Thursday, April 12, 2018

सहानुभुतीचे मुखवटे गळून पडले

वर्षे पाच उलटून गेलीत. मुली महिला बदलतात, आरोपी बदलतात. पण गुन्हा तोच तसाच असतो. सारवासारव करणारे व न्यायाच्या गप्पा मारणार्‍यांच्या बाजू बदलतात. आपण हळुहळू बेशरम लोकांचा अब्रुदार देश होत चाललो आहोत. म्हणून पाच वर्षापुर्वीच्या जखमेवरची खपली काढावी लागते आहे. (मुळ लेख पाच वर्षे जुना आहे).
child rape के लिए इमेज परिणाम


    दिल्लीतल्या सामुहिक बलात्कारानंतर देशभर एक वादळ उठले होते. प्रत्येकजण महिलांच्या स्वातंत्र्य, सुरक्षा व हक्कासाठीचा लढवय्या असल्याच्या आवेशात बोलत लिहित होता. अगदी आंदोलनात उतरलेला होता. एका बाजूला हे होते, तर गेल्या वर्षी आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ने स्त्रीभ्रुणू हत्याच्या विषयावर आरोळी ठोकल्यावर सर्वत्र लेक वाचवा अभियानाला जोश चढला होता. हा आवेश किती खरा आणि किती दिखावू असतो? कुठल्याही बाबतीतले पाखंड किंवा थोतांड उघडे पाडण्यासाठीच जणू खलनायकाला अवतार घ्यावा लागतो, असे मला कधीकधी वाटते. आपल्याकडे दशावताराची कल्पना पिढ्यानुपिढ्या सांगितली गेलेली आहे. त्यात कोणीतरी असूर खुपच मस्तवाल होतो आणि त्याला संपवणे देवांसहित मानवालाही अशक्य होऊन बसते. तेव्हा तो विष्णू म्हणे अवतार घेतो. त्याचा अवतार केवळ त्या पापी व अन्याय अत्याचार माजवणार्‍याचे निर्दालन करण्यासाठीच असतो वा असायचा. मला नेहमी हे कुतूहल राहिलेले आहे, की त्यासाठी अवतार घेऊन त्या संकटाचे निवारण करणारा तो विष्णू; मुळात असे संकटच का येऊ देतो? म्हणजे त्याचा अवतार घेण्याची पाळीच का येऊ देतो? जणू त्याचा अवतार व्हावा म्हणूनच ते असूर माजतात. त्याचीही काही गोष्ट आहेच. कुणाला दहा जन्म पृथ्वीतलावर घ्यावे लागतील असा शाप मिळतो आणि बदल्यात उ:शाप म्हणून त्यांनी विष्णूकडूनच नि:पात होण्याचे वरदान मिळवलेले असते. पण त्यातून एक मुद्दा साफ़ होतो, की देवाच्या अवतारासाठी आधी अन्याय अत्याचार करणार्‍या असूराला अवतार घ्यावाच लागत असतो. ‘असूराचे अवतारकार्य’ ही देवाच्या अवतारासाठी जणू पुर्वअटच असते. आता असे काही सांगितले, मग ह्या सगळ्या भाकडकथा आहेत म्हणून नाक मुरडले जाणार याची मला पुर्ण खात्री आहे. पण त्यातले भाकड तर्कशुन्य तपशील बाजूला ठेवून आपण त्यातल्या गाभ्याकडे वळलो तर? त्यातले सुत्र शोधून त्याचा मागोवा घेतला तर?

   प्रत्येक प्रेषित वा कुणा देव महाअवताराचे आगमन मुळात कुणाच्या पाप-अत्याचाराच्या पोषक भूमीशिवाय होत नाही; असाच त्याचा अर्थ नाही काय? मग याच पार्श्वभूमीवर अलिकडल्या काही घटना व त्यावरील सार्वत्रिक प्रतिक्रिया, युक्तीवाद तपासून पाहिले, तर आपण स्वत:ला महान शुद्ध चारित्र्याचे पुण्यवंत वा सभ्य सुसंस्कृत समजतो, त्यांचे वर्तन कसे असते? आपण पक्के दांभिक नसतो का? आज लक्ष्मण माने यांचे नाव गाजते आहे. कोणीही उठून त्यांच्यावर दुगाण्या झाडून आपल्या पावन चारित्र्याची ग्वाही द्यायला मोकळा आहे. काही महिन्यांपुर्वी आपण असेच मोहन भागवत, अनिरुद्ध बापू, आसाराम बापू किंवा त्या दिल्लीतल्या सामुहिक बलात्कारातल्या आरोपींवर दुगाण्या झाडून आपले पुण्य सिद्ध करत होतो ना? थोडाफ़ार शब्दांचा किंवा त्यातल्या व्यक्तीविशेषांचा फ़रक असेल. पण एकूण बघता, कोणावर तरी पापाचे खापर फ़ोडण्याच्या स्पर्धेतले आपण स्पर्धक असतो. कितीजण हे नाकारू शकतील? त्यामुळेच की काय; असे जेव्हा काही घडते तेव्हा आपण हिरीरीने पुढे येतो, ते आपली जबाबदारी झटकण्यासाठीच; असे मला अनेकदा प्रामाणिकपणे वाटते. घडलेल्या कृत्याला व पापाला आपण जबाबदार नाही, हे सांगायची व त्यापासून पळायची ती सगळी केविलवाणी धडपड असते. मग त्याच निकषावर सुसंस्कृत लोकसंख्येची विभागणी होत असते. काहीजण घडले ते पापच नाही अशा बाजूने उभे ठाकतात, तर काहीजण घोर कृत्य घडल्याचे दावे हिरीरीने करू लागतात. तर ज्यांना कुठल्याही बाबतीत घोंगडे गळ्यात नको असते, असे उर्वरित सुसंस्कृत कायद्याने काय ते ठरू द्यात, अशी पळवाट शोधून अंग चोरतात. आणि त्यांच्या पलिकडला मोठा अडाणी, अज्ञानी समाज हा सगळा तमाशा अचंबित होऊन बघत असतो. मग त्याला वाटू लागते; आता देवालाच अवतार घेऊन काही करायला हवे. अन्यथा यातून काही उपाय नाही.

   दिल्लीत जेव्हा त्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आणि काहूर माजले तेव्हा त्या विरोधात उमटलेला आवाज एकमुखी नव्हता ते मानावेच लागेल. त्यात एक नाराजीचा सुरही होता. खैरलांजी वा कुठल्या खेड्यात गरीब मुली महिलांवर असाच अत्याचार होतो; तेव्हा हा शहरी, उच्चभ्रू, सुखवस्तू समाज झोपाच काढत असतो ना? ती तक्रार चुक म्हणता येणार नाही. ती वस्तुस्थितीच आहे. पण जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा तरी पिडीत गरीबांच्या न्यायासाठी ते आधीचे नाराज तरी एका सुरात बोलतात काय? आज लक्ष्मण माने प्रकरणात जेव्हा खर्‍याच गरीब, गरजू पिडीत व दलित महिलांवर अत्याचार झाला आहे, तेव्हा गरीब पिडीतांचे तारणहार तरी एका सुरात बोलू शकले आहेत काय? भंडारा, खैरलांजी, सोनई (अहमदनगर) या घटनांनंतर उंचरवाने न्यायाच्या मागण्या करणार्‍यांची आजची भाषा कशी सावध झाली आहे? दुसरीकडे दिल्लीतल्या सामुहिक बलात्कारानंतर अहोरात्र होमहवन चालवावे, तसे बोलणारे का गप्प आहेत? अन्याय, अत्याचार वा महिलांचा न्याय याची चाड ही अशी परिस्थिती वा व्यक्ती, वर्गानुसार बदलत असते का? समतेच्या लढाईचे म्होरकेही त्यात तरतमभाव कसे करू लागतात ना? यातल्या महिलांचे जातपात वर्ग बाजूला ठेवून किंवा त्यातील संशयितांच्या सामाजिक प्रतिष्ठा, स्थान विसरून आपण अन्याय वा न्यायाचा विचारही करू शकत नाही; हेच आजचे जळजळीत सत्य आहे. ज्या आधारावर सामाजिक स्तरावर, जन्माधिष्ठीत अन्याय अत्याचाराचे गांभिर्य हजारो वर्षे तोलले व मापले गेले; त्याला आपण सामाजिक विषमता म्हणून नित्यनेमाने त्याचा धिक्कार करीत असतो. पण आज त्याचेच प्रत्यंतर येत असेल तर आपण समतेच्या शस्त्राची धार त्याच विषमतेवर घाव घालायला वापरू धजतो का? की जुन्याच मानसिकतेमध्ये त्यातला पिडीत कोण आणि गुन्हेगार कोण असे निकष वापरत असतो?

   आसाराम बापू वा मोहन भागवत हे टिंगलीचे विषय असल्याने कोणीही केव्हाही त्यांच्यावर कुठलाही आरोप करावा, त्याबद्दल शहनिशा करायची गरज नसते. डोळे झाकून त्यांच्यावरचे आरोप मान्य करीत त्यांना निंदेच्या शिक्षा बिनदिक्कत फ़र्मावल्या जात असतात. नंतर त्यातला फ़ोलपणा दाखवल्यावर माफ़ी मागणे वा चुक मान्य करणे, इतकीही सभ्यता न दाखवण्याला आजकालचा सुसंस्कृतपणा मानला जातो. भागवत विवाह संस्थेविषयी जे बोलले, त्याचा आपल्याकडून विपर्यास झाल्याची कबुली सागरिका घोष यांनी ट्विटरवरून एका वाक्यात दिली. मात्र तो विपर्यास चांगला तासभर वाहिनीवरून सविस्तर करण्यात आलेला होता. याला आजकाल सभ्यता म्हणतात. असे बिनदिक्कत बदमाशी व बेजबाबदार वागणे म्हणजे प्रतिष्ठीत असणे मानले जाते. दिल्लीच्या सामुहिक बलात्कारातले आरोपी निनावी होते आणि भंडारा सोनईचे गुन्हेगारही निनावीच आहेत. पण सातार्‍याचे गुन्हेगार पुरोगामी समतेच्या चळवळीतले आहेत, म्हणताच निकष बदलून जातात. आधीच्या प्रकरणात कोणीही केलेले आरोप विश्वसनीय असतात आणि नंतरच्या प्रकरणात कितीही विश्वसनीय आरोप असले तरी शंकास्पद ठरतात. सवाल त्यात कोण गुंतला असा नसून न्याय व अन्यायाचा असतो; याचाच आपल्याला विसर पडून गेला आहे. पिडीत कोण व आरोपी कोण, त्यांच्या वर्ग, जात व प्रतिष्ठा यानुसारच न्यायाचा निकष समतेच्या चळवळीतही आलेला आहे. आणि तो तसाच प्रस्थापित समाजातही चालुच आहे. मग समतेच्या सामाजिक चळवळीने कुठवर पल्ला गाठला आहे? जे त्या बंदिस्त वर्चस्ववादी तटबंदीला धडका देतात, त्यांना सामावून घेतले, मग अन्याय व वर्चस्वाला असलेले आव्हान निष्प्रभ करता येत असते. त्याच्याच अनुभवातून आपण जात नाही काय?

   सामान्य बलात्कारी, लक्ष्मण माने वा कोणी बापू वा प्रतिष्ठीत यांच्यावरील आरोपाकडे आपण तटस्थपणे बघू शकत नसू; तर आपल्याला त्याबाबतीत बोलायचा अधिकार उरतो काय? न्याय वा अन्यायाकडे आपण निरपेक्ष नजरेने बघूच शकणार नसू, तर समतेची लढाई लढवायची नैतिक क्षमता आपल्यात येणार कशी? शाहू, फ़ुले आंबेडकर अशा महापुरूषांची नावे नित्यनेमाने घेऊन समता येणार नसते. त्यांनी जसा आपपरभाव झुगारून समतेच्या संघर्षात स्वकीयांनाही आसुड ओढण्याचे धाड्स त्यांनी दाखवले, त्याचे अनुकरण करावे लागेल. नुसते समतेचे व चळवळीचे मुखवटे लावून वर्चस्ववादी व्यवस्थेत आपले स्थान निर्माण करायची चळवळ ही सामाजिक समतेची चळवळ होऊच शकत नाही. प्रत्यक्षात असे वळण घेतलेली आजची चळवळ त्या महापुरुषांच्या विचारांना उध्वस्त करण्याचे कारस्थान आहे. गेल्या आठवड्याभरात जे युक्तीवाद व प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या, त्यातून चळवळीची सुत्रे कशी समतेच्या शत्रूंच्या हाती गेलीत; त्याचेच प्रत्यंतर आले. त्यात कुठे कायद्याचा आदर नव्हता, न्यायाची चाड नव्हती, पिडीतांच्याविषयी आस्था नव्हती की समतेविषयी आच नव्हती. पहिले स्थान व रांगेत नंबर मिळवण्यासाठी झुंबड उडालेली असते; त्यातली अमानुषता मात्र अनुभवता आली. आपल्या स्त्रीविषयक, दलित, पिडीत सहानुभुतीचे मुखवटे त्यात गळून पडले. माने प्रकरण घडले नसते तर हेच मुखवटे शाबुत राहिले असते ना? 


(3 april 2013)

1 comment:

  1. Bhau iti is sheer unfortunate that you are forced to reprint the same column again, the worst part is Mr. Yogi Aditynatha has failed to take immediate action against MLS from his own party, and you already put comments in your yesterday’s column
    But then question comes why this mentality of ours, why we act like this, seating in AC rooms this society in general cannot do anything is the real naked truth

    ReplyDelete