Saturday, March 25, 2017

मनी वसे ते स्वप्नी दिसे

evm machine के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशच्या ताज्या विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यावर मायावती यांना एकूणच मतदानाविषयी शंका निर्माण झाली. त्यांनी तसे उघड बोलून दाखवले. त्यांना आपण सत्तेत येऊ अशी अपेक्षा होती आणि तिचा पुरता बोजवारा उडाला. सत्तेची गोष्ट दूर राहिली. मायावतींच्या पक्षाला साधा विरोधी पक्ष होण्याइतक्याही जागा जिंकता आल्या नाहीत. त्याच्याही पुढली शोकांतिका म्हणजे मायावती राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि पुढल्या वर्षी निवृत्त होतील. तेव्हा पुन्हा तिथेही निवडून येण्याइतके संख्याबळ त्यांच्या वाट्याला आलेले नाही. सहाजिकच त्यांचा राजकारण व निवडणूकीविषयी पुरता भ्रमनिरास झाला असल्यास नवल नाही. अर्थात त्यात एकट्या मायावतीच नाहीत. समाजवादी पक्षाचे पराभूत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापासून कॉग्रेसचेही अनेक नेते समाविष्ट आहेत. म्हणूनच की काय, त्यापैकी अनेकांनी आगामी काळात मतदान यंत्राचा वापर थांबवण्याची मागणी केली आहे. आपले काय चुकले, त्याचा विचारही यापैकी कोणाला करावा असे वाटलेले नाही. भाजपाला इतकी मते मिळालेलीच नाहीत, तर अन्य कुठल्याही पक्षाच्या दिलेले मत यंत्राने परस्पर फ़िरवून भाजपाच्या खात्यात ढकलले असल्याची आशंका, यापैकी प्रत्येक नेत्याने व्यक्त केलेली आहे. त्यांना संपुर्णपणे गैरलागू म्हणता येणार नाही. आपल्या मनात असते, तेच खरे वा तसेच जग चालते, अशी अनेकांची पक्की समजूत असते. त्यानुसारच ह्या प्रतिक्रीया व्यक्त झालेल्या आहेत. कारण राजकीय पक्ष असेच वागत असतील, तर यंत्रानेही तसेच वागावे; अशी या लोकांची अपेक्षा दिसते. म्हणजे असे की समजा, कुणालाच बहूमत मिळाले नसते तर मायावती कशा वागल्या असत्या?

१९९३ सालात उत्तरप्रदेशात भाजपाचा दबदबा होता आणि त्याला हरवणे शक्य नसल्याने मुलायमसिंग यांनी पुढाकार घेऊन कांशिराम यांच्या बहूजन समाज पक्षाशी निवडणूकपुर्व युती केलेली होती. त्या दोघांना मिळून बहूमत मिळाले नाही तरी भाजपाचेहीबहूमत हुकलेले होते. सहाजिकच भाजपा सोडून सर्व पक्षांनी पुरोगामीत्व टिकून रहाण्यासाठी सपा-बसपा युतीला पाठींबा दिला आणि नवे सरकार बनवले होते. तेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या कॉग्रेससहीत अन्य लहान पक्षांनीही मुलायमसिंग सरकारला पाठींबा दिलेला होता. पण अवघ्या वर्षभरात सपा-बसपा यांच्यात बिनसले आणि बसपाच्या नेत्या मायावतींनी मुलायमचा पाठींबा काढून घेतला. पुढे जाऊन भाजपाच्या पाठींब्याने मायावतीच मुख्यमंत्री होऊन गेल्या. तेव्हा त्यांनी भाजपाचा पाठींबा घ्यावा, असा कौल मतदाराने दिलेला नव्हता, की मायावतींना सत्तेवर बसवण्याचा कौल भाजपाच्या मतदाराने दिलेला नव्हता. पण दोघांना मत देणार्‍यांच्या इच्छा व अपेक्षा पायदळी तुडवून दोन्ही पक्षांनी साटेलोटे केले होते. मतदाराची मते भलतीकडे फ़िरवून दाखवलेली होती. प्रचार करताना किंवा मते मागताना पक्ष वा नेते ज्या कारणास्तव उभे ठाकलेले असतात, त्याला निकालानंतर हरताळ फ़ासला जाण्याची ती पहिलीच वेळ नव्हती. त्याहीपुर्वी अनेकदा असे झालेले होते आणि मतदारालाच थक्क होण्याची पाळी राजकीय पक्षांनी अनेकदा आणलेली आहे. मग कालपरवा गोव्यात झालेली अजब आघाडी असो, किंवा नुकत्याच झालेल्य महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणूका असोत. मतदाराच्या कौलाचा विचका प्रत्येक राजकीय पक्षांनी करून दाखवला आहे. ज्यांना नाकारले त्यांनाच बदलण्यासाठी दिलेल्या मतांच्या बळावर पुन्हा तेच सत्ताधारी सत्तेत विराजमान झालेले आपण बघत असतो. ही किमया कुठल्या मतदान यंत्राने केलेली नाही.

यंत्राने काय केले, असा सवाल मायावती वा अन्य राजकीय नेते विचारतात. तेव्हा त्यांना मतदान यंत्रेही माणसासारखी मतलबी वा दगाबाज असतात असे वाटते काय? यंत्राला मन नसते म्हणूनच कुठलाही स्वार्थ परमार्थ नसतो. त्याला लबाडी करता येत नाही. ते यंत्र वापरणारा नक्की गफ़लती करू शकतो. पण जे आदेश वा संकेत मिळालेले असतात, त्याच्या तसूभर पलिकडे कुठले यंत्र जात नाही. आपल्या फ़ायदा तोट्याचा विचार यंत्र करू शकत नाही. त्याला भावनाच नसतात, रागलोभ नसतात. म्हणूनच यंत्र मिळालेल्या हुकूमाचा ताबेदार असते. अशा निर्जीव यंत्राने प्रामाणिक असायला हवे आणि माणसे वा राजकीय पक्षांनी मात्र लबाडी करण्यास हरकत नाही, असे मायावतींना म्हणायचे आहे काय? मते एका कारणासाठी मागायची आणि नंतर त्याच मतांमुळे मिळालेले संख्याबळ अन्य कुठल्या भलत्या हेतूसाठी वापरायचे, असे यंत्र वागत नाही. पण राजकीय नेते व पक्ष बिनदिक्कत तसे दगाबाजी करीत असतात. मुलायमशी युती करून मिळवलेल्या जागा या बसपाला भाजपा विरोधात मिळालेल्या होत्या. पण त्याच जागा मायावतींनी मुख्यमंत्रीपद पदरात पाडण्यासाठी बेधडक वापरल्या. तेव्हा भाजपाविरोधी मते परस्पर भाजपाकडे वळवली नव्हती का? गेल्या पाच वर्षात आपल्यावरच्या खटल्यांना स्थगिती देण्यासाठी मायावतींनी लोकसभा राज्यसभेत विविध विषयात कॉग्रेस विरोधी भाषणे देत, त्याच कॉग्रेस पक्षाला आपली मते बहाल केलेली नव्हती काय? एफ़डीआयच्या विरोधात बोलून पुन्हा त्यालाच मत देणार्‍या मायावतीही मते फ़िरवणारे यंत्र आहेत काय? बहुधा तसेच असावे. म्हणून त्यांना मतदान यंत्रेही तशीच वागत असल्याचा भास झाला असावा. अर्थात मायावतीच नाहीत, प्रत्येक नेता किंवा पक्ष आजकाल तितकाच बेछूट व बेताल वागतो आहे. सहाजिकच त्यांना यंत्राने तटस्थपणे नोंदवलेली प्रामाणिक मते खोटी वाटली तर नवल नाही.

गंमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व लोक स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. पुरोगामी म्हणजे जो येऊ घातलेल्या युगाचा स्वागतकर्ता असतो आणि कालबाह्य झालेल्या जुन्या गोष्टींचा त्याग करायला सतत तप्तर असतो. नरेंद्र मोदी हे फ़ार शिकलेले नाहीत म्हणून हिणवले जाते. पोस्टल ग्राज्युएट म्हणून त्यांची हेटाळणी झाली आहे. पण हाच माणूस मागली दहाबारा वर्षे नव्या युगाला सातत्याने प्रतिसाद देतो आहे. एकविसावे शतक तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे असल्याचे मान्य करून, मानवी जीवन सुकर होण्यासाठी नवनव्या तंत्राचा उपयोग करण्याचा या ‘अपुरे शिक्षण असलेल्या’ पंतप्रधानाला घ्यास आहे. उलट्या बाजूला सुशिक्षित वा अतिशिक्षित केजरीवालसारखे नेते आहेत. इंजिनीयर असून केजरीवाल मतदान यंत्रावर अविश्वास दाखवत आहेत. पुन्हा कागदी मतपत्रिकेचा आग्रह धरत आहेत. मग यातला पुरोगामी कोण म्हणावा? जो आगामी काळातील व भविष्यातील जग बघतो, तो पुरोगामी की मागासलेल्या जुन्या गोष्टींचा आग्रह धरतो तो प्रतिगामी? अर्थात मुद्दा नवेपणा वा यंत्राचा नाही. ज्यांना आपला पराभव पचवता येत नाही, त्यांचे हे दुखणे आहे. लोकांची मते घेऊन मिळवलेल्या जागा व बळ कुणाच्याही खात्यात परस्पर फ़िरवू, अशी मक्तेदारी ज्यांची आहे, त्यांना यंत्राने आपली मक्तेदारी हिसकावून घेतली अशी भिती भेडसावते आहे. वास्तवात असे काहीही झालेले नाही. केजरीवालना २०१५ च्या विधानसभेत अपुर्व मते मिळाली, तेव्हा यंत्राची शंका आलेली नव्हती. मायावतींनाही २००७ च्या मोठ्या विजयात यंत्राची लबाडी दिसली नाही. मतदाराने यंत्राच्या मतदानातून तीच मक्तेदारी हिसकावून घेतल्यामुळे हे लोक विचलीत झाले आहेत. पण गोवा मणिपूरपासून राज्यातल्या जिल्हा परिषदेपर्यंत प्रत्येकाने यंत्राच्या गफ़लतीलाही लाजवणार्‍या खेळी केल्या. त्याची मात्र कुणालाच शरम वाटलेली नाही.

No comments:

Post a Comment