शकते. मनसे व करण जोहर यांच्यात मध्यस्थी करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याही विषयात गंभीरपणे लक्ष घालावे. तपास यंत्रणांना थोडा मागोवा घ्यायला लावावे. त्यांचा गल्ला खरा असेल, तर बिघडत नाही. पण दाखवला जातो तितका तो खरा नसेल, तर देशावरील तेही एक संकट ठरू शकते. म्हणूनच मल्टीप्लेक्स आणि त्यात जमा होणारा गल्ला, यांचा शोध व्हायला हवा आहे.

(२४/१०/२०१६)

‘राज’निती की मोदीनिती?

MNS modi के लिए चित्र परिणाम

राजकारणाला कुटनिती असेही म्हटले जाते. त्यात खेळी एक खेळली जात असते, पण डाव भलताच साधला जात असतो. किंबहूना अनेकदा भलताच डाव साधण्यासाठी इतरांच्या डोळ्यात धुळफ़ेक करणारी खेळीही केली जात असते. उदाहरणार्थ उरीच्या घातपातानंतर पाकला चोख उत्तर देण्याची भाषा केली जात होती. प्रत्येकजण सैनिकी कारवाईच्या दिशेने विचार करत असताना सरकारी माध्यमातून मात्र अन्य पर्यायांवर चर्चा चालू असल्याचा बेमालून देखावा उभा करण्यात आला होता. सर्जिकल स्ट्राईकपासून घातपाती फ़िदायीन हल्ले पाकिस्तानात कसे होऊ शकतील, याची आरंभी चर्चा चालली होती. पण त्याला कुठलाही प्रतिसाद न देता मोदी सरकार सिंधू खोर्‍याचे पाकला जाणारे पाणि किंवा मोस्ट फ़ेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचे पर्याय चाचपून बघत असल्याच्या बातम्या येत राहिल्या. जेणे करून प्रत्यक्ष लष्करी कारवाईचा मुद्दा साफ़ मागे पडला. पण २९ सप्टेंबर रोजी सकाळी भारतीय लष्करी प्रवक्त्याचे थेट पाक हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याची घोषणाच करून टाकली. मात्र सिंधूखोर्‍याचे पाणी वगैरे विषयावर पुढे कुठलीही हालचाल झाली नाही. याला कुटनिती म्हणतात. सर्जिकल स्ट्राईक करायचा तर पाकिस्तान व पाक सेनेला साफ़ गाफ़ील ठेवण्याची गरज होती आणि त्यासाठीच भारतीय माध्यमातूनही भलत्याच चर्चा रंगवल्या जातील, याची मोदी सरकारने पुरेपुर काळजी घेतली होती. सार्क सदस्य देशांनी आधी इस्लामाबाद परिषदेवर बहिष्कार जाहिर केला आणि भारताने नंतर केला. म्हणजेच अनेक खेळाडू मोदी सरकारला हवे तशा खेळी करत गेले. त्यांना भारत सरकारने तसे करायला भाग पाडले, असे कोणी उघड म्हणू शकत नाही. पण त्यामागची प्रेरणा भारतच होता, हेही कोणी नाकारू शकत नाही. कुटनितीची हीच खासियत असते. मनसे व करण जोहर प्रकरणात अशीच काही ‘राज’निती दडलेली असू शकते काय?

ही सगळी गडबड चालू असताना भारत सरकारने पाकला एकाकी पाडण्याचे धोरण जाहिर केले आहे. अवघ्या जगाला दहशतवादी देश म्हणून पाकिस्तानला एकाकी पाडा, असे आवाहनही भारताने केलेले आहे. पण तसे काही करण्याच्या आधी भारत सरकारने पाकला एकाकी पाडण्यासाठी काय केले आहे? मोस्ट फ़ेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेण्य़ाचे पाऊलही उचललेले नाही. पाकिस्तानने भारतीय चित्रपट व टिव्ही मालिकांवर प्रतिबंध लागू केलेला असला, तरी भारत सरकारने पाक कलाकार वा कला उत्पादनावर तसा कुठलाही निर्बंध लागू केलेला नाही. कारण तसे छोटे पाऊल उचलले तरी तात्काळ असहिष्णूता म्हणून हलकल्लोळ इथलेच भारतीय कलावंत, पुरोगामी बुद्धीमंत करणार हे मोदी जाणून होते. म्हणुनच तसा कुठलाही निर्णय मोदी सरकारने घेतला नाही. पण तशा प्रक्षुब्ध भावना विविध गोटातून येत असताना, त्यालाही लगाम लावला नाही. यातली पहिली प्रतिक्रीया मनसेने दिलेली होती. पाक कलाकारांना भारत सोडून जाण्याचा इशारा मनसेने दिला आणि विनाविलंब पाक कलाकारांनी काढता पाय घेतला. मग ज्यांनी अशा पाक कलाकारांना आपल्या कलाकृतीमध्ये सामावून घेतले आहे, त्यांच्या प्रदर्शनाचा मामला येणारच होता. तो आला आणि कलाक्षेत्रातच दुफ़ळी माजली. ते वादळ माजू देण्यात आले. मग नेहमीप्रमाणे काही महाभाग पाक कलाकार व कलेचे स्वातंत्र्य असला तमाशा करायला पुढे आलेच. बंदी घालून मोदी सरकार त्यांची नांगी ठेचू शकत होते. पण हा साप आपल्या हाताने मारण्यापेक्षा पाहुण्याच्या हाताने मारायचा डाव खेळला गेला. जे लोक कलेच्या स्वातंत्र्याची बाष्कळ बडबड करीत होते, त्यांनाच शरणागत येण्यास ही खेळी लाभदायक ठरली. कारण सरकारने त्यांच्या मुसक्या बांधलेल्या नाहीत, तर त्यांनीच आपल्या मुसक्या बांधून, त्याचे दोर राज ठाकरे यांच्या हाती देण्याची नामुष्की पत्करली.

एक सेकंद वेगळा विचार करून बघा. खरेच मोदींना पाक कलाकार वा त्यांच्या चित्रपटावर बंदी घालू नये, असे वाटत असेल काय? त्यांचीही जरूर तशीच इच्छा असेल. पण जगाला भारतीय पंतप्रधानाचा इतका संकुचित चेहरा दिसणे योग्य नाही. म्हणून मोदींना आपल्या मोहाला वेसण घालणे भाग असते. सहाजिकच पाकने भारतीय कलाकृतींना बंदी घातली असतानाही भारत सरकारने पाक कलाकारांना संधी नाकारलेली नाही; असा आपला उदात्त चेहरा मोदींनी जगासमोर मांडला आहे. धोरणात्मक बाबतीत भारताने पाक कलाकारांना प्रवेश मोकळा ठेवला आहे. पण तरीही त्यांना आज भारतात येणे अशक्य आहे. कारण इथल्या पक्ष संघटनांनी तसा प्रतिबंध घातला आहे. तो कायदेशीर नाही. पण तसे कोणी करायचे म्हटले, तर सरकारला त्यांना संरक्षण द्यावेच लागेल. त्यापेक्षा त्यांना इथे कोणी बोलावूच नये, अशी व्यवस्था झाली आहे ना? मनसेच्या दबावाखाली चित्रपट निर्माता संघटनेनेच तशी बंदी आपल्या परीने लावल्याचे कबुल केलेले आहे. राज ठाकरे वा मनसेने करण जोहरच्या चित्रपटाला प्रदर्शनाला त्रास देऊ नये, म्हणून ही बंदी घालण्याची अट पाकसमर्थक निर्मात्यांनी इथे मान्य केली आहे. त्याच्या परिणामी सरकारने बंदी घातली नसली, तरी व्यवहारी बंदी लागू झाली आहे. हे सर्व सुखासुखी राज ठाकरेंचा दबदबा आहे, म्हणून घडून गेले असे कोणाला वाटते का? तर तो माणूस मुर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे. हे सर्व मनसे व भारत सरकारच्या संगनमतानेच झालेले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांना निर्माते भेटले आणि दुसर्‍याच दिवशी त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची भेट घेतली. तेव्हाच त्यांनी राज ठाकरे यांनाही बोलावले आणि दोन्ही बाजूंनी आमनेसामने बसून निर्णय घेतला. थोडक्यात सरकारने बंदी घातली नाही. पण पाक कलाकारांच्या भारतात येण्य़ावर व्यवहारी निर्बंध लागू झाले.

जगासमोर मनसे व राज ठाकरे आडमुठे ठरले. मोदी सरकार उदारमतवादी दिसले. साप मारला गेला आणि मोदी सरकारची लाठीही तुटली नाही. याचा अर्थ इतकाच, की राजच्या हाती काठी देऊन मोदी सरकारने पाकप्रेमी भारतीय चित्रपट निर्मात्यांना वठणीवर आणलेले आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशा आक्रमक प्रतिमेचा राज ठाकरे यांना आपली छाप पाडायला उपयोग आहेच. तिसरी बाजू अशी, की शिवसेना मनसेच्या वादात पुन्हा डोके वर काढण्याची संधी राजना मिळालेली आहे. असहिष्णु म्हणून मोदी सरकारला मागल्या दोन अर्षात बदनाम करणार्‍यांची नांगीही ठेचली गेली आहे. आज पाक कलाकारांच्या बाजूने उभे राहिलेल्यांचे चेहरे बारकाईने न्याहाळा. त्यात तेच लोक दिसतील, ज्यांनी पुण्याच्या फ़िल्म इन्स्टीट्युटच्या संपापासून नेहरू विद्यापीठापर्यंत प्रत्येक बाबतीत मोदी सरकारला असहिष्णू ठरवण्याचा आटापिटा केलेला होता. पाक कलाकारांवर बंदी घालण्यातून त्यांच्या हाती कोलितच मिळाले असते. ती संधी राजला पुढे करून मोदींनी हिरावून घेतली. व्यवहारात पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात घेण्याचा अट्टाहासही मोडून काढला आहे. मोदीनितीतली ही ‘राज’निती भाजपावाल्यांनाही उमजलेली नाही. म्हणूनच राज ठाकरे वा मनसेवर तोडपाण्याचे आरोप करण्यात भाजपाच्या तोंडाळ समर्थकांचा पुढाकार दिसून आला. अशा लोकांना हाताशी धरून किंवा त्यांच्यावर विसंबून देशाचा कारभार करणे, मोदींना किती अवघड आहे, ते यातून लक्षात येऊ शकते. त्यासाठीच मग मोदींना पक्षाबाहेरचे वा समविचारी लोक हाताशी धरून आपले राजकारण पुढे न्यावे लागणार आहे. कारण असे भक्त व आंधळे समर्थक मदतीपेक्षा अडथळा अधिक निर्माण करत असतात. राजकीय डावपेचात दिसणार्‍या खेळीपेक्षा व्यवहारी परिणामांना खुप मोठे महत्व असते. हे ज्यांना उमजेल, त्यांना वर्षा बंगल्यावरची बैठक कशी व कोणी घडवून आणली, त्याचे अर्थ उलगडू शकतील.

(२५/१०/२०१६)