Monday, March 27, 2017

पुरोगामीत्व की नोकरी?

yogi के लिए चित्र परिणाम

मंगळवारी उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत आलेले होते. तिथे राष्ट्रपती व पंतप्रधानांची भेट त्यांनी घेतली आणि भाजपाच्याही अनेक मान्यवर नेत्यांशी त्यांची भेटगाठ झाली. तेच निमीत्त धरून भाजपाचे एक नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रिम कोर्टात हालचाल केली. अयोध्येतील रामजन्मभूमी येथील भव्य मंदिराची उभारणी लौकरच सुरू करणार, असे स्वामी दोन वर्षे बोलत आहेत. आता केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्याने त्याला वेग येईल, अशी अनेकांची अपेक्षा आहे. पण हे प्रकरण न्यायायलात अडकलेले असल्याने, परस्पर सरकार त्याविषयी काही हालचाल करू शकत नाही. स्वामींनाही ते नेमके कळते. म्हणूनच त्यांनी या विषयात कोर्टाच्या बाहेर समजुतीने हा विषय निकालात काढण्यास कोर्टाने संमती देण्याचा अर्ज केला होता. त्याच अर्जाची सुनावणी आदित्यनाथ दिल्लीत आले असताना झाली आणि तात्काळ पुरोगामी मंडळींना फ़ेफ़रे आले. गल्लीबोळातले तमाम पुरोगामी त्यावरून उलटसुलट प्रतिक्रीया देऊ लागले. त्यापैकीच एका वाहिनीची पत्रकार अयोध्येत जाऊन पोहोचली व तिथल्या लोकांना काय हवे आहे, असले प्रश्न विचारू लागली. अर्थातच हा विषय खुप जुना आहे, त्यामुळेच त्यावर कसा प्रश्न विचारला जातो, त्यानुसार उत्तर मिळत असते. उदाहरणार्थ अयोध्येतील लोकांना काय हवे आहे? नोकरी की राममंदिर? असा प्रश्न विचारला, तर बहुसंख्य हिंदूही नोकरी वा रोजगार असेच उत्तर दिल्याशिवाय रहाणार नाही. तेच उत्तर मुस्लिमही देऊ शकतो. त्याच्या लेखी पडझड झालेल्या बाबरी मशिदीपेक्षाही रोजीरोटीचा सवाल अधिक प्राधान्याचा आहे. पण कुठल्याही मुस्लिम वस्तीत जाऊन असा प्रश्न विचारला जाणार नाही. असे प्रश्न हिंदूंना विचारून त्यांचा गोंधळ माजवला जातो. हाच प्रश्न थोडा वेगळ्या रचनेत विचारला गेला तर?

म्हणजे असे, की मागली पंचवीस वर्षे बाबरी व जन्मभूमीचा वाद भिजत घोंगडे होऊन पडलेला आहे आणि त्यावरून मनसोक्त राजकारण खेळले गेलेले आहे. त्यात मग नोकरी की राममंदिर असा प्रश्न विचारला जातो. त्याऐवजी लोकांना काय हवे आहे, पुरोगामीत्व की नोकरी? असाही प्रश्न विचारून बघावा. अगदी गुजरातमध्ये जिथे हजारो लोक दंगलीने बेघर झाले वा विस्थापित झाले, त्यांनाही असाच प्रश्न विचारून बघावा. त्यांना हिंदूत्वाची भिती वाटते, की भुकमरीची भिती सतावते? असा प्रश्न विचारला, तर ताबडतोब मुस्लिमही उपासमारीची भिती असल्याचेच सांगणार. मुस्लिम वस्तीत जाऊन त्याला सेक्युलर विचारसरणी हवी, की नोकरी असा प्रश्न विचारला तर कोणते उत्तर मिळेल? हे इतके उघड आहे, की प्रत्येक गरीबाला आपल्या पोटपाण्याची चिंता भेडसावत असते आणि धर्म वा राजकीय भूमिका हा भरल्या पोटाचाच विषय असतो. पण सेक्युकर विचारांचा पर्याय म्हणून कधी नोकरी वा उपासमार असा पर्याय दिला जात नाही. मंदिराचा विषय असला, मग मात्र नोकरीचा पर्याय दिला जातो. हीच गल्लत सतत पाव शतक चालू राहिली. पण नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारात त्याला नेमका शह दिला आणि लोकांचे लक्ष मंदिर वा धर्मावरून उडवून नोकरी व नित्य गरजांच्या बाजूला वळवले. लोकसभेच्या प्रचार मोहिमेत पाटणा येथे भव्य सभा होती आणि तिची सुरूवात होण्यापुर्वी तिथेच बॉम्बस्फ़ोट झाले. तेव्हा मोदींनी असाच एक सवाल विचारला होता? मुस्लिमांशी हिंदूंना लढायचे आहे की दोघांनी मिळून गरीबी व उपासमारीशी लढायचे आहे? त्याचे उत्तर मतदानातून लोकांनी दिलेले आहे. म्हणूनच चुकीचे प्रश्न विचारून लोकांची दिशाभुल करण्याचा जमाना संपलेला आहे. पण माध्यमात बसलेल्या दिवाळखोरांना अजून त्या समजुतीतून बाहेर पडायची हिंमत झालेली नाही. ते आजही पुरोगामी पोकळपणात दबा धरून बसलेले आहेत.

लोकांच्या जीवनात मंदिराला प्राधान्य नाही, हे नक्की आहे. मशिदीलाही तितकेच प्राधान्य नसते. मग बाबरी पडली त्यावरून इतके काहूर माजवण्याचे काय कारण होते? बाबरी पडली नसती वा पाडली गेली नसती, तर इतक्या कालावधीत लाखो लोकांना रोजगार मिळणार होता काय? किती हजार लोक कुठल्या आजार वा उपासमारीतून बचावले असते? नसतील तर बाबरीच्या नावाने इतका मातम करण्याची पुरोगाम्यांना तरी काय गरज होती? मंदिराचा विषय भाजपाने काढायला नको असेल, तर पुरोगामी म्हणवणार्‍यांनीही तितक्याच अगत्याने बाबरीसाठीचे रडगाणे बंद केले पाहिजे. बाबरी पाडली जाणे आणि अन्य कुठे मोठा घातपात अपघात घडणे, यात फ़रक नसतो. काही लोकांनी एक जिर्णावस्थेतील सांगाडा पाडला. त्यामुळे कुठल्याही गरीब भुकेल्या मुस्लिमाच्या जीवनात काडीमात्र फ़रक पडला नव्हता. पण देशातल्या तमाम मुस्लिमांचे जीवनच उध्वस्त होऊन गेल्यासारखा गळा काढला गेला आणि त्यावरून रणकंदन माजवले गेले. त्यात पुढाकार घेणारे कोण होते? सगळेच्या सगळे पुरोगामीच त्यात होते ना? तेव्हा कोणाला नोकरी वा उपासमारी जीवनातील प्राधान्याचा विषय असल्याचे स्मरण झालेले नव्हते. तेव्हा बाबरी महत्वाची होती. कारण त्यातून मुस्लिमांच्या भावनांना हात घालून मतांचे गठ्ठे मिळवता येणार होते. सहाजिकच सोयीसाठी गरीबाच्या जीवनाशी संबंध नसलेल्या बाबरी मशिदीचे कोडकौतुक करण्यात आले. तितक्याच आवेशात तिथे मंदिर बांधण्याला विरोध उभा करण्यात आला. कारण पुरोगामी राजकारणाला गरीबी वा उपासमारीशी कुठले कर्तव्य नसून, त्यातून आपल्याला मते कशी मिळतील, इतकेच गणित मांडले जात असते. नोकरी, रोजगार की मंदिर या प्रश्नाची मांडणी आणखी एका वेगळ्या पद्धतीनेही कराता येईल. ज्यामुळे पुरोगामी खोटारडेपणा अधिक उलगडू शकतो.

समजा तिथे बाबरी पाडली गेल्यानंतर मंदिराची उभारणी झाली असती, तर किती मुस्लिमांच्या जीवनात संकट येणार होते? योगी आदित्यनाथ यांच्या मठामध्ये अनेक मुस्लिम काम करतात व तिथे दुकानेही चालवतात. त्यांना तिथल्या हिंदूत्वाची बाधा होत नाही. अयोध्येत भव्य मंदिराचे निर्माण झाल्यास जगभरच्या पर्यटक भक्तांची तिथे रिघ लागेल. सहाजिकच जे कोणी मुस्लिम अयोध्येत वास्तव्य करून आहेत, त्यांनाही त्याचा रोजगारासाठी लाभ होऊ शकेल. म्हणजेच त्यांच्या पोटापाण्यासाठी लाभच होणार आहे. तिथे जिर्ण झालेली मशिद टिकली असती, तर तितका लाभ नक्कीच मिळत नसता. मग भव्य मंदिराच्या उभारणीमुळे मिळणारा रोजगार हवा, की जुनीच मशीद हवी, असाही प्रश्न विचारता येऊ शकेल. पण तो कधी विचारला गेला नाही. मोदींनी राष्ट्रीय राजकारणात येताना अशा दिशाभूल करणार्‍या मांडणीलाच शह देऊन टाकला. सबका साथ सबका विकास, अशी घोषणा देऊन त्यांनी मुस्लिमांच्या गरजांना प्राधान्य असल्याचा संकेत सर्वदूर पाठवला. त्यातून मुस्लिमांना त्यांच्या खर्‍या गरजा व काल्पनिक अस्मितेला छेद दिला गेला. विकास हवा की पोकळ पुरोगामी बकवास हवी, असा प्रश्न उलट्या पद्धतीत मांडला गेला आणि देशात पुरोगामी नाटकाचे दिवाळे वाजण्यास आरंभ झाला. उत्तरप्रदेशात एकाही मुस्लिमाला उमेदवारी भाजपाने दिली नाही, तरी मुस्लिमांनी भाजपाला कशाला मते दिली, त्याचे उत्तर यातच दडलेले आहे. लोकांना मंदिर वा मशिदीच्या राजकारणात रस नाही आणि तशी भुरळ घालणार्‍या पुरोगामी राजकारणाचा जमाना संपलेला आहे. त्यामुळे हिंदूंची आता दिशाभूल होऊ शकत नाही, की मुस्लिमांचीही फ़सगत होणार नाही. अशा वादाच्या आगीवर आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा काळ संपलेला आहे. आदित्यनाथ हे त्याचेच प्रतिक आहे. तो उत्तरप्रदेशला गुजरातच्या मार्गाने घेऊन जाणार आहे.

1 comment: