Saturday, July 22, 2017

सास कभी बहू नही थी

indira sonia के लिए चित्र परिणाम

नॅशनल हेराल्ड खटल्याच्या बाबतीत खवळलेल्या कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी एक विधान केले होते. आपण इंदिरा गांधींची सुन आहोत आणि आपण कोणाला घाबरत नाही. खरेच घाबरण्याची काही गरज नाही. सत्य ज्याच्या पाठीशी ठामपणे उभे असते, त्याला कोणाला घाबरण्याचे काही कारण नसते. पण सासूची आठवण सोयीची असेल तिथे करूनही भागत नाही. इंदिराजींची सून म्हणून आपणही तितक्याच निर्भय असल्याचा दावा करणार्‍या सोनियांना, त्याच खटल्यात आपल्या सासूची हिंमत दाखवता आलेली नव्हती. साधे कोर्टाचे समन्स आले तर त्याला हजेरी लावून खटला लढवता आला असता. पण समन्स रद्द करून घेण्यासाठी सोनियांनी थेट हायकोर्ट व सुप्रिम कोर्टाचे दार ठोठावण्यापर्यंत पळापळ केलेली होती. शेवटी तिथे थप्पड खाऊन त्याच समन्सला हजेरी लावण्याची नामूष्की त्यांच्या पदरी आली होती. आज त्याच सूनबाई विरोधकांचे नेतृत्व करीत आहेत आणि १९८० सालात इंदिराजींनी जनता लाट कशी परतून दाखवली, तसा चमत्कार सूनबाई करतील, अशी अनेकांची अपेक्षा आहे. पण सूनबाई कितीही सासूबाईंचा हवाला देत असल्या, तरी त्यांच्यापाशी इंदिराजींच्या इतकी हिंमत वा धुर्तपणा नाही. कारण त्यांना सासूबाईने उपभोगलेली सत्ता व हुकूमत नक्की ठाऊक आहे. पण सासूबाईपाशी असलेला संयम मात्र या सुनेपाशी नाही. अन्यथा १९८० सालात सत्तेची चक्रे इंदिराजींनी कशी फ़िरवली, त्याचेच अनुकरण सूनेने केले असते. इंदिराजींनी तेव्हा कधीही संसद बंद पाडण्याचा आगावूपणा केला नाही. त्यांच्या संसदेतील नुसत्या उपस्थितीचाही जनता पक्षीयांना धाक होता. म्हणून पोटनिवडणूकीत निवडून आलेल्या इंदिराजींची निवड बहूमताने रद्द करण्यापर्यंत धावपळ जनतापक्षीयांनी केलेली होती. उलट आज सोनिया बिहारमधले महागठबंधन सरकार टिकवण्याची केविलवाणी धावपळ करीत आहेत.

१९७७ सालात कॉग्रेसचा दारूण पराभव झाला आणि त्यात इंदिराजींसह त्यांचा सुपुत्र संजय गांधीही बाजूच्या अमेठी मतदारसंघात पराभूत झाला होता. नंतर कॉग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांनाही इंदिराजींच्या नेतृत्व आणि करिष्म्याची शंका येऊ लागली होती. म्हणून त्यांना महत्वाच्या पदापासून दूर राखण्याचे डाव पक्षातही सुरू झालेले होते. पण त्याला बिचकून इंदिराजींनी अन्य कुणाची मदत मागितली नाही. आपल्या मूठभर निष्ठावंतांना सोबत घेऊन नव्या पक्षाची उभारणी केली. पुढल्या दोन वर्षात त्यांनी देशाचे राजकारण आमुलाग्र बदलून दाखवले होते. तो चमत्कार त्यांनी संसदेतील कामकाजाची कोंडी करून घडवला नव्हता, की युक्तीवादाने केला नव्हता. खरे तर इंदिराजी संसदेपासून पुर्णपणे दूर राहिल्या होत्या आणि त्यांनी सरळ जनतेला जाऊन भिडण्याची हिंमत दाखवलेली होती. ज्या जनतेने त्यांना झिडकारलेले होते, त्याच जनतेपर्यंत जाऊन हात जोडून माफ़ी मागण्याचे धाडस इंदिराजींपाशी होते. दुसरी गोष्ट त्यांनी संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा नकारात्मक कार्यक्रम केला नाही. त्यापेक्षा जनता सरकारला कुठलाही त्रास होणार नाही, अशी भूमिका घेतलेली होती. लोकांनी जनता सरकारला कौल दिला आहे आणि म्हणूऩच हे सरकार पुर्ण पाच वर्षे चालेल, अशी ग्वाही इंदिराजी देत होत्या. सहाजिकच जनता पक्षातील नेते बाहेरचा धोका नसल्याने निश्चींत झाले होते आणि आपसातले मतभेद उकरून एकमेकांच्या उरावर बसू लागलेले होते. परिणामी जनता सरकारच्या चुका होऊ लागल्या आणि कारभाराचा पुरता बोजवारा उडून गेला होता. इंदिराजींची तीच अपेक्षा होती. त्या सरकारला अपयशी होऊ दिले, तरच जनता त्यांच्यापासून दुरावेल आणि आपल्याकडे भक्कम सरकारसाठी येईल, अशी त्यांना खात्री होती. झालेही नेमके तसे. अडीच वर्षात जनता पक्षाच्या नेत्यांनी इतका घोळ घातला, की लोकसभाच बरखास्त करण्याची पाळी आली.

इंदिराजी सरकार पाडणार नाहीत अशी खात्री झालेल्या जनता पक्षातील नेते आपसात भांडू लागले आणि त्यांच्यात फ़ाटाफ़ूट झाली. तशीच कॉग्रेस पक्षातही फ़ुट पडलेली होती. अशा दोन फ़ुटलेल्या गटांनी एकत्र येऊन नवे सरकार स्थापन करायचे ठरवले, तर इंदिराजींनी आपल्या गटाचा पाठींबाही चरणसिंग यांना पंतप्रधान होण्यासाठी दिला. पण काही महिन्यांनी जेव्हा लोकसभेचे अधिवेशन आले, तेव्हापर्यंत इंदिराजी गप्प होत्या. जेव्हा अधिवेशनाचा दिवस आला तेव्हाच त्यांनी आपला हुकूमाचा पत्ता बाहेर काढला. आपण चरणसिंग यांना सरकार बनवण्यासाठी पाठींबा दिला होता, सरकार चालवण्यासाठी नव्हे, अशी भूमिका जाहिर करून त्यांनी त्या सरकारला राजिनामा देण्यास भाग पाडले. परिणामी लोकसभेच्या निवडणूका दोन वर्षे आधीच झाल्या. पण अशी स्थिती निर्माण करण्याचे सर्व डावपेच इंदिराजी खेळल्या होत्या. त्यांनी संयम आणि मौन धारण करून जनता पक्षाला मोकाट वागू दिले होते. चुकण्यासाठी सरकार चालवू दिले होते. गोंधळ घालण्याची मोकळीक दिली होती. आजच्या मोदी सरकारला तितकी सुविधा इंदिराजींच्या सुनेने दिली आहे काय? मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्याला चुका करण्याची कुठलीही मोकळीक सोनियांच्या कॉग्रेसने दिलेली नाही. सहाजिकच ज्यामुळे मोदींपासून सामान्य जनता दुरावेल, अशी कुठलीही स्थिती निर्माण होऊ शकलेली नाही. परिक्षेला बसलेल्या पोराला समोर उभे राहून त्याच्या प्रत्येक उत्तरातील चुक शोधून दुरूस्त करायला लावणारा पर्यवेक्षक हजर असेल, तर पोर नापास व्हायचे कसे? मागल्या तीन वर्षात मोदी सरकारला सोनियांच्या आक्रमक धोरणाने सतत सावध राखलेले आहे. पण दुसरीकडे इंदिराजी जशा जनतेला जाऊन भिडल्या होत्या, तसे सोनिया वा त्यांचे सुपुत्र काहीही करू शकलेले नाहीत. उलट आजही सत्ता उपभोगताना सवड काढून मोदी सतत जनतेच्या संपर्कात आहेत.

सासू व सुनेतला हा मोठा फ़रक आहे. इंदिराजी म्हणजे सासूंचेही चमचे तोंडपुजे होते. पण त्यांच्या भरवशावर इंदिराजींनी कधी राजकारण केले नाही वा डावपेच खेळले नव्हते. त्यांनी पक्षाचे नेते किंवा तथाकथित सल्लागारांपेक्षा सामान्य जनतेच्या भावनांवर स्वार होण्यात धन्यता मानली. कुठल्याही विपरीत प्रसंगी लोकांमध्ये जायचे आणि त्यांची मदत मागायची, हा सासूचा खाक्या होता. तर सूनबाई आपल्या गोतावळ्याच्या बाहेर पडून आपल्या डोळ्यांनी जग बघू शकलेल्या नाहीत. त्यांनी सरकारला चुका करण्याची मोकळीक दिलेली नाही, की संसदेबाहेरच्या जनता राजकारणाला प्राधान्य दिलेले नाही. नित्यनेमाने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलून जनतेला थेट जाऊन भिडण्याचा प्रयत्नही केलेला नाही. त्यांचे सुपुत्र जनतेपर्यंत जाण्याचा खेळ नित्यनेमाने करीत असतात. पण ते काय बरळतात, त्याचा सामान्य माणसाला थांगही लागत नाही. सहाजिकच तोही प्रांत नरेंद्र मोदींसाठी सुनेने मोकळाच ठेवलेला आहे. आपल्या सासूची हुकूमत सोनियांनी बघितली. पण त्यामागचा धुर्तपणा किंवा सुक्ष्म बारकावे कधी जाणले नाहीत. कारण त्यांची सासूबाई इंदिराजी कधीच सून नव्हत्या. त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या वाट्याला कधी सासुरवास आल्याचे कोणी ऐकले नाही. वाड्राच्या सासुबाईना एक ठाऊक नाही, की त्या कधीतरी सुनबाई होत्या. पण त्यांची सास कधीच बहू नव्हती. तिने आपल्या पित्याच्याही पुण्याईवर जगायचा दळभद्रीपणा केला नाही. राजकारणात आपल्याला मिळालेल्या किरकोळ संधीचा लाभ उठवित भल्याभल्यांना सुरूंग लावून आपल्या भवितव्याची पायाभरणी केली. प्रसंगी आपल्याच मस्तवाल सहकार्‍यांना नेस्तनाबूत करून हेतू साधण्य़ाचा जुगार खेळण्याची हिंमत त्यांच्यात होती. कारण इंदिराजी कधी सुनबाई नव्हत्या किंवा सासुबाईही नव्हत्या. त्या निव्वळ राजकीय नेत्या होत्या. म्हणूनच आपल्याहून समर्थ पुरूषांनाही नामोहरम करून विजय संपादन करत गेल्या.

3 comments:

  1. भूसंपादनविधेयकावेळी मोदी सरकारची प्रतिमा राहुलने सुटबुटकी सरकारवाली अशी केली होती व ती तशी झालीपन होती त्याचा फटका बिहारमध्ये बसला.पन चाणाक्ष मोदीजी लगेच सावध झाले व उज्वला योजना आणली निवडनुक लागलेल्या युपी मध्ये जोरात राबविली.आता तर मोदीजी व शहा प्रत्येक सभेत ये गरीबोंकी सरकार है ची टेप वाजवतात ही सर्व राहुल कृपा.नावाचा सुट घातला तर एवढ बोलायची काय गरज होती?

    ReplyDelete
    Replies
    1. साहजिकच आहे
      जुन्या पंतप्रधानचा रिमोट कंन्ट्रोल असून फाटका खिसा आहे त्याचा
      नवे पंतप्रधान सुट घालतात ???
      कसं बघवेल त्याला ???

      Delete
  2. There is an issue going on efficiency and supply of arms please comment

    ReplyDelete