Tuesday, May 9, 2017

काश्मिरी इंतेफ़ादाची गोष्ट

 (हा फ़ोटो पॅलेस्टाईनचा आहे)

palestine violence के लिए चित्र परिणाम

गेल्या दहाबारा वर्षात हळुहळू काश्मिरचा कधी पॅलेस्टाईन होऊन गेला, तेच आपल्या लक्षात आलेले नाही. वीसपंचवीस वर्षापुर्वीचे पॅलेस्टाईनचे फ़ोटो कुठे मिळाले तर मुद्दाम शोधून बारकाईने तपासा. मग त्याची प्रचिती येईल. यापुर्वी निदान काश्मिरमध्ये हुर्रीयत व फ़ुटीरवादी निवडणूकीवर बहिष्कार वा अधूनमधून सार्वत्रिक बंदचे आवाहन करीत. पण कुठे लष्करावर हल्ले झाले किंवा दगडफ़ेक झाली, असे प्रसंग चारपाच वर्षापुर्वीही आपल्याला बघायला ऐकायला मिळत नव्हते. पण आजकाल असे प्रसंग वारंवार घडू लागलेले आहेत. त्याची कार्यप्रणाली म्हणूनच तपासून बघता येईल. पॅलेस्टाईनच्या राजकारणात ज्याला चार दशकापुर्वी इंतेफ़ादा असे नाव दिले गेले त्याची ही भारतीय पुनरावृत्ती आहे. म्हणजे असे, की काही पॅलेस्टाईनी शांततेचे नाटक रंगवणार आणि इस्त्रायलच्या भागात रोजंदारीसाठी जाणार. त्यापैकी कोणी तिथे घातपात करणार. मग त्याला पकडले वा गोळी लागून मारला गेला, तर धुमाकुळ सुरू करायचा. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे युद्ध छेडले जात असे. म्हणजे असे, की अशा घटना घडल्या, मग बाजूचा लेबेनॉन तोच मुहूर्त साधून इस्त्रायलवर हल्ले सुरू करायचा. युद्धाची स्थिती निर्माण करायचा. म्हणजे पॅलेस्टाईनचा पश्चीम किनारा व बाजूच्या अरब राष्ट्राकडून एकाच वेळी इस्त्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू व्हायचे. एकीकडे लेबेनॉन सशस्त्र हल्ले करणार आणि पॅलेस्टाईनचे तरूण किरकोळ बॉम्ब वा दगडफ़ेकीने इस्त्रायली सेनेवर हल्ले करणार. मग जगभरच्या पुरोगामी माध्यमांनी त्याचा हलकल्लोळ करून टाकायचा. पॅलेस्टाईनमध्ये कसे निरपराध नागरिक मारले जात आहेत, त्यावरून मानवतावादी संघटनांनी रान उठवायचे. ही एक मोडस ऑपरेन्डी बनून गेलेली होती. आजकाल पाकिस्तानी सेना व काश्मिरातूल फ़ुटीरवादी तशीच काहीशी रणानिती संयुक्तपणे राबवित आहेत.

या संदर्भात ज्यांना अधिक तपशील हवा असेल, त्यांनी इंटरनेटवर इंतेफ़ादा शब्दाचा शोध घेऊन तपशील मुद्दाम वाचले पाहिजेत. काही फ़ुटीरवादी जिहादी नेमका तोच शब्द काश्मिरातही वापरत असतात. कारण स्पष्ट आहे. आता तीच रणनिती योजनाबद्ध रितीने इथेही वापरली जात आहे. मग त्यावरून काहुर माजले, की भारतातले मानवतावादी पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून टुमणे लावणार. किंवा काश्मिरात सैनिकी कारवाईत बळी पडलेल्यांचे उदात्तीकरण करणार. फ़ारूख अब्दुल्ला यांची भाषा व पॅलेस्टाईनचे नंतर अध्यक्ष झालेले यासर अराफ़त यांची भाषा किती जुळतीमिळती आहे, त्याचाही जिज्ञासूंनी अभ्यास करायला हरकत नाही. आज काश्मिरात काय चालले आहे, त्याची ओळख इंतेफ़ादा समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. इंतेफ़ादा ही रणनिती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनिती आहे. यात प्रत्येक पात्राला त्याची भूमिका ठरवून दिलेली आहे. त्यात दिर्घकाळ जिहादी घातपाताचे कृत्य करण्यासाठीच प्रसिद्ध असलेल्या यासर अराफ़त, यांच्याशी इस्त्रायलने बोलणी केली आणि त्यांच्या पॅलेस्टाईन प्रदेशाला स्वायत्त म्हणून मान्यता दिली. पण अशा स्वायत्ततेला आपले सैन्य उभारण्यास मोकळीक दिलेली नव्हती. आपल्या काश्मिरात यापेक्षा काहीही वेगळे नाही. पण आपल्यावरचा जिहादी कलंक पुसला गेल्यावर आराफ़त यांनी, आडोश्याने अन्य जिहादी पुढे करून तोच उद्योग चालू ठेवला होता. आराफ़त त्यात सक्रीय नव्हते. पण जे कोणी घातपात करीत होते, त्या हमास संघटनेच्या हिंसाचाराला पाठीशी घालत, त्याचे उदात्तीकरण आराफ़तच करीत होते. आज फ़ारूख अब्दुल्ला काय वेगळे करीत आहेत? हा सगळाच संगनमताने चाललेला तमाशा नाही काय?

फ़रक इतकाच आहे, की इस्त्रायल अन्य कुठल्या मानवतावादी संघटना वा त्यांच्या जागतिक नेत्यांना दाद देत नाही. हल्ले वा घातपात झाले, मग इस्त्रायली सेना लगेच प्रतिहल्ला चढवते आणि युद्धपातळीवर परिस्थिती हाताळू लागते. त्यात पॅलेस्टाईन भागातून जिथे कुठे घातपाती अड्डे आहेत, त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागून विध्वंसक प्रतिहल्ला केला जातो. जिथे सैनिकी कारवाईत निदर्शक म्हणून दगडफ़ेके समोर येतात, त्यांना घातपाती ठरवून गोळीबारही केला जातो. त्याचवेळी पॅलेस्टाईनचे नेते म्हणून पोपटपंची करणार्‍यांनाही आपल्या घरातून बाहेर पडता येणार नाही, इतका हलकल्लोळ त्याही भागात केला जातो. एकदा तर आराफ़त यांचे वास्तव्य असलेल्या कंपाऊंडवरही बॉम्बफ़ेक करण्यात आली होती. काही दिवस त्यांना काळोखात काढावे लागले होते. तिसरी आघाडी लेबेनॉनसारखे शेजारी लढवत असतात. उघडपणे लेनेनॉन कधी इस्त्रायलशी लढाईत उतरत नाही. पण तिथे हिजबुल्ला नामक जिहादी संघटना आहे, तिच्यामार्फ़त इस्त्रायलवर सैनिकी हल्ले केले जातात. आपल्याकडे काश्मिरात तोयबा वा मुजाहिदीन नावाने तसेच हल्ले पाकभूमीत बसलेले पाक सैनिक करीत असतात. हा सगळा प्रकार अगदी लेबेनॉनसारखा आहे. उरी येथे असा हल्ला झाल्यावर आपण त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले होते. त्याचे आपल्याला मोठेच कौतुक आहे. पण असे प्रतिहल्ले इस्त्रायल इतके खोलवर करते, की त्यानंतर अनेक महिने लेबेनॉनच्या हिजबुल्ला संघटनेला डोकेही वर काढता येत नाही. हवाई हल्ले व क्षेपणास्त्रे सोडून इस्त्रायलने अनेकदा लेबेनॉन बेचिराख करून टाकला आहे. त्यात शेकड्यांनी नागरिकही मारले गेले आहेत आणि सैनिक तर त्याहूनही अधिक मारले जातात. असे होऊ लागले, मग जागतिक नेते मध्यस्थी करतात आणि इस्त्रायलही युद्ध संपल्याची घोषणा करून टाकतो. पण केव्हा?

इस्त्रायलची ही रणनिती आपण गंभीरपणे अभ्यासली पाहिजे. एकदा असा इंतेफ़ादा सुरू झाला, मग इस्त्रायल सर्व पातळीवर आणि सर्वच आघाड्यांवर युद्धाचा पवित्रा घेऊन टाकते. त्यात जागतिक नेत्यांनी हस्तक्षेप करण्यापर्यंत एकदोन आठवड्याचा कालावधी निघून जातो. परिणाम असा होतो, की इस्त्रायलच्या सीमेपलिकडचा प्रदेश पुर्णपणे होरपळून निघतो. शेकड्यांनी लोक जखमी होतात, तितकेच मारले जातात. हजारो घरे व इमारती जमिनदोस्त होऊन जातात. सहाजिकच अशा नागरी वस्तीत आडोसा घेऊन बसलेल्या हिजबुल्ला वा अरबी सेनेचा कणा पुर्णपणे मोडून काढला जातो. त्यांनी कष्टपुर्वक उभारलेली गनिमी युद्धाची रचना व सामुग्री अशी उध्वस्त करून टाकली जाते, की इस्त्रायल कितीही गाफ़ील राहिला तरी पुढले कित्येक महिने कुणाही जिहादीला कुरापत काढणेही अशक्य होऊन जाते. भूकंपातून सावरासावर करावी, तशी त्यांची दुर्दशा होऊन जाते. जिहादी लढवय्ये सोडाच. त्यांचे पालनपोषण करणारी कुटुंबे व वस्त्याही पुरत्या नष्ट होऊन जातात. त्यातून अगोदर नित्यनेमाने जगण्याच्या सुविधा पुन्हा उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. नागरी जीवन रुळावर आल्याखेरीज इस्त्रायलची कुरापत काढण्याचा विचार इंतेफ़ादा पुकारलेल्यांच्या मनात येऊ शकत नाही. सहाजिकच वर्ष दिडवर्ष इस्त्रायलला शांततापुर्ण जीवन जगत येते. मग तो कालावधी उलटला, की पुन्हा पॅलेस्टाईनी व लेबेनॉनच्या हिजबुल्लाला लढायची खुमखुमी येते. पुन्हा इंतेफ़ादा सुरू होतो. पुन्हा इस्त्रायल आधीच्याच रणनितीचा अवलंब करते. हा घटनाक्रम आता जगाच्याही अंगवळणी पडला आहे. हळुहळू भारतालाही काश्मिर व पाकिस्तानातील त्यांच्या पाठीराख्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी इस्त्रायली युद्धनितीचाच अवलंब करावा लागणार आहे. कारण आपण ज्याला आझादीची लढाई समजून बसलो आहोत, तो प्रत्यक्षात काश्मिरातील पॅलेस्टाईनी इंतेफ़ादाच आहे.


1 comment:

  1. भाऊ, तुम्ही जो उपाय सांगितला आहे तो मात्र चुकीचा वाटतो. (म्हणजे चढाई करून कायमचा निकाल ईस्राएलला लावता येत नाही) ईस्राएल व अरब राष्ट्रे यातील इतिहास वेगळा आहे - काही शतके तरी अरबी जनता तेथे वास्तव्य करत होती/आहे व पाश्चत्य देशांनी ज्यू लोकांना त्याच्या मूळस्थानी शेकडो वर्षांनी एकत्र आणून ईस्राएलची निर्मिती केली. त्यांचे कणखर नेतृत्व व राष्ट्राभिमान यामुळे मात्र ते राष्ट्र अरबांना पुरून उरले आहे.

    काश्मिर ही खरे तर कश्यप भूमी आहे - शारदा देवीचे मंदिर व इतर अनेक पवित्र स्थाने असलेली ही भूमी पण हळू हळू मुसलमान वस्ती वाढत गेली तरीही राजा हिंदूच होता ज्याने अखेर विलीनीकरणाला मान्यता दिली व सरदार पटेलांमुळे निदान काश्मीर अधिकृतरीत्या भारताचा राहिला.

    इथे काश्मिर मध्ये अक्षरश: एका रात्रीत ३ लाख हिंदू पंडितांना पळवून लावले (त्यापूर्वी नेहरू आदींनी घोळ घालून शेख व नंतर फारुख अब्दुल्ला व त्याचे पोरटे याना अवास्तव महत्व देऊन सत्ता देऊ केली) फुटीरतावादी नेत्यांना फार विरोध न करता (उलट त्यांचे अति लाड केले) त्यांचे महत्व विनाकारण वाढविले-त्यांचा आर्थिक पुरवठा अडविला नाही व सैन्य व पोलीस याना पूर्ण मोकळीक न देता तेथील आंदोलने अधिकाधिक हिंसक होऊ दिली - या सगळ्याचा परिणाम आजचा काश्मिर असा हातातून गेल्यासारखा झाला आहे.

    तर मूळ मुद्दा हा आहे कि काश्मिर हा भारताचा पुरातन काळापासून अविभाज्य भाग आहे - तसाच पाकिस्तानही कृत्रिम देश निर्माण केले गेलेला आहे - त्यामुळे इथे उपाय एकच - तो म्हणजे हे 'कृत्रिम गळू' कायमचे नष्ट करायला हवे. आजवर कणखर नेतृत्वाअभावी हे कोणी केले नाही, एव्हढेच नव्हे तर ईस्राएल पुढाकार घेऊन पाकड्यांचा अणूबॉम्ब नष्ट करू पाहत होता त्याला रिफ्युएल ला सुद्धा परवानगी दिली नाही.

    पण आता भारताला नक्कीच तसे नेतृत्व मिळावे (आणि इतिहास पाहता मिळेलच) जे कायमचा उपाय अमलात आणतील आणि काळाची गरज हे अत्यंत त्वरेने व्हावे पण येत्या ४-५ वर्षात नक्की होईलच.

    ReplyDelete